आपली मातृभाषा शुद्ध स्वरूपात लिहिणे, बोलणे तिचे व्यवस्थित जतन, संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.
सध्या मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने शुद्ध लेखनाचे महत्व सांगताहेत भाषातज्ञ डॉ उषा रामवाणी गायकवाड…
– संपादक
मी बर्याच प्रकाशन संस्था, तसेच वर्तमानपत्रांत; विशेषतः संपादन साह्य, पुस्तक-निर्मिती, उपसंपादक तसेच मुद्रितशोधकाची जबाबदारी पार पाडली आहे.
या प्रांतांत किमान तीस वर्षांची प्रदीर्घ मुशाफिरी मी केली आहे. ‘लेखन कौशल्य’ या विषयावर मी शाळा – कॉलेजेसमध्ये कार्यशाळा घेत असते. एका NGOत मी लेखन-कौशल्य या विषयावर मुंबईत बऱ्याच कार्यशाळा घेतल्या. हिमाचल प्रदेशात हिंदी लेखन-कौशल्य या विषयावरही घेतल्या. या विषयावर फेसबुकवर मी एकतीस दिवसीय कार्यशाळा घेऊन बराच विचारविमर्ष घडवून आणला. माझ्याही ज्ञानात बरीच भर पडली. मराठी साहित्यात गाईडच्या मदतीशिवाय मुंबई विद्यापीठातून मी पीएच.डी. केलं आहे.
शुद्ध मराठीची आंतरिक तळमळ, जिव्हाळा व पोटतिडकीपोटी; चिवट व संयमी वृत्तीचा अवलंब करून मुद्रितशोधनाचं काम करतानाच; सामान्य ज्ञान उत्तम असल्याने माझ्यातल्या गुणवत्ता नि क्षमतांसकट ‘आऊट ऑफ वे’ जाऊन अनेक संस्थांना “बेस्ट क्वालिटी” देण्याचा प्रयत्न मी केला आहे.
नियत कर्तव्य भावनेपलीकडे जाऊन संपादकीय संस्करणाचंही काम करताना संपादकांनाही पुरेसं ज्ञान कित्येकदा दिसलं नाही. विशिष्ट दुरुस्तीसाठी कित्येकदा अनेक ठिकाणी फोन लावून; लेखकांशी, वरिष्ठांशी चर्चा करून; छापील माध्यमांतून खात्री करून समाधान झाल्याशिवाय मला स्वस्थता नसे.
मुद्रितशोधन म्हणजे शुद्धलेखन तपासण्याशिवाय आणखी बरंच असतं, शुद्धलेखन तपासणं आणि मुद्रितशोधन यांत खूप फरक आहे. मुद्रितशोधन हा कुठल्याही भाषेचा, प्रकाशनाचा आत्मा ! संगणकीकरणामुळे आजकाल वर्तमानपत्रांतील मुद्रितशोधकाची गरजच संपली आहे. वेज बोर्ड अॅक्टनुसार मुद्रितशोधकाला पत्रकार मानलं जातं. मराठी वर्तमानपत्रांतल्या मुद्रितशोधकाची जागा उपसंपादकांनीच घेतली आहे !
वाचकांसमोर जाण्याआधीची एक चाळणीच नाहीशी झाली आहे. त्यातून असंख्य विनोद घडत असतात! त्यात, हल्ली सगळे वर्ण दीर्घच लिहावेत अशी चळवळ चालू आहे. देवनागरीऐवजी रोमन लिपी वापरावी असाही प्रवाह दिसतो.
काहींंच्या मते शुद्धाशुद्ध, चूक / बरोबर असं काही लेखनात नसतंच. काहींंच्या मते लहानपणापासून ते जे शिकले तेच ते लिहितात. काही लोक तर ढळढळीत चुकीचं लिहून वर ‘आमचंच बरोबर आहे’ असं समजून वावरतात. काही लोक तर चुकीचं असल्याचं कळत असूनही तेच लिहितात. भाषाशास्त्रानुसार योग्य-अयोग्य जाणून घेण्याबाबत देणंघेणंच नसतं त्यांना.
