गप्पा मारण्यासारखा आनंद जगात दुसरा नाही. आपल्याला बोलता येते याचा शोध लागतो तेव्हा आपण अखंड बडबड करायला सुरुवात करतो. आपली बडबड जो ऐकून घेईल तो आपला पहिला मित्र बनून जातो. ‘अरे ऐकना, त्याचे असे झाले’ या संबोधनाचा वापर सुरु होतो आणि मैत्री घट्ट होत जाते.
लिओ टाॅलस्टाॅयने आपल्या लहानपणच्या आठवणी तिन खंडात लिहून ठेवल्या आहेत. बालवयात मोठ्यांच्या गप्पा ते अतिशय आवडीने ऐकत रहायचे. या गप्पांमधूनच त्यांना शाळेत न शिकविले जाणाऱ्या कितीतरी गोष्टी नकळत कळाल्या होत्या.
बटाटे सोलणारे मळ्यात काम करणाऱ्या मजुरांच्या गप्पा काम करता करता अगदी रंगात येई. खूप उच्च दर्जाची चर्चा जरी नसली तरी दैनंदिन जीवनातील कितीतरी साधे साधे विषय त्या गप्पांमध्ये लहानग्या लिओला कळत होते. लहान बछडे झाल्याची कोणीतरी आनंद वार्ता सांगायचा. पैशात बचत करुन बाजारातून घरच्यांसाठी कपडे घेतले याची गोष्ट असायची. कितीतरी गोष्टी. लहानग्या लिओचे मनोविश्व या गोष्टींनी समृद्ध झाले.
‘कितीतरी दिवसात नाही गेलो चांदण्यात’ या धर्तीवर कितीतरी दिवसात गप्पा मारल्या नाहीत अशी आज प्रकर्षाने जाणीव होत आहे. पोट माणसाच्या जवळ असले तरी ते माणसाला दाहीदिशांनी पळायला लावते. पोटामागोमाग तो हळूहळू प्रसिद्धीमागे, यशामागे धावतच राहतो. धावण्याच्या या चुरशीत तो नेमका गप्पा मारण्याचा आनंद हरवून बसतो. गप्पा मारणे म्हणजे वायफळ वेळ दवडणे अशी त्याची समजूत होऊन बसते.
कामधंद्यानिमित्त अनेकांशी तो गप्पा मारतोही. नाही असे नाही. पण कुठेतरी त्या गप्पांमध्ये औपचारिकता, कृत्रिमता, वरवरपणा असतो आणि त्यामागे फायद्याचे गणित असते.
खर्या गप्पा म्हणजे निरुद्देश आदिअंत नसलेल्या एकमेकांना टाळी देत, डोळा मारत, चेष्टा करत रंगत जाणाऱ्या गप्पा. अशा गप्पा आपण किती मारल्या असतील ? अशा गप्पा मारायच्या तर तेवढे आत्मियतेचे जिव्हाळ्याचे अनुबंध असलेले मित्र, सवंगडी, दोस्त भेटायला हवेत. कुटूंबातही तसे भाऊ बहिण, वडीलधारी, आजी आजोबा यांचे कौटुंबिक वातावरण लाभायला हवे.
एकलकोंड्या माणसाला हे सर्व लाभत नाही म्हणून त्याचा स्वभाव तिरसट, तुसडा होऊन जातो. काही जबाबदारीच्या ओझ्याखाली इतके दबून जातात की त्यांना गप्पा मारण्यासाठी तोंड उघडायलाही उसंत मिळत नाही. लग्नानंतर बरेच जण मित्रमंडळीतून बाद होतात आणि गप्पांची चैन त्यांना परवडत नाही.
सहज समुद्र किनारी जोडीजोडींने एकमेकांच्या कुशीत तासंतास गप्पात रंगलेली जोडपी पाहिल्यावर आपल्याला सहज प्रश्न पडत असेल की ते एकमेकांशी काय बोलत असतील ? त्यातील जेव्हा काही लग्न करुन संसार थाटतात तेव्हा मात्र एवढ्या गप्पा त्यांच्यात पुढे पुढे होत नाही ! शेवटी हे प्रमाण अगदी शुन्यावर येऊन ठेपते.
