Thursday, June 19, 2025
Homeकलाचित्र सफर : 26

चित्र सफर : 26

शंकर….
शंकर जयकिशन या लोकप्रिय संगीतकार जोडीतील शंकर यांची 36 वी पुण्यतिथी नुकतीच, 26 एप्रिल रोजी झाली. या निमित्ताने ज्येष्ठ चित्रपट समीक्षक श्री विवेक पुणतांबेकर यांनी रेखाटलेले शंकर यांचे जीवन चरित्र
वाचू या. श्री विवेक पुणतांबेकर यांचे आपल्या पोर्टलवर हार्दिक स्वागत आहे.
शंकर यांना आपल्या पोर्टल तर्फे विनम्र अभिवादन.
– संपादक

दोस्त दोस्त ना रहा…
संगम चे गाणे ऐकले की डोळ्यासमोर उभे रहातात शंकर जयकिशन जोडीतले शंकरजी.

शंकरसिंग रामसिंग रघुवंशी यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२२ चा. मूळचे हे पंजाबी कुटुंब नोकरी निमित्ताने हैद्राबाद ला स्थायिक झाले होते.

लहानपणापासून शंकरजींना दोन गोष्टी अतिशय प्रिय होत्या. एक म्हणजे कसरत करणे आणि दुसरे म्हणजे तबला शिकायचे. ख्वाजा खुर्शिद अन्वर यांच्याकडे ते तबला शिकले. तसेच कथ्थक पण शिकले.

दहावी शिकल्यावर मुंबईत सिनेविश्वात काही काम मिळते का हे पहायला शंकर मुंबईत आले. इथे त्यांची ओळख सुप्रसिद्ध नर्तक सत्यनारायण आणि त्यांची पत्नी हेमवती यांच्याबरोबर झाली. या दोघांचे कलापथक होते. त्यात शंकरजी सामिल झाले. त्यांच्या बरोबर ते काम करु लागले. मिळालेल्या पैश्यातून त्यांनी एक सायकल विकत घेतली. त्यावरून त्यांची मुंबईत भटकंती सुरु झाली.

एकदा त्यांची सायकल चोरीला गेली. सायकल चा शोध घेत ते कामाठीपुरात पोहोचले. एका कोठ्यावरून येणारे संगीताचे सूर ऐकताना त्यांना जाणवले की तबलजी चा ठेका चुकतो आहे. न रहावून ते तडक कोठ्यावर गेले. तबलजी ला म्हणाले गलत बजा रहे हो ! सगळे चकीत झाले. कसलेल्या तबलजी ना सांगायची याची हिम्मत कशी झाली ? संतप्त तबलजीनी आव्हान दिले तुम बराबर बजाके दिखाओ, वरना मार खाना पडेगा. आव्हान स्विकारुन शंकरजीनी वाजवलेला तबला ऐकून सगळे चकीत झाले. त्यांनी शंकरजींना बक्षिस दिले.मानी स्वभावाच्या शंकरजींनी पैसे नाकारले. कोठेसे पैसा लेना मेरे असूल के खिलाफ है असे सांगून ते बाहेर पडले.

काही काळ शंकरजी हुसनलाल भगतराम जोडीचे सहाय्यक बनले. सुरुवातीच्या कालखंडात त्यांच्या संगीतावर हुसनलाल भगतराम यांची छाप जाणवते ती यामुळेच. पापाजींच्या नाटक कंपनीत त्यांना सत्यनारायण घेऊन गेले.इथेच त्यांची गाठ पडली राजकपूर बरोबर.पापाजींच्या नाटक कंपनीत संगीत विभागाचे प्रमुख होते राम गांगुली. पूर्वी नाटकात मध्यंतरात तबला किंवा सतार वाजवत.शंकरजी तबला वाजवत. कसरत करायला व्यायाम शाळेत जात .तिथेच त्यांची गाठ दत्ताराम वाडकर शी पडली.त्यांनी सहाय्यक म्हणून दत्ताराम ची शिफारस पापाजींकडे केली.दत्ताराम नाटक कंपनीत आल्यावर तबला वाजवायचे काम करु लागले.

