प्रसिध्दीपेक्षा सिद्धीला महत्व देणाऱ्या साहित्य तपस्वी र .वा .दिघे म्हणजे रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म कल्याण येथे २५ मार्च १८९६ रोजी झाला. त्यादिवशी चैत्र शुध्द रामनवमी होती. त्यांचे वडील वामन गणेश दिघे आणि आई अन्नपूर्णा वामन दिघे यांनी हे बाळ म्हणजे प्रभू रामचंद्र यांची कृपा समजून त्यांचे नांव रघुनाथ ठेवले.
त्यांच्या वडिलांची फिरतीची नोकरी असल्यामुळे दिघे यांचे प्राथमिक शिक्षण खोपोली, कर्जत, चाळीसगाव येथे तर माध्यमिक शिक्षण जळगाव, सोलापूर, रत्नागिरी येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील डेक्कन कॉलेज मध्ये झाले. बी.ए.एल.एल.बी. झाल्यानंतर त्यांनी पुणे व पनवेल येथे सोळा वर्ष वकिली केली.
त्यांना शेती करण्याची आवड होती. रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे त्यांनी शेती करण्यास सुरवात केली. ते स्वतः शेतात राबत असत.
र .वा .दिघे यांची साहित्य सेवा
कवी ——- वयाच्या १३ वर्षी १९०९ साली त्यांनी “सानपाखर” ही पहिली कविता लिहिली. बालवयात त्यांनी अनेक कविता लिहिल्या होत्या. अभ्यास न करता कविता करतो असा त्यांच्या वडिलांचा समज झाल्यामुळे त्यांनी सर्व कविता फाडून टाकल्या. परंतु र.वा.दिघे यांची स्मरणशक्ती चांगली असल्याने त्यांनी अनेक वर्षानंतर त्या पुन्हा लिहून काढल्या. “गातात व नाचतात धरतीची लेकरे” हा त्यांचा लोकगीत संग्रह प्रकाशित झाला.
कादंबरी ——- कादंबरीकार म्हणून साहित्य क्षेत्रांत नावाजलेल्या दिघे यांच्या पाणकळा, सराई, वसंतराव आणी चाळीस चोर, निसर्ग कन्या रानजाई, गानलुब्धा, मृगनयना, आई आहे शेतात, पड रे पाण्या, कार्तिकी, सोनकी हया कादंबऱ्या प्रकाशित झाल्या परंतु हिरवा सण ही अपूर्ण राहिलेली कादंबरी त्यांचे मित्र ग.ल. ठोकळ यांनी लिहून पूर्ण केली.
कथा ——–
र .वा .दिघे यांनी अनेक कथा लिहिल्या .त्या विविध मासिकांत प्रसिध्द झाल्या. त्यानंतर पूर्तता, पावसाचं पाखरू, पांडुरंग कांती हे कथा संग्रह प्रकाशित झाले.
नाटके ———र .वा .दिघे नाटकांत फारसे रमले नसले तरी त्यांनी माझा साबुद आणी सिस्टर तारा ही दोन मराठी नाटके, “The Dream That Vanished” हे इंग्रजी नाटक लिहिले. त्यांपैकी मराठी नाटके प्रकाशित झाली परंतु इंग्रजी नाटक प्रकाशित झाले नाही.
चित्रपट —–
१ – मदहोश हा हिंदी चित्रपट “पाणकळा “कादंबरीवर आधारीत.
२ – बनवासी हा हिंदी चित्रपट “सराई” कादंबरीवर आधारीत.
३ – धरतीची लेकरे हा मराठी चित्रपट “आई आहे शेतात” कादंबरीवर आधारीत.
४ – कार्तिकी हा मराठी चित्रपट “कार्तिकी” कादंबरीवर आधारीत चित्रित झाले .