कानात हेडफोन लावून अगदी रहदारीचे रस्ते वाहने चुकवत अखंड गप्पात रंगलेले काही महाभाग मी पाहिले आहे. किंवा कानाशी मोबाईल लावून चालता चालता गप्पा मारत चाललेले आपल्याच तंद्रीत रहाणारेही मी पाहिले आहे.
अशा आॅनलाईन गप्पा मारणाऱ्या लोकांचा मला नेहमीच हेवा वाटत आला आहे. कामामध्येही मोबाईलवर कोणी कोणाशी गप्पा मारताना दिसले की मला हेवा वाटत राहतो.
काम असेल तर साधारण फोन लावले जातात किंवा येतात यात काही विशेष नाही. पण आवर्जून आठवण आली म्हणून आपण किती जणांशी संवाद साधतो हा खर तर प्रश्नच आहे.
व पु काळेंची एक फॅन्टसी असलेली कथा वाचनात आली होती. संवाद हरवलेल्या माणसाशी सुखदु:खाच्या मनमोकळ्या गप्पा मारायच्या आणि त्याचे मन हलके करायचे. नेमके हेच आज होत नाही. माणसं अशा संवादाला दुरावलेली आहेत. संवादाअभावी आतल्याआत कुढतायत आणि व्याधिग्रस्त , निराश होत आहेत, व्यसनांच्या आहारी जात आहेत. संवाद साधायला जवळचे मित्र नाही, जोडीदार नाही अशा नि:संवाद एकाकीपणाच्या विलक्षण पोकळीत आज जो तो कसाबसा बेचव आळणी जीवन जगतोय.
जहाज जोपर्यंत समुद्राचे पाणी आत घेत नाही तोपर्यंत ते बुडूच शकत नाही, इतका सुंदर विचार मी डोळे मिटून ऐकत असलेल्या गप्पांमधून ऐकला. एक मोटारमन आपल्या मित्राला सांगत होता. दुनिया मला चांगले म्हणाली तर मला आनंद होत नाही आणि वाईट म्हटली तर मी ते मनाला लावूनच घेत नाही. त्यापलिकडे मी गेलो आहे. ज्यांनी मला वाईट म्हटले शिव्या दिल्या तेच महिना दोन महिन्याने मला साॅरी म्हणत आले. ऐकतच रहावे असे त्याचे बोलणे होते.
पश्चिम लाईनवर तो विरारवरुन लोकल चालवतो आणि सेंट्रल लाईनला राहतो अशी माहिती कळाली. ट्रेन लेट का चालतात ? दोन्ही रुट्स कसे वेगळे आहेत ?रेल्वे सर्व सुविधा द्यायला तयार आहेत पण लोक कसे सुविधांची नासधूस करतात, चोरी करतात, एकेक चाक 45 हजाराचे असते, पेंटाग्राफ लाखाचा असतो, जगात एवढा स्वस्त प्रवास फक्त भारतीय रेल्वेत कसा करता येतो, दिवसांतून किती वेळा चेन खेचली जाते, असे कितीतरी विषय ज्यांना आपला स्पर्शही झालेला नसतो ते एकेक विषय त्या गप्पांमधून उलगडत गेले.
गप्पा ऐकणेही आनंददायी असू शकते. शेअर मार्केट, राजकारण यावरील गप्पांमधून तर उलट सुलट गप्पा रंगत राहतात. एकेक नेता. तो कुठे कमी पडला, कोणी काय केले, उद्याचे चित्र काय राहिल, अगदी मजा येते ऐकण्यात. कोणी म्हणेल, अशा राजकारणावर गप्पा मारुन काही फरक पडेल का ? फरक पडणार नसला तरी एक जागरुक दृष्टीकोन नक्कीच विकसित होत रहातो यात शंकाच नाही.
