जसा कोणताही नागरिक ठाणे महानगरपालिकेत कधीही जाऊ शकतो, अधिकाऱ्यांशी बोलू शकतो, वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना जाब देखील विचारू शकतो, त्या धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिका लोकाभिमुख करणार, असा निर्धार खा. नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. ते सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाला नुकत्याच दिलेल्या भेटी प्रसंगी बोलत होते.
खा. नरेश म्हस्के यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या काही साचेबंद कारभाराची उदाहरणे देताना सांगितले की, खरे म्हणजे या महानगर पालिकेत बरीचशी कामे ही सिडको ने करून ठेवली आहेत. त्यामुळे शहराची देखभाल, दुरुस्ती करण्याचीच जबाबदारी या महानगर पालिकेकडे आहे. असे असताना, डास झालेल्या काही विशिष्ट भागांची जबाबदारी महानगरपालिकेकडे नाही, असे सांगून महानगरपालिकेने त्या भागात डास प्रतिबंधक उपाययोजना करण्यास नकार दिला. पण हे डास महानगरपालिकेची जबाबदारी असलेल्या भागात जाऊन उपद्रव निर्माण करतील, त्याचे काय ? या डासांना या प्रशासकीय बाबी कशा माहिती असतील ? असा उपरोधिक सवाल केला. शेवटी जेव्हा सचिव पातळीवर ही बाब नेली, तेव्हा हा प्रश्न मार्गी लागला, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपण निवडून आल्यावर या जेष्ठ नागरिक संघाला नक्की भेट देऊ, या निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनाची आज पूर्तता होत आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून जेष्ठ नागरिक हे आपल्या आईवडिलांसमान असल्याने त्यांचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवू, अशी ग्वाही दिली. यावेळी त्यांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

संघाचे अध्यक्ष श्री मारुती कदम यांनी जेष्ठ नागरिक संघाची वाटचाल विषद करताना, १३५० सदस्य संख्या असलेला हा नागरिक संघ काय काय उपक्रम राबवित असतो, त्याची सविस्तर माहिती दिली.

आरोग्य संवादक सौ अलका भुजबळ यांनी ३ जानेवारी २०२४ रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन मध्ये श्री नरेश म्हस्के यांच्या हस्ते आपल्याला सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, याची आठवण सांगून आज ते या नागरिक संघात आल्याचा आनंद होत आहे, असे सांगून एस टी महामंडळाच्या सर्व बस गाड्या जाताना व येताना सानपाडा येथे थांबल्या पाहिजेत, अशी मागणी करून त्या आशयाचे निवेदन म्हस्के यांना दिले.

निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेली “आम्ही अधिकारी झालो” आणि “करिअरच्या नव्या दिशा” ही दोन पुस्तके खा. नरेश म्हस्के यांना भेट देऊन ठाणे लोकसभा मतदारसंघातील युवकांपर्यंत ही पुस्तके मोठ्या संख्येने पोहोचावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी माजी नगरसेवक श्री सोमनाथ वासकर, नवी मुंबई युवा सेनेचे उपाध्यक्ष श्री अविनाश जाधव, महिला आघाडी संघटक सौ सुरेखा गव्हाणे आदींची समयोचित भाषणे झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे सचिव श्री शरद पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष श्री जी व्हि मुखेकर यांनी केले.
या कार्यक्रमाला विविध मान्यवर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800