हुंड्यातून महिला मुक्त झाली आहे का ? या निमिताने सध्या ऑस्ट्रेलियात वास्तव्य असलेल्या लेखिका सुलभा गुप्ते यांनी तेथील स्थितीविषयी लिहिले आहे. या लेखनासाठी त्यांना त्यांची नात अलिसा, ग्रॅज्युएट (Planning and Transport विषयात) नोकरी – Transport मध्ये आणि नातू अश्विन : Law and Asian History विषयांमध्ये ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षीत शिकत आहे, यांची मदत झाली आहे. न्यूज स्टोरी टुडे तर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार….
“यत्र नार्यस्तु पूजन्ते
रमंते तत्र देवताः ॥
म्हणजे ज्या देशात नारीला पूजले जाते, त्या देशात देवांचा वास असतो . स्त्रीला देवीरूपात मानणारा आपला भारत देश . मात्र त्याच देशात प्रचलित “हुंडा” पद्धत हा तिच्या कपाळावर लागलेला कलंक आहे . कन्येचा योग्य वयात, अनुरूप वराशी विवाह करून देऊन, कन्यादान , (ज्याची तुलना पृथ्वी दानाशी केली जाते) करणे हे मातापित्यांचे कर्तव्य !
विवाह म्हणजे दोन जिवांचे मीलन, दोन कुटुंबांचे स्नेहबंधन इतका उदात्त हेतू ! . सोळा संस्कारांपैकी एक !
ह्या शुभप्रसंगी कन्येला सुंदर वस्त्र प्रावरणांनी, दागिन्यांनी नटवणे इथपर्यंत ठीक आहे . पण ह्या प्रसंगी “कन्या स्वीकारण्याची अट म्हणून हुंडा देणे अथवा घेणे” हे त्याला लागलेले गालबोट आहे . तरीसुद्धा ही घातक प्रथा समाजात रुळली आहे.
साठ वर्षांपूर्वी सरकारने हुंडा विरोधी कायदा अंमलात आणला . पण त्यामुळे महिला मुक्त झाली कां?
ह्याचे उत्तर : नाही ! नाही ! नाही !
असेच आहे . हुंडा बळी , न दिल्यास लग्न मोडणे , सुनेवर अत्याचार छळ हे समाजात सर्रास चालू आहे . प्रत्यक्ष हुंडा न दिला तरी आडमार्गाने
हे प्रकरण चालूच असते .
भारतातील ह्या सामाजिक पार्श्वभूमीचा विचार करता मी इतर पाश्चिमात्य देशात, विशेषतः काय प्रचलित आहे ह्यावर माझ्या सिडनी येथील वास्तव्यावर आधारित अनुभव सांगत आहे .
सर्वप्रथम इथे हुंडा ही पद्धत अजिबात प्रचलित नाही . मुलीला विवाहप्रसंगी काय द्यावे ह्याचे पालकांवर बंधन नाही . आईवडील आणि नातेवाईक, मित्रमंडळी हौशीने, आनंदाने , स्वेच्छेने भेटवस्तू देतात . (बंधन नाही.)
विवाहबद्ध होण्यासाठी जात, धर्म बंधन नाही. चर्च वेडिंगला सर्वात कमी खर्च येतो. ग्रीक, इटालियन इ . लोक वधूवरांना वैवाहिक जीवन सुरु करण्यास मदत म्हणून भरपूर भेटवस्तू आणि आर्थिक मदत करतात.
ऑस्ट्रेलियातील मूळचे लोक Aborginal हे बहुधा मधुचंद्र किंवा हॉलिडेचा खर्च देतात.
बव्हंशी स्त्रिया व पुरुष एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर काही काळ एकत्र राहून सहजीवन अनुभवतात . त्यानंतर मुले व्हावी असा विचार पटल्यास रजिस्टर लग्न करतात . त्यासाठी ३० दि आधी Govt. Registry मध्ये नाव नोंदणी आवश्यक असते नंतरच लग्न रजिस्टर होते व पुढे होणारी संतती कायदेशीर ठरते.
बहुतेक दोघेही संसारात पडण्यापूर्वी पुरेसे अर्थार्जन करतात . स्वसंमतीने विवाह होत असल्याने हुंडा देण्याची पद्धतच नाही . पर्यायाने पुढील छळ किंवा समस्या उद्भवतच नाही .
ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये काही जातीय, सामाजिक बंधने आढळून येतात. परंतु एकंदरीत विवाह ह्या बाबतीत वधूवरांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे.
मात्र खेदाने नमूद करावेसे वाटते की येथील भारतीय कम्युनिटी मध्ये honor killing, domestic violence,family violence
इ चे प्रमाण खूपच जास्त आहे . ह्या बाबतीत भारतीय कम्युनिटीचा दुसरा नंबर लागतो असे ऐकिवात आहे . ह्याची शहानिशा करण्याची संधी अजून मिळाली नाही.
त्यामुळे हुंडाबंदीने भारतीय महिला मुक्त झाली ह्या बाबत मी साशंक आहे.
– लेखिका : सुलभा गुप्ते. सिडनी, ऑस्ट्रेलिया.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खूपच छान लेखन.
वर्मी घाव लागणारे असे वाक्य.
पण वास्तव लिहिले आहे.
🌹🌹