पुण्याच्या जंगलात हरवलेल्या आजोबांची ही गोष्ट असली तरी अशी घटना कुठेही घडू शकते. म्हणून जेष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी नेहमीच आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक !
…………….संपादक
परवा पुण्यात ऐशी वर्षांचे एक आजोबा शहरातील मध्यवर्ती भागातील टेकडीवर रात्रीच्या अंधारात जंगलात अडकले आणि तीन-एक तास हरवले. अग्निशामक दलाच्या चमूने निरोप मिळताच तेथे धाव घेतली. वीस-पंचवीस मिनिटात त्यांची सुटका केली, कुटुंबातील सर्वांची गाठभेट झाली आणि आनंदी आनंद झाला.
पन्नासेक वर्षांपूर्वी मी बातमीदार होतो तेव्हा, मी किंवा माझा एखादा सहकारी रोज रात्री शेवटचा एकेक फोन पोलीस कंट्रोल रूम (१००) आणि फायर ब्रिगेड (१०१) यांना करून ‘काय बात खबर’ असे विचारणे हा आमचा नित्य क्रम होता. पुणे शहरात बातमी लायक काही घडले असेल तर येथून कळत असे, म्हणजे सुगावा लागत असे. तपशील मिळवायची सुरवात येथून होत असे. ‘हरवलेले आजोबा सापडले’ म्हणजे ‘बातमी लायक काही विशेष घडले नाही’ असे ठरवून पुढच्या कॉल कडे आम्ही जात असू.
परवा तसेच केले असते. पण आनंदी अखेर असलेल्या या कहाणीत मी, माझे कुटुंब आणि माझ्या शेजारची दोन कुटुंबे संबंधित आहेत म्हणून केवळ दोन परिच्छेदाच्या यशकथा पुरते मर्यादीत न ठेवता हा अनुभव सविस्तर लिहावासा वाटतो. या कथेत ‘कोण’ याला महत्त्व नाही, तर का, कसं घडलं सांगणं महत्त्वाचं वाटतं.
वेताळ टेकडी, चतु:शृंगी, आपला मारुती, लॉ कॉलेज टेकडी, भांबुर्डा वन विहार आणि पत्रकार नगर ची ‘पिछाडी’ अशा नावानी प्रसिद्ध असलेला हा भाग.
शहराच्या विविध भागातून सकाळी आणि संध्याकाळी फिरायला, व्यायामाला असंख्य लोक सहकुटुंब सहपरिवार येत असतात. लहान-मोठे स्त्री-पुरुष आपल्या मुलाबाळांसकट आणि नातवंडांसोबत फिरायला येत असतात. गेल्या तीस-चाळीस वर्षात घनदाट जंगल माजले आहे वनविभाग आणि निसर्गप्रेमी लहान थोर जैव विविधता राखण्याचा प्रयत्न करीत असतात. या टेकडीवर सगळ्यांचे प्रेम आहे.
त्यामुळे हे आजोबा देखील आपल्या कुटुंबीयां समवेत अनेक वेळा फिरायला येणे खूपच स्वाभाविक आहे.
संध्याकाळी सहाच्या सुमाराला अंधार पडू लागतो तेव्हा लहानथोर घरच्या वाटेला लागतात. हे आजोबा देखील आपल्या कुटुंबा बरोबर परतीला लागले असणार. या दिवशी पावसाच्या सरी पडत होत्या लहान-मोठे ढग अधून मधून तरंगत होते. त्यामुळे या कुटुंबाची चुकून ताटातूट झाली असणार.
या टेकडीवर असंख्य पायवाटा आहेत. पावसाळ्यामध्ये तण माजलेले असते. आजोबांनी फ्लोटर घातलेले असल्यामुळे या अंधाऱ्या तण माजलेल्या पायवाटेवर ते चुकले. घरची मंडळी दुसऱ्या कुठल्यातरी वाटेवरून चालत राहिली असावित आणि अंधारात त्यांची चुकामुक झाली असावी.
पायवाट आणि अंधार यामुळे आजोबांना आपण कोठे आहोत हे देखील सुचेनासे झाले असेल. आठच्या सुमाराला पत्रकारनगरच्या ‘पिछाडी’ला त्यांनी दोन तीन चक्कर मारले. मिट्ट काळोख असल्यामुळे आपण कुठे पोचलो आहोत याचा त्यांना अंदाज येईना. तेथे निसरडे झाले असल्यामुळे ते सारखे घसरत, पडत होते.
पत्रकारनगरच्या इंद्रायणी बिल्डिंगच्या मागच्या बाजूला राहणाऱ्या आमच्या ठाकूर कुटुंबाच्या घरचा लाईट त्यांना दिसला आणि त्यांनी हाक मारायला सुरवात केली. या वेळी इमारतीतील देवयानी नचिकेत ठाकूर, सुबोध अशोक बुधकर, आणि मोरेश्वर भालचंद्र जोशी यांच्या कुटुंबांना चाहूल लागली. काहीतरी वेगळं घडलं आहे हे लक्षात आलं. अंधारातून कोणीतरी हाक मारतो आहे म्हणून बॅटऱ्या आणून त्यांनी शोध घेतला.
इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीच्याही वरील काटेरी कुंपणाच्या मागून कोणी आजोबा हाक मारत होते हे लक्षात आले . थोड्यावेळाने आजोबानी या कुटुंबियांना परिस्थितीची कल्पना दिली. टॉर्च मुळे हे कळले की आजोबा वाट चुकून अडकलेले आहेत. लहान मोठ्या शिड्या लावून पत्रकारनगरच्या बाजूने उतरवून घेण्याचा प्रयत्न त्यांनी करून पाहिला. परंतु पावसाची टिप टीप नुकतीच होऊन गेल्यामुळे आणि काटेरी तारेच्या कुंपणाच्या उंचीमुळे टेकडीच्या बाजूने उतरवून घेणे त्यांना अशक्य झाले. हवेत गारठा आलेला होता. आजोबा थोडे भिजले देखील होते. त्यांना अंधारामुळे भीती वाटू नये म्हणून त्यांच्याशी गप्पा मारत बिझी ठेवायचे आणि त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करायचे असा प्रयत्न सुरू झाला. टॉर्च चालू ठेवून त्यांना प्यायला पाणी आणि चहाचा कप कुंप कुंपणावरून देणे कसेबसे जमले.
कुटुंबातील एकाने फायर ब्रिगेडला फोन करून बोलविले. फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी काळजी करू नका, पंधरा-वीस मिनिटात आम्ही पोहोचतो असा धीर दिला. खरोखरच ते थोड्याच वेळात पोहोचले. कुंपणाच्या तारा तोडून त्यांनी डोंगराच्या बाजूने आणि पत्रकारनगरच्या आतल्या बाजूने शिड्या लावून शिताफीने आपले काम सुरु केले. आजोबाना धीर दिला.
त्यांच्या कुटुंबाने देखील पोलीस स्टेशन कडे जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न सुरु करायचे तोपर्यंत ठरवले होते. पोलिसांची गाडी अन, कुटुंबीयांची गाडी असा ताफा पत्रकारनगरच्या मेन गेटच्या बाजूने पोहोचला. आजोबांची सुटका झाली. नातेवाईक त्यांना घरी घेऊन गेले.
त्यानंतरच आजोबांवर आलेल्या या प्रसंगाचे गांभीर्य आमच्या ही लक्षात आले. पावसाच्या सरी मुळे झालेले निसरडे, माजलेल्या उंच उंच गवता मधून नागा-सापांची नित्याची सळसळ, विंचूकाटा, मुंगूस, बेवारशी कुत्री, मांजरी, खारुताई, मोठमोठ्या गोगल गाई, डास आणि पाली-सरडे यांचा वावर भरपूर मोठ्या प्रमाणावर येथे आहे. वडारवाडीच्या बाजूने सिम्बॉयसिसच्या खिंडीच्या दिशेने अधून मधून डुक्कर येतात. डोंगराच्या वाटेने गाई आणि क्वचित म्हशी येतात. मोर लांडोर, माकड आणि पोपटा सारख्या असंख्य प्रकारचे पक्षी यांची या जंगलात रेलचेल आहे आजोबांवर आलेल्या प्रसंगाच्या वेळी या प्राणिमात्रांपासून त्यांना धोका झाला नसेल पण होऊ शकला असता हे तितकेच खरे.
या कथेचे तात्पर्य एव्हडेच की अनावस्था आणि कोणतेही संकट टाळायचे असेल तर या टेकडीवर फिरायला येणाऱ्या कुटुंबाने एकत्रच राहिले पाहिजे. ‘सात च्या आत घरात’ आले पाहिजे.
सुमारे सात आठ वर्षांपूर्वी याच पत्रकारनगर च्या शरावती इमारतीच्या मागे एक आजी संध्याकाळी अशाच केव्हा तरी वाट चुकल्या. रात्रभर झाडाखाली कुडकुडत बसल्या. उजाडले आणि रहिवाश्याची चाहूल लागली तेव्हा अगदी क्षीण आवाजात ‘मला थोडी चिमूटभर साखर द्या हो, मला डायबेटीस आहे’ अशी त्यांनी याचना केली होती. त्यानंतर त्यांना पायवाटेने बाहेर पोहोचवले होते.
परवा मात्र देवयानी नचिकेत ठाकूर हिने अग्निशामक दलाला फोन करण्याचे प्रसंगावधान दाखवले, मोरेश्वर भालचंद्र जोशी, आणि सुबोध बुधकर यांच्या कुटुंबांनी आजोबाना धीर दिला यामुळे प्रसंग निभावला गेला हे खरे.
असे प्रसंग येऊ नये म्हणून वेताळ टेकडीच्या परिसरात फिरायला येणाऱ्यानी जागरुक राहिले पाहिजे हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच.

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800