साहित्य क्षेत्रांतील योगदान
र .वा . दिघे यांच्या साहित्यातून महाराष्ट्राला अपरिचित असलेल्या भिल्ल , रामोशी , कातकरी , धनगर , ठाकूर या जमातींची , त्यांच्या संस्कृतीची , राहणीमानाची , स्वभावाची ओळख होते .सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन दिघे यांनी आपल्या कादंबऱ्यांतून समाज प्रबोधन करण्याचे प्रयत्न केले आहेत .दिघे यांनी ग्रामीण जीवनाचे व वन्य जीवनाचे चिंतन करून अक्षर वाड्:मय निर्माण केले आहे .ठाकूर , कातकरी व कामकरी अशा उपेक्षितांना आपल्या शब्दकलेतून अमर केले आहे .अनुभव घेणे , निरीक्षण करणे , त्याचबरोबर चिंतनशीलता हे गुण दिघे यांच्या अंगी होते. त्यामुळेच त्यांनी एकेका कादंबरीसाठी कित्येक वर्षे चिंतन केले . शोधायचे , भोगायचे , पचवायचे आणि मग लिहायचे हा दिघे यांच्या साहित्याचा गाभा होता .
प्रगतिशील शेतकरी
दिघे यांची रायगड जिल्यातील खोपोली येथे खूप जमीन होती . रायगड जिल्हयात गहू पिकत नाही परंतु दिघे यांनी आपल्या शेतात गव्हाचे पीक घेतले व नवीन नवीन प्रयोग केले त्यामुळे शासनातर्फे त्यांना “प्रगतिशील शेतकरी” पुरस्कार प्राप्त झाला होता .त्यांनी “पाणी आडवा , पाणी जिरवा ” ही मोहीम राबवणे गरजेचे आहे आणि शेतकऱ्यांनी शेताची निगा राखली नाही तर त्यांना आत्महत्या कराव्या लागतील असा इशारा साठ वर्षांपूर्वी दिला होता. परंतु त्याकडे शासनासह सर्व शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सध्या अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत .
दु:ख पचवून साहित्यात रमणारा माणूस
र .वा .दिघे यांचे पहिले लग्न झाले त्याला जेमतेम एक वर्षे झाले आणि बाळंतपणात पत्नी (पूर्वाश्रमीची रतन कामथे) यांचे व मुलीचे निधन झाले.
दिघे यांचे दुसरे लग्न झाले. दुसरी पत्नी लक्ष्मीबाई (पूर्वाश्रमीची यमुना पाटणे) ह्यांच्याशी झाला तरी संकटानी दिघे यांचा पिच्छा सोडला नाही. त्यांची उल्हास नावाची मुलगी हौदात पडून गेली .चौदा वर्षाची कृष्णा तापाने गेली. एक मुलगी मालती हिचे अपघाताने निधन झाले. त्यांचे जावई डॉ. वेलणकर यांचे काविळीने निधन झाले.
दिघे यांना दत्तात्रय , कृष्णा , उल्हास , शबरी , मुरार , वामन , मालू , कमल अशी आठ अपत्ये झाली. त्यांपैकी सध्या पुत्र वामन, कन्या कमल (सध्याची उर्मिला अशोक अवसरीकर) हयात आहेत. र .वा .दिघे यांच्यावर दु:खाचे डोंगर कोसळून सुध्दा त्यांच्या साहित्य सेवेत खंड पडला नाही.
प्राप्त झालेले सन्मान
१ – १९७१ साली अ .भा .चां.का .प्रभू समाजोन्नती परिषद ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती त्यात त्यांना चांदीचे तबक देऊन गौरवण्यात आले .
२- १९७७ साली चां.का .प्रभू सभा दादर या संस्थे तर्फे त्यांना सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आले .
३- बारावा महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव १९७४-७५ रोजी आयोजित करण्यात आला होता .त्यात “कार्तिकी चित्रपटाच्या ” उत्कृष्ट कथेबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले होते .
४- किर्लोस्कर मासिकाच्या सातशेव्या अंकानिमित्त १ में १९७८ रोजी आयोजित केलेल्या समारंभात दिघे यांना ताम्रपट देऊन सन्मानित करण्यात आले .
५- १९७० साली महात्मा गांधी जन्म शताब्दी निमित्त अमेरिकेतील इलिनॉईस विद्यापीठातर्फे नाटकांची जागतिक स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .त्यात जगातील १८७ देशांतील लेखकांनी भाग घेतला होता.त्यात र .वा .दिघे यांच्या The Dream That Vanished या नाटकाला सहावा क्रमांक प्राप्त झाला .
प्राप्त पारितोषिके
दिघे यांना १९४० साली “पाणकळा” या कादंबरीला तसेच १९४५ साली “रम्य रात्री” कादंबरीस पारितोषिक मिळाले .