क्रिकेटवरील गप्पा सुरु झाल्या की आपले अज्ञान लक्षात येऊन गप्प बसायला होते. लोक किती रस घेऊन एवढे सगळे कसे लक्षात ठेवतात याचाच अचंबा वाटत राहतो !
जो ज्या क्षेत्रातील आहे त्या क्षेत्रातील त्याचे अनुभव, ज्ञान, किस्से यांचे अद्भुत भांडारच गप्पांच्या ओघात आपल्याला लाभत रहाते आणि आपल्या विचारांच्या कक्षा नकळत रुंदावत रहातात.
काही माणसे इतकी बहुश्रुत असतात की कोणत्याही विषयावरील गप्पा रंगो त्या विषयावरील त्यांचे अगाध ज्ञान प्रकट होत रहाते.
काही माणसे मोठमोठ्या गप्पा हाणत असतात. बोलबच्चनच. त्यांनी बोलायला सुरुवात केली की सगळे अटकळच बांधतात की आता हा निव्वळ फेकाफेकी करील. पण अशा गप्पांमध्येही सगळे रंगून जातात. कारण अशा गप्पांमधून इतका छान वेळ निघून जातो की विचारता सोय नाही.
गप्पांमधून मधे मधे जोक, किस्से सांगणारे एक वेगळाच रंग भरत असतात. यामुळेच गप्पांना महफिलीचे रुप प्राप्त होत रहाते.
माणूस सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतो तर फक्त स्वतःवर ! हे एक कटू सत्य मी गप्पांच्या ओघात एकाच्या तोंडून ऐकले आणि जवळ जवळ उडालोच. जमलेल्या पैकी सगळ्यांनी त्याला उडवून लावले. कोणी सांगितले मी आईवर जास्त प्रेम करतो. तिचेही माझ्यावर खूप प्रेम आहे. त्याने विचारले जास्त आणि खूप याला पुरावा काय ? एकाने सांगितले माझे माझ्या बायकोवर प्रेम आहे. कोणी काय आणि कोणी काय सगळ्यांनी वेगवेगळ्या कबुल्या दिल्या. पण कटू सत्य हे एखाद्या हाडाच्या सांगाड्या सारखे असते. ते नर्म मुलायम त्वचा पांघरुन असते तेव्हा खरे वाटत नाही. आणि उघडे पडले तर सगळे मिथ्या, खोटे भ्रम वाटू लागते. मला लगेच माकडीणीची गोष्ट आठवली. एका हौदात पाण्यात बुडू लागलेली माकडीण जीवाच्या आकांताने आपल्या लेकराला निकराचे प्रयत्न करते. पण शेवटी ती स्वतः बुडू लागते तेव्हा सरळ पिल्लाला पायाखाली घालून ती हौदाबाहेर निसटते.
गप्पांचा ओघ क्षणात कोठे जाईल त्याचा नेम नसतो. गप्पांचे एक असते की आपापसात केमिस्ट्री जुळल्याशिवाय मनमुराद गप्पा रंगत नाही. गप्पा मारणारे कंपू असतात. ते सहसा कंपूत कोणा बाहेरील आगंतुकाला सहजासहजी सामावून घेत नाही. आपल्या गप्पा आपल्या कंपुपुरत्या राहिल्या पाहिजे. काही वेळा गप्पांचे स्वरुपही तसेच असते. खलबतं केल्यासारख्या. गट तट करुन गुप्त चर्चा झडत राहतात. काही गप्पा हलक्या आवाजात कानोकान होत राहतात. अशावेळी फक्त हास्यस्फोट तेवढे ऐकू येतात.
