थोर नेते प्रा एन. डी.पाटील यांचे नुकतेच निधन झाले. सरांच्या सार्वजनिक जीवनाविषयी आपल्याला खूप माहिती आहे. पण ते घरात कसे होते, त्यांच्या समवेतचे सहजीवन, त्यांचे नाते संबंध याविषयी त्यांच्या पत्नी
सरोजमाई यांनी जागविलेल्या या मनोज्ञ आठवणी “अंधश्रद्धा निर्मूलन” वार्तापत्राने जुलै २०१८ मध्ये प्रकाशित केलेल्या “एन.डी.पाटील कृतज्ञता” विशेषांकात प्रसिध्द झाल्या आहेत. आपले वाचक, हितचिंतक, कोल्हापूर येथील डॉ रमाकांत दगडे यांनी त्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचे मनःपूर्वक आभार. आदरणीय एन डी सरांना आपल्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली….
– टीम एनएसटी.
अतिशय चारित्र्यसंपन्न, गुणवान, सुसंस्कृत अशा आई-वडिलांच्या पोटी माझा जन्म झाला. हिमालयापेक्षा उंचीचे व सागरापेक्षा विशाल मनाचे भाऊ मला लाभले; तसेच पैशापेक्षाही मौल्यवान असे जिव्हाळ्याचे मित्र आम्हाला लाभले आणि सर्वांत शेवटी, ज्यांच्याबरोबर मी हा धकाधकीचा संसार केला ती व्यक्ती असामान्य होती. त्यांच्या मानाने मी अतिसामान्य, रुपानेही सुमारच; पण आपल्या मूल्यांशी, तत्त्वांशी प्रतारणा न करता त्यांनी माझे मन जपले. माझ्या स्वातंत्र्याला कधीही मर्यादा घातली नाही. मला जे आवडते ते काम मला करू दिले. दोघांनीही एकमेकांना समजून घेतल्याने जीवन संघर्षमय असूनही त्याची इजा एकमेकांना झाली नाही.
माझे आई-वडील निर्व्यसनी होते. त्या उभयतांना एकच व्यसन होते आणि ते म्हणजे ‘जनसंपर्क’. माझ्या लहानपणी आमच्या घरासमोर रस्ता संपूर्ण मोकळा होता. आमच्या घराकडे येणारा माणूस दुरून दिसला रे दिसला की, वडील स्वयंपाकघरात चहा-नाष्ट्याची ऑर्डर देत. घरात माणसांचा सतत राबता असायचा. त्या काळात आमच्या आई नगरपालिकेवर निवडून आल्या होत्या. आमच्या घरात विविध थरांतील लोक येत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिवीरांचे वास्तव्य आमच्या घरात असे. गांधीहत्येच्या वेळी अनेक ब्राह्मण कुटुंबांना आमच्या आई-वडिलांनी आधार दिला होता.
आमच्या आबांचे कौतुक करायला पाहिजे. कारण बहुतेक सगळे पुरुष बाहेर एक बोलतात आणि आत एक वागतात. बाहेर समाजाला ज्ञान शिकवतात; परंतु आमच्या आबांचं असं अजिबात नव्हतं. त्या काळात आपल्या बायकोला अशा पद्धतीनं स्वातंत्र्य देणं, ही सोपी गोष्ट नव्हती. मुलींच्या बाबतीतही त्यांनी तेच केले. बाईबरोबरच त्यांनीही मुलींना शिक्षण देण्याचा आग्रह धरला होता. आम्ही त्या काळामध्ये कबड्डी खेळायचो. मुलांच्याबरोबर वावरायचो. कधीही आम्हाला आमच्या आई-वडिलांनी अडवलं नाही. माझी मोठी बहीण सरला जगताप; तिला आम्ही ताई म्हणतो. ताई आणि मी अशा आम्ही पवार बहिणी खेळाच्या मैदानावर अतिशय प्रसिद्ध होतो.
पण आश्चर्य म्हणजे एवढ्या पुरोगामी विचारांच्या बाई; पण त्यांनी आम्हाला कबड्डी खेळायला बाहेरगावी जाऊ दिलं नाही. खरं तर आम्ही ‘ट्रिपल क्राऊन’ मिळवला होता. धुळे-जळगाव या ठिकाणी राहायची सोय नसल्यामुळे बाईंनी आम्हाला तिकडे पाठवून दिले नाही. त्या काळामध्ये आमच्या शिक्षिका वाटवे बाई आम्हाला खूप प्रोत्साहन द्यायच्या. थ्रोे बॉलची मी कॅप्टन होते. उंच उडी, लांब उडी या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही कायम पुढे असायचो. स्मरणशक्तीसारख्या गेम्समध्ये पहिला किंवा दुसरा क्रमांक नेहमी असायचा. खरं म्हणजे त्या काळामध्ये आमच्या दोघींमुळे शाळेमध्ये एक नियम काढला – ‘एन थ्री’ म्हणजे विद्यार्थ्यांनी कुठल्याही ‘तीनच स्पर्धां’मध्ये भाग घ्यायचा. कारण मी थ्रो बॉलची कॅप्टन होतेच; पण त्याचबरोबर सगळ्यामध्ये भाग घेऊन पहिला-दुसरा नंबर मिळविल्यामुळे तो नियम केला होता की, प्रत्येक विद्यार्थ्याने कुठल्या तरी तीन खेळांमध्ये भाग घ्यायचा.
जातिभेद, धर्मभेद यांचे वारेही आमच्या घरात शिरले नव्हते. माझे वडील बंधू (कै.) वसंतराव पवार हे शेतकरी कामगार पक्षातील एक लोकप्रिय व धडाडीचे नेते होते. त्यामुळे डाव्या चळवळीतील अनेक नेते आमच्या घरी येत-जात. क्रांतिसिंह नाना पाटील, भाई उद्धवराव पाटील, दाजीबा देसाई, जी. डी. लाड यांच्या सहवासाने आमचे घर पुनित झाले होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अनवाणी पावलांनीही आमची भूमी मंगलमय झाली होती. कर्मवीरांच्या वतीने मोहिते नावाचे एक लठ्ठ गृहस्थ कायम आमच्या घरी उतरत व ते खेडोपाडी जाऊन देणग्या व धान्य गोळा करीत. हे सर्व सांगावयाचा उद्देश असा की, आई-वडिलांच्या लोकसंग्रह वृत्तीतून माझे लग्न एन. डी. पाटील यांच्याबरोबर झाले व माझ्यामध्ये थोडीफार सामाजिक दृष्टीही येऊ शकली.
वडील म्हणायचे, ‘आपल्या मुलीने इथे जिथे फुले वेचली, तिथे तिला काटे का वेचायला लावायचे ?’ यावर आई म्हणत, ‘चिमण्या-कावळ्याप्रमाणे अनेकजण संसार करतात. मात्र हा मुलगा असामान्य आहे. त्याच्या डोळ्यांत बुद्धीची चमक आहे. वागण्यात प्रामाणिकपणा आहे. यालाच मुलगी द्यायची. ’एन. डी. पाटील यांना ओळखणारे अनेक लोक आई-वडिलांना म्हणत, “अहो ! याच्या पायाला भोवरा आहे, एखाद्या दरवेशाप्रमाणे हा भटकत असतो. कशाला मुलगी देता ? तुम्हाला ती जड झाली आहे का ?” असे वादविवाद चालू होते. या वादविवादात माझ्या पसंती-नापसंतीचा विचार कोणाच्याच डोक्यात नव्हता. आमच्या आईचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असल्याने अशा वादाच्या वेळी आईचा नेहमीच विजय होत असे. अशा रीतीने माझे लग्न एकदाचे ठरले.
