नाशिक येथील साहित्य संमेलनात नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी “बी” यांची दखल घेणे अत्यन्त समयोचित ठरेल. कारण हे त्यांचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष तसेच अमृत महोत्सवी पुण्यतिथी वर्ष आहे.
कवी “बी” हे लक्ष्मीबाई उर्फ अन्नपूर्णाबाई आणी मुरलीधर बाजीराव गुप्ते यांचे ज्येष्ठ अपत्य. त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी झाला. त्यांचे घराणे रायगड जिल्ह्यातील पेण जवळ असलेले “वाशी” आहे.
कवी बी यांना चार भाऊ आणी तीन बहिणी होत्या. कवी बी यांचा पहिला विवाह १८८७ मध्ये वणी येथील मार्तंडराव प्रधान यांच्या कन्येशी झाला. परंतु अल्पावधीत त्यांचे निधन झाल्यामुळे एक वर्षाच्या आत दुसरा विवाह अमरावती येथील गोविंद रावजी सुळे यांची कन्या कु. सुंदर यांच्याशी झाला. विवाहानंतर सुंदर सुळे या, लक्ष्मी बाई गुप्ते झाल्या. उभयतांस पाच मुली व एक मुलगा झाला. सन १८८९ मध्ये कवी ‘बी’ यांच्या वडिलांचे व पाठोपाठ दोन महिन्यांनी आईचे निधन झाले. नाशिक येथील गजानन महाराज हे कवी “बी” यांचे सर्वात लहान बंधू.
ज्ञानेश्वरीची परंपरा अध्यात्म वादाने कायम राखणारे कवी म्हणून त्यांची खास ओळख आहे. जुन्या मराठी संतकवी यांच्या अभंग वाडःमयाचा आणि जातिवंत शाहिरांच्या लावण्या – पोवाडे यांचा मार्मिक अभ्यास करून कवी “बी” यांनी आपली शब्द संपदा कमावली आहे.
कवी ‘बी’ यांची पहिली कविता “प्रणय पत्रिका” १८९१ साली “करमणूक” मध्ये प्रसिध्द झाली. त्यांनी एकूण ४९ कविता लिहिल्या. १९३४ साली त्यांचा पहिला कविता संग्रह “फुलांची ओंजळ” प्रकाशित झाला. त्याला आचार्य अत्रे यांची प्रस्तावना लाभली. अकरा कवितांचा समावेश असलेला “पिकले पान” हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. मराठी काव्यात ‘बी’ यांचे स्थान त्यांच्या अवघ्या दोनच कवितांनी अढळ केले आहे. त्यां कविता म्हणजे “कमला” आणि “चाफा बोलेना”. या दोन कवितांनी रसिकांना वेड लावले आणि कवी “बी” यांना प्रसिध्दीच्या शिखरावर बसवले.
कवी “बी” हे उत्क्रांतीवादी होते. समाजविघातक रूढींचा आणि संस्थाचा नायनाट होऊन जनता सामर्थ्यवान व्हायला पाहिजे असे त्यांना मनापासून वाटत होते. ३०.८.१९४७ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी हा प्रतिभावंत कवी काळाच्या आड गेला. त्यांचे निधन होऊन ७४ वर्ष पूर्ण झाली आहेत तरी, त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही.
१ जून २०२२ रोजी कवी बी यांची १५० वी जयंती आहे. त्यामुळे १ जून २०२१ ते १ जून २०२२ हे कवी ‘बी’ यांचे ‘शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष’ आहे. तसेच ३० ऑगस्ट २०२२ रोजी कवी बी यांची ७५ वी पुण्यतिथी आहे. त्यामुळे ३० ऑगस्ट २०२१ ते ३० ऑगस्ट २०२२ हे त्यांचे “अमृत महोत्सवी पुण्यतिथी” वर्ष आहे.
नाशिक येथे आयोजित केलेल्या अ. भा. साहित्य संमेलनात एखाद्या प्रवेशद्वाराला, व्यासपीठाला अथवा
हॉलला कवी “बी” यांचे नांव देऊन त्यांना आदरांजली व्हावी ही अपेक्षा.

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
कविवर्य बी यांच्याबद्दल वाचून छान वाटले. त्यांच्या नावाचे प्रवेशद्वार तर असावेच पण कविता वाचन करणाऱ्यांसाठी बी व्यासपीठ असावे.
भगवान बुद्ध पासून, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत गाडगेबाबा पर्यंत सर्व संत महात्मे सांगून गेले की मानव श्रेष्ठ आहे. मानव धर्म सर्वश्रेष्ठ आहे, मानव कल्याण हेच ईश्वर कल्याण आहे. परंतु माणूस मात्र कर्मकांडात आणि आघोरी प्रथांमध्ये अडकला. मानव मात्र जाती, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत शिक्षित, अशिक्षित अशा भेदाभावा मध्ये अडकला आणि मानवच मानवाचे पतन करू लागला आहे. हे भारतीय मानव समाजाचे सर्वात मोठं दुर्दैव आहे….
कवि…बी यांना मानाचा मुजरा