जगात दोनच प्रकारचे लोक आहेत. एक गप्प बसणारे आणि दुसरे गप्पा मारणारे. गप्प बसायला काही विद्वत्ता लागत नाही पण बरेच विद्वान लोक तुम्हाला गंभीर चेहर्याने ओठ मुडपून गप्प आपल्याच विचारात किंवा शुन्यात हरवलेले दिसतात. यांच्या कानावर जरा जरी गप्पांचे आवाज आले तरी यांची मुद्रा त्रासिक होते आणि त्रागा करीत हे उद्गारतात ‘काय मासळीबाजार भरलाय’ ‘काही कामधंदे आहेत की नाही ?’असे गप्पांचे वावडे असलेले विद्वान लांबून जरी येताना दिसले तरी हसते खेळते लोक चिडीचूप होऊन जातात. असे लोक कामात असतील तर आसपास कोणी चुकूनही गप्पा मारु नये किंवा हसण्याचा प्रयत्नही करु नये कारण त्यांचा तो जळजळीत कटाक्ष तुमच्यावर पडला तर तुमच्यातील मनमोकळेपणा, खेळकरपणा जळून खाक होईल. ते असे काही फटकारतील की त्यांनी उच्चारलेले शब्द चाबूक वाटू लागतील.
गप्पांचे, हसण्याचे उसळते आवाज आले की दाणकन घंटी वाजवून शिपायाला बाहेर काय चाललंय म्हणून जगातला कुठलाही साहेब भडकल्या शिवाय रहात नाही!
कामाच्या ठिकाणी टाचणी पडली तरी तिचा आवाज यावा अशी सगळ्यांची अपेक्षा असते. कोणी सात मजली हसले तरी कान उघडणी केली जाते. कामाच्या ठिकाणी काम सोडून कोणी गप्पात रंगले तर ते कर्तव्यपरायणेत येत नाही असे मानले जाते. मग अशावेळी चहापान आणि जेवण अशा निमित्ताने गप्पा रंगतच राहतात.
गप्पा मारणे हा माणसाचा मूळ स्वभाव आहे आणि त्यावर कोणी मर्यादा आणली, ओरडले किंवा या मूळ स्वभावाला मुरड घालायची वेळ आली तर माणसं आतल्याआत चरफडत राहतात आणि त्याचा पुन्हा परिणाम कामावरच होतो. काम कसेबसे करुन मोकळे व्हावे ही भावना कामाची गुणवत्ता ढासळण्यास कारणीभूत होते हे कोणाच्याही लक्षातच येत नाही.
मूळात काम हे काम वाटले तर कंटाळवाणे होते. गप्पा मारत, संगीत ऐकत काम गुणवत्तापूर्ण व कमी वेळात पूर्ण करता येते या गोष्टीवर सहजासहजी कोणाचा विश्वासच बसत नाही.
एक अधिकारी आठवतात. त्यांच्याकडे काम घेऊन गेले की ते आलेल्या माणसाला जवळ बसवून घ्यायचे आणि त्याच्याशी गप्पा मारायला लागायचे. त्याने कामाची आठवण करुन दिली की ते ‘काम काय होईल रे’ असे उद्गारायचे. आपल्या घरापासून ,कुटुंबापासून दूर लांब शहरात कामासाठी आलेल्या या अधिकाऱ्याला कोणीतरी आंतरिक संवाद साधावा, कोणीतरी बोलावे असे वाटणे साहजिकच होते.
आज जिकडे तिकडे कामाचे गंभीर वातावरण तयार झालेले दिसते. रुग्णालयात जसे आजारी वातावरण तरंगत असते तसे. कोणालाही कामाशिवाय बोलायला जणू बंदीच असल्यासारखे. कोणाला भेटायचे असेल तर नाव आणि काय काम आहे त्याची चिठ्ठी आधी पाठवावी लागते. वेळ घेतल्याशिवाय ,
परवानगी घेतल्याशिवाय कोणाला भेटताच येत नाही.कोणी आलं तर काय काम आहे ? या नजरेने पाहिले जाते. कामाशिवाय कोणी भेटायला येऊ शकत नाही अशी बंधने घालून घेतलेली असतात. बंद दाराच्या दालनात वातानुकूलित वातावरणात बसणे जो तो पसंत करीत असतो. क्वचितच काही ठिकाणी ‘मांजरासारखे डोकावून पाहू नये’ ‘परवानगीची आवश्यकता नाही. सरळ आत यावे आणि मोकळी दिसेल त्या खुर्चीत बसावे’ असे मुक्तद्वार आढळते. तेथे मग सर्व तर्हेच्या माणसांचा राबता असतोच.
गप्पा मारणे ही खरं तर कलाच आहे. सारख्याला वारखे मिळाले की गप्पांना अगदी रंग चढत जातो. सगळ्या भिंती गळून पडतात आणि गप्पात सहभागी सर्व तणाव विसरुन मन मोकळे करण्यात हरवून जातात. गप्पांना कुठलेही नियम, मर्यादा मग उरत नाही. उंच कड्यावरुन मुक्तपणे निर्झर खळाळून वहावे तसे मग प्रत्येकजण गप्पात हरवून जातो.
गप्पा मारायला जागेचे बंधनही नसते. अगदी गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलच्या दाराच्या पॅसेजमध्येही गप्पा रंगतात. वेगवेगळ्या स्वभावाची तर्हेवाईक माणसं एकत्र आली की त्यांच्या गप्पा अगदी ऐकण्यासारखा असतात. या रोजच्या गप्पा काही ठरवून होत नसतात. एखाद्याला वाटेल रोज हे एवढे काय बोलत असतील पण नाही. एकमेकांची चेष्टा करीत, खोडी काढत, एकमेकांना चिडवत, एकमेकावर कुरघोडी करीत या गप्पा होतच राहतात. या गप्पांना अंत असा नाही. फक्त आपापले स्टेशन आले की उतरुन जायचे एवढेच काय ते अर्धविराम. गप्पांना पूर्णविराम असा नसतोच. गप्पांना विषयाचे बंधन वा सोयरसुतकही नसते. काहीवेळा ‘गाडीत महिला आहे’ असे ओरडून सांगायची वेळ येते.
गुलूगुलू गप्पांमध्ये तेवढे इतरांना संधी नसते. पण ‘कार्यक्रमासाठी बसलेल्या चार यारांमध्ये गप्पा एकेक पेगाबरोबर चखणा तोंडात टाकत ज्या रंगत जातात त्याला तोडच नाही. अगदी डोळे भरुन येतील अशा एकेक आठवणी या गप्पांमधून होतात. वेळेकाळाचे भान विसरुन होणाऱ्या या गप्पांची रंगतच न्यारी. मैत्री घट्ट व्हायची असेल तर अशा समरसून गप्पा होणे आवश्यकच असते.
सगळ्यांनाच गप्पा मारायला जमते असे नाही. रंगलेल्या गप्पातही काही नुस्तीच ऐकत राहणारी मंडळी असतात. ती फक्त मधून मधून मान डोलावत असतात. हसत असतात. मधूनच कोणाला डोळा मारुन टाळीही देत असतात. काही लोक मात्र गप्पिष्ट असतात. त्यांना कधीही पहावे ते कोणाशी तरी गप्पाच मारताना दिसतात. बरे त्यांच्याकडे एकेक विषय, एकेक किस्से, एकेक जोक असे असतात की जातील तिकडे त्यांचे स्वागत होते आणि तिथले वातावरण ते रंगतदार करुन टाकतात. अशा लोकांची बोलण्याची सांगण्याची पद्धत अशी असते की कोणालाही त्यांचा हेवा वाटावा. सहज आपलेसे करण्याचा अलौकिक गुण अशा लोकांमध्ये असतो.