लग्नापूर्वीच एन. डी. पाटलांनी सांगितलं, “माझ्याकडे शेती नाही. असली तरी आम्हाला मिळणार नाही. मी घरात वेळ आणि पैसा दोन्ही देऊ शकणार नाही. कारण मी पूर्णवेळ पक्षाचं काम करायचा निर्णय घेतला आहे. अर्थात, माझी तुमच्याकडूनही कुठलीच अपेक्षा नाही. मला मुलगी आणि नारळ चालेल. तुम्ही करून द्याल, तसे लग्न मला मान्य आहे. हे सारे जर मुलीला चालत असेल, तर माझी काही हरकत नाही.”
या त्यांच्या अटींबद्दल विचार करण्याचं माझं वय नव्हतं आणि त्याबाबत मला कुणी मार्गदर्शनही केलं नाही. माझ्या आई-आबांनी त्यांच्या सर्व अटी मान्य केल्या आणि आमचं लग्न ठरलं.
माझे दुसरे भाऊ अनंतराव त्यानंतर एकदा त्यांना फिरायला घेऊन गेले. “आता लग्न होणार; मग तुम्ही पुढचा विचार काय केलाय ?” असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर “कोणतीही वेळ आली तरी तुमच्या दारात येणार नाही,” असं त्यांनी सांगितलं. बस्स, लग्नापूर्वी झाली ती एवढीच चर्चा. त्यामध्ये मी कुठेच नव्हते. आजच्या मुली स्वतंत्रपणे स्वत:च्या आयुष्याचा विचार करतात, तसे करण्याचे ते दिवसच नव्हते. “आपले आई-आबा आपले चांगलेच करणार,” असा विश्वास असायचा. मी तर लग्न, त्यानंतरचं आयुष्य याचा विचारच केला नव्हता. तेवढी परिपक्वता माझ्यात नव्हती.
त्या वेळी मी पुणे येथील आबासाहेब गरवारे कॉलेजात बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत होते व होस्टेलमध्ये राहत होते. माझ्याबरोबर इतरही अनेक मैत्रिणींची लग्ने ठरली होती. शनिवार आला की, सर्व मैत्रिणींचे भावी यजमान होस्टेलवर येत व आपल्या भावी पत्नींना घेऊन चित्रपटाला वा फिरायला जात. याला अपवाद फक्त एन. डी. पाटील होते. ते शेवटपर्यंत या होस्टेलची पायरी चढले नाहीत. मी मनात म्हणायची, ‘हे कधीच कसे येत नाहीत ? फोनही करीत नाहीत, कसला नवरा ?’ अशा रीतीने मनाला हळूहळू चटके बसण्यास सुरुवात झाली होती.
शेवटी 17 मे 1960 चा दिवस उजाडला. लग्नाची वेळ सकाळी 10 ची होती. मांडवात लोक जमू लागले होते. अक्षता देण्याची वेळ येऊन ठेपली; पण नवरदेवाचा पत्ता कुठाय ? माझ्या मनात पाल चुकचुकली, ‘या गृहस्थाने रामदासासारखे पलायन तर केले नाही ना ?’ चार दिशेला चार भाऊ नवरदेवांना शोधायला गेले. त्या काळी बिचाऱ्यांकडे वाहनेही नव्हती. शरद एक डबडी मोटारसायकल घेऊन पळाला. उन्हात वणवण फिरून परत मांडवात परतला, तो अगदी दमलेल्या अवस्थेत ! अक्षरश: तोंडाला फेस आला होता. ते 18 वर्षांचे पोर थकून गेले होते. विरोधी पक्षाची चपराक कशी असते, त्याचा अनुभव लहान वयातच आला. त्यामुळेच की काय, पुढील आयुष्यात विरोधी पक्षाशी त्याला चांगलेच जमवून घेता येऊ लागले. शेवटी नवरदेवाचा शोध लागला. नवरदेव व वरात एका ओढ्यातील चिखलात अडकून पडले होते. शेवटी घाईघाईने नवरदेवाची गाडी ओढून काढली व त्यांना मांडवात बिन आंघोळीचेच उभे केले व एकदाचे अक्षता टाकून त्यांना चतुर्भुज केले.
लग्नानंतर एका डबड्या फियाटमधून आमची वरात माझ्या सासरी ढवळी गावास निघाली. फियाटमध्ये पाठीमागे आमच्या दोघांप्रमाणे आणखी दोघे घुसले व पुढे दोघे बसले. उन्हाळ्याचे दिवस. पाठीमागे चारजण कसे बसले असू, त्याची कल्पना केलेली बरी. एकूण सात माणसांना घेऊन आचके देत गाडी एकदाची ढवळीस पोचली. आताची ढवळी व 1960 च्या काळातील ढवळी यात जमीन-अस्मानचे अंतर आहे. मी तिथे पोचले व फारच घाबरून गेले. तीन खोल्यांचं छोटंसं घर, छोटी मोरी. घरात पाच-सात कच्ची-बच्ची, दीर-जावा, सासू-सासरे, घरातच जनावरं, घोंगड्यावरची झोप, स्वयंपाकाच्या वेगळ्या पद्धती, स्वच्छतागृहांचा अभाव, डास पिसवांचं साम्राज्य. या साऱ्या वातावरणाची स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती; किंबहुना जगात असं पण काही असतं, हेही माहीत नव्हतं.
धुळीची ऍलर्जी असल्यानं नाकातनं पाणी यायचं; पण कमरेला रुमाल लावणं ‘बापईपणाचं लक्षण’ होतं. माझे केस खूप दाट, लांबसडक होते; पण उभं राहून केस विंचरणं हेही ‘बापईपणाचं लक्षण’ होतं. मला बसून केस विंचरताच यायचे नाहीत. स्वच्छतागृह नाही. त्यामुळं माझं पोट साफ नसायचं. मी तर आजारीच पडले. एके दिवशी संधी साधून मी त्यांना सांगितलं, ‘मला बरं वाटत नाहीय.’ त्यांनी दुसऱ्याच दिवशी बॅग भरायला लावली आणि अलिबागच्या बहिणीकडे सोडलं. लग्नापासून पुढची 20-25 वर्षे म्हणजे माझ्यापुरता कटू आठवणींचा काळ. त्या काळात इतका संघर्ष करावा लागला की, ती वर्षे आयुष्यातून खोलीच्या दरवाजासारखी बंद करावीत, असे वाटते. हा संघर्ष होता परिस्थितीशी आणि आई म्हणून स्वत:शीसुद्धा !
माझ्या सासरी त्या काळी सोयी नव्हत्या. गरिबी होती, शिक्षणाचा अभाव होता; पण अडाणी असली, तरी माणसं मनानं निर्मळ, चांगली होती. माझ्या छोट्या-छोट्या गोष्टीचंही कौतुक करण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे होता. माझ्या ‘इंदू’ नावाच्या एक जाऊबाई अडाणी होत्या. माझ्या सासूबाईंनी एकदा शेजारणीला बोलता-बोलता सांगितलं, “अगं, मी जर इंदाच्या हातात लेखणी (पेन) दिली आणि सरोजच्या हातात नांगूर दिला, तर ते कसं दिसंल ? तेचा काय उपेग हाय काय ?” त्यांच्या या विचारांमुळे माझ्यावर टीका करणाऱ्यांची बोलती बंद व्हायची.