दिघे यांना कशाचीच अपेक्षा नव्हती त्यामुळे जे मिळाले त्यात र .वा . दिघे समाधानी होते . अशा या साहित्य तपस्वी र .वा .दिघे यांनी ४ -७-१९८० जगाचा निरोप घेतला .खोपोली या त्यांच्या कर्मभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .
ते जरी देहरूपाने आपल्यात नसले तरी साहित्य रूपाने अजरामर झाले आहेत.
र .वा. दिघे यांचे शब्दरूपी “साहित्य शिल्प ” त्यांचे चिरंजीव श्री .वामन रघुनाथ दिघे यांनी वयाच्या ८० व्या वर्षी प्रकाशित केले आहे .त्यांनी वडिलांची साहित्य क्षेत्रांतील वाटचाल जवळून पाहिली आहे .त्यांना मिळालेला मान सन्मान तसेच त्यांचा झालेला अपमान याचे ते साक्षीदार आहेत . त्यांना वडिलांच्या बद्दल जबरदस्त अभिमान आहे .त्यांची हस्तलिखिते तसेच, कार्यक्रमाचे फोटो, त्यांना मिळालेले पुरस्कार व त्यासंदर्भातील पत्रव्यवहार त्यांनी जपून ठेवला आहे. या पुस्तकांत त्यांनी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे .
काही साहित्यिकांची जिवंतपणी फारशी दखल घेतली जात नाही परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांचा उदो उदो केला जातो परंतु याबाबतीत र .वा. दिघे अपवाद ठरले आहेत . शासनाने अथवा साहित्य संस्था यांनी र .वा. दिघे यांची फारशी दाखल घेतली नाही याबद्दल वामन दिघे यांना खंत वाटते .
पुढील पिढीला र .वा. दिघे यांच्या बद्दल खरी खरी व खात्री पूर्वक माहिती मिळावी यासाठी वामन दिघे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
१२० पानी पुस्तकात वामन दिघे यांनी स्वतःच्या शब्दांत र .वा. दिघे यांच्या साहित्य कारकिर्दीची माहिती दिली आहे . त्यांचे अप्रकाशित साहित्य, दुर्मिळ फोटो यांचा समावेश केला आहे. र .वा. दिघे यांच्या कन्या सौ .उर्मिला अवसरीकर तसेच स्नुषा ऊज्वला दिघे यांचे लेख तर आहेतच परंतु ४ जुलै १९८० रोजी र .वा. दिघे यांचे निधन झाल्यानंतर तसेच जन्म शताब्दी निमित आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित अनेक मान्यवरांनी विविध वृत्तपत्रात लिहिलेले लेख पुनः मुद्रित केले आहेत .त्याचप्रमाणे श्री गंगाधर गाडगीळ, श्री आनंद यादव, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, श्री मधुकर भावे, श्री बाबा कदम डॉ .माधव पोतदार इत्यादी साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंतांनी र .वा. दिघे यांच्या साहित्यावर दिलेल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यामुळे ह्या पुस्तकाचा दर्जा अधिक उंचावला आहे.
ऐके ठिकाणी मी एक वाक्य वाचले होते की “गवयाचे लहान मूल ताला सुरातच रडते” वामन दिघे यांचे हे पाहिले पुस्तक प्रकाशित होत असले तरी त्यांची तसेच त्यांच्या भगिनी सौ .उर्मिला अवसरीकर यांची लेखनशैली पहिल्या नंतर हे सिध्द होते की
साहित्यिकांच्या मुलाने आणी मुलीने चार ओळी जरी लिहिल्या तरी त्या दर्जेदार असतात .
वामन दिघे यांनी पुस्तकाची मांडणी आकर्षक तर केली आहेच परंतु लेखन करतांना शब्दांचा फापटपसारा न मांडता शब्दांचे भान ठेऊन लेख लिहिले आहेत .
वयाच्या ऐंशिव्या वर्षी पहिले पुस्तक प्रकाशित करून साहित्य दरबारात प्रवेश करणाऱ्या र .वा. दिघे यांच्या सुपुत्राला खुप खुप शुभेच्छा. ह्या पुस्तकाची किंमत अवघी दोनशे रुपए आहे .वाचकांनी वामन दिघे यांच्या मो .नं. ९४०४५८५४९९ वर संपर्क करून पुस्तक खरेदी करावे ही अपेक्षा.

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी. कर्जत-रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800