पोलिस वा ‘खाकी वर्दी’ म्हटले की धाक, रुबाब, असे एक चित्र सामान्य नागरिकांच्या डोळ्या समोर उभे राहते. खाकी वर्दीतील तापट स्वभावाचा, कडक शब्दांत बोलणारा, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्ती अशीच बरीचशी प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असल्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात.
पोलिस अधिकाऱ्याला कर्त्यव्यासाठी वेळप्रसंगी कठोर व्हावे लागत असले तरी वर्दीतही अगोदर तो मनुष्य असतो. त्यालाही मन, भावना असतात. माणुसकीच्या नात्याने ते प्रसंगी मदत करतात, सल्ला देतात, पण कायद्याचे रक्षण करण्यासाठी आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांना कठोर राहावं लागतं.
खाकी वर्दीतील देव माणूस हे वाक्य साजेल व पोलीस दलाची मान उंचावेल असे काम सध्या ठाणे येथे राहणारे परंतु मूळचे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किंजळोली – भालेकर कोंड या गावाचे, सुपुत्र निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप महादेव जाधव करीत आहेत.
श्री जाधव यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडविणारी ही घटना पोलादपूर तालुक्यातील साखर गावातील रिंगेवाडी येथील आहे. २२ जुलै २०२१ च्या अतिवृष्टीमध्ये साखर गावातील सुतारवाडीवर दरड कोसळली. त्यात संपूर्ण वाडी उध्वस्त होउन ६ जण मृत्यमुखी पडले होते तर अनेकजण जखमी झाले होते. यातील एका निकटच्या घरात, सौ सुनीता विठ्ठल चव्हाण यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईमध्ये घरकाम करून, पै पै पुंजी जमवून काही दागिने बनवले होते, दागिन्यांचा तो डबा पुरात वाहून गेला होता. मुलीचे लग्न तर पुढच्या वर्षी करण्याचे ठरले होते. त्यात पूजाचे वडील विठ्ठल चव्हाण हे अपंग आणि निराधार. त्यामुळे या कुटुंबासमोर मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
पोलादपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष पवार यांनी महाड येथील तळिये आणि पोलादपूर तालुक्यातील साखर-सुतारवाडी व केवनाळे गावातील पूरपरिस्थीचा आढावा घेण्यासाठी मुंबईतील माणगाव, महाड, पोलादपूर तालुक्यातील सर्व सामाजिक, राजकीय कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मिटिंग आयोजित केली होती.
सभेला सुरुवात करताना मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी महाड -पोलादपूरमध्ये आलेल्या पूर परिस्थितीमुळे जनजीवन कसे विस्कळीत होऊन जीवित व वित्तहानी झाली आहे याचा संपूर्ण आढावा घेत, केवनाळे येथील ११ वर्षीय साक्षी दाभेकर दिड वर्षाच्या मुलाला वाचवताना पाय गमावून बसली आहे, तर साखर येथील पूजा चव्हाण हिचे लग्नाचे दागिने वाहून गेल्याचे सभेत आपल्या भाषणात सांगितले. हे ऐकताच दिलीप जाधव यांनी, मालुसरे यांना जवळ बोलावून पूजाच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारत असल्याचे आणि या गोष्टीची कोणाकडेही वाच्यता करू नये असे सांगितले.

दागदागिने, कपड्यालत्यासह सर्व खर्चाची जबाबदारी घेत जाधव साहेबांनी आश्वासनाची पूर्तता करीत पूजाचे लग्न नुकतेच विष्णू सीताराम गोगावले यांच्याशी साखर येथे करून दिले. या निमित्ताने खाकी वर्दीतील माणुसकीचा चेहरा दिलीप जाधव यांच्या रूपाने समोर आला आहे.
सामाजिक भावनेतून केलेल्या या कामाबद्दल जाधव यांना जेव्हा विचारले तेव्हा ते म्हणाले की, “मी फक्त माझं कर्तव्य केलं. वेगळं काहीच नाही. पोलिसांना जात नसते ना धर्म. लोकांचं रक्षण, त्यांच्या मदतीला धावणे हाच त्यांचा खरा धर्म असतो. त्यामुळे मानवता हा एकच धर्म मी मानतो. लहानपणी अनुभवलेली गरिबी आणि उदरनिर्वाहासाठी आईसोबत केलेले कष्ट याचे स्मरण मला अजूनही आहे. समाजात आपल्या हातून चांगले कार्य घडावे हीच अपेक्षा व जाणीव ठेवून मी माझ्या जन्मगावात आणि समाजात काम करीत असतो. शाळेत आम्हाला प्रार्थना होती. ‘खरा तो एकची धर्म..जगाला प्रेम अर्पावे’ आम्ही रोज ही प्रार्थना म्हणायचो. लोकांनी ही प्रार्थना लक्षात ठेऊन काम केलं पाहिजे. सर्वधर्म समभावाने राहिलं पाहिजे. जात, धर्म महत्त्वाचा नाही. माणसाने, माणसासाठी माणसासारखं वागलं पाहिजे.”

पूजा व विष्णू यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवरांसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
दिलीप जाधव यांच्या माणुसकीचे मनोज्ञ दर्शन समाजसेवकाच्या रूपात त्याचप्रमाणे रवींद्र मालुसरे यांनी सामाजिक जाणिवेतून या प्रश्नाला प्राधान्य दिल्याने या दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800