आंबा
लेखिकेचा परिचय :
लेखिका सौ रश्मी चाफेकर यांनी पुणे विद्यापीठातून एमएससी पर्यंत चे शिक्षण घेतले आहे. गेली २८ वर्षे त्यांचं वास्तव्य अमेरिकेतील शिकागो येथे आहे.
सौ चाफेकर यांनी १९९८ ते २००० या कालावधीत अमेरिकन एअरलाईन्स मध्ये नोकरी केली.पुढे त्यांच्या आवडीच्या स्पीच लँग्वेज पँथालॉजी असिस्टंट होण्यासाठी आवश्यक ती पदवी प्राप्त केली. गेली १४ वर्षे त्या स्पीच लँग्वेज पँथालॉजी असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत. ललित लेखन ही त्यांची आवड आहे.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
बघा, तुम्हाला वाटलंच ना, की हिचं काय चाललंय ? ही काय शाळेत आहे का, ‘माझं आवडतं फळ’, ह्यावर निबंध लिहायला ? ह्या वयात (ह्याला माझा आक्षेप आहे बरं का !) ‘आंबा’ हा काय लेखाचा विषय होऊ शकतो का ? हो, होऊच शकतो. का ते तुम्हाला कळेलच !आंबा ! प्रशांत दामले म्हणतात तसं,
‘सुख म्हणजे नक्की काय असतं ?
काय पुण्य असतं, की जे घर बसल्या मिळतं ?’
असंच सुख नुकतंच आमच्या वाट्याला आलं. आता ह्याचा आंब्याशी काय संबंध ? सगळं सांगते. फार घाई करता बुवा तुम्ही.
तर आंबा, फळांचा राजा ! मस्त पिवळा, केशरी रंग परिधान केलेला. आपल्या सुवासाने इतरांना भुरळ घालणारा. वाढणाऱ्या महागाईमुळे प्रचंड किंमत मोजावी लागणारा ! (पण फळांचा राजाच तो ! त्याला माहीत असतं, की काहीही झालं तरी, ‘it’s worth it’ म्हणत माणूस आपल्याला घरी नेणार ह्यात शंकाच नाही.)
तर नुकताच शिकागोमध्ये, असा हा खास रत्नागिरीचा हापूस आंबा खाण्याचा योग जुळून आला आणि मग काय, त्या आंब्याबरोबरच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.
लहान असताना हे हापूस आंबे एव्हढे महाग नव्हते पण तरीसुद्धा त्या काळानुसार जास्त किंमत मोजावी लागायचीच! मग ही स्वारी एका पेटीत बंदिस्त होऊन घरी यायची. हे साहेब घरात आले, की सगळीकडे मस्त सुवास ! आणि मग आंबे खायची घाई व्हायची. पण वाट बघायला लागायची कारण हे आंबे कधी कधी अजून तेव्हढे तयार झालेले नसायचे. तेव्हा अवस्था अगदी ‘वाट पाहूनी जीव शिणला’ अशी व्हायची पण त्याला पर्याय नसायचा.
मग एकदा आईबाबांकडून, आंबे आता पिकले आहेत अशी घोषणा झाली, की त्यावर तुटून पडायचं. आता हे आंबे कितीतरी प्रकारांनी खाता येतात हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मग विचारविनिमय करायचा, की आज आंबे कसे खायचे ? आंबा खाताना तो सुरीने कापून, त्याची साले काढून मग प्लेटवर ठेवायचा हे असले प्रकार आम्हाला मान्यच नव्हते. मग काय करायचं ? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जरा जुने कपडे घालून बसायचं कारण कपड्यांवर हे महाराज विराजमान होणार हे नक्की ठरलेलं असायचं. त्यानंतर जरा चार पाच आंब्यांवर नजर टाकून त्यातला आपल्याला आवडलेल्या रंगाचा, छान वासाचा आंबा निवडायचा. मग त्या आंब्याला दुखापत होणार नाही इतपत हलक्या हातांनी सगळ्या बाजूंनी हलकेच दाबून त्याला मऊ करायचा.
आता आपण आणि आंबा दोघंही तयार असायचो. त्या आंब्यावरचं ते छोटंसं, काळं दार उघडायचं आणि आतल्या खजिन्याची, सीझनच्या पहिल्या आंब्याची चव घ्यायची. आहाहा! त्या क्षणाला खरी ब्रह्मानंदी टाळी लागायची असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
आता हा आंबे चोखून खाण्याचा प्रकार चालू असताना आंब्याचा गळणारा रस तोंडावर, हातावर सगळीकडे एखाद्या मनमौजी प्रमाणे विहार करायचा. पण ह्याचं काय करायचं असा प्रश्न मात्र कधीच पडायचा नाही.
