रसिकहो नमस्कार…….
आज आषाढ महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच आषाढ शुद्ध प्रतिपदा (१) ……….
भारतीय साहित्य जगतात आजचा दिवस “महाकवी कालिदास दिन” म्हणून साजरा करण्याचा प्रघात आहे. कोण हा महाकवी कालिदास ? आज आपण त्यांच्याबद्दल काही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आदि कवी महर्षी वाल्मिकी व महामती
श्री भगवान वेदव्यास यांच्यानंतर भारतीय साहित्य जगताला आपल्या अलौकिक प्रतिभेने व दिव्य अशा काव्य संपदेने ललामभूत ठरणारा हा महाकवी केवळ भारतीयच नव्हे तर सर्व जगातील रसिकांचा, साहित्यप्रेमींचा, अभ्यासकांचा व संशोधकांचा अभ्यास विषय व सरताज आहे. आपल्या काव्यातून शब्दालंकार, उपमा, निसर्ग वर्णन,उत्कट शृंगार, मानवी भावभावना व श्रेष्ठ सांस्कृतिक व साहित्यिक मूल्य प्रस्थापित करणारा हा बहुमुखी प्रतिभेचा अद्वितीय कविराज स्वतःबद्दल मात्र कमालीचे मौन बाळगतो.
त्यामुळेच त्याचा जन्म, त्याचे शिक्षण, त्याची गुरुपरंपरा, त्याचे देहावसान या बाबतीत इतिहासामध्ये कोणताही ठोस लेखी पुरावा मिळत नाही व त्यामुळे अनेक मत मतांतरे असल्याचे जाणवते.
तरीही भारतीय साहित्य जगतात व पर्यायाने विश्व शारदेच्या प्रांगणात आपल्या काव्य कैलास निर्मितीतून अलौकिक व शुक्र ताऱ्या प्रमाणे अढळ स्थान प्राप्त करणाऱ्या या महाकवीला आपण भारतीयांनी योग्य तो सन्मान व हवा तसा न्याय दिला नाही ही खंत रसिकजनांच्या मनात घर करून राहतेच. हा कालिदास आपल्याला भेटतो तो लोककथातून किंवा किंवदंतीतूनच. त्याबद्दल सर्व मान्य व बहू प्रचलित असलेली कथा अशी……..
काशीराज नरेशांचे आपल्या एकुलत्या एक राजकन्ये वर ( वेदवती /विद्योत्तमा वर ) खूपच प्रेम होते.कारण ती सुपुत्री, सुशील, सौंदर्यसंपन्न, राजकारण कुशल व साहित्यशास्त्र विनोद यामध्ये असाधारण गती असलेली एक प्रतिभावंत रूपगर्विता होती. काशी राजाच्या दरबारात येणाऱ्या कितीतरी पंडितांची परीक्षा घेऊन तिने त्यांना परास्त केले होते. ही अशी तेजस्वी कन्या बालपणापासून प्रधान पुत्र असलेल्या तिच्या सवंगड्या बरोबरच वाढली. लहानाची मोठी झाली. स्वाभाविकच उभयतांमध्ये एक अंगभूत आकर्षण व स्नेहभाव निर्माण झाला. त्या आधारे प्रधान पुत्राने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला, पण तू माझ्या बाबांच्या नोकराचा पुत्र आहेस, मी तुझ्याशी विवाह करणार नाही,असे म्हणून या मानिनीने त्याचा प्रस्ताव झिडकारला.
तिच्या या नकारामुळे तो सूडाने अंतर्बाह्य पेटला व एखाद्या मुर्खाशीच हिचा विवाह करून हिचा आजन्म सूड घेण्याचे त्यांनी ठरवले. तो अशा महामूर्खाच्या शोधात बाहेर पडला. असेच फिरत असताना जंगलात एका झाडाच्या फांदीवर बसून तीच फांदी तोडणारा एक मूर्खश्रेष्ठ त्याला सापडला. शरीराने धडधाकट, दिसायला सुंदर व धारदार नाकाचा,सावळ्या अंगकांतीच्या व टपोऱ्या डोळ्यांच्या या मूर्खाला प्रधान पुत्राने सर्व बनाव करून दरबारात त्याच्या शिष्य परिवारासह महापंडित व साहित्य शास्त्राचा मूर्धन्य विद्वान म्हणून सादर केले.