ही माणसे साधी असली, तरी ती पुरोगामी विचारांची आहेत, बंडखोर प्रवृत्तीची आहेत, हे जाणवू लागले. अजूनही मी जेव्हा ढवळीला जाते, तेव्हा सर्व मुले माझ्याभोवती ‘काकी-काकी’ करत जमतात. मी त्यांच्यातच रमते. त्यांच्याबरोबरच जेवते. मला स्वयंपाकगृहात कधीच जावे लागत नाही. हा तेथील स्त्रियांचा मोठेपणा आहे. माझ्या सासूबाई निरक्षर असल्या, तरी त्यांचे विचार पुरोगामी होते. त्यांचे मन पाण्यासारखे स्वच्छ व निर्मळ होते. त्यांना माझा नेहमीच अभिमान वाटे. यांचे संसारात लक्ष नाही, हे पाहून सासूबाईंना माझी दया येत असे. कधी-कधी चिडून म्हणत, ‘कशाला याने लग्न केले ? याचे बायका-पोरांकडे लक्ष नाही !’ गोरगरिबांना, अडलेल्यांना त्या नेहमी मदत करत. शिक्षण नसूनही जातिभेदाचा त्यांच्यात लवलेश नव्हता.
माझं लग्न मे मध्ये झाले आणि ऑगस्टमध्ये ते आमदार झाले. मधल्या तीन महिन्यांच्या काळात मला अलिबागच्या बहिणीकडे किंवा बारामतीत टाकून हे गायबच व्हायचे. केव्हा तरी महिन्याभरानं परत दर्शन व्हायचं. मधल्या काळात मला अगदी शरमल्यासारखं व्हायचं; पण हे त्यांच्या गावीही नसायचं. त्या काळी फोन वगैरे नव्हते. त्यामुळे फक्त वाट बघण्याशिवाय काहीच करता यायचं नाही. परत भेटल्यावर काही बोललं, तर ते स्पष्टपणे सांगायचे, “हे बघ, साऱ्या गोष्टींची मी आधीच स्पष्ट कल्पना दिली होती. आता त्यावर चर्चा नाही.” मग बोलणंच खुंटायचं. मनस्वी, सडेतोड, स्पष्ट विचारांच्या, कर्तव्यकठोर आमदाराशी गाठ होती ना ?
आमदार झाल्यावर ते मुंबईला घेऊन गेले, तेव्हा मी खुशीत होते. आता मुंबई कशी असते, ते पाहता येईल, चित्रपट, गाण्यातून भेटलेल्या मुंबईची ओळख करून घेऊ शकू, असं वाटलं होतं. पण कसचं काय ? आमदार निवासातल्या एका खोलीत माझी वळकटी टाकून त्यांनी थोडे पैसे दिले. ‘जवळच कॅन्टीन आहे. तिथे जेवण नाष्ट्याची सोय आहे,’ असं यांनी सांगितलं आणि निघून गेले. मग काय, कॅन्टीनमधलं जेवायचं आणि यांची वाट पाहायची, हा माझा कार्यक्रम. रात्री केव्हातरी हे यायचे आणि सकाळी लवकर बाहेर पडायचे. त्यांचा पूर्ण वेळ पक्षासाठीच असायचा. मी गॅलरीतून दिसेल तेवढी मुंबई पाहत राहायची. ‘परत कधी येणार ?’ असं विचारलेलं त्यांना आवडायचं नाही. सुरुवातीच्या काळात कधी विचारलंच तर ‘काम संपले की येईन’ हे ठरलेलं उत्तर असायचं. एक मात्र नक्की, ‘जेवायला घरी येणार का नाही, आणखी कुणी येणार आहे का,’ हे मात्र ते न चुकता सांगायचे.
मुंबईत इंदूलकर नावाचे त्यांचे एक मित्र होते. शिवाजी पार्कजवळ त्यांची इंदूलकर चाळ होती. कॉमन व्हरांडा आणि दोन लहानशा खोल्या असं चाळीचं स्वरूप होतं. एकदा इंदूलकरांनी आम्हा दोघांना जेवायला बोलावलं. जेवण झाल्यावर ते यांना म्हणाले, “एन. डी., आमची शिवाजी पार्कजवळ चाळ आहे. त्यातल्या दोन खोल्या तुम्हाला देतो. तुम्ही आमदार निवासापेक्षा तिथे राहा.” त्या काळात पागडी न घेता, भाड्याविषयी काही न बोलता त्यांनी खोल्यांच्या चाव्या दिल्या. असे मित्र ही यांची श्रीमंती आहे. त्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी केलेल्या कष्टांची, समाजावर केलेल्या प्रेमाची त्यांच्याकडून आम्हाला अशा अनेक रुपांनी भरपाई मिळते. त्यांचे मोठेपण आमचा त्यांच्याबद्दलचा आदर वाढविते.
तर अशा रीतीने आम्ही दोन खोल्यांत राहायला आलो. आईनं येऊन संसार लावून दिला. जुजबी सामान आणलं, इथेही तीच तर्हा ! सकाळी लवकर पक्षाच्या कामासाठी हे बाहेर जायचे. घरासाठी अगदी थोडा वेळ. तिथल्या शेजारणींना वाटायचं की, ‘मला नवऱ्यानं फसवून इथं आणून ठेवलंय.’ त्या म्हणायच्या, ‘तुझा नवरा घरी कधी दिसत नाही. त्यानं फसवलंय का ? तसं असलं, तर सांग. आम्ही तुला मदत करू.’ मी हसून ते नाकारायचे. मग त्या विचारायच्या, “तो नेमकं काय करतो ?” मी सांगायची, “ते सोशल वर्कर आहेत.” त्यावर त्यांना प्रश्न पडायचा, ‘नेमकं कोणतं सोशल वर्क करतो ?’ अशा अनेक गमतीदार गोष्टी घडायच्या. याच काळात मोठ्या मुलाच्या -सुहासच्या- वेळेस मला दिवस राहिले. पुन्हा मी बारामतीला आले. या वेळी बरेच दिवस मुक्काम पडला. तोपर्यंत तिकडे इंदूलकरांनी चाळीच्या वरच्या मजल्यावर 350 चौरस फुटाचे तीन फ्लॅटस् बांधले. एक त्यांच्या मुलाला, एक पुतण्याला आणि एक आम्हाला दिला. हेच आमचं घर. मी या घरात 25 वर्षे काढली.
कोल्हापूरमध्ये रुईकर कॉलनी येथे बांधलेल्या घराचेही असेच. बरीच वर्षे तो प्लॉट तेथे पडून होता, तोही दौंडकरांच्या नावे होता. शेवटी सोसायटीने जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्यावर तेथील एका मेंबरने ती जागा परस्पर स्वत:च्या सासूबाईंच्या नावावर चढवली. ती जागा मोकळी करून घे, असे मला सांगितले गेले. खूप वर्षे को-ऑपरेटिव्ह कोर्टात हेलपाटे घातले. मन:स्ताप सहन करावा लागला. दहा वर्षांपूर्वीपासूनचा पत्रव्यवहार दाखविण्याचा आदेश कोर्टाने दिला. कोणीच नीट लक्ष न घातल्याने सगळी कागदपत्रे मिळविणे महामुश्किल होते. प्रशांतच हे सर्व करत होता.
