Thursday, January 16, 2025
Homeसाहित्यडॉ मनमोहन सिंग : स्मरणीय भाषण

डॉ मनमोहन सिंग : स्मरणीय भाषण

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी. २३ डिसेंबर २०१७ रोजी औरंगाबाद येथील एमजीएम मध्ये पद्मविभूषण शरद पवार यांच्यावर मी लिहिलेल्या “पद्मविभुषण शरद पवार द ग्रेट ईनिग्मा” या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी केलेल्या भाषणाचा अंश पुढे देत आहे. हे भाषण म्हणजे त्यांची विद्वत्ता, सूक्ष्म वाचन आणि त्यांच्या मनाच्या मोठेपणाची जणू साक्ष होय…..

“या प्राचीन आणि सुंदर औरंगाबाद शहरात आणि तेही श्री शरद पवार यांच्या जीवनचरित्राच्या प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करणाऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहताना मला आनंद होत आहे.

कार्यक्रमानंतर घेतलेले छायाचित्र

शरद पवार हे महाराष्ट्राच्या या धन्य भूमीचे आहेत, पण ते प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक ठिकाणी घरचे वाटतात.

मला शरदजींच्या अखंड आणि दीर्घ मैत्रीचा खूप फायदा झाला आणि माझ्यासाठी ते शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे कर्मयोगी या शब्दाचे सर्वोच्च मूर्त स्वरूप आहेत. शरदजी खरेच कर्मयोगी आहेत.

श्री शेषराव चव्हाण यांनी शरदजींच्या जीवनावर आणि कार्यावर प्रकाश टाकणारा एक तेजस्वी ग्रंथ लिहिला आहे. या पुस्तकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोणत्याही संकटाची परिस्थिती हाताळण्यासाठी शरद पवार योग्य आहेत, मग ती मुंबईची दंगल, बाबरी मशीद किंवा लातूरचा भूकंप, त्यांच्या साथीदारांचे नेतृत्व करण्यासाठी पवार तयार आहेत. जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग आला तेव्हा त्यांनी ते संकट सोडवले.

चव्हाणजींच्या पुस्तकात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा वाद मी वाचत होतो. त्या संकटाची परिस्थिती आणि स्फोटक सामाजिक परिस्थिती शरदजींनी ज्या पद्धतीने सोडवली तो इतिहास सदैव स्मरणात राहील.

महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री म्हणून शरदजींनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक पैलूत परिवर्तन घडवून आणले, मग ते कृषी क्षेत्र असो वा प्रसिद्ध बारामती मॉडेल, त्यांची देशभर आणि जगभर चर्चा होते. त्यांनी औद्योगिक विकासासाठी उद्योगांना संरक्षण दिले कारण फार कमी राजकारण्यांना औद्योगिक विकासाची काळजी आहे. त्याचाच परिणाम असा आहे की महाराष्ट्राची ही धन्य भूमी आज भारतीय संघराज्यातील सर्वोच्च राज्यांपैकी एक आहे, याचे श्रेय मोठ्या प्रमाणावर शरद पवारांना जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या परिवर्तनातील शरदजींच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारे चव्हाणजींचे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे अशी मी शिफारस करतो.

पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात मला मंत्री म्हणून १९९१ मध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. शरदजी संरक्षण मंत्री होते. तिजोरी जवळपास रिकामी असताना मी अर्थमंत्री झालो होतो. प्रत्येक सहकाऱ्याकडे जाऊन त्यांना बजेट कमी करण्यास सांगण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. इतर कोणत्याही मंत्र्याने माझी दुर्दशा विचारात घेतली नाही. परंतु शरदजींनी अतिशय विनम्रपणे संरक्षण बजेटमध्ये ५०० कोटी रुपयांची कपात करण्याचे मान्य केले आणि उर्वरित मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसाठी एक उदाहरण ठेवले.”

अशा या थोर, माजी पंतप्रधान स्व. मनमोहन सिंग यांना भावपुर्ण श्रध्दांजली..

शेषराव चव्हाण

— लेखन : शेषराव चव्हाण. छ्त्रपती संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय