“गुरुचरित्राचे पारायण ….”
नवी दिल्ली पोस्टींग मधील दत्त विनायक मंदिर हे एक विशेष आकर्षण होते. सायंकाळी आरतीच्या आधी रामरक्षा स्तोत्र म्हणायला मिळे. गणेशोत्सवात नाटके, विविध गुण दर्शन कार्यक्रमात सहभागी व्हायला आवडायचे. गोधडे कुटुंबियांसमवेत बॅडमिंटन खेळायची सोय होती तर मराठी पुस्तकांची लायब्ररी चालवली जायची. अशा सांस्कृतिक, धार्मिक आणि मनोरंजनाची सोय असलेले दत्त विनायक मंदिर केंद्र होते.
असेच एकदा वयस्कर काजवाडकर कुटुंबिय आमच्या घरी गप्पा मारायला आले होते. बोलता बोलता विषय निघाला की ते दर वर्षी गुरुचरित्राचे पारायण करतात. त्यांना आनंदाची प्रचिती येते. वगैरे. ते ऐकून मला तशी प्रचिती मिळेल का तर मी पण गुरुचरित्राचे पारायण करायला तयार आहे असे सहज आव्हानात्मक म्हटले. त्यांनी आपल्याकडील पोथीची प्रत दिली. आणि सुरवातीला बोलून बसलोय म्हणून पोथी वाचनाला सुरवात केली. २ दिवस झाले असतील, मला अचानक काही तरी लिहायला हवे अशी उर्मी आली. लिहायला सुरुवात केली. ते लिखाण त्या रात्री २ वाजेपर्यंत चालू होते. नंतर सलग महिनाभर लेखन होत राहिले. आणि माझ्या हातून कादंबरी लिहिली गेली. तिचे नाव होते ‘अंधारछाया’ मी तसा लेखक वगैरे नाही, मराठीत लिहिण्याचा सराव पण राहिला नव्हता. पण त्या काळात जे लिहिले ते माझ्या बालपणातील स्मृतींवर आधारित जगात भूतयोनी असते का ? असेल तर शारीरिक व मानसिक त्रास, छळ कसा केला जातो? याच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे. यातून सुटका करून घेण्यासाठी काय उपाययोजना केली होती यावर सविस्तर चर्चा केली आहे.
या नंतर दर दत्तजयंतीच्या आधी पोथीची सप्ताह करायला आनंद वाटत राहिला. नंतर जणू काही पोथी वाचनाचा प्रसाद म्हणून अशा काही अदभूत घटना घडत गेल्या. त्यातलीच एक नाडी भविष्य विषयावर पुस्तके निर्माण झाली. वगैरे वगैरे… अगदी २०२३, २४ पर्यंत वाचन सुरू होते. मध्यंतरीच्या काळात नृसिंह सरस्वतींच्या गुरुचरित्राऐवजी ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ पोथीचे वाचन चालू राहिले. त्यातील नंतरच्या काळात सोनी टीवी वर ‘मन में है विश्वास’ या सीरीज मधे २६ जानेवारी २००७ साली दत्तगुरुंच्या आशीर्वादाने माझ्यावर आलेल्या चोरीच्या बालंटामधून कशी लीलया सुटका झाली यावर आधारित एक भाग होता.
एकदा नाडी केंद्रावर खोटी कोर्ट केस लावली गेली ती पण उलटवली गेली वगैरे घटना घडत गेल्या.मला या चरित्र पोथ्यांचा तौलनिक अभ्यास करायला सुचले. ते लेखन नंतर सनातन प्रभात मधे प्रकाशित झाले .मग त्या वर आधारित २० ई-बुक पुस्तकाची निर्मिती झाली. मनोपदेश म्हणून मनाच्या श्लोकांचे हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषांतर करायचे कार्य सध्या चालू आहे.
याच सुमाराला माझी पुढची पोस्टींग पुण्यात झाली. एकदा सहज जनकपुरीत राहणाऱ्या मराठी वरिष्ठ व्यक्तींशी बोलताना पुण्यात प्लॉट आहे पण पझेशन मिळत नाही,यासाठी केस करून ती जमीन मिळवायला पुण्यात असले तरच ते शक्य आहे असे मी म्हणालो. ते ही म्हणाले ‘खरे आहे, माझी पण गोव्यातील जागेच्या संदर्भात तीच अडचण आहे’ वगैरे म्हणून माझे डीटेल्स घेतले. काही काळाने माझी बदली पुण्यात झाली. मी हवाईदलातील वरिष्ठांशी बोलताना त्या व्यक्तीचे नाव सांगितले, तेव्हा ते म्हणाले, ‘अरे तुला कल्पना आहे का ते किती महत्त्वाच्या पदावर आहेत ते ? हवाईदलातील प्रत्येक खरेदीच्या व्यवहारात त्यांच्या संमतीशिवाय पान हलत नाही. ते अत्यंत कठोर नैतिक सचोटीचे अधिकारी म्हणून नावलौकिक उच्च अधिकारी आहेत वगैरे. मी त्यांना पोस्टींग झाले सांगितले तर फक्त म्हणाले, ‘हो का ? आता जमिन मिळवा’ असे म्हटले. शेवटी जमीन मला मिळालीच नाही!
मी मे १९८६ साली पुण्यात दाखल झालो. मग पुण्यात काय काय घडले, मुलगा चिन्मयचे अपहरण वगैरे थरारक कथानक पुढे येईल.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800