Tuesday, June 17, 2025
Homeलेखस्वामी विवेकानंदांची धर्म संकल्पना.

स्वामी विवेकानंदांची धर्म संकल्पना.

.”समजदार व्यक्तीसोबत केलेली, काही वेळाची चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते ..”
“दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातापेक्षा, अधिक उपयुक्त आहे…”
“शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या मर्यादे पलीकडे जाणे, हाच उत्तम मार्ग आहे….”
“आपल्याकडे आधीपासूनच, विश्वाच्या सर्व शक्ती आहेत. तरी लोक डोळ्यावर हात ठेवतात आणि मग आयुष्यात, किती गडद अंधार आहे याबद्दल ओरड करतात…”
“उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका….”
“आपल्यात अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्य होईल.”
अशा अनेक सुविचारांची पेरणी स्वामी विवेकानंदांनी समाजात केली.

स्वामी विवेकानंद म्हणजे एक अलौकिक प्रेरणास्थान. त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्याला ऊर्जा देते. त्यांनी आपल्या छोट्या आयुष्यात संपूर्ण जगावर भारत आणि हिंदुत्वाची खोल छाप उमटवली. आज त्यांच्या १२० व्या स्मृतिदिनानिमित्त (चार जुलै) त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि अनमोल विचारांना प्रणाम करून, त्यांच्या धर्मविषयक असलेल्या परखड मतांचा सखोल अभ्यास करावासा वाटतो.

शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ रोजी झालेल्या सर्व धर्म परिषदेत, विवेकानंदांनी हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडात फडकवला, हे आपल्या मनावर खोलवर कोरलेलं आहे.
सर्वधर्म परिषद ही त्यावेळच्या अमेरिकेतील सर्वात मोठी घटना होती. तीन वर्षे त्याची तयारी सुरू होती. प्रत्येक धर्माला, धर्माचा प्रतिनिधी निवडण्यास सांगितले होते. परंतु भारतातून शंकराचार्यांनी कुणालाही हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून निवडले नव्हते. त्याला काही कारणे होती.

ही परिषद परदेशी भाषेत होती. देव भाषेत नव्हती. आणि हिंदू धर्म बुडवणारा समुद्र प्रवास, हे एक तर्काला न पटणारे कारण होते. त्यामुळे विवेकानंदांनी आमंत्रण नसतानाही, स्वतः पैसे गोळा करून, अनेक खटपटी करून, त्या परिषदेत प्रवेश मिळवला होता.
“… बंधू भगिनींनो ..!” अशी भाषणाची सुरुवात करून परिषदेतील श्रोत्यांची मने सुरवातीलाच जिंकून घेतली होती.

बोस्टन इव्हिनिंग ट्रान्सस्क्रिप्ट मध्ये आलेल्या बातमीत म्हटले होते की, विवेकानंदांची भाषणे आकाशाएवढी व्यापक स्वरूपाची आहेत. सर्व धर्मातील सर्वोत्कृष्ट तत्वांचा त्यात समावेश आहे.

त्यांनी सांगितले, “सर्वधर्म एक आहेत. अध्यात्म म्हणजे पावित्र्य, चित्तशुद्धी, दया. आणि हे सर्व धर्माचे मूलभूत आधार आहेत. माझी खात्री आहे की सर्व धर्मांच्या ध्वजावर लवकरच लिहिले जाईल, संघर्ष नको. परस्परांना सहाय्य करा. एकमेकांना आत्मसात करा. विनाश करू नका. कलह नको. मैत्री हवी. शांती हवी.” अत्यंत परखड आणि भेदकपणे त्यांनी कट्टर धर्मवाद्यांच्या धर्मकल्पनांची चिरफाड केली होती.

अजूनही विश्वातील वर्णद्वेष, धर्म, जात यातून होणारे वाद, कलह, हिंसाचार मिटलेले नाहीतच. वेगवेगळ्या धर्मांची नावे माणसात बंधुभाव निर्माण करण्याऐवजी वैरभाव निर्माण करत आहेत. त्यातल्या शुभ शक्ती पूर्णपणे नाहीशा झालेल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंदांचे धर्म संकल्पनेबद्दलचे, भेदक विचार पुन्हा एकदा स्मरणात आणले पाहिजेत.

आज जगातील सर्व धर्म निर्जीव विडंबनाच्या रूपात उरलेले आहेत. त्यासाठी जळजळीत, कणखर शब्दांची आणि कृतीची गरज आहे.
स्वामी म्हणत, “जो गरिबांचे दुःख कमी करत नाही त्याला काय म्हणून धर्म म्हणायचा ?”
“स्त्रियांना देवदासी म्हणून मंदिरात नाचवले जाते हा कुठला धर्म ?”
“हजारो वर्षे, अन्न डाव्या हाताने खावे की उजव्या हाताने, गंध उभे लावावे की आडवे, याच धार्मिक प्रमेयांची चर्चा काय साधते ?

विवेकानंदांनी सर्व शिष्यांना उद्देशून म्हटले होते, “जो देव गरिबांना माझ्या देशात अन्न देऊ शकत नाही तो स्वर्गात मला अनंत सुखात ठेवेल, यावर विश्वास ठेवू नका. गरिबांना पोटभर अन्न आणि शिक्षण याची गरज आहे. पुरोहित गिरी नष्ट करावयास हवी. अत्याचार नको. सामाजिक जुलुम नको. सगळ्यांना जीवनात पुढे जाण्याची समान संधी मिळायला हवी.”

आधुनिक भारताचा लोकधर्म कसा असावा याचे चिंतन मांडताना, स्वामीजी म्हणतात की, हिंदूंचा अध्यात्म विचार, बौद्धांची करुणा, ख्रिस्ती बांधवांची कार्यशैली, आणि मोहम्मद पैगंबर यांनी शिकवलेला बंधुभाव, हे सारे आपल्या जीवनात एकवटायला हवेत. स्वामीजींचा हा खरा सर्वधर्म समन्वय आहे. सेक्युलरिझमचा हाच अर्थ आहे. नव्या भारत धर्माचे त्यांनी स्वप्न पाहिले. त्यात देवघेव, आदान प्रदान आहे. औपचारिकता नाही. कर्मठपणा नाही. हा भारत धर्म विश्वधर्माकडे वाटचाल करणारा आहे.

स्वामींचा स्त्री विचारही काळाच्या कितीतरी पुढे होता. स्त्रीला त्यांनी शक्ती रूपात पाहिले.
। जनै: सम्माननं स्त्रीणां
राष्ट्रप्रगतिमापकम् ।।
राष्ट्राच्या प्रगतीचे मापन स्त्रीला मिळणाऱ्या वागणुकीने ठरते. आणि स्वामीजी स्त्रीमुक्तीची कल्पना, कुटुंब व्यवस्थेच्या वर्तुळात, स्त्रीच्या आकांक्षा आणि क्षमता याचा आदर राखून करतात.
“बाईच्या डोळ्यातून ओघळणारा शोकाश्रू म्हणजे ईश्वराची नाराजी…” असे ते म्हणत.

अधुनिक भारतासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आधुनिक स्मृती हवी. आजच्या काळाची ती गरज आहे. आणि खऱ्या धर्माची जागृती हीच या कर्मयोग्याला दिलेली खरी श्रद्धांजली… धन्यवाद !!

राधिका भांडारकर

– लेखन : राधिका भंडारकर. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?