वर्षातून एकदा भेटणारा हा आंबा, मग त्याचा एक थेंबही वाया जाऊ न देणं हे एक कर्तव्यच वाटायचं. आणि त्यावेळेला, तोंड पुसण्यासाठी टिश्यू वापरणे वगैरे हे प्रकार अस्तित्वातही नव्हते. अर्थात ते असते तरी त्या टिश्यूला आंब्याच्या जवळही फिरकू दिलं नसतं हे ही तितकंच खरं.
आता असं वाटतं, की तो आंबा चोखण्याचा आनंद लुटताना तोंडाच्या होणाऱ्या विचित्र हलचालींचे, मध्येच दातात अडकलेली ती एखादी रेष बाहेर काढताना आपण करत असलेल्या निष्फळ प्रयत्नांचे पण तरीही चेहऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या समाधानाचे फोटो काढून ठेवायला हवे होते. असो !
तर हे सगळं घडत असताना तो आंबा कधी संपायचा ते कळायचंच नाही. मग आपल्या हातून चुकून त्या आंब्याचा काही अवशेष राहून गेला नाही ना हे बघण्यासाठी धडपड सुरू व्हायची. आणि एकदा का लक्षात आलं, की आता ह्या आंब्याशी फारकत घ्यायची वेळ आली आहे, की मग तो आंबा कचऱ्याच्या पेटीकडे घेऊन जायचा. पुन्हा आंब्याची तपासणी करून, नकळत नजरेतून सुटलेला तो छोटासा भाग चाटून, परत एकदा खात्री करून घेऊन, जड अंतःकरणाने तो आंबा कचऱ्याच्या पेटीत जायचा.
ही असायची आपण आणि तो आंबा ह्याची भेट. पण घरात असलेल्या इतर आंब्याची एकत्र मैफिल करण्याचाही घाट घातला जायचा. अहो, म्हणजे आमरसाच्या कार्यक्रमाचा हो ! हे ही एक अत्यंत आवडणारं काम असायचं कारण ते नेहमीच माझ्या आणि भावाच्या वाटेला यायचं.
पुन्हा एकदा जुने कपडे दिमाखात अंगावर लेऊन, जमिनीवर ठाण मांडून आम्ही सज्ज व्हायचो. पुन्हा एकदा त्या आंब्याच्या भावनांची कदर करत हलक्या हाताने त्याला मऊ केलं जायचं. एक प्रकारचा मसाजच म्हणा ना! पण ह्या वेळेला तो आंब्याचा रस पातेल्यात जायचा. सगळ्या आंब्याचा रस काढून झाला, की उरलेली सालं उलटी करून ती चाटून पुसून स्वच्छ केली जायची. कोयींचं वाटप व्हायचं आणि आधीच पूर्णपणे रस काढून उरलेल्या कोयीसुद्धा चाटून पुसून लख्ख केल्या जायच्या.
मग पातेल्यातल्या, आपण कष्ट करून काढलेल्या त्या आमरसाकडे नजर जायची आणि चेहऱ्यावर समाधानाची एक हलकीशी रेष उमटायची. आता आमरस काढला म्हणजे पुरी ही त्याची मैत्रीण जेवणात असणं गरजेचं असायचं. मग त्याची तयारी. मी पुऱ्या लाटणार, दादा पुऱ्या तळणार हे ठरलेलं असायचं. एकदा हे सोपस्कार पार पडले की आमच्या चौघांची आमरस पुरीची मेजवानी सुरू व्हायची. इथे सुद्धा एकही थेंब वाया जाऊ न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जायचे. आणि मग तृप्त मनाने ही मैफिल संपायची.
त्या सीझनमधे जेव्हा जेव्हा आंबे घरी यायचे तेव्हा तेव्हा अशाच मैफिली रंगायच्या. मग हळूहळू आंबे बाजारात येईनासे व्हायचे आणि आपण पुढच्या वर्षी नक्की परत येऊ असं वचन देऊन आपला निरोप घ्यायचे.
आता कळलं ना, की ह्या फळांच्या अनभिषिक्त राजाविषयी लेख लिहायचं मी का ठरवलं ते ! निव्वळ ह्या आंब्याच्या प्रेमापोटी ! ‘आंबे महाराज’, इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा ह्या आठवणी ताज्या केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद’ !
तुमच्याही अशाच आठवणी असतील ना ? मला त्या वाचायला, ऐकायला नक्कीच आवडतील. मला नक्की कळवा बरं का !
कळावे लोभ आहेच तो वाढावा ही विनंती !
धन्यवाद,

– लेखन : रश्मी चाफेकर. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800
या लेखाच्या निमित्ताने आंबा या फळांच्या राजाचे ,त्यासंदर्भात आठवणी इ.विषयी उत्तम लेखन.
रश्मीताईंनी लहानपणीची आंबे खाण्यातली जी मजा वर्णन केली आहे ती वाचताना मला माझे बालपण आठवलेच. त्या माळ्यावरच्याहापूस पायरीच्या अढ्या, त्यातून आजीने निवडून काढलेले मधूर आणि मोठे मोठे आंबे चोखायचे.
खूप छान लेख