बोलीभाषा महत्त्वाच्या असल्या तरी सर्वांशी संवाद साधण्यासाठी एका प्रमाणभाषेचा अवलंब करणं गरजेचं असतं. मजकुराच्या आकलनात अडथळे आणणारे वाक्यरचनेतले दोष; लेखकाच्या शैलीला धक्का न लावता योग्य बदल करून दुरुस्त करावे लागतात. गोंधळात टाकणाऱ्या वाक्यरचनेमुळे कधी अनेक विनोद घडतात, तर कधी संपूर्ण वाक्य अनाकलनीय होतं.
भाषिक संपादन न झाल्यास लेखन कंटाळवाणं, रटाळ वाटू शकतं. आशय कितीही चांगला असला तरी तो जर साध्या-सरळ भाषेत वाचकापर्यंत पोचला नाही तर लेखनाच्या वाचनीयतेला बाधा पोचून वाचक ते लेखन नाकारतात.
माझ्या नोकरीची रीतसर सुरुवात १९९९ साली एका प्रतिष्ठित सेवाभावी प्रकाशन संस्थेत ‘संपादन साहाय्यका’च्या कामाने झाली. नोकरीच्या सुरुवातीच्या काळातच संपादकांनी एका दलित साहित्यिकाचं गाजलेलं आत्मचरित्र; ज्याच्या बऱ्याच आवृत्त्या आधी निघाल्या होत्या, नि आता नव्याने ‘पुनर्मुद्रण’ व्हायचं होतं; मुद्रितशोधनासाठी दिलं. प्रकाशनाची तारीखही तोंडावर आली होती. मुद्रितशोधन करता करता संपादनाच्याही अक्षम्य चुका दिसू लागल्या. विशेषतः बोलीभाषेचा नि प्रमाणभाषेचा विलक्षण घोळ होता! संपादकांनी प्रकाशनाची तारीख पुढे ढकलली नि पुस्तकाची ‘सुधारित’ आवृत्ती काढली !
त्यानंतर संपादकांचा माझ्या कामावरचा विश्वास वाढत गेला नि माझ्या कामाचा कसही लागत गेला ! मग; एखाद्या पुस्तकाची दहा प्रुफं संपादकांनी वाचली असली तरी अंतिम प्रूफ माझ्याच ‘नजरे’ खालून गेलं पाहिजे असा संपादकांचा आग्रह असे. अधूनमधून ते विचारत, ‘रामवाणी, अमुक तमुक शब्द कसा लिहायचा ?’ त्यांच्या स्वतःच्या लेखनातल्याही अगदी सामान्य ‘चुका’ही मी त्यांच्या नजरेला आणून दिल्या आहेत. ९९ साली प्रुफं तपासण्याचा सवलतीचा दर इथे अडीच रुपये होता !
या संस्थेने मला संपादकीय संस्करणाचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. पण एकदा हा प्रकार अंगलट आला. एका अमेरिकेस्थ NIR लेखकाचं पुस्तक त्यांनी छापलं होतं. लेखक संस्कृत लेखनाच्या नियमांची बांधिलकी मानणारा. प्रकाशकांच्या सांगण्यानुसार मी केलेल्या दुरुस्त्या तशा साध्याच होत्या. ‘करीत’च्या ऐवजी करत वगैरे. पुस्तक छापून झाल्यावर जाब विचारणारं त्याचं भलं मोठं पत्र संपादकांना आलं. मग निस्तरलं सगळं. प्रत्येक प्रकाशकाची नि मुद्रितशोधकाचीही एक विशिष्ट शैली असते हा मुद्दा त्यांना अमान्य होता. पुढे मी माझ्या प्रांतात जी समृद्ध होत गेले ती नकळत याच प्रकाशन संस्थेमुळे; हेही खरंच !