डोळे उघडे ठेवून पाहिले तर जिकडे तिकडे जो तो गप्पा मारताना दिसेल. गप्पांमध्ये वेळ वायफळ वाया जातो असे भलेही कोणी विकासाची, प्रगतीची काळजी करणारा प्राणी करो पण गप्पा संजीवनी आहे. कुठलेही नाते घट्ट करणारी, जीवन तणावरहित करणारी मनाचे आरोग्य सुधरवणारी व खर्या अर्थाने जगण्याचा मूलमंत्र शिकवणारी संजीवनी आहे
या संजीवनीपासून जो वंचित राहिल तो दुर्भागी म्हणावा लागेल. आज समाज माध्यमात वाॅटसअॅप, मेसेंजर, फेसबुक सारखी संवाद माध्यमे उपलब्ध झाली आहे. मित्र संख्याही वाढलेली आहे पण त्यामुळे गप्पा मारण्याच्या खर्या आनंदाला आपण मुकलो आहे. बरे, या समाजमाध्यमांमध्ये केवळ लाईक्स आणि काँमेंटमध्ये व्यस्त व व्यसनाधीन झालेल्या लोकांमध्ये खर्या अर्थाने संवाद किती होतो? केवळ गुड मॉर्निंग, गुड अफ्टरनून, गुड इव्हिनिंग आणि गुड नाईट या पलिकडे आणि काही शेअर करण्यापलिकडे आपण जातच नाही.
मोठमोठे साहित्यिक, कलावंत, गायक, संगीतकार यांच्यात गप्पांच्या अक्षरशः मैफिली रंगतात. या गप्पांमधून त्यांचा व्यासंग, साधना, ज्ञान इतके प्रतित होते की ऐकणारा या अमृतवर्षावात अगदी न्हाऊन निघतो. तृप्त होतो. उर्दू, अरेबिक, फारसी भाषेतील शायरी, गझल यांचा दांडगा व्यासंग असलेले एक मित्र आहे. त्यांच्याकडे सहज जरी गेले तरी ते तासंतास आपल्या गप्पांमध्ये असे रंगवून टाकतात, माहित नसलेल्या एकेक गोष्टी एकेक किस्से सांगतात की वेळेचेही भान उरत नाही. असे मित्र मिळणे म्हणजे भाग्यच असते. नकळत आपल्या जीवनात रंग भरुन टाकतात असे मित्र !
गप्पा सुरु करायला काही वेदमंत्र लागत नाही. फक्त विरंगुळ्याचा क्षण आणि कमीत कमी एकतरी सोबती मिळावा की गप्पांना बहर आलाच म्हणून समजा. एकाच छंदाची माणसे एकत्र आल्यावर जशा गप्पा रंगतात तशाच गप्पा निरनिराळ्या ढंगाची माणसं एकत्र आल्यावर रंगतात. सहज कोणीतरी थंडीची रात्री शेकोटी पेटवावी आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु व्हाव्या. जसजशी रात्र चढत जाते तसतशा हात पाय शेकत गप्पां रंगतच जातात. शेकोटी विझू नये आणि गप्पा सरु नये असे होऊन जाते. गप्पांमध्ये भूताखेताच्या गोष्टी निघाल्यावर तर मग विचारुच नका. सगळ्यांना ऐकीव भूतांच्या गोष्टी आठवतच राहतात. चार पिणाऱ्यांची बैठक गप्पांच्या मैफीलीत बदलून जाते. मध्येच कोणालातरी अगदी गलबलून येते. कुणाचे डोळे भरुन येतात. पेगमागून पेग भरले जातात. गप्पांच्या नादात किती पेग घेतले तेही मोजायला विसरुन जातात. अशा गप्पांमधून मैत्र अगदी घट्ट होऊन जाते यात शंकाच नाही.गप्पांच्या ओघात प्रत्येकाला एकमेकांची गुपिते माहित होऊन गेल्याने त्या मैत्रीला वेगळीच खुमारी येत चालते. ती मैत्री साधीसुधी रहात नाही.
मध्यंतरी एक फार सुंदर कथा माझ्या वाचण्यात आली होती. दिवसभर वर्गावर्गावर शिकवून झाल्यावर थकले भागले गुरुजी घरी जायला एसटीत बसतात. त्यांच्या शेजारी नेमके पीटीचे शिक्षक येऊन बसतात. त्यांनाही घरीच जायचे असते. ते शेजारी बघतात तर खिडकीत बसलेले बहुधा शिक्षक असावे म्हणून अटकळ बांधून त्यांनी ओळख काढत सुरु केली आणि मग दिवसभर पीटी मुळे बोलायला न मिळालेल्या त्या शिक्षकाला किती बोलू आणि किती नाही असे होऊन गेले. तर दिवसभर बोलून बोलून थकलेल्या त्या गुरुजीला नकळत त्या गप्पांमध्ये सामील व्हावेच लागले अगदी प्रवास संपेपर्यंत !
