पर्यटन व्यवसायात आजही महिला व्यावसायिकांची संख्या अत्यल्प असून, महिलांच्या अंगी असलेल्या अगत्य, आतिथ्य आणि एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याच्या त्यांच्या कसबामुळे महिलांना या व्यवसायात मोठी संधी आहे, त्यामुळे महिलांनी या संधीचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन न्यूज स्टोरी टुडे पोर्टल आणि पब्लिकेशन्स च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांनी केले.
अर्थसंकेत ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ पर्यटन विशेष कार्यक्रम नुकताच मुंबईतील कोहिनुर बिझनेस स्कुल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला, त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

सौ भुजबळ पुढे म्हणाल्या, पर्यटन क्षेत्रातील कौटुंबिक परंपरा असलेल्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच महिला आज पर्यटन क्षेत्रात दिसून येतात. पण पर्यटन क्षेत्राशी निगडीत अशा प्रवास व्यवस्था, निवास व्यवस्था, वाहन व्यवस्था, पर्यटन मार्गदर्शक अशा अनेक प्रकारच्या बाबी महिला सक्षमपणे हाताळू शकतील अशा आहेत. त्यात पर्यटन व्यवसायाची व्याप्ती ही संपूर्ण जगभरासाठी आहे. त्यामुळे महिलांनी या क्षेत्रात पुढे आले पाहिजे. तसेच महिलांचे या व्यवसायातील प्रमाण वाढण्यासाठी त्यांच्यासाठी पुरस्कार सुरू करण्यात यावे, अशी सूचना ही त्यांनी केली.
कोहिनुर बिझनेस स्कुलच्या संचालिका डॉ. स्वेतलाना तातूस्कर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कोहिनुरच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरे प्रमुख पाहुणे ग्लोबल अँजेलो ग्रुपचे प्रमुख श्री अग्नेलो राजेश अथयाडे यांनी भारतात संपूर्ण जगाचे प्रतिबिंब बघता येते व भारत इतर देशांवर फार कमी अवलंबून आहे. पर्यटनामुळे कोणत्याही राज्याला सातत्यपूर्ण उत्पन्न मिळते असे सांगितले. महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास १३ कोटी आहे, जगामधील अनेक देशांची लोकसंख्या इतकी नाही, त्यामुळे नुसते महाराष्ट्रात जरी पर्यटन विकासावर भर दिला, तरी खूप मोठी आर्थिक उलाढाल होऊ शकते. पर्यटनामुळे आयुष्यात बरेच काही शिकता येते. प्रवासात भेटणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवत असते, असे मतही त्यांनी मांडले.
एजिलस डायग्नोस्टीक्सचे संस्थापक डॉ. अविनाश फडके हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. मराठी माणूस उत्तमरीत्या व्यवसाय करू शकतो हे त्यांनी उदाहरणासह उपस्थितांना सांगितले. मराठी माणसाने देशावर राज्य केले आहे. युद्ध लढण्याची जोखीम घेतली आहे. मराठी माणूस जोखीम घेऊ शकतो पण त्याने उद्योग व्यवसायात जोखीम घेऊन पुढे गेले पाहिजे. लघु व मध्यम उद्योग शेअर बाजारात लिस्ट करून भांडवल उभे करून व्यवसाय मोठे केले पाहिजेत, असे ते म्हणाले.

मराठी माणूस शिक्षण घेतो, नोकरी करतो, त्यात सुद्धा फार प्रगती करत नाही व शेवटी निवृत्त होतो. उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांच्या नियमांचे अनुपालन करायला मराठी उद्योजक कमी पडताना दिसतात, असे विचार वस्तू व सेवा कर उपायुक्त श्री. चैतन्य ताथारे यांनी मांडले.
कोहिनुर बिझनेस स्कुलच्या संचालिका डॉ. स्वेतलाना तातूस्कर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कोहिनुरच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ संकल्पनेमध्ये सहभागी ब्रँडचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सात दिवस व्होटिंग घेतले जाते. व्होटिंगनंतर जास्त व्होट मिळालेल्या विभागास पुरस्कार दिला जातो, असे अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सांगितले.
महाराष्ट्रातील हजारो पर्यटन संस्थांपैकी फक्त नऊ संस्था बनू शकल्या ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’. ट्युलिप हॉलिडेज, खवणे कयाक्स, दीपक वर्ल्ड व्हेकेशन्स ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’ ठरले. बेसिल लीफ हॉलिडेज, जोगळेकर कॉटेज, शिवांजली हॉलिडे होम, राजगुरू टूर्स बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड ठरले. ईशा टूर्स आणि फ्लाईंग कोकण मोस्ट इन्नोव्हेटिव्ह ब्रँड ठरले. ‘आयकॉनिक टुरिझम ब्रँड ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्काराने ‘वेदभुमी इको व्हिलेज’चा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मंदार नार्वेकर यांनी केले. रचना आर्टस् अँड क्रिएशन्सच्या संस्थापिका सौ. रचना बागवे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला पर्यटन व्यवसायातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
खरोखरी अलकाताई, पर्यटन ही आजच्या काळाची गरज आहे व्यवसायदृष्टीने सुद्धा आणि पर्यटकांच्या दृष्टीनेसुद्धा👍