Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यआठवणींचा कलश

आठवणींचा कलश

कधीकधी आतून आपण ओथंबून येतो. गहिवर दाटून येतो.नकळत दुपारचे शांत ऊन हातावर झेलताना खूप साऱ्या आठवणी दाटून येतात.काही गोड, काही कडू, काही आंबट, तुरट, खारट तर काही मधुर फुलपाखरं जशी फुलावर रुंजी घालतात. तश्याच ह्या आठवणी आपल्या भोवती भिरभिरतात.
बालपणापासून ते तारुण्य आणि तारुण्य ते प्रौढावस्था असा हा आठवणीचा प्रवास सुरू असतो.

अलगद पावसाचा थेंब झेलावा, त्याचा गारवा मनात शिरावा तश्या आठवणी मनाला बिलगून येतात आणि मनाचं रीतेपण भरून येते.मन मोहरतं.

लहानपणी चिमणीच्या दाताने तोडलेले चॉकलेट अजुनही आठवतं. ती गोड आठवण मोठ अजुनही रुंजी घालते.
कट्टी दोस्ती मधील गोड़वा किती सुखद असतो ! दोन निरागस मनाचा मेळ आयुष्यभर सोबत असतो. आपण खरच ते बाळपणीचे मित्र विसरु शकतो का ? सांगा ?

शाळा हे तर आठवणी चे मोठे दालन आहे. तिथलें गुरुजी किंवा बाई, मित्र, मधली सुट्टी, खाल्लेला डबा, तो अभ्यास आणि गृहपाठ न केल्यास मिळालेला धम्मक लाडू. पण त्यातही जीव होता.प्रेम होते. म्हणून आजही शाळेतल्या बाई आपल्याला आठवतात. ती न विसरता येणारी आठवण न्हवे साठवण आहे.

वय वाढत असतं. प्राथमिक शाळेतल्या आठवणीना बिलगुन माध्यमिक शाळा येते. तिथल्या मॅडम, सर वाढ़त्या अभ्यासासोबत काही कोमल अंकुर मनात घेऊन येतो. मन या फुला वरुन त्या फुला कड़े धावते.
दोन वेण्याच्या रिबिनी सूटत जातात आणि मन सईसुटयो करीत सुटते.

रिबिनीची आठवण आपले टोक मनाच्या काठावर नकळत विसावते. हलकेच सुटुन ही जाते. लाल रिबिनीची रेघ घेते अंतराचा ठाव.
किती कापले अंतर
परी मन घेते धाव.

अश्या गोड आणि निष्पाप आठवणीत काही कडू कारल्यागत आठवणी ही असतात.
किशोर वयात काही टारगट मुलांनी दिलेला त्रास. कधी उमलत्या कळीला भोगावा लागतो. कळी उमलण्या आधीच कोमेजुन जाते. कधी कधी आपल्या जवळच्या माणसाचा मृत्यू आपल्याला खोल जखम करून जातो. ही कटू आठवण चिरकाल मनाला भेदून जाते.

माझी वाडयातली आई, तिचं जाण ही नकळत्या वयात चटका लावणारी आठवण. मग एकेक जवळची माणसं जात गेली. हृदयाच्या कप्यात खोल जखमा होत गेल्या. आई, बाबा, लेक, आणिक किती तरी मित्र, नातलग..
एक नकळत अजूनही हलकीशी कळ मनात रुतून बसते.

सोबत गोड आठवणी येतात. मोहरल्या आंब्याचा सुगंध जसा दर्वळतो तश्याच या आठवणी. गोड गुलाबी.लग्न, मूलं, त्यांची शिक्षण, लग्न, होणारी नातवंडं आणि गोड गोड पापी अश्याच सुंदर आठवणी घेऊन आपण जगत असतो.

आठवणीचा गोल पिसारा असाच गरगरे देहभर भरतो. कलश मग मनाचा, आठवणी फिरती मनभर.
म्हणून माणसाने कायम हसत राहावे. एकमेकांना हात द्यावा.
आणि सुखद आठवणीने मनाचा कलश भरता ठेवावा.

अनुपमा मुंजे

— लेखन : अनुपमा मुंजे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८