हस्तलिखिताचं लेखन मुळात कच्चं, कधी; न कळणारं हस्ताक्षर, तर कधी अस्पष्ट झेरॉक्स, अनेक लेखकाचं बहुतेक पहिलं लेखन, बऱ्याचदा मजकुरातही फारसा जीव नाही
(प्रकाशक असं पुस्तक का छापतोय हा प्रश्न कित्येकदा पडायचा ! नंतर लक्षात येत गेलं, की प्रकाशकालाच त्या पुस्तकासाठी भरपूर बिदागी मिळालेली असते किंवा ते पुस्तक छापण्यात त्याचे ‘वेगळे’च हितसंबंध असतात).
बऱ्याचदा ऑपरेटर मंडळी खूप आगाऊपणा करतात. आपल्या ज्ञानाला आवाहनही करू पाहतात खूप कमी वेळा ही बाब स्वागतार्ह ठरते). पुनर्वसन या शब्दात रफार ‘न’च्याच वर हवा हे ठसवण्यासाठी एकाने शब्दकोशच काढला. कधी, प्रुफांंत दुरुस्त करून दिलेला शब्द ऑपरेटरच्या हलगर्जीपणामुळे दुरुस्त होत नसे नि जबाबदार मलाच ठरवलं जात असे. नाही ठरवलं गेलं तरी माझ्या ज्ञानाची ‘वाट’ लागलेली पाहून खूप वाईट वाटायचं. outline print paperची त्यांना सवय लावलेली असते. एकदा लाईन आऊटपुटमध्ये दुरुस्त्या करून दिल्यावर त्याच चुका ऑपरेटरकडून राहतात हे पेपर / पुस्तक छापून आल्यावर लक्षात येतं.
शेवटच्या प्रुफात फक्त पाचच चुका असल्या तरी ऑपरेटरकडून त्या दुरुस्त होतीलच याची खात्री नसते. कधी चूक दुरुस्त करताना भलती नवीनच चूक ते करून बसतात. संपादकांना हे कळत नाही की ते दुर्लक्ष करतात, हे कळत नाही. या ऑपरेटर लोकांवर बॉसचाही वचक नसतो!
एका सांजदैनिकात मुद्रितशोधकाचं काम करताना हा अक्षम्य प्रकार सहसंपादकांच्या निदर्शनाला आणून देऊन त्यांना पटवून दिलं, की आऊटलाईनची ही पद्धत चुकीची असून डायरेक्ट स्क्रीनवर चुका दुरुस्त करण्याची पद्धत सोयीस्कर ठरेल. त्यांनी ऑपरेटरला सांगितलं. पण ऑपरेटर नि अन्य स्टाफलाही ही पद्धत मान्य नव्हती. मग वादावादी होऊन वातावरण बिघडलं. दुसरं म्हणजे; अर्थ कायम ठेवून, म्हणजे वाक्यरचनेतून अर्थ लागणार नसेल किंवा अस्पष्टता असेल, वाक्यरचना ढिसाळ असेल तर सौम्य, सुसह्य बदल केलेले ऑपरेटर्सनाही चालत नसे. संपादकांचं काही म्हणणं नसे. अशा वातावरणात मनापासून काम करणं शक्य नसतं.
एका कचेरीतल्या संपादक, मुद्रितशोधक आणि डीटीपीवाल्यांनी एकत्र बसून कामाची कार्यपद्धती ठरवण्याची मानसिकता कुठेच दिसत नाही. परिपूर्णता व गुणवत्तेबाबत मी आग्रही, काटेकोर असणं हा माझा दोष ठरणं हे खूपदा मनःस्तापांना कारणीभूत ठरायचं.
