समरसता साहित्य परिषद, पिंपरी चिचंवड शाखेने आयोजित केलेल्या सातव्या ‘स्व.विजयराव कापरे स्मृती काव्य करडंक मैफिलीचे उद्घाटन मा. पुरुषोत्तम सदाफुले सर यांच्या हस्ते नुकतेच झाले.
“मी महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहात असतो. परंतु समरसता साहित्य परिषदेसारखी शिस्तबद्धता कुठेही दिसून येत नाही. आपली कविता वाचून झाली की निघून जाणारे कवी सर्वत्र दिसतात. पण येथे मात्र ३ ते ६ कवींनी एकत्र येऊन काव्य मैफिल सजवून शेवटपर्यत थांबणे हे या काव्य मैफिलीचे विशेष वैशिष्ट्य आहे. संवेदनांचे आविष्कार घडविणारी ही काव्य करंडक मैफिल स्पर्धा ही एक अनोखी स्पर्धा असून सर्व कवींना माझ्या खूप खूप शुभेच्छा” असे उद्घाटक या नात्याने सदाफुले सरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
स्व. दत्तोपंत म्हसकर न्यासाचे अध्यक्ष मा प्रदीप पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतातून स्व.दत्तोपंत म्हसकरांच्या कार्याची महती सांगून ते पुढे म्हणाले की “सामाजिक कार्यातून आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या कार्यकर्त्यांची देशाला नितांत गरज आहे आणि यासाठी कवींनी समाजाच्या संवेदना टिपून आपल्या रचनेतून समाजमनाचे संवर्धन करावे” असे सांगून, सर्व कवी संघांना शुभेच्छा दिल्या.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240506-WA00142-1024x593.jpg)
तत्पूर्वी समरसता साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष श्री कैलास भैरट यांनी प्रास्ताविक केले. समरसतेचा उद्देश उधृत करताना ते म्हणाले की “समरसतेचा भाव जागविल्याशिवाय समाजात खरी “समता” येऊ शकणार नाही. समतायुक्त समाज निर्मितीची समरसता ही पूर्व अट आहे आणि अश्या समतायुक्त समरस समाज निर्मितीत साहित्यिकांचे योगदान, सहयोग लक्षवेधी आहे आणि तो सदैव असत राहावा ही समरसतेची भूमिका आहे. समाजाचे जिवंत, चैतन्ययुक्त रसरसलेले चित्रण साहित्यातून अवतरत असते आणि ते अखंड अवतरत राहावे हीच समरसतेची आणि समरसता साहित्य परिषदेची मूख्य भूमिका आहे” असे सांगून त्यांनी समरसतेच्या वर्षभरात संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा घेतला.
“कवितेकडून कवितेकडे, काव्य करंडक मैफिल स्पर्धा, विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन असे पूर्ण एक दिवशीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याशिवाय दर महिन्याला घेतला जाणारा “साहित्य संवाद ” पाऊस कवितांचा “आषाढस्य प्रथम दिवसे” तसेच कथा कविता कार्यशाळा, महिलादिन यासारखे छोटे मोठे विविध कार्यक्रम संस्थेमार्फत वर्षभर घेतले जातात” असे सविस्तर सांगून कैलास भैरट यांनीही सर्व संघांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240506-WA00122-1024x566.jpg)
ज्येष्ठ साहित्यिक मा.पुरुषोत्तम सदाफुले (कार्याध्यक्ष, म.सा.प भोसरी), मा प्रदीप पवार (अध्यक्ष स्व. दत्तोपंत म्हसकर न्यास) मा. उज्वला केळकर (अध्यक्षा, स.सा.प.पिंचिं शाखा), मा सुहास घुमरे (प्रांत सदस्य) व मा कैलास भैरट (कार्य. सदस्य) यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या प्रसंगी शहरातील सर्व जेष्ठ कवी, लेखक, साहित्यिक डॉ धनंजय भिसे, राज आहेरराव, रजनी आहेरराव, सुभाष चव्हाण, राधाताई वाघमारे, सुरेश कंक, रघुनाथ पाटील, फुलवती जगताप, सविता इंगळे, नंदकुमार मुरडे, वर्षा बालगोपाल, जयवंत भोसले, मिलींद कुलकर्णी, प्रशांत मोरे, आनंदाराव मुळुक यांचा सन्मान करण्यात आला.
श्रीमती शोभाताई जोशी, राजेंद्र भागवत, नीलेश शेंबेकर, श्रध्दा चटप, बाळासाहेब सुबंध, सुरेश जोशी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
सौ मानसी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले आणि सौ जयश्री श्रीखंडे यांनी आभार प्रदर्शन करून या प्रथम उद्घाटन सत्राचा समारोप केला.
— लेखन : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर. निगडी, पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800