जुनी पिढी : नवी पिढी !
वर्तमानपत्रांत 1960 नंतर सर्व जागांवर पत्रकारितेची पदवी घेतलेली तरुण मंडळी आली॰ या पंचविशी / तिशीतील तरुण मंडळींना कित्येक जुन्या गोष्टी, जुनी नामवंत माणसे माहित नसतात॰ याचा मला आलेला अनुभव सांगावासा वाटतो॰
2004 मध्ये अभिनेता – गायक कुंदनलाल सैगल याच्या जन्माला 100 वर्षे झाली॰ म्हणून ( आता दिवंगत ) गायक विनायक जोशी – ज्याने या सैगलच्या शंभराव्या वर्षात त्याच्या चित्रपट गाण्यांचे कार्यक्रम केले – याने सैगलवर जुने लेख जमवून आणि काही नव्याने लेख लिहून घेऊन ‘ बाबुल मोरा ‘ नावाचे पुस्तक प्रकाशित केले॰ यात माझाही एक सैगलच्या एकदम वेगळ्या आठवणी सांगणारा लेख आहे॰
प्रकाशन समारंभात माझ्या लेखाबद्दल मुख्य वक्ते नामवंत लेखक अच्युत गोडबोले आणि प्रास्ताविक करणारे माझ्या बद्दल कौतुकाने बोलले॰ नंतर चहा पिताना ‘ टाईम्स ऑफ इंडिया ‘ चा तरुण वार्ताहर मला भेटला; आणि म्हणाला की तुमच्यावर ‘’ठाणे सप्लीमेंट ‘ मध्ये मला चित्रपट सृष्टीच्या संदर्भात स्फुट लिहावयाचे आहे, आपण केव्हा भेटू या॰
वेळ ठरवली आणि तो मला भेटावयास आला॰
हा जेमतेम 28 – 29 वर्षांचा तरुण दिसत होता॰ गप्पा मारायला सुरवात झाली॰ मी चित्रपट सृष्टीच्या संदर्भात व्ही॰ शांताराम, मेहबूब, देवकी बोस, बी॰ एन॰ सरकार, गुरुदत्त अशांचे उल्लेख करून बोलावयास लागलो॰ तर हा वार्ताहर मला विचारतो की ही मंडळी कोण होती ?
मी त्याला विचारलं की तू चित्रपट विषया संबंधी मुलाखत घ्यायला आला आहेस; आणि तुला ही नामवंत मंडळी ठाऊक नाहीत ? ‘ नाही; मला काही ठाऊक नाही. मी तुमच्याकडून मिळालेली माहिती लिहून काढून छापायला देणार आहे ‘ तो निर्विकारपणे म्हणाला.
मला असा संताप आला. तरीही मी त्याला शांतपणे म्हटले की आपण चहा घ्या आणि निघा॰ आपण माझी मुलाखत न घेणे बरे; आणि ती न छापणे बरे॰
अगदी असाच अनुभव, गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ चित्रपटांवर लेखन करणारे माझे पुण्याचे मित्र, शशिकांत किणीकर यांनाही आला॰
यांनी मधुबाला, जयराज, चंद्रकांत गोखले अशा अनेक लोकांची चरित्रे लिहिली आहेत॰ त्याच सुमारास यांनी अभिनेत्री नर्गिसचे इंग्लिश भाषेत चरित्र लिहिले होते॰ त्याचे प्रकाशन मुंबईत ‘ फिल्म फेअर ‘ आणि ‘ स्क्रीन ‘ चे माजी संपादक बी॰ के॰ करंजिया यांच्या हस्ते झाले॰
या समारंभांनातर ‘ Indian Express ‘ ची चित्रपट वार्ताहर मुलगी यांना भेटली आणि एक मुलाखत देण्याची विनंती केली॰ त्यांनाही तोच अनुभव आला॰ तिला नर्गिस आणि त्या काळाबद्दल काहीही माहिती नव्हते॰ गम्मत म्हणजे किणीकरांनीही तिची मुलाखत न देताच बोळवण केली !
येथे अभिनेता दिलीपकुमारनं सांगितलेली आठवण आठवते॰
एकदा एक तरुण वार्ताहर त्याची मुलाखत घ्यायला गेला आणि त्यानं पहिलाच प्रश्न विचारला की आपला पहिला चित्रपट कोणता ? दिलीपकुमारनं त्याला सहज म्हटलं की आपली काय माहिती आहे ? कोणता चित्रपट माझा पहिला चित्रपट आहे ? त्याने सरळ सांगितले की मला काहीही ठाऊक नाही॰ मी आपल्याला प्रश्न विचारूनच माहिती जमा करणार आहे !संतापलेल्या दिलीपकुमारनं, त्याचा राग गिळत, त्याला त्या क्षणीच बाहेरचा रस्ता दाखवला !
