माझे मित्र, डॉ. बळीराम गायकवाड हे सध्या उरण येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या प्रबंधक पदाचेही दायित्व सांभाळलेले आहे. त्यांनी कै. अण्णाभाऊ साठे यांच्या “फकीरा” या कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद केला आहे त्यामुळे ही कादंबरी देश विदेशात पोहोचली आहे. विद्यापीठाच्या आण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या कामातही त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या या कामामुळेच “भारतीय व जागतिक साहित्य विश्वात मराठीची ध्वजा फडकवणारे अनुवादक” या परिसंवादात त्यांचा डॉक्टर विनया बापट, मा.अरुणा जोशी व मा.मृणालिनी केळकर यांच्यासोबत सहभाग होता.
दुपारी विनोबा भावे सभामंडपात “कृषी जीवनातील अस्थिरता, प्रक्षोभ व मराठी लेखक” या विषयावर परिसंवाद झाला. त्यात मा. शेषराव मोहिते, मा. विजय चोरमारे, मा कैलास इंगळे, डॉक्टर श्रीकांत पाटील, मा दत्तात्रय पवार, मा. विजय जावंधिया यांचा समावेश होता.
त्यानंतरचा परिसंवाद “मराठी साहित्यातील उद्यम व अर्थशास्त्रीय लेखन” या विषयावर झाला. यात मा. अच्युत गोडबोले, मा. जयू भाटकर, मा. यमाजी मालकर, डॉ. साहेब खंदारे व मा. श्रीकांत गोडबोले यांचा समावेश होता.
वरील सर्व परिसंवाद अत्यंत महत्त्वाचे होते. तसेच भाग घेणाऱ्या सर्व व्यक्तीही अत्यंत विद्वान होत्या. असे असतानाही रसिकांनी या परिसंवादांना फारच कमी प्रतिसाद दिला.
मात्र नंतरच्या “मुक्त संवाद” या कार्यक्रमात संपूर्ण सभामंडप हा भरून गेला. हा मुक्त संवाद कवी किशोर कदम, अभिनेते सयाजी शिंदे व चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांच्या समवेत मा. बालाजी सुतार व मा. अरविंद जगताप यांनी केला होता.
या मुक्त संवादात वरील तिघांनीही काही कविता सादर केल्या. त्याचबरोबर आपल्या काही आठवणी या श्रोत्यांबरोबर शेअर केल्या. सयाजीराव शिंदे यांनी आपल्या आईचे काही किस्से सांगितले. नागराज मंजुळे यांनी आपला प्रवास कसा घडला हे सांगितले. त्याचबरोबर वयाबरोबर समाज समजण्यात कसा बदल घडतो तेही सांगितले. कवी व नट किशोर कदम यांनी सर्व बोलीभाषा ही मराठी आहे ती प्राकृत प्रमाणित, शुद्ध, अशुद्ध असे काहीही नाही असे सांगितले.
सर्वसामान्यांच्या भाषेत नागराज मंजुळे यांनी चित्रपट काढल्यामुळे आज ते लोकांच्या गळ्यातील ताई बनले आहेत असे ते म्हणाले. आपली आई लक्षात राहण्यासाठी आईच्या वजनाएवढ्या बियांची मी झाडे लावणार आहे असे सयाजीराव शिंदे यांनी सांगितले. हा मुक्त संवाद खूपच रंगला, तरीही वेळेत संपला. त्यामुळे रात्रीचे कवी संमेलन हे फार उशीर न होता सुरू झाले.
या कवी संमेलनात माझ्याबरोबर कवी प्रतिभा सराफ, कवी दुर्गेश सोनार, कवी व्यंकटेश चौधरी, कवी तानाजी साबरे, कवी रमेश पवार असे एकूण ३८ कवी होते. सर्व कवींनी निसर्ग, शेतकरी, स्त्री, आई, अशा विविध विषयांवर, विविध प्रकारात आपल्या कविता सादर केल्या.
मी “चिमुकल्याची हाक” ही माझी कविता सादर केली. नोकरी करणाऱ्या पालकांच्या चिमुकल्याची ही हाक होती.
“आई बाबा, आई बाबा लवकर घरात याना
कंटाळूनिया मी गेलो ना माझ्याशी खेळाना”
असे कवितेचे बोल होते. माझी ही कविता अनेकांच्या हृदयाला भिडली. त्यामुळे कविता संपल्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटाने रसिकांनी आपला प्रतिसाद दिला. एवढेच नाही तर निवेदक व सहकारी कवींनीही माझे अभिनंदन केले. संमेलन संपल्यावर अनेक जणांनी प्रत्यक्ष भेटून ही कविता आमच्या मनात घर करून राहील असे सांगितले. काहींनी ती कविता व त्याचे रेकॉर्ड मागवून घेतले.
निमंत्रितांच्या कवी संमेलनातील प्रत्येक कवीला संमेलन समितीतर्फे मानधन व स्मृतिचिन्ह देण्यात आले. आपल्या कवितेला मिळालेला प्रतिसाद पाहून अत्यंत कृतकृत्यतेने मी आमच्या निवासस्थानी परत आलो. आनंदात निवासस्थानी आलेल्या सर्व कवी मित्रांच्या गप्पा रात्री उशीरापर्यंत रंगल्या होत्या. ओळख घट्ट होत होती.
क्रमशः

– लेखन : प्रवीण देशमुख
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800