Tuesday, June 17, 2025
Homeसाहित्यमहानुभावांचे मराठी योगदान ( ४ )

महानुभावांचे मराठी योगदान ( ४ )

महानुभावांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन
आज आपल्याला स्वातंत्र्य मिळवून अनेक वर्ष लोटली असतांनाही भारत वर्षात स्त्री आणि पुरुषात कमालीची विषमता दिसून येते. मुलगी परक्याचे धन आहे , मुलगी जन्माला आली तर हुंडा द्यावा लागतो, मुलगी वंश चालवत नाही, म्हातारपणी आपल्याला आधार देऊ शकणार नाही, म्हणून भारतात स्त्रीभ्रूणहत्येसारखे अपराध मोठ्या प्रमाणात होतांना दिसतात.

पुरोगामी महाराष्ट्रात मंदिरातील गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नाकारण्यात यायचा, मासिक पाळीमुळे समाजातील पवित्रता नष्ट होते, अशा पारंपारिक बुरसटलेल्या विचारांच्या आधारावर आपण किती दिवस चालणार आहोत याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

जागतिकीकरणाच्या प्रवाहात सहभागी झाले असतांना आजही आपण सामाजिक अंधश्रद्धेच्या दुष्टचक्रात अडकलेलो आहोत. भारतातील साधू, संत, महंत, आणि समाजसुधारकांनी दिलेल्या सत्य, अहिंसा, शांती, प्रेम, बंधुता, मानवता या मूल्यांचा सुद्धा आपल्याला विसर पडला आहे. म्हणून पुन्हा एकदा श्रीचक्रधर स्वामींनी निर्माण केलेला नवविचारांचा आचारधर्म,  (स्वातंत्र्य हा मोक्ष आणि पारतंत्र हा बंध), समाज व्यवस्थेतील अनिष्ट रूढी, प्रथा-परंपरांना स्पष्टपणे बाजूला सारणारा उपासना मार्ग, स्त्री-शुद्रादिकांना धर्म, मोक्ष व ज्ञानाचा दिलेला अधिकार, स्त्रीभ्रूणहत्येचा विरोध, स्त्रियांचे अधिकार अशा समाज प्रबोधनाकरिता स्वामींनी मांडलेल्या वैचारिक तत्त्वज्ञानाचा विचार करणे गरजेचे आहे.

बाराव्या शतकापूर्वी तत्कालीन परिस्थितीचा विचार केल्यास भारतीय समाजव्यवस्था वर्णभेद आणि विषमतेच्या बंधनात जखडून पडलेली होती. चातुर्वर्ण्य पद्धतीच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या जातीयवादामुळे विशिष्ट जातीच्या व्यक्तीला विशिष्ट काम करावी लागत असे. हीन दर्जाचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले आहे अशा अस्पृश्यशुद्रांना कडक बंधनात वावरावे लागत असे. स्त्रीशूद्रांना धर्माचा व मोक्षाचा अधिकार नव्हता.

याला कारण म्हणजे भारतीय समाजव्यवस्था व राज्यव्यवस्था ही धर्मावर आधारित होती. या धर्मसंकल्पनेतील चातुर्वर्ण्य पद्धती व त्याची कडक बंधने ही समाज जीवनाची आवश्यक अंगे समजण्यात येत होती. या समाज व्यवस्थेने विशिष्ट धर्माला आधार मानून त्या विरुद्ध कृती म्हणजे समाजद्रोह व पर्यायाने धर्मद्रोह ठरविलेला होता. राज्यसत्तासुद्धा या समाजजीवनात हस्तक्षेप करू शकत नव्हती. उलट राज्यकर्ते वर्षाकाठी २००० व्रते सांगणाऱ्या हेमांद्री पंडितांसारख्या धर्ममार्तंडाच्या सल्ल्यानेच राज्यकारभार करीत होते, यात कोणत्याही प्रकारचा बदल करणे धर्मबाह्य, शास्त्रबाह्य मानण्यात येत होते.

अशा वातावरणात जोपर्यंत या सामाजिक परिवर्तनाला, सुधारणेला अध्यात्म्याचे, धार्मिक विचारांचे अधिष्ठान देण्यात येत नाही, तोपर्यंत या तथाकथित समाजव्यवस्थेची सुधारणा एखाद्या वृक्षाचे मूळ कायम ठेवून फांद्या तोडण्यासारखेच निरर्थक ठरेल. हा दृष्टिकोन विचारात घेऊन बौद्ध आणि जैन दर्शनाने अडीच हजार वर्षांपूर्वी स्वतःचे धार्मिक तत्त्वज्ञान व त्यावर आधारित समाजरचनेचा सिद्धांत प्रस्थापित केला.

असे करण्यात सामाजिक सुधारणा करण्याचा मुख्य उद्देश त्यांचा नसेलही पण समाजव्यवस्थेतील वेद प्रामाण्याला व त्यावर आधारित चातुर्वर्ण्य पद्धतीला स्पष्ट नकार देणाऱ्या स्वतंत्र धर्मतत्त्वांची निर्मिती करण्याचा उद्देश अगदी स्पष्ट दिसून येतो. या दोन्ही (बौद्ध, जैन) धर्मतत्त्वांनी, वेदांतातील कर्मकांड, एकेश्वरवाद, बहुदेववाद व ज्ञानमार्गालाही नकार देऊन निरीश्वरवादी सिद्धांत प्रस्थापित केले. या कार्यामुळे चातुर्वर्णपद्धतीतून निर्माण झालेल्या मानवातील जातीभेद व विषमतेला बऱ्याच प्रमाणात पायबंद बसला.

समता व मानवतेच्या विचाराने, शिकवणुकीने भारतीय समाज सुदृढ झाला ही गोष्ट नाकारता येत नाही. या दोन्ही धर्मतत्त्वांना राजाश्रयाचा आधार प्राप्त झाला होता. तसेच त्या सामाजिक मूल्यांचा महत्त्वाचा विचार करतांना, त्यांना प्रभावी आदर्शात्मक जीवन प्राप्त झाले असल्यामुळे ही धर्मतत्वे वैदिक कर्मकांडाला, व्रतवैकल्याला कंटाळलेल्या तत्कालीन समाजात परिवर्तन करण्यात बरीच उपयुक्त ठरली.
( क्रमशः)

प्रा डॉ विजया राऊत

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?