एकदा शहा नावाच्या निर्मात्याला शिवमहिमा सिनेमासाठी संगीतकार पाहिजे असे समजल्या वर शंकरजी भेटायला गेले. तिथे एका तरुणाकडे त्यांचे लक्ष गेले. बोटांनी त्याने ताल घरला होता. या बुज-या तरुणाशी शंकरजींनी ओळख करून घेतली. तेव्हा समजले हार्मोनियम वाजवणारा हा तरुण पण सिनेमात काम मिळते का पहायला आला होता. गुजरात च्या वालडा गावातून आलेला हा तरुण शिवडी च्या टिंबर मार्ट मधे नोकरी करत होता. या तरुणाचे नाव होते जयकिशन डाह्याभाई पांचाळ. या दोघांनाही सिनेमात काम मिळाले नाही. संध्याकाळी शंकरजी जयकिशन ना घेऊन नाटक कंपनीत आले. पापाजींनी या तरुणांना कंपनीत हार्मोनियम वादक म्हणून घेतले. इथूनच या दोघांची मैत्री सुरु झाली ती जयकिशन च्या जाण्यापर्यंत टिकली.

पठाण, दिवार या नाटकात शंकरजींनी छोट्या भुमिका केल्या. हसरत जयपुरी पण नाटक कंपनीत आलेले. राजकपूर, हसरत, शंकर, जयकिशन यांची मैत्री जमली. राजकपूर नी शंकरजींना आश्वासन दिले होते की सिनेमा निर्मिती सुरु केल्यावर त्यांना संगीतकार म्हणून संधी देईन. पण आग च्या निर्मितीच्या वैळी अनुभवी संगीतकार हवा म्हणून राम गांगुली ना घेतले. शंकरजी निराश झाले. ते राम गांगुलीचे सहाय्यक बनले. जोडीला होते जयकिशन.

आग मधे नावाड्याच्या रोलमध्ये शंकरजी पडद्यावर दिसले. आग सिनेमा यशस्वी झाला. बरसात सिनेमाची तयारी सुरु झाली. या वेळी पण संगीत राम गांगुली कडे गेले. सहायक शंकरजी नी एक गाणे रेकॉर्ड केले. पण राजकपूर नी पास केलेली एक चाल राम गांगुली दुसऱ्या निर्मात्याला ऐकवतो आहे हे समजल्यावर संतप्त राजकपूर नी राम गांगुली ना काढून टाकले. गाणे रेकॉर्ड करणाऱ्या शंकरजींचे नाव संगीतकार म्हणून रेकॉर्ड वर छापायला सांगितले. शंकरजींनी राजकपूर कडे आग्रह धरला की जोडीला जयकिशन चे नाव पण संगीतकार म्हणून छापा. राजकपूर तयार झाले आणि शंकर जयकिशन ही संगीतकार जोडी उदयास आली.

महालक्ष्मी येथल्या फेमस स्टुडियोत राजकपूर नी ऑफिस घेतले. तिथेच शैलेंद्र ची भेट शंकर जयकिशन बरोबर झाली. शंकरजी नी तयार केलेल्या चालीवर शैलेंद्र नी शीर्षक गीत (टायटल सॉंग) आणि पतली कमर है ही दोन गीते लिहीली. राजकपूर नी शंकर जयकिशन या जोडीला, हसरत जयपुरीना दरमहा पगारावर नेमले.आधी शैलेंद्र तयार नव्हते पण राजकपूर नी अनेकदा विनवणी केल्यावर तयार झाले. अश्या रितीने शैलेंद्र, हसरत, शंकर जयकिशन अशी चौकडी जमली जिने सिने संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेले.

बरसात रिलीज झाला तुफान लोकप्रिय झाला. रसिक खुळावले. शंकरजींनी जयकिशन बरोबर अलिखित करार केला. यापुढे कायम एकत्र काम करायचे. जे मिळेल ते एकत्र वाटून घ्यायचे आणि कोणती चाल कोणाची हे कधीच दुनियेला कळता कामा नये. आवारा रिलीज होईपर्यंत एकही बाहेरचा सिनेमा या जोडीने घेतला नाही. राजकपूर नी ओळखले ही जोडी जबरदस्त आहे यांना फक्त आर.के.फिल्म बरोबर बांधून ठेवणे चुकीचे आहे. त्यांनी उदारपणे या जोडीला बाहेरचे सिनेमे घ्यायची परवानगी दिली. एकच अट घातली की ज्या चाली तुम्ही कराल त्या आधी मला ऐकवायच्या. ज्या चाली मला आवडतील त्या माझ्या. नेहमी टायटल सॉंग शैलेंद्र लिहीत आणि शंकरजी त्याला चाल लावीत. पार्श्वसंगीत जयकिशन तयार करत.शंकरजी गंभीर स्वभावाचे त्यामुळे शैलेंद्र त्यांचे आवडते, जयकिशन रोमँटिक स्वभावाचे त्यामुळे हसरत त्यांचे आवडते असे असले तरी दोघांनी ही या दोघा गीतकारांबरोबर काम केले.

