Sunday, July 13, 2025
Homeलेखवृध्दाश्रम : काळाची गरज

वृध्दाश्रम : काळाची गरज

“आईवडिलांची काळजी घ्या, नाही तर…” हा लेख काल, ८ जुलै २०२५ रोजी आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध झाला. तो लेख वाचून काही व्यक्तींनी स्वानुभव कथन करण्यासाठी मोबाईल वर संपर्क साधून आपल्या भावना, अनुभव सांगितले. तर लेखिका स्वाती दामले यांनी त्या राष्ट्रसेविका समितीतर्फे सेवादिनाला एका वृध्दाश्रमात गेल्या असताना तेथील स्त्री, पुरुषांशी मारलेल्या गप्पांवर आधारित लेख पाठवला आहे. आपल्याही अनुभवांचे, विचारांचे स्वागत आहे.
— संपादक

आजकाल वृध्दाश्रमांची संख्या वाढतच चालली आहे. जवळजवळ प्रत्येक तालुक्यात जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे वृध्दाश्रमांची स्थापना होतांना दिसते. या मागचे कारण काय ? हे आज कुणाला सांगण्याची गरज आहे असे मला तरी वाटत नाही. कारण आपल्या आजुबाजूची परिस्थिती, कुटुंबांमधले वादविवाद, एकमेकांशी होणारे संवाद यातून कळते की प्रत्येक घरात अगदी छोट्या नातवंडांसहित सारेच स्वतःच्या मोबाईलच्या राज्यात व्यस्त असतात. आपल्या घरात अजून कोणीतरी राहतयं, त्यांच्याशी संवाद साधायला हवा ही गोष्टच त्या व्यस्त लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे घरातील ज्येष्ठ नागरिक गपगुमान स्वतःशीच गप्पा मारीत राहतात. त्यात एकच व्यक्ती असेल तर तिची मनःस्थिती आणखीनच वाईट !

आजकाल जवळ जवळ प्रत्येक घरातले तरुण नोकरी व्यवसायानिमित्त परदेशी किंवा अन्य शहरात रहात आहेत. त्यामुळे घरातील त्यांचे जवळचे सदस्य म्हणजे बायको आणि मुले. आईबाबांना फक्त कसे आहात असं विचारलं की झालं. मग या कंटाळवाण्या जीवनातून सुटका मिळण्याचा एकच सोपा आणि सुंदर मार्ग म्हणजे वृध्दाश्रम !

खरंच ! मी स्वतः वृध्दाश्रमात जाऊन दोन दिवस राहून आले आहे. तेथील पुरुष, महिलांशी मोकळेपणी संवादही साधला आहे. कशा आहांत ? असं विचारायची खोटी की लगेच सगळ्याजणी आपण किती खूष आहोत हे सांगायला लागल्या. प्रत्येकीचे मत एकच होतं की, घरापेक्षा ना हे घर छान आहे कारण आपल्याच वयाची, आपल्याच विचारांची माणसं इथे आहेत त्यामुळे वादविवाद, भांडणतंट्यांना कांही वावच नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातल्यांना कुणी ओळखत नाही. त्यामुळे आपल्या मनातले गरळ इथे बिनधास्त ओकता येते आणि मन मोकळे करता येते. इथे राहायला आल्यापासून खेळ, गाणी, गोष्टी, चर्चा, भेंड्या यांत मस्त वेळ जातो. वाचनालयात पुस्तके, वर्तमानपत्रे कधीही वाचायला मिळतात. जेवणखाण्याची तर काय चंगळच आहे. रविवारी गोड पदार्थ, रात्री दूध ! आपल्या खोलीत जा आणि कधीपण कितीही आराम करा. शिवाय सकाळ संध्याकाळ एकमेकांना सावरत मजेत हिरवळीवर फेरफटका आणि झोपाळ्यांवर झुलायला पण मजा ! सगळ्या पुरुषांची पण अशीच मजा. इथे कॅरम, बुध्दिबळ, पत्ते खेळायचे. आरामात बसून टी.व्हीपण पाहता येतो.

इथे काही जोडपी फार वयस्कर नव्हती तरी आनंदात रहात होती. त्यातल्या एकाने सांगितलेलं कारण वेगळंच होतं. म्हणाले, मुलगी सासरी, मुलगा, सून परदेशी. मग रोजचा सकाळचा स्वयंपाक, त्यातून उरलेल्याबरोबर रात्री नविन पदार्थ, त्यात उरलेलं सकाळी खायचं. म्हणजे सारखं शिळपाकं. परत रोज भाजी आणा, बिलं भरा, कपडे धुवा, या सगळ्याचा इतका कंटाळा आला आणि मग ठरवलं इथे यायचं. डोक्याला कुठलाच ताप नाही. सगळं आयतं हातात मिळतं. अगदी आरामात जगतो आहोत आणि हो, एक महत्वाचं कामही करतो आम्ही दोघं. जे कोणी दुःखात त्रासलेले दिसतात त्यांच्याशी बोलून त्यांना मन मोकळं करायला सांगतो. काय चाललय मनात ते एकदा बोलून टाका म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आणि आम्ही कांहीही कुणालाही सांगणार नाही बरं.

आता एवढं सगळ ऐकल्यावर, परिस्थिती पाहून लक्षात येते आहे ना की वृध्दाश्रमांची आजच्या काळात किती गरज आहे !

स्वाती दामले

— लेखन : स्वाती दामले. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments