गेल्या दिवाळीची गोष्ट ! नेहमीप्रमाणेच कोणत्याही सणाची नांदी आमच्याकडे शिमग्यानेच होते. मागील वर्षीही शिमगा झालाच ! तिचं आणि माझं कडाक्याचं भांडण ! खरंतर नेहमीप्रमाणे यशस्वी माघार घेण्याचं तंत्र मला अवगत झालंय आता. पण कसं कुणास ठाऊक यावेळी मीही हटूनच बसलो.
दिवाळी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली. मुलांची भुणभूण सुरू झाली. “बाबा दिवाळीच्या खरेदीचं काय ? किल्ला, फटाके, आकाशकंदील हे सगळं कधी करायचं ? मुख्य म्हणजे फराळ कधी करायचा ?”
हे सगळे प्रश्नं मलाही पडलेले होते. पण ‘आता नाही म्हणजे नाही बोलायचं !’ असं मीसुद्धा ठरवलं होतं. पलीकडूनही काहीच प्रतिसाद नव्हता. दरवर्षी हे सगळं तीच करायची. यंदा काहीच हालचाल नाही.
त्यामुळे मीच मुलांना बरोबर घेऊन सगळं करायचं ठरवलं. सुरूवात कपड्यांच्या खरेदीपासून केली. मुलांना घेऊन गेलो ‘हे नको, ते हवं’ असं करत मुलांनी कपड्यांसाठी फार फिरवलं. तिच्यासाठी माझ्या पसंतीनेच साडी आणि मला शर्ट-पॅन्ट खरेदी केले.
दमूनभागून घरी आलो तर ती कुत्सितपणे हसताना मला दिसली. मला राग आला पण कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही असं मी ठरवलेलं होतं. मुलं उत्साहात कपडे घालून आईला दाखवणार तोच मोठ्याची पॅन्ट सैल झालेली आणि धाकट्याला शर्ट होईना ! पुन्हा दुकानात जाऊन कपडे बदलून आणण्याचं माझ्यात त्राण उरलं नव्हतं.
येतायेताच खरेदी केलेल्या पणत्या घरी आणेपर्यंत फुटलेल्या होत्या. महागातला आकाशकंदील फोल्ड करून घेतलेला त्याची काही केल्या जुळवाजुळव करता येईना. रांगोळीच्या रंगांचे पाऊच एका पिशवीत कोंबलेले. घरी आणेपर्यंत सगळे रंग एकमेकात मिसळलेले होते. माझी दैना पाहताना ती हसते आहे, असा मला भास झाला आणि माझा निर्णय आणखीनच दृढ झाला.
हिरीरिने मी फराळाच्या तयारीला लागलो. यादीप्रमाणे सगळं सामान आणायला गेलो पण यादीच न्यायला विसरलो. जे काही आणलंय त्यातून सुरूवात तरी करू या, असं म्हणून कामाला लागलो. चकलीची तयारी केली. युट्युबवर पाहून पाॅज करत-करत माझी रेसिपी सुरू होती. प्रमाणात सगळ्या गोष्टी घेऊनही शेवटी पीठ सैल झालं आणि चकली पाडताना तुकडे पडू लागले. त्यात थोडी भाजणी मिसळली तर चकली छान पडली पण तेलात सोडताच परत तिचे तुकडे होऊ लागले. असं करत-करत कशीबशी तुकड्या तुकड्यांची चकली तयार झाली.
घरभर पीठ, तेलकटपणा, मेणचटपणा, स्वयंपाककट्ट्यावर पसारा अशी अगदीच अवस्था झालेली. मी मात्र इरेलाच पेटलेलो होतो.
एकीकडे युट्युबवर पहात रव्याचे लाडू सुरू केले. रवा छान भाजला. पाक करायला ठेवला आणि मित्राचा फोन आला. पंधरा-वीस मिनिटात पाक झाला घट्ट ! कसेबसे लाडू वळले. एक खाण्यासाठी तोंडात टाकला. लाडू इतका कडक झालेला की गेल्याच आठवड्यात नवीन रूट कॅनल केलेल्या दाताची कॅपच निघाली. झालं ! अडीच हजार पाण्यात! (नव्हे लाडूत !)
आता मात्र मी स्वतःवरच खूप चिडलो. तणतणू लागलो. भांड्यांची आदळआपट होऊ लागली. ती तिरप्या नजरेने पाहतच होती. माझा राग अनावर झाला. मी मुलांवरच खेकसलो (सॉफ्ट टार्गेट ☺️).
” माझ्या एकट्याची दिवाळी आहे का? तुम्हाला ही वरची कामंसुद्धा करता येत नाहीत का ? इथे नुसतं आयतं पाहिजे सगळ्यांना !”
मुलं म्हणाली, “अहो बाबा, आमच्यावर का वैतागताय ? नेहमीप्रमाणे आईला सॉरी म्हटलं असतं तर ही वेळ तुमच्यावरही आली नसती आणि आमच्यावरही !”
मलाही खरंतर हे मनातून पटलेलंच होतं. पण माघार घ्यायची म्हणजे ‘इगो’ आडवा येत होता ! शेवटी मी हवेतच बोललो, “ज्याला हवं तो करेल पुढचं ! मी थकलोय आता !” असं म्हणून मी बेडरूममध्ये जाऊन पडलो. दिवसभराच्या थकव्यामुळे कधी झोप लागली कळलंच नाही.
सकाळी उठून पाहतो तर घर जिथल्या तिथे ! दारात रांगोळी, कंदील लागलेला, पणत्या पेटलेल्या, फराळाचं ताट तयार ! म्हणजे जे घडलं ते स्वप्न होतं का ? मग लक्षात आलं, विस्कटलेलं घर तिनं सावरलं आणि आवरलंही होतं, अगदी एका रात्रीत !

– लेखन : हेमंत कुलकर्णी, मुलुंड, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800
दिवाळी शुभेच्छा खूप खूप मनापासून विसुभाऊ कवी म्हणून थोर आपणास ही शुभेच्छा सर्व ताई दादा