वयाने मोठे असल्याने ऑर्केस्ट्रा अँरेजमेंट शंकरजी ठरवत आणि सँबेस्टियन आणि दत्ताराम कडून गाण्याला साज चढवत. मनमिळावू स्वभावाचे जयकिशन इतर निर्मात्यांशी संपर्क साधत किंवा व्यवहार तेच ठरवत असा गैरसमज आहे. तसे नव्हते अतिंम शब्द शंकरजींचा असे.

शंकरजी कडक स्वभावाचे, फटकळ, शीघ्रकोपी होते. पण त्यांचा राग लगेच शांत होत असे. यामुळे त्यांच्या विषयी गैरसमज होत असत. पण कामात ते अतिशय एकनिष्ठ होते. रेकॉर्डिंग च्या दिवशी बरोबर सकाळी सात वाजता त्यांची गाडी आत शिरायची. आत शिरल्यावर त्यांच्या हस्ते पुजा झाल्यावर ते नारळ फोडून रिहर्सल सुरु करत. नऊ वाजता गायक आल्यावर १२ वाजेपर्यंत रिहर्सल सुरू व्हायची. मग छोटी विश्रांती घेऊन दिड वाजता फायनल टेक सुरू होऊन अडीच पर्यंत रेकॉर्डिंग पुर्ण होत असे. उशिरा आलेल्या वादकाला त्या दिवशी संधी देत नसत.

एक वादक उशिरा आला.शंकरजी नी राग शांत झाल्यावर कारण विचारले तेव्हा समजले त्याच्याकडे घड्याळ विकत घेण्यासाठी पैसेच नव्हते. लगेच शंकरजींनी आपले मनगटी घड्याळ काढून त्याला दिले. सिनेक्षेत्रात शंकर जयकिशन चलनी नाणे होते. त्यांच्या नावावर सिनेमे विकले जात. नायकापेक्षा ही जास्त मानघन त्यांना मिळायचे. प्रत्येक गायकाची रेंज त्यांना अचूक ठाऊक होती. मुकेश च्या आवाजाच्या मर्यादा माहिती असल्याने चोरीचोरी मधली राजकपूर च्या तोंडची सगळी गाणी मन्ना डे कडून गाऊन घेतली. निर्माता मयप्पन बरोबर वाद झाला त्याला हा बंगाली पसंत नव्हता. रागात शंकरजी मन्ना डे आणि वादकांसकट रेकॉर्डिंग हॉल च्या बाहेर पडले. मयप्पन घाबरला कारण शंकर जयकिशन नी सिनेमा सोडला तर कोणीच संगीतकार जवळ करणार नाही याची खात्री त्या काळात होती. राजकपूर च्या मध्यस्थीने मन्ना डे च्या आवाजात गाणी रेकॉर्ड झाली आणि आजतागायत लोकप्रिय आहेत.

चोरीचोरीतल्या रसिक बलमा गाण्याला फिल्म फेअर मिळाले नाही म्हणून नाराज झालेल्या लतादिदींना चौपाटीवर नेऊन त्यांचे आवडते आईसक्रीम देऊन त्यांची समजूत शंकरजींनी काढली. इतके त्यांचे स्नेहपुर्ण संबंध त्या काळी होते.

अनाडी च्या तेरा जाना गाण्याच्या रेकॉर्डिंग ला हजर असलेल्या सी.रामचंद्र यांनी सोलो व्हायोलिन च्या ऐवजी लतादिदींचा आलाप वापरायची सूचना शंकरजींनी खिलाडू पणे मान्य केली. त्यामुळे या गाण्यातला आर्त परिणाम आपल्या काळजात घुसतो.

