सकारात्मक जाणिवेने विद्यार्थ्यांची जडणघडण करणारे शिक्षक मराठी साहित्यावर निखळ व निरपेक्ष प्रेम करून संवेदनशील लेखन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या नव सृजनशीलतेला प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती शिक्षण मंडळ, संस्थेने नुकतेच कल्याण येथे “सृजनांकुर” साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते.
संमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलन करून महाराष्ट्र राज्य गीताने झाली.
प्रा. नरेंद्र पाठक , कार्याध्यक्ष अखिल भारतीय साहित्य परिषद,सदस्य साहित्य अकादमी यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. उदघाटनीय भाषणात त्यांनी शिक्षकांसमोरील आव्हाने,जबाबदारी ह्याची जाणीव करून दिली व सृजनांकुर कसा विकसित करता येईल ह्याविषयी ओघवत्या शैलीत संवाद साधला.भाषेबद्दलचे विचार प्रवर्तन,साहित्यातून समाज प्रबोधन ,भाषा मरता देशही मरतो जीवन जगण्याचे संस्कार हे भाषेतून घडविले जातात,मनाची मशागत करायला हवी,शिक्षक व विद्यार्थी ह्यांचे नाते आविष्कार फुलविण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर आहेत. ग्रंथ संस्कार झालाच पाहिजे ह्यावर अधिक भर दिला.
त्यापुढील पहिल्या सत्रात कवी,लेखक श्री.दुर्गेश सोनार ह्यांनी भाषिक समृद्धी ह्या विषयावर शिक्षकांशी संवाद साधला. कवितेची निर्मिती प्रक्रिया हा जगण्याचा भाग आहे. कवितेचे प्रकार, प्रवास, अनुभव सांगितले. ह्या सत्रात संस्थेतील काही शिक्षकांनी स्वरचित कविता सादर केल्या.
दुसऱ्या सत्रात, प्रसारण कर्मी श्रीमती कांचन संगीत प्रमुख अतिथी होत्या. अभिव्यक्ती तंत्र, आवाजातील आरोह अवरोह संभाषणांचे वैविध्य स्व सादरीकरणातून दाखविले.ह्या सत्रात संस्थेतील शिक्षकांनी प्रसिद्ध कवी लेखकांच्या साहित्याचे वाचन, सादरीकरण केले.
समारोप सत्रात ज्येष्ठ कवी, लेखक प्रवीण दवणे ह्यांनी कविता अध्यापन करत असताना आनंद कसा घ्यावा, कविता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, कवीला काय म्हणायचे आहे, हा काव्यानुभव देणे महत्त्वाचे आहे असे सांगून आपल्या व्यवसायातला आनंद हा घेता आला पाहिजे, मनाच्या चाकावर चालतो तो प्रवास कवितांच्या रसग्रहणाचे समीक्षण वाचावे, रसग्रहण वाचावे, लिहिणाऱ्या कवीला वाचणाऱ्या रसिकाला शब्दांचे अर्थ कळले पाहिजे, “शब्दांना कानाच्या डोळ्यांनी बघा” अशा सहजसुंदर वक्तव्याने सर्वाना मंत्रमुग्ध केले.
छत्रपती शिक्षण मंडळ संस्था अध्यक्ष डॉ.नंदकिशोर जोशी ह्यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. संस्था उपाध्यक्ष प्रा.नारायण फडके, कार्याध्यक्ष श्री.श्रीकांत तरटे, उपकार्याध्यक्ष श्री.विश्वास सोनवणे, सरचिटणीस श्री.निलेश रेवगडे, कोषाध्यक्ष श्री.धनंजय पाठक, श्री.श्रीनिवास दातार चिटणीस, सौ.भारती वेदपाठक, नागेश पवार, संजय पालकर, मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.
साहित्यक्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेल्या संस्थेतील शिक्षकांना श्री.प्रविण दवणे ह्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित जयोस्तुते गीताने संमेलनाची सांगता झाली.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800