द. मा. मिरासदार यांची भूताचा जन्म ही कथाही अशीच गंमतीदार. अमावस्येच्या एके रात्री गावाकडे निघालेल्याला वाटेत एकजण भेटतो. अनोळखी असला तरी बरे झाले कोणाचीतरी सोबत मिळाली असे त्याला वाटते. चालता चालता त्यांच्या गप्पा रंगतात. वाट सरत राहते. एके ठिकाणी झाडाखाली ते विधी वगैरेसाठी थांबतात. एकजण झाडाच्या आडोशाला जातो. परत येऊन पाहतो तर दुसरा दिसत नाही. खरे तर तोही आडोशाला गेलेला असतो. पण तो दिसला नाही हे पाहून याची बोबडी वळते आणि तो वेगाने धावत सुटतो. जरावेळाने आडोशाला गेलेला हा येऊन पाहतो तर जोडीदार गायब म्हणून त्याचीही बोबडी वळते आणि अशाप्रकारे भूताचा जन्म होतो अशी ही खुमासदार गोष्ट.
बर्याचशा लोककथा , परीकथा ह्या अशा गप्पांमधूनच पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत. त्यांचा प्रसार रंगरुप शैली बदलून होत आलेला आहे.
गप्पा आणि गोष्टींना अंतच नाही. पहावे तिकडे लोक गप्पा झोडत असतात. टाळीवर टाळी देत असतात. पु. भा. भावे यांच्या एका कथेत एक आक्रमक बढाईखोर असतो आणि तो जे सांगेल ते ऐकून घेत असलेला उत्तम श्रोता होता. गप्पा रंगत जातात. तो बढाईने एकेक गोष्ट रंगवून रंगवून सांगत असतो. आपल्या एकेक प्रकरणांबद्दल सांगत रहातो. शेवटी तो श्रोता त्याला पुढ्यातला दारुचा रिकामा ग्लास मारुन फेकतो इतका त्याचा राग ऐकता ऐकता आतल्या आत धुमसत जातो. कारण तो जे प्रकरण रंगवून रंगवून सांगत असतो त्या प्रकरणाचा पती तो श्रोता असतो. गप्पांच्या नादात कधी कधी भानच रहात नाही. अचानक काही भानगडी उजेडात येतात आणि स्फोट होतो. माणसं बदलली, ठिकाणं बदलली की गप्पांचे स्वरुपही बदलून जाते. चार तरुण एकत्र आले की तरुणाईच्या गप्पा रंगतात. नवपरिणित जोडपं असेल तर त्यांच्यातील हितगुज कोणालाच ऐकू येत नाही. ते एवढ्या हळू आवाजात लाजत लाजत असते की जोडीदाराला कसे काय बुवा समजत असेल असा प्रश्न पडतो. काही ठिकाणी आवडत्या व्यक्ती भेटल्या की गुलुगुलु गप्पा सुरु होतात आणि नको ती माणसं भेटली की तोंडाला कुलुप असेही चित्र दिसते.
