स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज; २८ मे रोजी जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी दिलेले विविधांगी योगदान सांगणारा हा विशेष लेख. स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन.
— संपादक
महान क्रांतिकारक, थोर विचारवंत, लेखक, नाटककार, कवी, पत्रकार, समाज सुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म दिनांक २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला. तर २३ दिवस प्रयोपवेशन करून त्यांनी दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबईत आत्मार्पण केले.
काळ जसजसा पुढे जात आहे, तसतसे सावरकरांचे विचार, कार्य यांची आपल्याला किती गरज आहे हे, तीव्रतेने जाणवत आहे. यामुळेच देशविदेशात सावरकर सम्मेलन आयोजित होत आहेत, ही अत्यंत आवश्यक आणि अभिमानाची बाब आहे. सुदैवाने २८ मे २०१७ रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर संमेलनास आणि २८ मे २०२० रोजी नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय सावरकर संमेलनास उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली.
सिडनी येथील संमेलनात माझे “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता” या विषयावर तर दिल्ली येथील संमेलनात “स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सामाजिक समतेत योगदान” या विषयावर व्याख्यान झाले. परंतु जसजसा सावरकरांच्या जीवनाचा, विचारांचा, साहित्याचा आपण अभ्यास करू लागतो, तसतसे त्यांनी विविध क्षेत्रात दिलेले योगदान पाहून आपण विस्मयचकित होतो. एकच व्यक्ती एका जीवनात, त्यातील काही वर्षे भयंकर अशा तुरुंगवासात घालवावी लागलेली असूनही इतके मोठे कार्य करू शकते हे पाहून आपण नतमस्तक होतो. सावरकरांच्या अशाच विविधांगी योगदानाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न येथे करीत आहे.
ब्रिटीश सरकारने क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेचा सूड घेण्यासाठी अनंत कान्हेरे या निधड्या छातीच्या तरुणाने नाशिकचा कलेक्टर ए एम टी जॅक्सन याला २१ डिसेंबर १९०९ रोजी गोळी घालून ठार मारले. या प्रकरणात सावरकरांवर ३८ दोषारोप ठेवुन त्याना जन्मठेप झाली.
४ जुलै १९११ पासून सावरकारांची अंदमान कारागृहात शिक्षा सुरू झाली. तिथे त्यांचा अनन्वित छळ होऊ लागला. पण गप्प बसतील, ते सावरकर कसले ? तिथेही त्यांनी आपले कार्य सुरु केले.

साक्षरता प्रसार :
कैद्यांमधील अज्ञान पाहून सावरकरांना त्यांना साक्षर करणे महत्वाचे वाटू लागले. त्यामुळे त्यांनी तुरुंगात कैद्यांना साक्षर करण्याचे कार्य हाती घेतले.त्यामुळे अनेक कैदी साक्षर होऊन त्यांना कारकुनाच्या जागा मिळाल्या. अक्षरज्ञान करून घेतल्यामुळे जेव्हा कैद्यांना वृत्तपत्र वाचता येऊ लागले, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
साक्षरतेबरोबरच सावरकरांनी कारागृहात ग्रंथालय उभारणी सुरू केली. जेव्हा त्यांनी अंदमान सोडले, तेव्हा तिथे दोन हजार ग्रंथ जमा झाले होते !.
कारागृहातुन पत्रकारिता :
नाशिक येथे शाळेत असतानाच सावरकरांनी पत्रकारिता सुरू केली होती. पुढे पुणे, मुंबई, लंडन येथे शिकत असताना देखील ते पत्रकारितेच्या माध्यमातून स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवीत होते.
पुढे अंदमान च्या कारागृहात शारीरिक, मानसिक कष्ट, हाल अपेष्टा, अतोनात छळ होऊनही सावरकर खचले नाहीत. त्याही परिस्थितीत त्यांनी गुप्तपणे पत्रकारिता सुरूच ठेवली. क्रांतिकारक इंदूभूषण व उल्लास्कर यांचा छळ आणि हौतात्म्य याविषयीचे थरारक वृत्तांत भारतीय वृत्तपत्रांमधून त्यांनी प्रसिद्ध केले. त्यामुळे इंग्रज अधिकारी हादरले. वृत्तपत्रातून झालेली टिका, मध्यवर्ती मंडळात विचारले गेलेले प्रश्न, लोकमताचे वाढते दडपण,या सर्वांचा सरकारवर प्रचंड दबाव आला. शेवटी १९१३ साली सर रेजिनाल्ड क्रडॉल यांनी अंदमानच्या कारागृहाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. ते कैद्यांशी बोलले. सावरकरांचीही त्यांनी भेट घेतली. या सर्वांचा परिणाम होऊन अंदमानच्या यमपुरीतील छळ आणि निर्बंध किंचितसे सैल झाले.