शेवटी 2001 ला, वीस वर्षांनी केस जिंकली आणि जागा दौंडकरांच्या नावे झाली. त्यांनी ती आमच्या नावावर केली. घर बांधायचे ठरवले. प्लॅनही मंजूर झाला; पण लक्षात आले की, बरीच वर्षे जागा पडून असल्याने आजूबाजूच्या अनेकांनी अतिक्रमण करत आपले प्लॉट पुढे घेतले आहेत. मूळचा कॉलनीतील रस्ता बाजूला करून या प्लॉटमधून रस्ता दाखविला आहे. पुन्हा वर्षभर न्यायासाठी झगडत होते. एकटीच सगळीकडे जात होते. कॉलनीच्या नियमाप्रमाणे आणि प्लॅनप्रमाणे प्लॉट मिळण्यासाठीसुद्धा खूप हेलपाटे मारावे लागले.
स्त्री स्वत:साठी काही मागत नाही; पण मुलांसाठी तडजोड करताना मात्र तिला खूप झगडावं लागतं. हे मला मुलांच्या जन्मानंतर तीव्रतेने जाणवायला लागलं. इतके दिवस थोडे पैसे देऊन हे गेले तरी मी काही बोलत नसे. माहेरचा भक्कम आधार होता; पण तो यांच्या तत्त्वात बसत नाही, मलाही ते आवडत नव्हतं. शरमल्यासारखं वाटे. अनुभवातून तावून निघाल्यावर मी विचार करायला लागले. दोन मुलं आहेत. त्यांचा खर्च वाढतच जाणार. तो मेळ आपण कसा घालणार ? एका अपरिहार्यतेतून मला बाहेर पडायचं होतं. रस्ता शोधायचा होता. कुढणं, रडणं संपवायचं होतं.
मग विचार करून मी निर्णय घेतला. बी. ए. पर्यंतचं शिक्षण झालंच होतं. मी बी.एड. करायचं ठरवलं. त्या वेळी माझा मोठा मुलगा दुसरीत तर धाकटा माँटेसरीत होता. मुलांना कोण सांभाळणार ? शेवटी मी घराला ‘लॅच की’ करून घेतली. मुलांच्या गळ्यात ती किल्ली बांधून दिली, म्हणजे हरवण्याची भीती नाही ! घरात टेबलावर अन्न मांडून झाकून मी जायची. त्या काळी फक्त केळी एवढं फळच परवडण्याजोगं होतं. मग केळ्याची फणी सुतळीला बांधून मुलांच्या हाताला येईल, अशी टांगून ठेवायची. मुलांना फूटपाथवरून सावकाश यायला शिकवलं. ती घरी येऊन खायची. दार बंद करून खेळायला जायची. या साऱ्याचा परिणाम म्हणजे मुलं जबाबदार, शहाणी, स्वतंत्र झाली. माझ्याऐवजी खरं तर त्यांनीच घर सांभाळलं. त्यावर्षी मी बी.एड. झाले.
याच दरम्यान अंधेरीतून आमदारकीसाठी इंदूलकरांचा मुलगा उभा होता. त्याचा प्रचार करण्यासाठी हेही फिरत होते. तेव्हा तिथल्या झोपडपट्टीतल्या मुलांसाठी शाळेची सोय नव्हती. नागरिकांतून शाळेची मागणी होती. शेवटी इंदूलकरांनी त्यांना शाळेचं आश्वासन दिलं. त्यांचा मुलगा निवडूनही आला. निवडणुकीतल्या आश्वासनानुसार शाळा सुरू करू या, असा एन.डीं. नी तगादा लावला. त्या भागातच इंदूलकरांचा छोटा प्लॉट होता. तिथं शेड मारून शाळा सुरू करण्यात आली. बी.एड. झाल्याबरोबर मला त्या शाळेत नोकरी लागली. तेव्हा दोनशे रुपये पगार होता.
यापूर्वी घरात स्टोव्हवर स्वयंपाक करावा लागे. एक मूल कडेवर, एक हाताशी असं माझं काम चालायचं. ते वडिलांना खटकलं. ते म्हणाले, “त्यापेक्षा मी पैसे देतो. तू तुझ्यासाठी गॅस घे.” गॅस नोंदविल्याचं समजल्यावर त्यांना राग आला. तीन महिने हे माझ्याशी बोललेच नाहीत. “त्यांनी दिला म्हणून काय झालं ? आपल्याला काय परवडतं, ते कळायला नको ? ते उद्या गाडी आणून दारात लावतील. आपल्याकडे पेट्रोलला पैसे आहेत का ?” असले त्यांचे प्रश्न ! त्या शाळेत दहा वर्षे मी शिक्षिकेची नोकरी केली. त्या काळात गरिबीची खूप जवळून ओळख झाली.
तेव्हा शाळेत जे हेडमास्तर आणि क्लार्क होते, त्यांनी संगनमताने मुलांच्या फीचे पैसे खाल्ले. मग मॅनेजमेंटकडून चौकशी सुरू झाली, तर ते दोघे पळून गेले. उरलेल्यांमध्ये मी सर्वांत सीनियर होते. त्यामुळे हेडमास्तर झाले. तब्बल 1997 पर्यंत मी या शाळेत जीव ओतून काम केले. प्रशासनाचा अनुभव नव्हता. मग मी परिसरातल्या नामवंत शाळांत जाऊन सारं शिकून घेतलं. विद्यार्थ्यांना रोजची हजेरी अनिवार्य केली. दोन-तीन दिवस मुलगा शाळेत आला नाही, तर मी स्वत: स्कूटर काढून झोपडीत जायची. तेव्हा दारिद्य्राचं अगदी जवळून दर्शन झालं. एवढ्याशा झोपडीत दहा-बारा माणसं ! त्यांच्या अडचणींचा विचार केला, तरी अंगावर काटा यायचा.
एकच उदाहरण सांगते. पावसाळ्यात शाळेत घोटाभर किंवा गुडघाभर पाणी साठायचं. मग शाळेला सुट्टी दिली, तरी मुलं शाळेतच. विचारल्यावर काहींनी सांगितलं, “शाळेत एवढंसंच पाणी आहे; मात्र घरात कमरेइतकं पाणी आहे. एकाच कॉटवर आम्ही किती जणं बसून राहणार ? त्यापेक्षा शाळेतच बरं आहे.” मी कधीतरी काही कारणानं त्यांच्या घरी गेले, तर त्यांची धावपळ उडायची. घरची बाई मोलकरीण असायची. मग ती दोन रुपयांची चुरगाळलेली नोट कुठून तरी काढायची. मुलांना थंड पेय आणायला पिटाळायची. पाहुणचार करायची इच्छा असायची; पण परिस्थिती आड यायची. खरं सांगते, ते थंड पेय घशातून खाली उतरायचं नाही. या शाळेनं, मुलांनी, पालकांनी आणि समाजानंही मला भरभरून प्रेम दिलं. मी शाळेत रमले.
दहा वर्षे शिक्षिका म्हणून काम करताना या मुलांच्या क्षमता, त्यांचे सुप्त गुण, संधीचा अभाव हे सारं लक्षात येत होतं. शाळेचा निकाल शून्य ते दहा टक्केच असायचा. वाईट वाटलं, तरी मी काही करू शकत नव्हते; पण मी हेडमास्तर झाले. मुलांच्या मदतीनं मी शाळेत अनेक उपक्रम राबविले. वृक्षारोपण, मुली दत्तक देणं, लोकांकडून दान रुपात पुस्तकं मिळवणं, बोलका व्हरांडा, अशा अनेक उपक्रमांचा समावेश होता. शाळेतले शिक्षक, मुलांनी, इतकंच काय; परिसरातल्या लोकांनीही उत्तम साथ दिली.