असा ध्यास बाळगणारी माणसं हल्ली ‘डोकेदुखी’ ठरू लागली आहेत. गुणवत्तेला दाद देण्यासाठी मुळात गुणवत्ता जोखण्याची क्षमता अंगी असावी लागते. अशी जमात आता केवळ दुर्मीळ नव्हे, तर इतिहासजमा होत चालली आहे.
अनेकदा लेखक त्याच्या शब्दांच्या प्रेमात असतो. त्याने जी भाषिक मांडणी केलेली असते तिच्यात बदल केलेला त्याला चालत नाही. त्याचा अहंकार दुखावला जातो. एका प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेतल्या लेखकांचा नि म्हणून संपादकांचा आग्रह असे, की फक्त मुद्रितशोधनाच्याच चुका दुरुस्त व्हाव्यात. ‘चार आंब्याची झाडे’ या वाक्यात ‘आंब्याची चार झाडे’ एवढीही दुरुस्ती केलेली लेखकांना चालत नसे. योग्य शब्द, योग्य वाक्य यापेक्षा ‘यांत्रिक’पणे काम करणं इथे महत्त्वाचं होतं.
दोन शैक्षणिक प्रकाशन संस्थांत मुद्रितशोधन करताना लेखकांच्या लिखित नोट्स; तर कधी जुन्या छापील पुस्तकांत मुद्रितशोधन करायचं असे.
विज्ञान, गणित, इंग्रजी, इलेक्ट्रॉनिक्स तसेच कायद्यासारख्या विषयांच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांत व गाईड्समध्ये नुसते ‘मुद्राराक्षसाचे विनोद’ नसत; त्याहीपेक्षा भयंकर अशा ज्ञानाच्याही चुका! शिवाजी किंवा अशा कित्येक आदरार्थी व्यक्तिमत्त्वांना आपण एकेरीच संबोधतो. भाषिक अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांत ‘ते सचिन (तेंडुलकर)’ अशा अनेक दुरुस्त्या करणाऱ्या मुद्रितशोधकाची नियुक्ती काही गैरसमाजांतून मला नोकरीवरून काढून मालकाने केली (अनेकदा विविध बोर्डांच्या प्रश्नपत्रिका वा पाठ्यपुस्तकांंत शुद्धलेखनाच्या व मजकुराच्या अक्षम्य चुका आढळून ती एक ‘बातमी’ बनते. असे प्रकार अशा कारणांमुळेच घडतात!) गैरसमज दूर झाल्यावर मालकाने घरबसल्या कामं द्यायला सुरुवात केली. ने-आण करायला त्यांचा माणूस असे. सुमारे वर्षभर हे काम केल्यावर संबंधित कोऑर्डिनेटरकडे मी; देत असलेल्या दरापेक्षा प्रतिपान रुपया वाढवून मागितला. त्यानंतर काम बंद झालं !
एका वर्तमानपत्रात उपसंपादक व मुद्रितशोधक होते. त्यांना नोकरकपात करायची होती. गदा माझ्यावरच आली. मुद्रितशोधनातला ‘म’ही माहीत नसलेल्या; पण कमी पगारात काम करणाऱ्या तिथल्याच कारकुनाची निवड झाली. त्यांच्यासाठी ‘ध’चा ‘मा’ न होणं एवढंच महत्त्वाचं होतं.
एका वर्तमानपत्रात Online proof reader होते. एका उपसंपादकाने (शिक्षण MA) ‘शाहू जयंतीनिमित्त निरक्षरांचा सत्कार’ अशा शीर्षकाची बातमी पाठवली. संपादकांना चूक पटवून द्यावी लागली. त्यांनी उपसंपादकाची चांगलीच हजेरी घेतली. उपसंपादकाला त्याची चूक मान्यच नव्हती. त्याच्या दृष्टीने निरक्षर नि साक्षर एकच! अशा चुकांची उदाहरणं शेकड्याने!
