काही कविता अश्या असतात की त्यांच्या प्रतिभेतून त्या कवयित्रीच्या मनाचे अंतरंग, अंतर्मन व मनातले अनेक कंगोरे जाणवतात. आपले मन आजूबाजूच्या घडामोडीशी, जीवनातल्या अनुभवाशी, कधी वेदना देणारे, कधी समाजप्रेमाची जाणीव करून देणारे, काही दैनंदिनीच्या प्रवासातील प्रसंगाशी जुळवून घेणारे असतात.
सर्वसाधारणपणे सामान्य लोकं आले प्रसंग गेले प्रसंग म्हणून विसरून जातात पण जे दिसले जे भावले जे पटले तसे ते कागदावर उमटणे अशी प्रतिभा थोड्या शब्दात मांडणे हे अगदी काही प्रतिभावंत लोकांनाच जमते.
असाच एक सुदंर कवितासंग्रह माझ्या वाचनात आला. जेष्ठ कवयित्री ‘सौ सुरेखा गावंडे’ यांचा ‘संजीवन‘ हा कवितासंग्रह.
मनाला अगदी सहज समाजाप्रती चटका लावून जाणारी कविता म्हणजे ‘सपान‘ आणि ‘ती काळरात्र‘, तर देशप्रेमातील कविता म्हणजे ‘हा भारत माझा देश‘ व ‘अंदमान‘ सावरकरांबद्दलचा आदर दाखवते ‘निसर्गरम्य मनाली’ सौंदर्यानी अशी नटलेली कविता.
अश्या अनेक वेगवेगळ्या विषयांवर सहज सुलभतेने भावलेल्या अनेक कविता वाचताना वाचक सहज थक्क होऊन जातो.
वाचकांच्या हातात ‘संजीवन‘ आल्यावर कविता वाचता वाचता त्या पुस्तकातील कविता आपला कधी ताबा घेतात कळत नाही व पुढे पुढे आपण सहज कवितेची पानं उलगडत जातो मग कधी समाजातील लोकांना सावध करणारी कविता म्हणजे ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ ‘पाणी हेच जीवन‘ तर
‘ पतंग आणि मानव’ यांचे मानवी जीवनाशी संबध लावणारे काव्य. तर वापरलेली ‘छत्री’ संदेश कशी देते. मोबाईल ने कशी आता सर्वमानवजातीच्या जीवनात ‘क्रांती’ घडवून आणली आहे ही कविता, अगदी मोजक्या शब्दात कवयित्रीने अचूक मांडली आहे.
“संजीवन” या काव्य संग्रहाला सुप्रसिद्ध गझलकार माधव डोळे यांची अतिशय सुंदर अशी प्रस्तावना लाभली आहे. पावसाच्या थेबांनी छोट्याशा रोपट्याला ही कसं संजीवन मिळतं हे साजेस चित्र मुखपृष्ठाला शोभिवंत करतं.
वेगवेगळ्या विषयांवर एकूण 46 कविता आहेत. एकांतात वाचताना थकलेल्या, हरवलेल्या, भरकटलेल्या मनाला आपल्याला कधी बालपणात, तर कधी तारूण्यातल्या आठवणींना उजाळा देतात.
निसर्गाच्या सान्निध्यात आपल्यावरील प्रेम, मिळालेली कृपा हे संजीवनी सारखे सतत काम करत असते.
मरगळ आलेल्या मनाला उभारी देते.
‘संजीवन’ मधील सर्व कविता वाचता वाचता काहीतरी समाजोपयोगी शिकवण देत जातात. हेच जीवनाचे मर्म म्हणजे ‘संजीवन’ आहे.
काही कविता विनोदी आहेत, त्या मनोरंजन करत हसवतात. तर काही कविता सहजच सुचली आणि कागदावर उमटली व त्याची अप्रतिम निर्मिती झाली.
अश्या छान छान कवितेचा आस्वाद घेत असताना अजून कविता हव्या होत्या असे वाटत राहते. हीच उत्सुकता ठेवणे पण कवियत्रीचे कौशल्य आहे. नाशिक येथील भालचंद्र प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या ‘संजीवन’ कवितासंग्रहाचा आस्वाद सर्वांनी घ्यावा असे हे अप्रतिम पुस्तक आहे.

– लेखन : सौ पूर्णिमा शेंडे. मुंबई
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800