एक गंमत सांगते, या मुलांना खासगी शिकवणी परवडणं शक्य नव्हतं. त्यांचा अभ्यास व्हावा म्हणून मी शाळेत रात्र अभ्यासिका सुरू केली. मुली आठ-साडेआठपर्यंत असायच्या. मुले मात्र रात्री अकरापर्यंत थांबायची. त्यांच्यावर लक्ष ठेवायला कुणीतरी हवं होतं. मी परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांशी बोलले. त्यांना विनंती केली की, रात्रीचे दोन-तीन तास आमच्या मुलांसाठी द्या. मुलं आपापला अभ्यास करतील, तुम्ही फक्त तिथं खुर्चीत बसा. एखादी शंका कुणी विचारली, तर ती सांगा. त्या परिसरात सगळे क्लास वन, क्लास टू अधिकारी म्हणून निवृत्त झालेले लोक होते. हे सारे सहकार्यासाठी आनंदानं पुढं आले. उलट तेही या मुलांमध्ये रमले. शालेय अभ्यासाबरोबरच धार्मिक गोष्टी, विज्ञानाचे प्रयोग रंगू लागले. या सगळ्याचा परिणाम म्हणून पुढच्या काळात निकाल 90 ते 100 टक्क्यांपर्यंत गेला.
वृक्षारोपणाचा एक आगळा प्रयोग मी राबविला. मुलांच्या सहकार्यानं शाळेचा परिसर तर हिरवागार केलाच; रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडंदेखील लावली. नंतर पार्ल्यातील सोसायट्यांची आम्ही परवानगी मिळवायचो आणि आमची मुलं तिथं झाडं लावून जगवायची सुद्धा ! झाड थोडं मोठं होईपर्यंत त्याला पाणी घालावं लागतं. नंतर ते आपोआप वाढत जातं, हे मी मुलांना समजावलं. दूरवरून येणारी मुलं झाडांना पाणी कसं घालणार, हा प्रश्न आला. मी म्हटलं, घरातल्या दुधाच्या पिशवीतून पाणी आणून घाला. मुलांनी ते आनंदानं केलं. पार्ल्याला आजही गेलात, तर स्टेशनपासून आमच्या शिवाजी विद्यालयापर्यंतचा परिसर हिरवागार दिसतो. तो माझ्या या मुलांनी मोठ्या कष्टातून उभा केलाय. त्यामुळंच मला म्हणजे आमच्या शाळेला आणि या मुलांना सलग पाच वर्षे राज्यपालांच्या हस्ते मोठी ढाल आणि निसर्गमित्र पुरस्कार मिळाला.
या मुलांमध्ये कल्पकता असते. आपण मध्यमवर्गीय लोक आपली मुलं पुस्तकी माहितीत वाढवितो; पण आर्थिकदृष्ट्या कमी परिस्थिती असली, तरी ही मुलं अनेक गोष्टींमध्ये तरबेज असतात. एखादी कलाकृती करणं असेल किंवा विजेची कनेक्शन्स हलवणं असेल, तांत्रिक बाबीही त्यांना चांगल्या जमतात आणि कलात्मकतेतही ती मागे नसतात. या शाळेतल्या मुलांना मी आकाशकंदील करायला लावायचे. शाळेच्या व्हरांड्यात दोरी लावून त्याला आम्ही आकाशकंदील लटकवायचो. मुलं धडपड करून त्यात लाईट सोडायची. सारी शाळा लख्ख तेजानं उजळून निघायची. आसपासची माणसं आमचे आकाशकंदील विकत घ्यायची. त्यातून मी हजारो रुपये शाळेसाठी मिळविले. शाळेला देणग्याही मोठ्या प्रमाणात मिळाल्या. मी जेव्हा 1997 साली सेवानिवृत्त झाले, तेव्हा माझ्या शाळेकडे तब्बल 25 लाख रुपये शिल्लक होते. त्याच्या व्याजातून आजही शाळेचे अनेक खर्च भागविले जातात.
हे सारं इतक्या विस्तारानं सांगायचं कारण की, जसजशा माझ्या जाणिवा विकसित झाल्या, तसतसं माझं व्यक्तिगत दु:ख मला जाणवेनासं झालं. माझी मुलंही छान स्वावलंबी झाली. आमच्या दोघांमधलं मतभेदाचं किंवा दुराव्याचं मूळच माझ्या नोकरीमुळं नष्ट झालं. त्यामुळं पुढच्या काळात एकमेकांबद्दल तशा अर्थाने तक्रारीच उरल्या नाहीत.
माझ्या मोठ्या मुलाला, सुहासला मेडिकलला प्रवेश घ्यायची इच्छा होती; पण त्यासाठी त्याला एक-दोन मार्क्स कमी पडत होते. त्यावेळी हे सहकारमंत्री होते आणि माझा भाऊ शरद पवार मुख्यमंत्री ! तरीही त्यानं नागपूरला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचं ठरवलं. (त्याच वेळी नागपूरमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं !) पण तोही स्वाभिमानी ! प्रवेशाच्या रांगेत उभा राहिला. वडिलांच्या व्यवसायाच्या कॉलममध्ये शिक्षक लिहिलं आणि स्वत:च्या हिमतीवर प्रवेश मिळविला. कोणाच्या तरी वशिल्यानं आपण प्रवेश मिळविला, असं कुणी बोट दाखवणं त्यालाही आवडत नव्हतं आणि आम्हालाही नको होतं. सरळपणे मिळालेला प्रवेश घेऊन तो इंजिनिअर झाला. प्रचंड बुद्धिमत्ता, अफाट कष्टाची तयारी, प्रामाणिकपणा या गुणांच्या बळावर तो आज अमेरिकेत नामवंत उद्योजक झाला आहे. वडिलांचा साधेपणा दोघाही मुलांमध्ये आला आहे.
आमच्या घरी कार्यकर्त्यांचा सदैव राबता असतो. काही कामात गुंतल्यामळं किंवा इतर कारणानं आलेल्यांना चहा-बिस्किटं द्यायला उशीर झाला, तरी ते अस्वस्थ होतात, आत-बाहेर करतात. एखाद्याला तुरीची डाळ चालत नाही, तर त्याच्यासाठी वेगळं काही केलंय का ? याची खात्री केल्याशिवाय चैन पडत नाही.
मला एकदा टायफॉईड झाला होता. त्यावेळी माझा मोठा मुलगा चौथीत शिकत होता. दौरा टाळून ते घरात थांबले नाहीत. आम्हीही ‘थांबा’ असे म्हटले नाही. कार्यकर्त्यांच्या छोट्या-मोठ्या आजारपणातही धावून जाणारा हा माणूस घरच्यांच्या बाबत इतका कोरडा कसा काय राहू शकतो ? हे मला कधी कळले नाही. हा कठोरपणा मला खटकला आहे. यांनी आमदारकीचे पैसे, प्राध्यापक म्हणून मिळणारी पेन्शन असा त्यांना म्हणून मिळणारा एकही पैसा कधी घरी दिला नाही. त्याबद्दल माझी कधीच तक्रार नव्हती आणि नाही.
हा सर्व पैसा त्यांनी एस.टी. किंवा रेल्वेचा प्रवास, कार्यकर्त्यांच्या गरजा आणि समाजासाठीच वापरला, हे मला माहीतच आहे. या बदल्यात त्यांच्याबरोबर आम्हीही समाजाचे निरतिशय प्रेम, आदर अनुभवतो. आम्हीही त्यांची मूल्ये जपतो. त्यांच्या मूल्यांच्या चौकटीतील स्वातंत्र्य ते आम्हाला पूर्णपणे देतात. त्यामुळे एकमेकांना समजून घेत आमची आजपर्यंतची वाटचाल झाली आहे.