चहाची टपरी हे तर गप्पांचं मस्त ठिकाण. चाय पे चर्चा हा कार्यक्रम आता आला असला तरी चहाच्या टपरीवरील गप्पांना त्याहून अधिक इतिहास आहे. चहाचा एकेक घोट घेत घेत एकेक विषय चघळण्यात जो मजा आहे तो कशात नाही. तरतरी नेमकी चहामुळे येते की गप्पांमुळे यात संभ्रम वाटेल असे असते. बाबू लोक चहाच्या टपरीवर किंवा पानाच्या ठेल्यावर गप्पांमध्ये इतके रंगून जातात की त्यांना साहेबांनी बोलवले म्हणून शिपायाला शोधत यावे लागते कारण त्यावेळी नेमके मोबाइल आऊट ऑफ कव्हरेज एरिया करुन ठेवलेले असतात. किंवा काही महाभाग ऐन भरातल्या गप्पांना मध्येच व्यतय येऊ नये म्हणून चक्क जागेवर फोन चार्जिंगला लावून व शिपायाला त्यावर नजर ठेवायला लावून बाहेर पडलेले असतात. फोन आला तरी जागेवरच वाजत रहातो आणि गप्पांमध्ये अजिबात व्यतय येत नाही
निवृत्त झालेल्या मंडळींचा गप्पा मारायचा एक कट्टा वेगळा असतो. जो शक्यतो गजबजलेल्या जगापासून वेगळा असतो. एकेक आठवणी काढत रोज गप्पा रंगत राहतात. आठवणींनाही अंत नसतो. हा कट्टाच जादूचा. कुठल्या कुठल्या सहसा न आठवणारया आठवणींही गप्पांच्या ओघात येऊन जातात की अरे इतके दिवस ही आठवण आपण कसे विसरुन गेलो होतो असा प्रश्न पडेल. अशा कट्ट्यावरील एकेकजण कमी होतो तेव्हा पाणावल्या डोळ्यांनी गप्पा सुरुच राहतात.
वेगवेगळ्या वयात वेगवेगळे विश्व असते आणि त्यानुसार गप्पा रंगत असतात. अशा गप्पा मारणाऱ्यांमध्ये असाही एकजण असतो ज्याला बाहेर वेगळे सूर ऐकू येत असतात पण तोंडाने मात्र तो ऐकल्यासारखे करुन हुं हुं करत राहतो.
तर अशा या कधी ही न संपणाऱ्या गप्पा, आता मात्र संपवायलाच हव्यात ;

– लेखन : विलास कुडके
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मा. विलास कुडके यांचा गप्पा या विषयावर वरील लेख हाच मुळी एक गप्पांचा अनुभव देऊन गेला. निच्छितच गप्पांची मानवी जीवनातील महती अधोरिखीत केली आहे….बरे वाटले.
खूप सुंदर कथा. लोकलमध्ये मैत्रीणीसोबत अश्या गप्पागोष्टी व सुख दुःख शेअर केली जातात.
निरुद्देश गप्पा मारता येतील अशी माणसं आजूबाजूला जपली पाहिजेत, स्टेटसची चिंता न करता. स्टेट्स हे आपल्या आयुष्याच्या पुस्तकाची किंमत वाढवण्यासाठी घालून घेतलेले एक कव्हर आहे,आतला मजकूर आपण समाधानी अवस्थेत लिहायचा तर मनस्वास्थ्य उत्तम असले पाहीजे, मनमोकळे करता आले पाहीजे.
मला ऑफिस टूरवर जाताना बॉसने सांगितले, तपासणी करतोयस असे दाखवू नकोस. तिथल्या स्टाफशी गप्पा मार. बर्याच गोष्टी आपोआप समजतील.
मी प्रयत्न केला. मला मराठी, हिंदी आणि इंग्रजी याच तीन भाषा येतात. त्या लोकांनी तर फक्त स्थानिक दाक्षिणात्य भाषा बोलण्याची प्रतिज्ञा घेतलेली. माझ्या प्रश्नांना ते त्यांच्या दाक्षिणात्य भाषेत उत्तर द्यायचे. त्यांना उत्तर देताना माझ्याकडे शब्दच नसायचे. मग ते काहिही बोलले तरी मी माझ्या स्टिलच्या डब्यात पेपरवेट ठेवून वाजवायचो.
पंधरा मिनिटांत हिंदी पोपट तयार होऊन ग”गप्पा” मारायला लागले.
गप्पा झाल्या पण सगळ्या पाट्या स्थानिक आणि इंग्रजीतच होत्या. हिंदी बॅन.
दक्षिणेत जाल तर गप्पा मारताना पेपरवेट जवळ ठेवा.
गप्पा नको पण भात आवर हे ही लक्षात ठेवा.
– शाम पंधरकर
Excellent 👌
मनापासून धन्यवाद सर