राजकुमारीने विचारलेल्या साहित्य शास्त्रातील सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच्या तथाकथित शिष्यांनी दिल्यामुळे या महा पंडिताला दरबारात बोलण्याची वेळच आली नाही. त्याच्या या अलौकिक पंडित्यावर राजकुमारी भाळली व प्रधान पुत्राने केलेल्या बनावानुसार उभयतांचा विवाह पार पडला. आपल्या वैवाहिक सहजीवनाचे एक वेगळेच अलौकिक भावस्वप्न उराशी घेऊन राजकन्येने त्याच्या संसारात पाऊल टाकले.
पण हाय रे दुर्दैव….. ज्याला महापंडित समजून तिने साताजन्माचा सहचर म्हणून निवडले होते तो तद्दन मूर्ख असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने मनात योजलेल्या सर्व स्वप्नांचा अगदी चक्काचूर झाला, भीषण भवितव्याच्या जाणिवेने तिच्या डोळ्यापुढे काळाकुट्ट अंध:कार पसरला. पण ती राजनीती कुशल असल्यामुळे तिने स्वतःला सावरले .अशा मुर्खा बरोबर आजन्म संसार करण्याची शिक्षा भोगण्यापेक्षा विधवा म्हणून विजनवासात राहणे जास्त श्रेयस्कर वाटून तिने कमरेची कट्यार काढून त्याच्या गळ्यास लावली. तो घाबरला व त्याने झालेला सर्व प्रकार एका क्षणात तिला सांगून टाकला. प्रधान पुत्राने आपला असा सूड घेतला आहे हे तिच्या लक्षात आले पण आता वेळ निघून गेली होती. तरीही याच्याजवळ अल्पांशाने तरी साहित्य शास्त्र विनोदबुद्धी आहे का याचा शोध घेण्यासाठी तिने त्याला प्रश्न केला……
“अस्ति कश्चित वाग्विशेष:……..?”
हा प्रश्न ऐकून तो अधिकच गोंधळला, राजकन्येने त्याच्या गळ्यास तीक्ष्ण कट्यार लावली, राज कन्येचा हा रुद्रावतार पाहून त्याने कसाबसा आपला जीव वाचवला व रात्रीच्या अंधारात गवाक्षातून उडी मारून तो अदृश्य झाला.
जनश्रुती नुसार पुढे त्याने भगवती काली मातेची उपासना करून अलौकिक असे ज्ञान प्राप्त करून घेतले. त्याच्या उपासनेने प्रसन्न होऊन अभिनव वाग्विलासिनी शारदा काली मातेच्या रूपात त्याच्यासमोर प्रकट झाली. आणि तिने त्याला काव्यालंकार संपन्न केले. कालीमातेच्या प्रसादातून मिळालेल्या या प्रतिभेच्या वरदानाची प्रासादिक कृतज्ञता म्हणून तो स्वतःला “कालिदास” म्हणवू लागला. मात्र राजकन्येने विचारलेला तो प्रश्न त्याचा मेंदू पोखरतच होता, तो प्रश्न होता……
अस्ति कश्चित वाग्विशेष: ……. ?”
या प्रश्नातील एकेका शब्दाने सुरुवात करून या महाकवी ने भारतीय साहित्य जगतामध्ये अनुलंघ्य असे काव्य कैलास निर्माण केले. व उन्मत्त राजकुमारीस उत्तर दिले.
१) अस्ति :- या शब्दापासून सुरुवात करून महाकवी कालिदासांनी “कुमार संभव” नामक महाकाव्याची रचना केली. या महाकाव्याचा विषय शिवपार्वतींची प्रेम कथा व परिणय सोहळा असा आहे. तारकासुराच्या वधासाठी भगवान कार्तिकेयांच्या जन्म हेतूने रचण्यात आलेल्या शिवपार्वतींच्या प्रेम कथा व परिणय कथेचे यात सुरम्य वर्णन आहे. यात महाकवी कालिदासांची प्रतिभा गिरीराज हिमालयाच्या उत्तुंग उंची सारखेच त्याचे अलौकिक दर्शन आपणास घडविते. या महाकाव्याचा पहिला श्लोक पुढीलप्रमाणे आहे.
