लोकनेते गोपिनाथ मुंडे यांची आज जयंती साजरी होत आहे. त्या निमित्ताने त्यांचा हा थोडक्यात जीवन संघर्ष….
लोकनेते गोपिनाथ मुंडे यांचे ३ जून २०१४ रोजी दिल्लीत एका अपघातात निधन झाले.संघर्षयात्री म्हणुन ज्यांची देशाला ओळख होती ते लोकनायक मुंडेसाहेब आज आपल्यात नाहीत.
आज त्यांची जयंती!त्यानिमित्त त्यांना शब्दांतुन वाहिलेली ही आदरांजली !
गोपीनाथ मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यात परळी वैजिनाथ तालुक्यातील नाथ्रा या गावी झाला. त्यांचे नाथ्रा येथेच प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण परळीत झाले.
पुढे अंबाजोगाईत काॅलेजचे शिक्षण सुरु झाले. तिथे त्यांची भेट प्रमोद महाजनांशी झाली.
एकाच बाकड्यावर सुरु झालेला हा त्यांचा मैत्रीचा प्रवास नंतर नात्यात बदला. प्रमोद महाजनांची बहिण प्रज्ञा यांच्याशी विवाहबध्द झाले. अंबाजोगाईतुन वकिली शिक्षणासाठी पुढे पुण्यात नंतर महाराष्ट्राच्या विधानभवनात दोघांनी एकदाच प्रवेश केला.
विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून दोघेही राजकारणात सक्रिय झाले. त्यानंतर गोपीनाथरावांनी कधीच मागे वळुन पाहीले नाही. नाथ्रा ते दिल्ली, ग्रामविकास मंत्री हा प्रवास संघर्षाचा, वादळांचा, काट्याकुट्यांचा होता तरी ते सर्वांना पुरुन उरले.
खरे तर ते गोपीनाथजी संघर्षनायकच होते. आमदार, विरोधीपक्ष नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, खासदार आणि केंद्रिय ग्रामविकासमंत्री अशा अनेक पदावर ते आरुढ झाले. या सर्व पदावर राहताना संघर्ष सतत त्यांच्या सोबतीला होता.
जाणता राजा म्हणून ज्यांची ओळख महाराष्ट्राला आहे अशा मोठ्या नेत्यांना सुध्दा गोपीनाथरावांनी जेरीस आणले. आपले वक्तृत्व, अभ्यास, जनसामान्यांचा मोठा पाठिंबा हीच गोपीनाथरावांची खरी ताकत होती.
गृहमंत्री झाल्यावर त्यांनी राज्याला शिस्त लावण्याचे काम केले. अनेक गुंडांना, मुंबईतल्या डाॅनना गजाआड करुन मुंबई दहशत मुक्त करुन दाखविली.
गोपीनाथराव लोकनेते होते. तांडा, वस्ती, यावर ते सतत जात. तेथेच मुक्काम करत. त्यांच्या समस्या जाणुन घेत. लगेच त्यासाठी पाठपुरावा करत. तांड्यावर, वस्तीवर पिठलं भाकर खात असत. आपल्या लोकांच्या मळलेल्या गोधडीवर झोपताना या लोकनायकाला कधीही कमीपणा वाटला नाही. तांड्यावर, वस्तीवर मुक्काम करणारा, त्यांच्यात मिसळणारा हा खरा संघर्षनायक होता.
मराठवाड्यात विलासराव देशमुख वेगळ्या पक्षात असुन पण या दोघांचे मैत्रीपुर्ण संबंध होते. राजकारणात “दो हंसो का जोडा” म्हणुन विलासराव आणि गोपिनाथराव गाजले. विलासरावांना पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊन ते मदत करत. विलासरावही मुख्यमंत्री असताना गोपिनाथरावांना जवळ करायचे. पक्ष, राजकारण यापलिकडे त्यांची मैत्री होती.
राजकारणात प्रचंड संघर्ष करुन पक्षात घुसमट झाल्यामुळे २००४ साली त्यांनी बंड पण केले. या बंडाची ताकत महाराष्ट्र बंद पडेल एवढी होती. लोकनायक दुसर्या पक्षात जाणार असे वाटत असताना ते मातोश्रीवर आर्शिवादासाठी गेले. तेंव्हा बाळासाहेबांनी देव्हार्यातला भगवा गंध गोपीनाथरावांच्या कपाळी लावला आणि सांगितले, ‘भगव्याची संगत सोडु नको. संघर्ष कर !’ हा मंत्र घेवुन गोपिनाथराव परत आले आणि देशभर संघर्ष यात्रा काढली. शेटजी, लाटजी, भटजीचा समजलेला जाणारा पक्ष लोकमनांत वसवला.
१२ डिसेंबर १९४९ ला सुरु झालेला हा संघर्ष ३ जून २०१४ रोजी थांबला. एक वादळ शांत झाले. एका संघर्षनायकाचा अस्त झाला. पण आजही जनासामान्यांच्या मनावर गोपीनाथरावांचे गारुड तसेच कायम आहे. त्यांचा संघर्षनायक जन्यसामान्याच्या हृदयावर कायमचा कोरला गेला आहे.
या संघर्षनायकाला जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

– लेखन : पंकज काटकर. काटी, जि.उस्मानाबाद
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800