एकदा ‘बार गर्ल्स’बाबतची काही बातमी होती. वैशाली हळदणकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचा संदर्भ संपादकांना द्यायचा होता. पण त्यांना लेखिकेचं नाव, पुस्तक काहीच माहीत नव्हतं. अशा सामान्य ज्ञानविषयक अनेक प्रकारचा लाभ काम केलेल्या सगळ्या ठिकाणी मी करून दिला.
वर्तमानपत्रातल्या बड्याबड्या रकमांच्याही जाहिराती टाईप करताना ऑपरेटर बहुधा आधीच्या मजकुरावरून कॉपी-पेस्ट मारण्यात पटाईत ! ‘आहेत ना प्रूफ रीडर्स, बघतील ते!’ अशीच त्यांची उद्दाम भावना. आकड्यांचे, भाषांतराचे घोळ निस्तरणं म्हणजे तारेवरची कसरतच !! कित्येकदा; भाषांतर करणाऱ्याला फोन करून त्याला नेमकं काय म्हणायचंय ते जाणून घ्यावं लागे. याच वर्तमानपत्रात विनय आपटे गेल्याची बातमी होती. बातमीत मोहन आपटे असं नाव होतं. मागचापुढचा संदर्भ लागेना ! संपादक महाशयांना काही शंका विचारली तरी ते चिडायचे. त्यांच्याकडे नावाची खात्री केली. त्यांचं म्हणणं – ‘तुम्ही विचारताच कसं ? हे प्रूफरीडरचंच काम आहे’. दुसऱ्या प्रूफरीडरला विचारलं, ‘तू काय केलं असतंस ?’ चुकीबाबत त्याला शंकाच आली नाही. तो म्हणाला, ‘मी दुरुस्तीच केली नसती.’
या वृत्तपत्रात दोन मुद्रितशोधक असूनही दोघांना किमान निम्मा तरी वेळ मोकळा असे (सलग नव्हे). महत्त्वाच्या बातम्या वाचायला येईपर्यंत बहुधा संध्याकाळ उजाडायची. मग पानं लागणार कधी ? त्यापेक्षा वाचून न घेताच पानं प्रिंटिंगला जात. अगदीच महत्त्वाचं असलं तरच शक्यतो वाचून घेतलं जाई. करेक्शन्स करून दिल्यावर कधीतरी एखादा उपसंपादक एखादा शब्द बदलत असे. तो नेमका तरी नसे किंवा मुद्रिताची तरी काहीतरी चूक करे. दुसऱ्या दिवशी मुख्य उपसंपादक विचारणार, ‘मॅडम, ही चूक कशी झाली?’ अशा वेळी presence of mind खूप महत्त्वाचा ठरे ! जुनी प्रुफं शोधून ‘ही चूक माझ्याकडून राहिलेली नाहीये’ हे त्यांना पटवून द्यावं लागे.
मुद्रितशोधक हा सर्वत्र अनप्रॉडक्टिव आणि उपेक्षित घटकच असतो! पगार, मानधन तुटपुंजं! प्रुफांचा बाजारभाव वर्षांंनुवर्षं वाढत नाही. कधी; समजुतीची मतभिन्नता असेल, कधी अज्ञान वा अनवधानाने झालेली चूक असेल; किरकोळ चुकांचा बाऊ करून ठरलेल्या मानधनात कपात करणं, चक्क बुडवणंही; असेही अनुभव या क्षेत्रातील उमेदवारीच्या काळात आले.
मुद्रितशोधकाच्या प्रोफेशनला समाजात ना मान ना धन ! कुठल्याही पुस्तकात फक्त मुद्रितशोधक सोडून इतर सगळ्या घटकांना; अगदी ऑपरेटरपासून सगळ्यांना श्रेयनामावलीत स्थान दिलं जातं. कधीतरी असंही होतं – एखादं सामान्य, अव्यावसायिक प्रकाशन असतं, त्यांचं पुस्तक सामान्य असतं ; पण त्यांनी श्रेयनामावलीत मुद्रितशोधनाचं श्रेय दिलेलं असतं, पण पुस्तकात सगळ्या चुका दुरुस्तच झालेल्या नसतात! अशा ‘बॅकस्टेज’वाल्यांंची खरंतर संघटना असायला हवी. तरच अशा उपेक्षित व्यवसायाला व व्यावसायिकाला न्याय व प्रतिष्ठा मिळेल! या संदर्भात फार मोठ्या जागृतीची आवश्यकता आहे.
