योग दिवस हा माझ्या आयुष्यात योगायोगानेच येतो. एखादा चांगला मित्र मोबाईलवर आठवण करून देतो कि आज योग दिवस आहे. पण त्याचा मेसेज येईपर्यंत आमचा पोटोबा झालेला असतो आणि आसनं अनशापोटी करायची असतात नं ?
निदान दोन तास तरी पोट रिकामे हवे. पण आम्हाला आमच्या पोटाची खूप काळजी, त्यामुळे आम्ही ते कधीच रिकामे ठेवत नाही. त्यामुळे योगा करण्याचा योग जुळतच नाही. मग ही म्हणते, “अहो खाली जाऊन फिरून तरी या”, पण तोपर्यंत आमचं स्नान आटोपलेले असत. त्यामुळे कशाला ती घामाची चिकचिक म्हणून अस्मादिकांच परत राहूनच जातं.
पण याचा अर्थ असा नाही कि योगा आमच्या विरोधी पक्षात आहे. आम्ही पण लोकांना योगा करण्यास प्रोत्साहन देतो, योगा न केल्याचे परिणाम काय होतात हे आमच्या तुंदिलतनूकडे पाहून सउदाहरण स्पष्ट करतो. योगातच जग आहे हे तरुण पिढीला समजावून सांगतो. आमच्यासारखे लेटमार्क मिळू नये म्हणून कळकळीने लोकांना सकाळी लवकर उठण्याचे फायदे सांगतो. वडापाव खात खात का होईना, लोकांना तेलकट/तूपकट खाऊ नये याचे धडे देतो. समाजकार्यात आम्ही कुठेच मागे नाही.
शरीरापेक्षा मनाची ताकद मोठी असते. हे आमचे ब्रीदवाक्य. पण त्या मनाने दगा दिलाच आणि शरीराची साथ सोडलीच.
१३ दिवसांनंतर !
एक मित्र : किती वेळा सांगितलं होतं वडापाव खाऊ नको म्हणून ! पण ऐकेल तर शप्पथ !
दुसरा मित्र : फेविकाँलच्या ऍड सारखा खुर्चीला चिटकून बसायचा आणि चहा ढोसायचा नुसता. संपल सगळं !
शेजारी : माणूस बरा होता हो !
दुसरा शेजारी : कधीही चालायचे नाही. सदानकदा Activa वर !
ती नसती तर जरा active तरी राहिले असते. गेले बिचारे !
योग-पुराणवरती बसून ऐकतो आहे मित्रांच बोलणं !!अजून काय पुरावा देऊ ??
– लेखन : वर्षा फाटक.
– संपादन: देवेंद्र भुजबळ. 9869484800.
योगपुराण मधे वर्षा फाटक यांनी अतिशय खुसखुशीत शब्दात टीपणी केली आहे. ती आम्हा आळशी लोकांना अगदीच लागू पडते.
काही ना काही निमित्ताने आम्ही व्यायाम योगासने टाळत असतो.
मग साठीनंतर एकदमच तोंडाला चिकटपट्टी बसते
तेव्हा जागे होतो.