नोकरीला लागल्यावर मात्र मी त्यांच्याशी युक्तिवाद करायला शिकले. त्यांच्या तत्त्वांबाबत ते तडजोड करीत नाहीत. त्या पलिकडच्या गोष्टींना त्यांची हरकत नसते, हे एव्हाना माझ्या लक्षात आले होते. त्यामुळे एखादी वस्तू आणल्यानंतर ‘माझ्या पैशातून मी वस्तू आणली. कोणती गैर गोष्ट केली नाही ना ? त्यासाठी तुमच्याकडून पैसे मागितले नाहीत ना ?’ असं मी म्हणायची. यावर ते काही बोलायचे नाहीत. त्यामुळे नंतर भांडणाचा, संघर्षाचा प्रश्नच आला नाही.
नोकरीच्या पैशातून हळूहळू संसारातील एक-एक वस्तू जमवत गेले. मला स्वच्छतेची, नीटनेटकेपणाची हौस आहे. ती हळूहळू पुरवत गेले.
मुलं लहान असताना मी ‘महात्मा’ नावाचा एक सिनेमा पाहिला होता. त्यामध्ये ‘मोठ्या व्यक्तींच्या उतार वयात त्यांना कुटुंबातील सदस्यांचा द्वेष स्वीकारावा लागतो,’ हे दाखविलं होतं. अगदी मोठ्या माणसांची मुलंही ‘यांनी समाजासाठी खूप केलं; पण आमच्यासाठी काय केलं ? त्यांच्यामुळेच आमचे हाल झाले ना ?,’ असं म्हणतात. मला मात्र माझ्या घरात ते होऊ द्यायचं नव्हतं. “तुमचे वडील म्हणजे कोरा चेक आहे. लोकांसाठी ते झटतात. त्यांनाच काय, उद्या तुम्हालाही कुठली अडचण आली, तर यांचे दहा कार्यकर्ते मदतीसाठी धावून येतील. हीच श्रीमंती खरी असते,” असं मी मुलांना सांगायची. त्यामुळं मुलांच्याही मनात त्यांच्याबद्दल कधी राग, द्वेषभावना आली नाही. आजही त्यांना पित्याबद्दल प्रचंड आदर वाटतो. त्यांच्याशी तात्त्विक वाद झाले, तरी त्यांचे मोठेपण वादातीत राहते.
आज आमच्या आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. दोन्ही मुले स्वकर्तृत्वावर उभी आहेत. वडिलांनी संसारात कधीच लक्ष दिले नाही, हे ओळखतात; पण तरीसुद्धा त्यांना वडिलांविषयी आदर आहे, अभिमान आहे. कधी तरी येणाऱ्या आजोबांना नातवंडे ‘बाबा, बाबा’ करीत चिकटतात; पण या भावनेच्या ओलाव्यात ते अडकून पडत नाहीत. मन घट्ट करून घराबाहेर पडतात.
सागरला (मोठ्या मुलाचा मुलगा) घेऊन मी अमेरिकेला गेले, तेव्हा तो अतिशय लहान होता. तरीही माझ्याबरोबर एकटा असतानाही तो कोठेच कमी पडला नाही. एअरपोर्ट-विमान-लंडनमध्ये उतरून दुसरे विमान पकडणे, कनेक्टिंग फ्लाईट, सगळीकडे तो मला मदत करत होता. त्याचा मित्रपरिवारही प्रचंड होता. मित्रांबरोबर खूप उत्साहाने वाढदिवस साजरा केला जायचा. तो अतिशय उत्तम भाषणे करायचा. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर किंवा अग्रगण्य मुकेश अंबानी यांची मुले त्याचे मित्र होते आणि कित्येक दिवस आम्हाला घरात येणारी मुले ही एवढ्या नावाजलेल्या प्रसिद्ध लोकांची आहेत हे माहीतच नव्हते. ती अगदी सर्वसामान्य मुलांसारखी आमच्याकडे यायची.
सागरच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्या लहान वयातही त्याने दाखवलेल्या कर्तृत्वाचा तो परिणाम होता. आपल्याबरोबर अंबानींचा किंवा जैनांचा मुलगा असतो, यामुळे सागरला कधीच फरक पडला नाही. मी त्याला म्हटले की, ‘अरे सागर, एवढ्या मोठ्या लोकांची मुले तुझ्याबरोबर असतात. तू कशी काय त्यांच्याबरोबर मैत्री करतोस ? तुला हे कसे झेपणार ?’ त्यावर त्याचे अगदी सरळ साधे उत्तर होते, ‘आई, मी त्यांच्याकडे जात नाही, ते माझ्याकडे येतात. ते आनंदाने आपल्यामध्ये वावरतात. त्यांना काही त्यामध्ये अडचण वाटत नाही, तर मग आपण कशाला काही वाटून घ्यायला पाहिजे ? आमची निकोप मैत्री आहे.’ ती मुले कोणत्या गाड्यांतून फिरतात, कशी राहतात, कोणत्या ब्रँडचे कपडे-शूज, घड्याळ घालतात, त्याच्याशी त्याला काही घेणे-देणे नव्हते; फक्त ब्रँडेड शर्ट मात्र घालायला त्याला आवडायचे. ते सोडले, तर गॉगल, शूज, कोट असा कोणताही आग्रह त्याने धरला नाही.
मला आठवते की, सागरच्या आजारपणात आम्ही लंडनला होतो. त्यावेळी एका फ्लॅटमध्ये राहत असताना, माझा एक नातेवाईक सागरला भेटायला आला होता. तो कोट तेथेच विसरून गेला. मी म्हटले, की त्यांचा कोट विसरलाय. परत येईल तेव्हा नेईल; पण सागरची तो कोट विसरलाय हे सांगायची गडबड चालू होती. तेव्हा तो म्हणाला, ‘आई तो काही साधा कोट नाही, अरमानी कंपनीचा अतिशय किमती कोट आहे. त्याने त्या कोटाची किंमत शांतपणे मला सांगितली आणि ती किंमत ऐकून थक्कच झाले. मला माझ्या नातवंडांसाठी कधी असे ब्रँडेड कोट किंवा इतर वस्तू देता आल्या नाहीत. अशा महागड्या वस्तू वापरणाऱ्या समाजामध्ये त्याचाही वावर होता. लाखो रुपयांच्या वस्तू ही मुले अंगावर घालत होती; पण सागरला कधीही त्याचे वैफल्य वाटले नाही. तो अगदी आत्मविश्वासाने आणि निवांतपणे त्यांच्यात वावरायचा. खऱ्या अर्थाने त्याच्या आजोबांचे गुण त्याच्यात उतरले होते.
त्याचे आजोबा नेहमीच त्याला सांगायचे की, ‘माणसाची जगण्यासाठीची गरज किती आहे ? किती लागते पोट भरायला ? 35 रुपयांत आपण घरी पोटभर जेऊ शकतो. गरजा कमी असल्या की, जगणे फार अवघड नसते. कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी खर्च, दोन वेळचे जेवण आणि दोन कपडे-फार थोडी रक्कम लागते.’ असे सरळ-साधे विचार समोर ठेवून एन. डी. पाटील आपले आयुष्य जगले आणि आजूबाजूलाही त्यांनी तेच विचार रुजवले.