“अस्त्युत्तरस्याम दिशी देवतात्मा
हिमालयो नाम नगाधिराज:।
पूर्वा परो तोय निधिन् वगाह्य
स्थित: पृथ्वीव्या इव मानदंड:।। “
२ ) कश्चित:- या शब्दापासून सुरुवात करून महाकवी कालिदासांनी “मेघदूत” नावाचे जगप्रसिद्ध असे खंडकाव्य रचले आहे.कुबेराच्या शापाने शापित झालेला यक्ष शिक्षा म्हणून एक वर्षासाठी पृथ्वीतलावर येतो. रामगिरी च्या (रामटेक, नागपूर ?) आश्रयाला तो राहतो. त्याच्या पृथ्वीतलावरील निवासास आठ महिने पूर्ण झाले आहेत. अलकापुरीतील आपल्या प्रेयसीच्या मीलनास उत्सुक, व्याकुळ आणि आतुर झालेला यक्ष आषाढाच्या पहिल्याच दिवशी आकाशातून जाणाऱ्या मेघांना दूत बनवून अलकापुरीत राहणाऱ्या आपल्या प्रिय प्रेयसी ला संदेश पाठवितो असे या खंड काव्याचे कथानक आहे. मंदाक्रांता वृत्तात १२० मुक्तकातून व पूर्व मेघ व उत्तर मेघ अशा दोन भागातून हे खंड काव्य कालिदास आपल्यापुढे मांडतात. हे खंडकाव्य म्हणजे कालिदासांच्या संपूर्ण व स्वतंत्र प्रज्ञेचा उत्तुंग आविष्कार होय. या संपूर्ण खण्डकाव्यातून उत्कट व प्रसंगी उत्तान शृंगाराचे अप्रतिम वर्णन कालिदासाने केले आहे. कश्चित् शब्दा पासून सुरु होणारा या काव्याचा पहिला श्लोक पुढीलप्रमाणे आहे……..
“कश्चित् कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्त:। शापेनास्तंगमित्य महिमा वर्ष भोग्येण भर्तृ:। यक्षश्चक्रे जनक तनया स्नान पुण्योदकेषु । स्निग्धच्छाया तरुषुवशितम रामगिर्याश्रमेषु।। “
३ ) वाक् :- वाक् या शब्दापासून सुरुवात करुन महाकवी कालिदासांनी भगवान श्रीरामांचे पूर्वज महाराज श्री रघूंच्या वंशाच्या जीवनादर्श व पराक्रमाचे अप्रतिम वर्णन केलेले आहे. रघु वंशातील सत्तावीस पिढ्यांचे अतिशय सुंदर तपशीलवार व मनोहर असे वर्णन यात वाचावयास मिळते. तत्कालिन नीती कल्पना, न्यायव्यवस्था, चारित्र्य प्रियता , न्याय प्रियता,स्वप्नातहि दिलेला शब्द पाळण्याची परंपरा व रघुवंशीयांच्या महान पराक्रमाचे यात साद्यंत सप्रमाण वर्णन आहे. वाक् या शब्दापासून महाकवी कालिदास यांनी रचलेल्या या महाकाव्याचा पहिला श्लोक पुढीलप्रमाणे आहे……
“वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ: प्रतिपत्यये। जगत: पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ।।”
४ ) ऋतुसंहार :- वरील तीन सुप्रसिद्ध काव्यां व्यतिरिक्त महाकवी कालिदास यांचे ऋतूसंहार हेही एक खंडकाव्य प्रसिद्ध आहे. ऋतुसंहार ही कालिदासाची पहिली रचना असल्याचे विद्वानांचे मत आहे. प्रत्येकी १८ ते २० श्लोकांच्या सहा सर्गातून, सहाही ऋतूंचे विलक्षण निसर्ग वर्णन यात कालिदासाने केले आहे. विशेषतः ऋतू बदलाचा मानवी प्रेम जीवनावर होणाऱ्या परिणामाची सूक्ष्म व तरल मांडणी महाकवी कालिदास या काव्यातून करतात.
याशिवाय महाकवी कालिदास यांनी तीन अतिशय सुंदर अशी नाटकेही लिहिली आहेत.
१ ) मालविकाग्निमित्र :- राजा अग्निमित्र व मालविका यांच्यातील सुरस प्रेम कथेची या नाटकात अतिशय सुंदर मांडणी महाकवी कालिदासांनी केली आहे.
२ ) अभिज्ञान शाकुंतल :- महाकवी कालिदासांची जगप्रसिद्ध अशी ही नाट्यरचना. जगातील बहुतेक सर्व भाषांमधून या अतिशय सुरस व भावपूर्ण नाटकाची भाषांतरे झालेली आहेत.
जर्मन महाकवी गटे हे अभिज्ञान शाकुंतल डोक्यावर ठेवून नाचला ते उगाचच नाही. विश्वामित्र व मेनका कन्या शकुंतला व महाराज दुष्यंत यांच्यातील प्रेम कथेचे अतिशय तरल, नाट्यपूर्ण व तपशिलवार चित्रण कालिदास या नाटकातून करतात.
“काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुंतला”
अशी उक्ती प्रसिद्धच आहे. कण्व मुनींच्या ह्रुदयातील पितृ वत्सल उलघाल हा या नाटकातील प्रसंग पिढ्या न पिढ्या रसिकांच्या मनावर कोरला गेला आहे. या नाटकातून तत्कालिन ऋषी संस्थेचे वर्णन, आश्रमिय वातावरणाचे सुंदर वर्णन, नागर व आश्रमिय जीवन, राज्यव्यवहाराचे वर्णन, कालिदासाची प्रतिभा आपल्याला घडविते.
३ ) विक्रमोर्वशीय :- महाकवी कालिदासाची ही सुद्धा एक अप्रतिम नाट्यकृती. राजा पुरुरवा व उर्वशी यांची अतिशय रहस्यमय, गुंतागुंतीची, उत्कंठा वर्धक व तरल संवेदनापूर्ण अशी प्रेमकथा महाकवी कालिदास यातून आपल्यापुढे मांडतात.
याशिवाय महाकवी कालिदास हे ज्योतिष तज्ञही असल्याने ज्योतिष विषयक “उत्तर कालामृतम्” नावाच्या एका ज्योतिष ग्रंथाचीही नोंद कालिदासांच्या नावाने आहे.
महाकवी कालिदास हे भारतीय साहित्य व काव्य जगतातील एक उत्तुंग कैलास शिखर आहे. त्यांनी निर्माण केलेल्या या रस सिद्ध, दर्जेदार व कालजयी साहित्यकृतींचा गौरव करण्यासाठीच भारतीय साहित्य जगताने त्यांना “कविकुलगुरू” “कनिष्ठिकाधिष्टित” व “कविता कामिनी विलास” या गौरवशाली उपाधींनि गौरविले आहे. समस्त भारतीयांना ललामभूत होणारा व येणाऱ्या कित्येक पिढ्यांना भारतीय समाज जीवन, भारतीय अध्यात्म, भारतीय निसर्ग, भारतीय भावभावना, भारतीय कुटुंब जीवन, ऋषी परंपरा व दिव्य चरित्रांचे उदात्त चित्रण करणाऱ्या या अलौकिक साहित्यकृतींचे दर्शन घडविणार्या या महाकविचा परिचय व्हावा व त्याच्या साहित्य कृतींचा आस्वाद घेण्याचा, अभ्यास करण्याचा विचार आमच्यात रुजावा म्हणून हा लेखन प्रपंच……
आज आषाढ शुद्ध प्रतिपदा अर्थातच “कालिदास दिन “अथवा” कालिदास जयंतीच्या” निमित्ताने महाकवी कालिदासाच्या या उत्तुंग, असामान्य, अतुलनीय कर्तुत्वाला मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन……!

— लेखन : योगेश्वर उपासनी. अमळनेर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
महाकवी कालिदास याच्यावर इतका सुंदर लेख संपादित करून निर्माण केल्याबद्दल मनापासून कौतुक व आभार.
“आषाढस्य प्रथम दिवसे ” असे लिहून महाकवी कालिदास ह्यांच्या “मेघदूत ” काव्याचे वर्णन करणारे अनेक लेख आज वाचनात आले, परंतु कालिदासांच्या समग्र साहित्य निर्मितीचे समालोचन करणारा आणि त्यांमधील वैशिष्ट्ये उलगडून दाखवणारा हा लेख अतिशय आवडला.लेखक श्री.योगेश्वर उपासनी ह्यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन 🙏💐