सौ. अमिता जोशी व श्रीमती कल्पना दिलीप मापूसकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला ‘आरंभ’ कला-साहित्य मंच मिरा-भाईंदर यांचा पहिला वहिला रंगारंग कार्यक्रम नुकताच ज्येष्ठ नागरिक विरंगुळा संस्था,
भाईंदर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाला सुरवात झाली. विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष श्री. शंकर जंगम यांनी सरस्वती पूजन केले. कार्यक्रमाची सुरवात अमिता जोशी यांच्या सुमधूर आवाजात सादर केलेल्या ओंकार या गणेश वंदनाने झाली. ध्वनी शाह हिचे पुष्पांजली व ऋतूल पारेख, मृदुला विश्वास, शिखा शाह यांचे त्रिश्लोकम हे बहारदार नृत्य पाहून श्रोतृवर्ग अगदीच भारावून गेला.
लेखिका डॉ विजया वाड यांची ‘देवता’ कथा सौ. सरोज गाजरे यांनी आपल्या भारदस्त आवाजात सादर केली प्रेक्षकांच्या टाळ्या छान माहोल बनवून गेल्या.
भूपाल चव्हाण यांची ‘चूक होती का खरी’ ही गजल प्रेक्षकांची मने जिंकून गेली. स्त्रीच्या तारुण्यातील सौंदर्य दर्शवणारी अरविंद देशपांडे यांची ‘लावण्य’ कविता अप्रतिम होती. स्त्रीवर्गाच्या सौंदर्याची स्तुती करणारा पुरुष वर्ग तारुण्यात असतो तर आजच्या उतारवयात सुद्धा आहे. ‘तरीही म्हणता राव देखणं आहे तुमचं लावण्य’ हे ध्रुपद घेऊन श्रीमती कल्पना दिलीप मापूसकर यांनी आपली ‘संध्याछाया’ कविता सादर केली. प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद देऊन कविता तोलून धरली.
जगदीश अबगुल यांनी सादर केलेल्या ‘स्वर गंगेच्या काठावरती’…. गाण्याने जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. सौ. सरोज गाजरे यांनी चौकट ही स्त्रीवर लादण्यात आलेल्या बंधनावर आधारित कविता सादर केली. श्री. विलास कुलकर्णी यांनी आपली ‘आंटी’ ही फक्कड लावणी सादर केली. ‘सपनात सुदिक मला असं कुणी बोललं न्हाई, ह्यो ह्यो टकल्या मेला, मला आंटी बोलला बाई’ या धृपदाने वातावरण दणाणून सोडले. त्यालाच धरुन अमिता जोशींची ‘रेशमाच्या रेघांनी’ ही ठसकेदार लावणी झाली. वन्समोअरचा प्रेक्षकांकडून आवाज आला.

होडवेकर सर आपल्या दमदार आवाजात कविता बोलून गेले. आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा आपल्या कोकीळ कंठाने अमिता जोशी गाऊन गेल्या ‘कोकीळ कुहू…कुहू…बोले आणि पुन्हा एकदा वन्समोअर….
सांस्कृतिक कला मंचच्या समूहाने ‘माऊली….. माऊली…..माऊली…..माऊली…..’ हे सामुहिक नृत्य सादर केले. या नृत्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
विरंगुळा केंद्राने स्वखुशीने फुलांचा गुच्छ देवून प्रत्येकीचा सत्कार केला.
पसायदान आणि राष्ट्रगीताने आरंभची सांगता झाली.

सौ. अनिता जोशींच बहारदार सूत्रसंचालन कार्यक्रम बांधून ठेवून एक आगळ्यावेगळ्या उंचीवर घेऊन गेलं. प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवण्याची गती त्यांच्या निवेदनातून दिसून आली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800