गंमत म्हणजे अनाडी च्या आधी काही काळ एकही सिनेमा शंकर जयकिशन कडे नव्हता. पण त्यांचे वादक त्यांना सोडून गेले नाही. रोज नियमित पणे रिहर्सल करून शेकडो चाली त्यांनी रचल्या आणि त्या जोरावर पुढचे एक तप त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केल्याचे शंकरजींनी मुलाखतीत सांगितले होते.

जयकिशन वर तर त्यांचे लहान भावासारखे प्रेम होते. पल्लवी मढीवाला बरोबर जयकिशन चा विवाह झाला. घरच्यानी विरोधामुळे तिचे कन्यादान करायला नकार दिल्याने शंकरजींनी स्वतः तिचे कन्यादान केले.

शंकरजींच्या आयुष्यात आली कुंदन काळे. एका प्रतिष्ठित सरदार घरातली. नव-या बरोबर फारकत घेतलेली. तिच्याबरोबर लिव इन रिलेशनशिप मधे शंकरजी राहू लागले. पण हा संसार त्यांना खूपच त्रास देऊन गेला. पण तिच्या संपर्कात आल्यावर शंकरजी मराठी शिकले. सोनोपंत दांडेकर यांच्याशी शंकरजींचा परिचय झाला. ते नियमितपणे वारीला जात. दरवर्षी दहा हजार रुपयांची देणगी देत. तसा बोर्ड आळंदीला लावला आहे. सोनोपंत गेल्यावर त्यांच्या अंत्ययात्रेत शंकरजी पुणे ते आळंदी पायी चालत सामिल झाले होते.

संगम च्या वेळी लतादिदीं बरोबर झालेल्या वादामुळे त्या शंकरजीं पासून दूरावल्या. या जोडीत फूट पाडायचे प्रयत्न याच सुमारास झाले. फिल्म फेअर नाईट नंतर जयकिशन नी आपआपसातला अलिखित करार मोडून ये मेरा प्रेमपत्र ची चाल आपली असल्याचे जाहीर केले. यामुळेच शंकरजी दुखावले. यातच शारदा त्यांच्या जीवनात आली. वास्तविक शारदा राजकपूर यांचे फाईंड. घरच्या परिस्थिती ने तंगलेले शंकरजी शारदाकडे ओढले गेले. तिलाच ते प्राधान्य देऊ लागले. यातूनच त्यांच्यात आणि जयकिशन मधे दुरावा आला.

१९६६ ला शैलेंद्र गेला. शंकरजींचा मित्र गेला. शंकरजी बरोबरच्या वादामुळे लतादिदींनी मेरा नाम जोकर साठी गायला नकार दिला. ढिसाळ संकलनामुळे जोकर दणदणीत आपटला. कल आज और कल अर्धवट असताना सिरोसिस ने जयकिशन गेला. कल आज और कल चे पार्श्वसंगीत करताना रणधीर बरोबर त्यांचा वाद झाला. रणधीर ने तिखटमिठ लावून राजकपूर कडे तक्रार केली. राजकपूर नी शंकरजींना दूर केले. पंचवीस वर्षाची दोस्ती क्षणात संपली.

जयकिशन गेल्यावर त्यांचे अनेक सिनेमे अर्धवट राहिले. त्यातला एक होता लाल पत्थर. निर्माता फकीरचंद ने शंकरजींचे दहा हजार रुपये बुडवले होते. त्यामुळे शंकरजींकडे जायची त्याला हिम्मत नव्हती. नाईलाजाने तो शंकरजींकडे गेला. शंकरजींनी दुपारी सिटींग रूमवर बोलावलं. शिव्या घालून तयार केलेली चाल ऐकवली. चाल सरस होती. गपचुप दहा हजार रुपये देऊन आपला सिनेमा पुर्ण करायची विनंती फकीरचंद नी केली. या चालीवरचे सरस गाणे होते गीत गाता हू मै ….

शंकर जयकिशन चे चहाते अभ्यासक प्रो.कृष्णकुमार गावंड यांना शंकरजींचा सहवास लाभला होता. त्यांनी सांगितलेली आठवण अँन इव्हिनिंग इन पँरिस च्या वेळची. शंकरजींच्या आईचे निधन झाले. अंत्यविधी आटोपून ते मुंबईत आले. वादकांना संघ्याकाळी म्युझिक रुमवर बोलावले. निर्माते शक्ति सामंत पण आले. दु:खद मनस्थितीत शंकरजी काय सांगणार कोणालाच माहीत नव्हते. सगळे जमल्यावर शंकरजी नी रुमवर अंधार केला. पियानो वर मेणबत्ती लावली आणि रात के हमसफर गाण्याची चाल ऐकवली. सगळे चकीत झाले. दु:खी मनस्थितीत असतानाही निर्मात्याचे नुकसान होऊ नये या भावनेतून शंकरजी नी लगेच काम सुरू केले होते.

आम्रपाली च्या वेळी वैजयंती माला नडली. नील गगन की छाओमे गाण्यावर नाचता येणे अवघड आहे असे तिने सांगितले. कथ्थक शिकलेल्या शंकरजींनी पायात चाळ बांधून त्या चालीवर नाचून दाखवले. मुकाट्याने वैजयंती माला ने नाच केला.

साथीदार गेल्यावर संगीताची धुरा तितक्याच ताकदीने संभाळणारे शंकरजी हे एकमेव उदाहरण. शंकर जयकिशन याच नावाने ४० सिनेमे जयकिशन गेल्यावर त्यानी कंपोज केले.

महमंद रफी यांच्या मध्यस्थीने लतादिदी आणि शंकरजी यांच्यातला दुरावा संपला. सन्यासी ची शंकरजींनी कंपोज केलेली गाणी गाऊन त्या वर्षीचे फिल्मफेअर लतादिदींना मिळाले. पण त्या सुमारास फिल्म संगीतात घाणेरडे राजकारण शिरले. शंकरजी ना वादकाचा ताफा कमी करायला लावला. निर्मात्यांची हाजी हाजी करणे त्यांच्या रक्तात नव्हते. त्यांच्या नावावर सिनेमे विकले जायचे दिवस संपले. नमकहराम चे संगीत आधी शंकरजी देणार होते पण वितरक मिळणे कठीण आहे हे समजल्यावर त्यांनी स्वतः आर.डी.चे नाव सुचवले. शोलेची स्क्रीन. मधे पानभर जाहिरात आली होती. त्यात संगीत शंकर जयकिशन असा उल्लेख आहे. नंतर तो सिनेमा आर.डी.कडे.गेला. सत्यम शिवम सुंदरम च्या वेळी सगळा अपमान गिळून आर.के.स्टुडिओत गेले पण राजकपूर नी त्यांची दखल सुध्दा घेतली नाही.

२६ एप्रिल १९८७ ला शंकरजी गेले. ते कसे गेले हे मात्र गूढ आहे. त्या दिवशी फेमस मधे रेकॉर्डिंग ठरले होते. वादक आले होते. शारदा पण आली होती. नेहमीच सात वाजता येणारे शंकरजी १२ वाजेपर्यंत का आले नाहीत म्हणून त्यांचे अनेक वर्षाचे सहकारी चंद्रकांत भोसले घरी गेले तेव्हा समजले, शंकरजी गेले. इतकेच नाही तर घाईघाईने चंदनवाडीत त्यांचा अंत्यसंस्कार उरकला. घरी पुजेला येणा-या ब्राह्मणाला पण लगेचच काढून टाकले.

शंकर जयकिशन हे शापित यक्ष होते. भूतलावरचे काम संपले म्हणून नियतीने क्रूरपणे यांना वर बोलावले असावे. या शापित यक्षाला माझी आदरांजली.

विवेक पुणतांबेकर

– लेखन : विवेक पुणतांबेकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. साध्या सरळ भाषेत तरीही ह्रदयाला भिडणारा शंकरजींचे महत्व आणि महात्म्यही अधोरेखित करणारा परिचय. सिनेजगतातील संगीताच्या बाबतीत सुवर्णकाळाचा मागोवा घेणारा प्रशंसनीय लेख. 👌🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?
शितल अहेर on पुस्तक म्हणाले…
Mrs Vandana Suhas Inamdar on पुस्तक म्हणाले…
सौ. सुनीता फडणीस on पुस्तक म्हणाले…
श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…