वाढते तापमान लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना केलेले आवाहन, हे सर्व तापमान ग्रस्त भागातील लोकांनी आचरणात आणावे असेच आहे. या सूचनांचा अवलंब करून आपली, आपल्या परिवाराची काळजी घ्या.
— संपादक
राज्यातील अनेक भागात यावर्षी मार्च महिन्यापासूनच तापमान वाढले असल्याचे निदर्शनास येत आहे. ‘उष्णतेची लाट’ ही एक मूक आपत्ती आहे.
साधारणत: एखादया प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 3 डिग्री सेल्सियसने जास्त असेल किंवा सलग दोन दिवसांसाठी 45 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असेल तर त्याला ‘उष्णतेची लाट’ असे संबोधतात. उष्णतेच्या लाटेमुळे माणसांसोबतच पक्षी, प्राणी, वनस्पती यांची होणारी हानी मोठी आहे. साधारणपणे मार्च ते जून या मान्सून पूर्वकाळात या उष्णतेच्या लाटा येताना दिसतात.
या उष्णतेच्या लाटेचा अपाय आपल्याला होऊ नये यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकानेच काळजी घेणे जरुरीचे असून यादृष्टीने नवी मुंबईकर नागरिकांनी खबरदारीचा भाग म्हणून पुढील महत्त्वाच्या गोष्टींचे व नियमांचे पालन करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
नियम १ : पुरेसे पाणी प्यावे. ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्यावेत. प्रवास करताना पिण्याचे पाणी आवर्जून सोबत ठेवावे.
नियम २ : पांढरे, सौम्य रंगाचे सैलसर कपडे वापरावेत, डोक्यावर टोपी घालावी.
नियम ३ : आपली बाहेरील कामे सकाळी 10 च्या आत किंवा संध्याकाळी 4 नंतर करावीत.
नियम ४ : टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी , कोशिंबीर इ. पाण्याचे जास्त प्रमाण असलेली हंगामी फळे व भाज्या खाव्यात.
नियम ५ : उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळावीत.
नियम ६ : दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे.
नियम ७ : दुपारी 2 ते 4 या वेळात स्वयंपाक करणे टाळावे.
नियम 8 : चप्पल न घालता / अनवाणी उन्हात चालणे टाळावे.
नियम 9 : लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना वाहनात आत ठेवून गाडी बंद करणे टाळावे.
नियम 10 : सामूहिक मेळावे / क्रीडा विषयक कार्यक्रम या दरम्यान पिण्याच्या पाण्याची सोय असेल, थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क नसेल याची खबरदारी घ्यावी.
नवी मुंबईकर नागरिकांनी उन्हाळ्याच्या कालावधीत वरील नियमांचे पालन करावे आणि उष्माघात टाळावा तसेच उष्माघात संदर्भात लक्षणे आढळून आल्यास त्वरित आपल्या घराजवळील नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयातून उपचार घ्यावेत असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800