प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आदमपूर हवाई अड्ड्याला भेट दिली. त्यावरून माझ्या जीवनातील आदमपूरच्या घटना एकदम आठवल्या. १९७२ साली मला आदमपूरला दोन महिन्याकरता कामाला धाडले गेले होते. जालंधर आणि होशियारपुर यामधे असलेल्या आदमपूरला स्क्वाड्रन लीडर कोठारे म्हणून माझे बॉस होते. एक फ्लाईट लेफ्टनंट सरदारजीने आम्ही त्याला पेमेंट करायला दिलेल्या पैशाच्या कापडी पिशवीत उरलेले पैसे परत द्यायला माझ्यासमोर उभा होता. आणि ते देत असताना त्यांनी ती पिशवी अशी फेकली की ती टेबल वरून खाली पडली.
मी दुसरे काम करत होतो. मला वाटलं की तो खाली पडलेली पिशवी उचलून माझ्या हातात देईल. त्यांनी बोटानी आणि तोंडाने बोलून, ‘तुला हवं असेल तर घे उचलून’ असं म्हटलं, मी त्याला म्हटलं की ही बॅग देताना तुझ्या हातात दिलेली होती. तशीच परत दे. तो ऐकेना. आमची बाचाबाची बॉस कोठारे यांनी ऐकून त्या फ्लाईट लेफ्टनंट सरदारजीला खणखणीत आवाजात सांगितलं की आत्ताच्या आत्ता तू ही कॅशबॅग उचलून त्याला दिली नाहीस तर, तुला मी सेक्युरिटीचे पोलीस बोलावतो आणि तुला मी क्लोज कस्टडीत पाठवतो. बदललेली परिस्थिती पाहून त्यांनी चुपचाप खाली उचलून माझ्या हातात ती दिल. म्हणून नंतरचा प्रसंग टाळला.
काही दिवस झाले असतील, त्या घटनेनंतर ऑफिसर्स मेस मध्ये एक पार्टी होती गाणी, डान्स वगैरे चाललेला असताना एकदम एक जण आला आणि त्याने माझ्या पोटात बुक्की मारली. मला कळवळा आला, पाहिलं तर तोच सरदारजी होता! त्याचा झालेला अपमान असा माझ्यावर पोटात बुक्की मारून काढला होता. मी पण त्याच्या समोर गेलो आणि त्याच्या पोटात गुद्दे मारले. तो दारू प्यायला असल्यामुळे त्याचा तोल जाऊन कोलमडला. काही जण मधे पडून सोडवायला आले. नंतर काही दिवसानी भेटला त्यावेळेला तो मला म्हणाला, सॉरी यार, माफ कर देना’ असं म्हणून त्यांनी त्या घटनांवर पडदा टाकला. नंतर जोपर्यंत मी तिथे होतो तोवर तो माझा दोस्त बनला.
ह्या आदमपूरला आणखी एक मजेशीर घटना घडली. स्क्वाड्रन लीडर कोठारे ह्या आदमपूर पासून साधारण पंधरा-वीस किलोमीटर दूर असलेल्या होशियारपुरला भृगुसंहिता पहायला निघाले होते. म्हणाले, ‘काय रे, तू येणार का तिकडे भविष्य बघायला? आश्चर्य असं की मी म्हटलं, ‘नाही मला काही इंटरेस्ट नाही’.
नंतर अशा काही घटना घडल्या की नाडी भविष्याने माझे भावविश्व भारले. १९९५ मधे तांबरमहून दोन हजार किमी पार करून भृगुसंहिता केंद्रांच्या लोकांना भेटायला म्हणून होशियारपूरला गेलो होतो!
पंतप्रधान नरेंद्र मोदी या आदमपूरलाच का गेले? याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तिथे S400 ही आपली जी रडार विरोधी यंत्रणा आहे, तिचा पाकिस्तानी एअरफोर्सनी नाश केला असे म्हटले गेले. ते खोटे आहे हे दाखवण्याकरता मोदींनी बारा मेच्या भाषणानंतर दुसऱ्याच दिवशी १३ मेला ते आदमपूरला पोहोचले होते आणि S400 रडारच्या ट्रक पुढे उभे आहेत असे चित्र दाखवून त्यांनी पाकिस्तानचा खोटेपणा उघड केला.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
वरील लेख मी पुण्याहून गोव्याला प्रवासादरम्यान, विमानतळाच्या लाऊंजमध्ये आणि विमानात बसल्यावर, व्हॉईस टायपिंगच्या माध्यमातून शुक्रवारच्या साप्ताहिक सदरासाठी वेळेवर पाठवला. त्यानंतर तो अधिकृतरीत्या प्रकाशित झाला.