ही त्यांची तत्त्वे ठीक आहेत. ‘पैसे मिळविण्याऐवजी लोकांसाठी काम करत राहिलो,’ याचा अभिमानही असावा; पण हे अतिशय व्यवहारशून्य आहेत. बाहेरच्या जगामध्ये एखाद्या वस्तूची किंमत काय आहे ? व्यावहारिक जगात काय चालले आहे, याची त्यांना जराही कल्पना नाही. मुंबईच्या घरामध्ये आम्ही खूप वर्षांनी थोडे फर्निचर करायला घातले होते. एक तर मी एकटी खूप वर्षे नोकरी करत होते. कसेबसे सगळे चालत थोडे पैसे बाजूला टाकले होते आणि फर्निचर करायचे ठरवले होते. एखादी वस्तू करायची तर त्याचा खर्च किती येणार ? याची किंमत किती ? याची गरज आहे का ? असे काही असले की, सतत प्रश्न विचारत राहायचे.
एखाद्या टेबलचा खर्च समजा 5 हजार रुपये येणार असेल आणि आम्ही 500 रुपये येणार, असे सांगितले, तरी ते म्हणायचे, ‘अरे बापरे ! एवढ्याशा टेबलसाठी 500 रुपये खर्च ? एवढा खर्च कशाला करता ? जरा कमी करता आला, तर पाहा.’ घरामध्ये दागिने घ्यायचे असतात, साड्या-कपडे घ्यायचे असतात, लग्न-समारंभ असतात, इतर काही सांसारिक, प्राथमिक गोष्टी असतात, याची त्यांना काही माहितीही नाही आणि देणे-घेणेही नाही. मला तर असे म्हणावेसे वाटते की, आपली जुनी म्हण आहे ‘अज्ञानातच सुख असते. या म्हणीचा मी त्यांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने अनुभव घेतला आणि घेत आहे.
ते आयुष्यभर मूल्यांना चिकटून राहिले. ढोंग, लबाडी, स्वार्थीपणा यांच्या पलिकडे राहिले. अफाट मेहनत, प्रचंड वाचन, ज्ञानाचा सागर असणारे असे ‘वडील’ मुलांना खूप आवडतात. कौतुक करणारे एन. डी. पाटील ‘आजोबा’ म्हणूनही नातवंडांना खूप प्रिय आहेत. नातवंडांना मिळालेल्या बक्षिसात आपला एक करकरीत रुपया टाकून त्यांना खूष करतात. मी मनात म्हणते, खऱ्या अर्थाने ते श्रीमंत आहेत. सर्व सुख-दु:खाच्या पलिकडे गेलेले, मोह नसणारे, अंथरुणावर पडताच घोरणारे असे हे व्यक्तिमत्त्व, श्रीमंत नाही तर काय ? आज राजकीय पुढाऱ्यांची मुले बिघडताना दिसतात; पण आपल्या मुलांवर वडिलांचे चांगले संस्कार झालेत. वडिलांच्या लाल दिव्याच्या गाडीत ती कधी बसली नाहीत. मुले कधी कोणाशी अप्रामाणिकपणे वागली नाहीत. वरळीला आमदार कोट्यातून मिळणारा उत्कृष्ट फ्लॅट वडिलांनी नाकारला, याचेही मुलांना कधी दु:ख होत नाही.
थोडक्यात, म्हणजे आम्ही दोघेही सुखी आहोत, समाधानी आहोत. माणुसकी हा धर्म मानून दोघेही कार्यरत राहिलो. आज आमच्याकडे थोडे पैसे असतील; पण त्यापेक्षाही मौल्यवान माणसे, मित्र आम्हाला भेटले. नेर्ल्याचे रावसाहेब पाटील, वाळव्याचे शिवाजी माने, शिवाजी रणदिवे, कोल्हापूरचे संभाजीराव चव्हाण, हिंदूराव साळोखे, पंढरपूरचे मुरलीधर थोरात, अशोक भुतडा अशा अनेक मित्रांनी यांच्यावर जिवापाड प्रेम केले. मुंबईचे अशोक सरकार, सुरेश भाटवडेकर, कमलाकर म्हेत्रे, डॉ. जनक नाथन ही तर आमची मुलेच आहेत. आम्ही आजारी पडलो, तर आम्हाला कसलीच काळजी वाटत नाही.
आमच्या उभयतांच्या जीवनातील तीन दु:खद घटना म्हणजे इस्लामपूरचा गोळीबार, दुसरी घटना म्हणजे त्यांच्या पायाला आलेले अपंगत्व आणि तिसरी घटना म्हणजे आमचा नातू चि. सागर याचा अकाली मृत्यू. आपण पूर्वीप्रमाणे कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही, त्यामुळे त्यांना फार दु:ख होईल. कार्यकर्त्यांनी दिलेल्या गाडीतही त्यांना बसायला आवडत नसे. त्याचे त्यांना दु:ख होई. मग मीच समजूत घालीत असे, ‘तुम्हाला तुमचे कार्यकर्ते ओळखतात. नाईलाजाने तुम्हाला गाडीचा प्रवास करावा लागत आहे.’ असे बोलल्यावर ते थोडे शांत होतात.
अजूनही त्यांचा प्रवास अखंड चालू असतो. त्यांच्या प्रवासात नियोजन नसते. म्हणून मी कधी-कधी रागावते. ‘महिन्यातून किमान दोन दिवस विश्रांती घ्यायला हवी,’ असे मी कळकळून सांगते; पण ते ऐकत नाहीत. आजपर्यंतच्या आयुष्यात एकही रविवार त्यांनी घरी घालवलेला नाही. 43 वर्षांच्या प्रवासात मोजून पाच चित्रपटही आम्ही एकत्र बसून पाहिलेले नाहीत. रयत शिक्षण संस्थेचे काम ते अहोरात्र करीत असतात; पण गाडीला पेट्रोल स्वखर्चाने घालतात. संस्थेकडून ड्रायव्हरशिवाय काही घेत नाहीत; परंतु दिवसातून अनेक वेळा म्हणतात, ‘रयत शिक्षण संस्थेने मला फार मोठे केले. कर्मवीरांमुळे मी एवढ्या पायऱ्या चढलो. शेका पक्षाने मला कीर्ती दिली.’
उभयतांचे जीवन खडतर गेले; पण आमची एकमेकाविषयी मने कधीच कलुषित झाली नाहीत. कारण एकमेकांवरचा अढळ विश्वास होय. जितक्या ओढीने ते बाहेर जातात, तितक्याच ओढीने ते घरीही येतात.
ते अतिशय गरिबीत वाढले. आपली साधी राहणी त्यांनी कधीच सोडली नाही. स्वत:चे कपडे स्वत: धुण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. एका स्लीपरवर राहण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. निरलस वृत्ती, कार्यकर्त्यांसाठी असलेली तळमळ, अभ्यासू वृत्ती, वाचन, चिकाटी, मनाचा सच्चेपणा, खुलेपणा, निर्भीडपणा, स्वत:ला प्रामाणिकपणे जे वाटते ते करताना कोणाला काय वाटेल, याची फिकीर न करण्याची वृत्ती, स्वत:च्या मूल्यांना असलेले प्रथम अधिष्ठान अशा गुण समुच्चयांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व उन्नत आणि भव्य बनते. संन्यस्त वृत्तीने संसार करणाऱ्या आणि सामाजिक कामात स्वत:ला झोकून देणाऱ्या ‘तेजवीराची सावली’ होता आलं, यातच कृतार्थतेची भावना दाटून येते.
चौकटी :-
१) वास्तवतेचा चष्मा
लग्न झाल्यानंतर इतर मुलींसारखं आम्ही सिनेमा बघायला त्यावेळी गेलेलं आठवत नाही. वास्तवतेला धरून काहीच नसतं. म्हणून एन. डीं.ना सिनेमा बघणं आवडायचं नाही. ते म्हणायचे, ‘काहीतरी काय दाखवतात ? या गोष्टी वास्तवतेच्या चष्म्यातून बघायला पाहिजेत.’ सिनेमा कधी चुकून बघितलाच, तर सारखं टीकाच करत बसायचे. ‘हे कधी असं असतं का ? काहीतरी दाखवतात आणि आपण ते बघत असतो,’ असे त्यांचे म्हणणे असायचे.