अस्पृश्यता निर्मूलन :
अंदमान कारागृहातून सावरकरांना रत्नागिरी येथील कारागृहात हलविण्यात आले. जाती व्यवस्थेमुळे हिंदू एक होऊ शकत नाही, हे त्यांनी ओळखले होते. त्यामुळे अस्पृश्यता निर्मुलन, जातीप्रथा निर्मूलन यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले. २२ फेब्रुवारी १९३१ रोजी सर्वांना खुले असणाऱ्या रत्नागिरीतील पतित पावन मंदिराचे उद्घाटन झाले. आचार्य, शंकराचार्य, पंडित, देशभक्त यांनी जाहीर केले की, आता रत्नागिरी हे एक तीर्थक्षेत्र बनले आहे. एक वक्ते म्हणाले, रत्नागिरी ही नवजागृत, शुद्धीकृत, एकीकृत हिंदू जगताची नवं काशी ठरली आहे. खरोखरच पतितपावन मंदिर हे अखिल भारतीय हिंदू चळवळीचे विद्यापीठ बनले होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या “जनता” पत्राने सावरकरांनी केलेल्या उपदेशाला पाठिंबा दिला. त्याआधी काही दिवस सावरकरांनी एक पत्रक काढून, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी नासिक येथे चालविलेल्या मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाला आपला पाठींबा जाहीर केला होता.”दलित वर्गाच्या हिंदूंना काळाराम मंदिर उघडे करा” अशी नासिकच्या सवर्ण हिंदूंना सावरकरांनी त्या पत्रकाद्वारे आवाहन केले होते. भाऊराव गायकवाड यांनी नासिकच्या सवर्ण हिंदूंमध्ये ते पत्रक वाटले होते.”मी जर आज मोकळा असतो तर नासिकच्या सत्याग्रहात भाग घेऊन पहिल्या प्रथम तुरुंगात गेलो असतो.” असे सावरकरांनी या पत्रकात म्हटले होते.
विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन :
सावरकरांचा दृष्टिकोन सम्पूर्णतः विज्ञाननिष्ठ होता.”मानवाला जे साधक ते चांगले आणि जे बाधक ते वाईट”, अशी त्यांची विचार सरणी होती. यंत्र हा शाप नसून मानवाला मिळालेले वरदान आहे, बेकारी हा यंत्राचा दोष नसून तो विषम वाटणीचा आहे, असे प्रतिपादन ते कटाक्षाने करीत.
एका लेखात सावरकरांनी निरीश्वरवादी रशियाच्या अंतराळ प्रगतीचे वर्णन करून विज्ञानाची कास धरण्याचे कळकळीचे आवाहन हिंदूना केले आहे. मानव अहीतासाठी नव्हे तर मानव हितासाठी विज्ञानाचा उपयोग करण्याचे उद्दिष्ट मनुष्याने ठेवले तर विज्ञान हे वरदान ठरेल, असा निष्कर्ष त्यांनी काढला होता.
लिपी सुधारणा :
लिपी सुधारणा, पंचांग सुधारणा याहिकडे सावरकरांनी लक्ष दिले होते. या विषयांवर त्यांनी अनेक लेख लिहिले, पुस्तके प्रकाशित केली.
सावरकरांनी छापखान्यातील नागरी टंकांची संख्या २५० वरून ८० वर आणुन दाखविली होती. ही सर्वाधिक शास्त्रीय लिपी आहे, असे मुंबईच्या एका सभेत त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय पंचांग आवश्यकता या विषयावर सावरकरांनी केसरी वृत्तपत्रात दोन लेख लिहिले होते.
सावरकरांनी अनेक इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी शब्द सुचविले आणि ते प्रचारात आणले. हे सर्व शब्द आज रूढ झाले आहेत. त्यातील काही शब्द म्हणजे,”मेयर”ला महापौर,”बजेट”ला अर्थसंकल्प,”टेलीप्रिंटर”ला दूरमुद्रक इत्यादि.
आत्मार्पण
सावरकरांची प्रकृती १९६६ सालच्या प्रारंभी विकोपाला गेली. त्यांनी औषध सोडले. पचनक्रिया बिघडल्याने अन्न वर्ज्य केले. आधार घेऊन ते उठू शकत. त्यांना वेदना सहन होत नव्हत्या. केव्हा एकदा मृत्यू येईल, असे त्यांना झाले होते. दृष्टीसमोर तरळणाऱ्या अंतकाळाची सूचक कल्पना मांडताना त्यांनी एका लेखात लिहिले होते, “अत्यंत असमाधानाने, विफलतेच्या तीव्र जाणिवेने, संकटाना कंटाळून ,इच्छा असतानाही सुखाने जगता येत नाही म्हणून, अत्यंत अतृप्त अशा मनस्थितीत,वैतागाच्या भरात जे जीव देतात, त्यांच्या त्या कृत्याला साधारणत: “आत्महत्या” म्हटले जाते. पण आपले जीवितकार्य सफल झाल्याने, आपल्या ऐहिक अस्तित्वाची हर्षभराने समाप्ती करतात, त्यांच्या या कृत्यास आत्मार्पण म्हणतात.”
सावरकरांनी आपल्या विचारांना जागून आत्मार्पण करण्याचा निर्धार केला. ३ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी उपोषण सुरू केले. ते २३ दिवस चालले. शेवटी २६ फेब्रुवारी १९६६ रोजी सकाळी ११ वाजता, वयाच्या ८३व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपला देह मृत्यूला अर्पण केला.
भारतमातेच्या या महान, कणखर, प्रखर देशभक्त सुपुत्रास शतशः नमन.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००