मराठी भाषेचं शुद्धलेखन व व्याकरण हे किचकट आणि क्लिष्ट असून शुद्धलेखनाचे नियमही परिपूर्ण नाहीत. त्यांंना अपवाद आहेत. शुद्धलेखनसंबंधात थोडीफार पुस्तकं उपलब्ध असली तरी या नियमांबाबत तज्ज्ञांतही मतभिन्नता आढळते. एकवाक्यता, सुसूत्रता नसते. कितीही बारकाईने अभ्यास केला तरी खूप ठिकाणी अडतं. अनेक अडचणी उद्भवतात. निवारणाचा निश्चित मार्ग उपलब्ध
नसतो. नेमकं काय प्रमाण मानावं, लेखनात एकवाक्यता कशी यावी, एकवाक्यतेचे निकष काय असावेत यांबाबत संभ्रमावस्था आढळते. त्यामुळे गुंते आणखी वाढतात!
आजकालच्या विशेषतः वर्तमानपत्रांमध्ये असणारी याबाबतची अनास्था फारच चिंताजनक असून वर्तमानपत्रांमध्ये होणारी भाषेची मोडतोड, शुद्धलेखनाबाबतची अक्षम्य हेळसांड होत आहेे. हल्ली काम करवून घेणाऱ्यांनाही पटापट कामंं उरकणं हवं असतं. त्यामुळे.तज्ज्ञ माणसं हाताशी असूनही; मराठी छापील माध्यमांत भाषेची आणि प्रामाणिक, ज्ञानी व्यक्तीची गळचेपी अटळ ठरते! भेदक, दाहक, कटू आणि क्लेशदायक अनुभवांना सातत्याने सामोरं जावं लागतं. हल्ली बहुसंख्य ठिकाणी बनचुक्या, ‘पाट्या’ टाकणाऱ्या, तांत्रिक नि यांत्रिक मुद्रितशोधकांचीच सर्वत्र चलती दिसते.
शुद्धलेखन हा विषय शाळाकॉलेजात मला तरी कधी नव्हता. त्यामुळे चुकत-धडपडतच या क्षेत्रातलं माझं ज्ञान मी विकसित केलं. या विषयाचं रीतसर प्रशिक्षण ना कुठे मिळतं, ना या विषयावर जाणकारांमध्ये एकवाक्यता असणारं मार्गदर्शनपर अधिकृत पुस्तक! साफसफाईच्या नि रूक्ष असलेल्या या विषयात आपापल्या परीने एखाद्याने शंभर टक्के जीव ओतला असला तरी कुठलाही मुद्रितशोधकच काय, संपादकही मुद्रितज्ञानाबाबत शंभर टक्के परिपूर्ण असू शकत नाही. परिपूर्ण हा शब्द सापेक्ष आहे. पण मी नेहमी परिपूर्णतेच्या ध्यासाने काम केलं. दिसायला खूप सोपं, साधं असं मुद्रितशोधनाचं काम किती जिकिरीचं, किचकट नि तारेवरच्या कसरतीचं असतं हे त्याच्या ‘वंशा’ गेल्याशिवाय कळणं कठीणच! बाळाला जन्म देण्याइतक्याच कळा त्यासाठी सोसाव्या लागतात.

– लेखन : डॉ उषा रामवाणी गायकवाड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
१००% सहमत
मॅडम, खूप छान आणि स्पष्ट लिहीले आहेत तुम्ही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचायला हवे. धन्यवाद!