२) एन. डीं.चे व्यक्तिमत्त्व
एन. डी. पाटील माझ्या लग्नाच्या आधीपासूनच आमच्या घरी यायचे. त्यांचं व्यक्तिमत्त्व वेगळं आहे. ते मनस्वी, करारी, प्रामाणिक, कष्टाळू आहेत, हे माझ्या आई-आबांनी ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी आमच्या लग्नानंतर त्यांच्या मुलांच्या बरोबरीने यांना मान दिला; किंबहुना ते यांना आठवा मुलगाच मानायचे. त्यांच्यानंतर माझ्या भावांनीही हा कित्ता गिरवला आहे. महत्त्वाच्या कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत आजही यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे.
३) समांतर वाटा
मला आठवतं की, आम्ही अशोक हांडे यांच्या कार्यक्रमात गेलो होतो. कार्यक्रम बघताना अतिशय निर्विकार चेहर्या ने एन. डी. कार्यक्रम बघत होते आणि मधल्या वेळेमध्ये फक्त ते पुस्तक वाचत बसले होते. एरव्हीही ते पुस्तके वाचतात; पण तरीही एकूणच त्यांच्या गरजा कमी आहेत. कुठलीही गोष्ट विकत घ्यावी, असं वाटत नाही. यांना कपडेही दोनच पुरतात. बी. ए. च्या शेवटच्या वर्षाला मी जेव्हा होते, तेव्हा माझं लग्न ठरलं. परीक्षा दिल्यावर लग्न झालं. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परीक्षा व्हायच्या आधी, इतरही मुलींचे नवरे यायचे, त्यांना फिरायला न्यायचे. बाकीच्या मुली मला विचारायच्या, ‘तुझा नवरा कसा कधी येत नाही ? तुमचंही लग्न ठरलेलं आहे. तुझंही लग्न होणार आहे चार-पाच महिन्यांनी.’ मलाही तेव्हा वाईट वाटायचं. कारण ते वय तेवढी परिपक्वता असण्याचं नव्हतं. तो आवाकाच नव्हता. हळूहळू ती सहनशक्ती येत गेली. शाळेचे काम करत गेले, वाचन वाढत गेले. मग ती वेगळी दृष्टी आली आणि तुमचं काम तुम्ही करत राहिलंच पाहिजे, हे जाणवू लागले. आमच्या दोघांच्याही वाटा वेगळ्या होत्या. दोन वेगवेगळ्या वाटेने चाललो, तरी आम्ही बरोबर चालत राहिलो.
४) प्रशासनाचा अनुभव
शाळेतून निवृत्त झाल्यानंतर मी कार्यकर्त्यांची सरबराई आणि छोटी-मोठी कामे करीत होते. वयाच्या 71 व्या वर्षी म्हणजे तीन-चार वर्षांपूर्वी मला रयत शिक्षण संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये घेतले. त्यानंतर ‘रयत’च्या रायगड जिल्ह्यातील शाळांकडे मी लक्ष देत आहे. याशिवाय सध्या आमच्या गावच्या (ढवळी, ता. वाळवा, जि. सांगली) येथील शाळेवरही मी लक्ष केंद्रित केले आहे. ती शाळा उत्तमपणे चालवून दाखवण्याचे काम मी करणार आहे. शाळा चालवण्याचा प्रशासनाचा अनुभव मला अशा संधी मिळवून देतो आहे.
५) प्रापंचिक जबाबदारी
संपूर्ण प्रपंचाची जबाबदारी मी घेतल्यामुळे मला डोकं वर काढायला वेळ मिळाला नाही, एवढं मी काम केलं; पण पंच्याहत्तर सालापर्यंत आम्हाला बँकेमध्ये खातंही उघडता आलं नव्हतं. अनेक वर्षे नोकरी करूनसुद्धा ते शक्य झालं नव्हतं. म्हणजे तो पैसा कसा-बसा पुरवणं हे मला करायला लागायचं आणि महिन्याचा शेवट आला की, पुन्हा एकदा अंगावर काटा उभारायचा. ठीक आहे, यातनंही खूप शिकायला मिळालं. आयुष्यामध्ये फार काही राहून गेलं किंवा फार नुकसान झालं, असे बिलकूल वाटत नाही. अनेक चांगल्या गोष्टी घडल्या; तारांबळ मात्र माझी आणि माझ्या मुलांची खूप झाली.
६) मूल्ये एकच; मार्ग वेगळे
माझा जन्म सुसंस्कृत घराण्यात झाला आहे. माझा भाऊ शरद पवार पूर्वीपासूनच काँग्रेसमध्ये आहे. हे सरकारला धारेवर धरणारे; पण त्याचा आमच्या नात्यांवर काहीही परिणाम होत नाही. आमचे जाणे-येणे अजूनही आहे. पक्षाच्या चपला आम्ही घराबाहेर ठेवतो आणि घरात छान गप्पांत रंगतो.
मला संसारात खूप अडचणी आल्या. तेव्हा माझे सगळे भाऊ मला खूप मदत करायचे. मला संकोच वाटायचा; पण माझे भाऊ मला सांगायचे, ‘हे बघ, आम्हाला आई-आबांनी सांगितलंय, जी माणसं समाजाचा संसार करण्यासाठी बाहेर पडतात, त्यांचा संसार इतरांनी सांभाळायचा असतो. म्हणून आम्ही बाकीच्या बहिणींपेक्षा तुला जास्त मदत करतो.’ इतकी छान भावंडं मिळाली. हेही असेच सुसंस्कृत आहेत. शेवटी तळातल्या लोकांबद्दलची दोघांचीही तळमळ सारखीच आहे. दोघांची मूल्ये एकच आहेत; फक्त मार्ग वेगवेगळे आहेत. त्यामुळे मला काहीच फरक वाटत नाही. आई-वडिलांनी रुजविलेली मूल्यं आत्मसात केलेली असल्यानं ‘यांची’ मूल्यं मला वेगळी वाटली नाहीत की, त्याचा त्रास झाला नाही.
ते अतिशय गरिबीत वाढले. आपली साधी राहणी त्यांनी कधीच सोडली नाही. स्वत:चे कपडे स्वत: धुण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. एका स्लीपरवर राहण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. निरलस वृत्ती, कार्यकर्त्यांसाठी असलेली तळमळ, अभ्यासू वृत्ती, वाचन, चिकाटी, मनाचा सच्चेपणा, खुलेपणा, निर्भीडपणा, स्वत:ला प्रामाणिकपणे जे वाटते ते करताना कोणाला काय वाटेल, याची फिकीर न करण्याची वृत्ती, स्वत:च्या मूल्यांना असलेले प्रथम अधिष्ठान अशा गुण समुच्चयांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व उन्नत आणि भव्य बनते. संन्यस्त वृत्तीने संसार करणाऱ्या आणि सामाजिक कामात स्वत:ला झोकून देणाऱ्या ‘तेजवीराची सावली’ होता आलं, यातच कृतार्थतेची भावना दाटून येते.
– लेखन : सरोज नारायण पाटील.
(वरील लेख..”चळवळीचा महामेरु : एनडी पाटील” संकलन – विजया पाटील या पुस्तकातून साभार)
– अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, जुलै २०१८ अंक
एन डी पाटील कृतज्ञता विशेषांक.