लहान मुलांना वाढवतांना पालकांना आज काहीतरी कमी पडत आहे आणि ते म्हणजे मुलांशी सुसंवाद राखणं. या सुसंवादाचं महत्व सांगताहेत मुख्याध्यापक तथा बाल मानसशास्त्रात पीएचडी केलेल्या डॉ. अंजुषा पाटील….
तांत्रिक युगात मुलांच्या हातात बहुआयामी असा मोबाईल आलेला आहे. शिक्षण, पाककृती, अभ्यास, खेळ, संगीत, सगळ्या क्षेत्रातील ज्ञान या एका यंत्रावर उपलब्ध आहे. त्यामुळे मुलं स्वमग्न होत आहेत. आपल्याच विश्वात रममाण झालेली दिसतात. काही ठिकाणी अपवाद आढळतो.
कधी कधी मुलं आपल्याशी मनमोकळेपणाने बोलत नाहीत, किंवा आपण काही सांगायला गेलो तर त्यातून वादच निर्माण व्हायचा; आणि शेवटी कोणाचा तरी एकाचा हट्ट चालायचा. आता एकच मुल असते. किंवा दोनच मुलं घरात असतात. तरीही संवाद होत नाही. काही वेळा पालक मुलांना ओरडतात प्रसंगी शिक्षाही करतात. शिक्षा केल्यानंतर पालकांनाही वाईट वाटते. मुलांनी हट्ट केला कि आई सुद्धा ओरडते वा फटकावते. नंतर ती जवळ घेऊन कुरवाळते देखील.
आई वडील मुलांवर चांगलेच संस्कार करतात; मुलांनी समाजात आदर्श वर्तन करावं अशी त्यांची इच्छा असते. काही ठिकाणी पालक व मुले यांचं अजिबात पटत नाही. पिढीचं अंतर तर राहणारच. त्यासाठी आपापसात सुसंवाद साधणे गरजेचं आहे. आईवडीलही काही देव नाहीत निमूटपणे सर्व सहन करायला काही ठिकाणी मुलांवर रागावणे व नकार देणे हि त्यांची गरज असते. परंतु तो नकारही पूर्ण विचारांती व निश्चित स्वरूपाचा असून त्याची कारणे मुलांना लहानपणातच कृतीसह समजावून देणे समजदारपणाचे आहे.
देवाजवळ दिवा लावल्यानंतर नमस्कार करणे, श्लोक, मंत्र म्हणणे या गोष्टींचे कृतीसह आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला नीतिमूल्ये सांगितली आहेत. तीच मूल्ये आजची मुले त्यांच्या विचारांच्या, बुद्धीच्या कसोटीवर घासून घेऊन मगच ती मान्य करतील.
प्रत्येक माणसात एक ‘पेरेंट’ व एक ‘अडल्ट’ आणि एक ‘चाईल्ड’ लपलेलं असते. आज आपल्याला मुलांबरोबर विचार करून बोलावं लागते. काळाबरोबर सर्व भूमिकांमध्ये बदल झाला आहे. पालकांनीही आत्मपरिक्षण करून नवीन पद्धतीने मुलांशी संवाद साधायला हवा.
आजच्या तंत्रयुगात नवीन पिढीला नवीन शिदोरी द्यायची आहे. ती म्हणजे सुरक्षितपणाची भावना, आत्मविश्वास, सृजनशीलता वेगरे. जीवनाला सामोरे जाऊन ताठ उभे राहण्यासाठी पालकांनी नाविन्याचा अवलंब करून मैत्रभाव जोडला पाहिजे.
आजची मुलं स्वावलंबी, स्वतंत्र व आत्मनिर्भर राण्याचा प्रयत्न करणारी आहेत. त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली आहे. आपल्या बोलण्यातून, वागण्यातून मुलांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षी संस्कार होतच असतात. मुलांच्या विकासासाठी, भल्यासाठी जास्तीत जास्त चांगले करण्याची सगळ्याच पालकांची ईच्छा असते. पण मुले व पालक यांच्यात मःनसंवाद घडत नाही. उलट वाढत्या मुलांच्यात व पालकांच्यात संवादयुद्धे धुमसत आसतात.
मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्याच्याशी सुसंवाद साधून मुलांना निर्भयता, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, सृजनशीलता हे संस्कार घडतील तेव्हाच निरामय पिढी उदयास येईल.
– लेखन : डॉ अंजुषा पाटील.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.
Dr.अंजुषा पाटील यांचा लेख आवडला.मुलांशी सुसंवाद साधणे अतिशय महत्वाचं आहे.