2002 च्या मार्चमध्ये मी जेव्हा निर्माते – दिग्दर्शक गुलजार यांची ‘ आपलं महानगर ‘ साठी मुलाखत घेतली; तेव्हा प्रथम गुलजारजींनी माझी 5 – 6 प्रश्न विचारून कितपत तयारी आहे याची खात्री करून घेतली होती; याची आठवण येते॰
मोठी माणसं मोठी का असतात याचे अनेक छोटे छोटे प्रसंग माझ्याकडे आहेत॰ त्यापैकी गुलजार यांच्या संदर्भातला प्रसंग सांगावासा वाटतो॰
मी त्यांची 2 मार्च 2002 रोजी मुलाखत घेतली; ती 10 मार्च 2002 च्या अंकात छापून आली॰ तो अंक आणि काही भागाचे इंग्लिश भाषांतर मी त्यांना पाठवून दिले॰ त्या नंतर माझा आणि त्यांचा काही संपर्क झाला नाही॰ नंतर नऊ – साडे नऊ महिन्यांनी 22 डिसेंबर 2002 रोजी गुलजारजींची ‘ चतुरंग ‘ ने डोंबिवलीत मुलाखत ठेवली॰
त्या मुलाखतीला मी काही गेलो नव्हतो॰ याची दोन कारणे – एक म्हणजे तो दिवस माझा कामाचा दिवस होता, मला सुटी नव्हती; आणि दुसरे म्हणजे ‘ चतुरंग ‘ च्या शिस्तीत, आलेल्या पाहुण्यांशी समारंभाच्या ठिकाणी अनाहूतपणे कोणी संपर्क साधणे बसत नव्हते; हे होते॰ त्यामुळे मी समारंभाच्या ठिकाणी फिरकलोच नाही॰
‘ चतुरंग ‘ वेळेच्या बाबतीत काटेकोर; आणि गुलजारजी अति – काटेकोर ! मुलाखत सायंकाळी साडे सहा वाजता होती; पण ते आणि त्यांचा मुलाखतकार अरुण शेवते ( हा ‘ ऋतुरंग ‘ नावाचा अप्रतिम दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित करतो॰ याने ‘ नापास मुलांची गोष्ट ‘ नावाचे लक्षणीय पुस्तक संपादित केले आहे॰ ) साडे चारलाच येऊन दाखल झाले॰ ‘ चतुरंग ‘ कडे आलेल्या पाहुण्यांशी बोलून त्यांना busy ठेवेल असा माणूस नव्हता॰ त्यांना जवळ जवळ दोन तास काय करायचे तेच कळे ना ! मग गुलजारना एकदम आठवण झाली की मी आणि रविप्रकाश कुलकर्णी येथेच राहतो॰ त्यांनी अरुणला आमच्याशी संपर्क साधून बोलावून घेण्यास सुचवले॰ हा शेवते आमचा मित्र ! पण त्याच्याकडे आमचे फोन नंबर्स नव्हते॰ तो ओशाळला !
या नंतर तीन दिवसांनी 25 डिसेंबरला, ‘ कीर्ती महाविद्यालया ‘ त ‘ ग्रंथाली ‘ च्या ‘ वाचक दिनी ‘ मला आणि रविप्रकाशला हा अरुण शेवते योगायोगाने एकत्रच भेटला; त्याने आमची क्षमा मागून हा प्रसंग सांगितला, आणि आमचे फोन नंबर्स त्याने लिहून घेतले !
जाता जाता ….
‘ फिल्म फेअर ‘ आणि ‘ स्क्रीन ‘ चे संपादक बी. के. करंजिया यांचा वर उल्लेख आला आहे. हे स्वातंत्र्यपूर्व काळातील मुलकी सेवेची I.C.S. ( ‘ Indian Civil Service ‘ ) ही सनदी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या शेवटच्या तुकडीतील विद्यार्थी. (सनदी सेवेतील प्रख्यात महाराष्ट्रीय मो. ग. पिंपुटकर हे देखील याच तुकडीतील यशस्वी विद्यार्थी ! ). मात्र, करंजिया सनदी सेवेत न शिरता फर्ड्या इंग्लिशच्या जोरावर पत्रकारितेत शिरले; आणि लवकरच नामवंत संपादक म्हणून ओळखू जाऊ लागले. या बी. के. करंजिया यांनी शबाना आझमी आणि नसिरुद्दीन शहा अभिनित ‘ पेस्तनजी ‘ वेगळ्या धर्तीच्या चित्रपटाची कथा लिहिली आहे.
यांचे दुसरे भाऊ आर. के. ( रूसी ) करंजिया हे देखील फर्डे इंग्लिश लिहिणारे. त्यांनी ‘ ब्लिट्झ ‘ या सनसनाटी साप्ताहिकाची, 1950च्या दशकात, स्थापना करून ते जवळ जवळ तीन दशके एकहाती चालवलं 1930च्या दशकात हे दोघे भाऊ एकच वेळी मुंबईतील ‘ विल्सन महाविद्यालया ‘ त शिकत होते. दोघेही उत्कृष्ट वक्ते असल्यामुळे कित्येक वक्तृत्व स्पर्धांत हेच दोघे भाऊ अंतिम स्पर्धेत एकमेकांविरुद्ध असत !
ठाण्याचे सध्याचे राजकारणी आनंद परांजपे यांचे आजोबा आणि भूतपूर्व खासदार प्रकाश परांजपे यांचे वडील वि. रा. परांजपे हे माझे ठाण्यातील ‘ मो. ह. विद्यालया ‘ तील शिक्षक. ते ही याच काळात ‘ विल्सन महाविद्यालया ‘ त शिकत होते. ते आम्हाला या दोन्ही बंधुंविषयी सांगत !
या दोन्ही करंजियांचे वडील खुस्रो करंजिया हे भारतातील पहिले सिव्हील सर्जन. लेखिका ( दिवंगत ) ज्योती सोमण यांनी त्यांच्या आत्मकथनात्मक ‘ क्वेट्टा टेरेस ‘ या पुस्तकात करंजिया कुटुंबांबद्दल सविस्तर लिहिलं आहे.

— लेखन : प्रकाश चान्दे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800