Saturday, July 27, 2024
Homeलेखपालकत्व : एक कला

पालकत्व : एक कला

भाग 12 : “बालमनाला द्या पोषक आहार”

आज मुलांचा स्क्रीन टाईम खूप जास्त वाढला आहे आणि ती सध्या काळाची गरज झाली आहे. त्यामुळे मुलांच्या हातात इंटरनेट नावाचं, योग्य उपयोग केला तर वरदान नाहीतर शाप असं खेळणं आलेलं आहे आणि ते खेळणं मुलांना हक्काने आपल्या ताब्यात ठेवत आहे. ही गोष्ट पालकांसाठी मानसिक ताप देणारी ठरत आहे. त्याच प्रमाणे मुलं घरी राहून एकलकोंडी होत चालली आहे. जास्त चिडचिड करू लागली आहेत. असे अनेक behaviour problems मुलांमध्ये निर्माण होत आहेत.

गेल्या काही वर्षापासून संपूर्ण मानवी जीवनावर आधुनिकतेचा पगडा वाढत गेला आहे. त्यामुळे मानवी नाते संबंध, सामाजिक जाणीव यामध्ये देखील मोठा बदल दिसून येत आहे. यंत्र युगात प्रवेश झाल्या नंतर जी प्रगती होत गेली त्याच बरोबर, माणसं, भावना, आई बाबा आणि मुलं देखील एक यंत्र होऊ लागले आहेत. चावी, रिमोट आणि बटणं यात सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याची जणू ओढच लागली आहे. मोठ्या माणसांनी लहान मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दयावी आणि, त्या कौतुकाच्या, प्रेमाच्या स्पर्शात लपलेली माया, जिव्हाळा यामुळे मुल सुखावुन जावी आणि त्यांना नवी दिशा मिळावी. असं घडणं दुर्मिळ होत चाललय. कौतुक करण्याची आणि करून घेण्यासाठी आता बरेच साधन अर्थात गिफ्ट्स खूप महत्वाचे झालेय.

काही महिन्यांपूर्वी एक नोकरदार IT इंजिनियर आई councelling साठी आपल्या सहा वर्षाच्या मुलीला माझ्या कडे घेऊन आली.आपल्या लेकीची, ही न ती तक्रारीची लांबलचक यादी ती माझ्या पुढे वाचत होती.त्यात तीची अडचण नको म्हणून तिने आपला मोबाईल मुलीच्या हवाली केला होता.एका पायावर दुसरा पाय ठेवत आई बोलू लागली “कालच हिला drawing मध्ये good मिळालं म्हणून online remot dalls order केल्या.आणि किती करायचं या मुलांचं तुम्हीच सांगा. तरी उलट उत्तर, मोबाईल तर हवाच आणि सतत काही तरी demand असतेच”.मी शांतपणे ऐकत होते सारे.आणि ती लहानशी पोरं तिला कश्याशीच काही घेणं देणं नव्हतं. कोण जाणे काय शोधत होते तीचे इवले इवलेसे बोटं त्या मोबाईल मध्ये.माहीत नाही मनाच्या कुठल्या गरजेची खळगी भरत होते ते भुकेले, तहानलेले निरागस डोळे.

कोरड्यात कोरड कितीही मिसळत गेलं तरी गोळा तयार होत नाही चार थेंब ओलावा शिंपडल्याशिवाय कोरड उपयोगी सिद्ध होत नाही. मायेचा ओलावा, आई बाबाची सोबत, आईचा स्पर्श, आईच्या हातानी बनलेल्या खाऊची चव या सगळ्या बालहक्काच्या गोष्टी मुलांसाठी दुर्मिळ होत चालल्या आहेत. चावीची खेळणी, रिमोटच्या बाहुल्या तसेच सगळंच विकत मिळणारी बाजारपेठ आणि सगळंच विकत घेऊ शकण्याची क्षमता या आविर्भावात वावरणारी आई बाबा आणि मुलांची जमात, कदाचित नात्यांची वीण सैल करत चालली आहे.

मुलं वास्तव्य नाकारून काल्पनिक विश्वात रमू लागली आहे, नव्हें तेच खरं समजू लागली आहे.ही परिस्थीती दिवसेंदिवस भयानक रूप घेतेय. पालकांना याची गंभीरता लक्षात घेणं खूप गरजेच आहे. मुलं का एकलकोंडी होत ? कोणी पाहुणे आले की, त्यांच्याशी न बोलता आपल्या खोलीत बंद का होतात ? चार माणसांशी बोलताना त्यांना अवघडल्या सारखं का होतं?ते कायम एखाद्या वेगळ्याच विश्वात का वावरतात? असे प्रश्न निर्माण झाल्यास पालकांनी पाल्याशी संवाद साधणं खूप आवश्यक आहे.

काही दिवसापूर्वी अकरा वर्षाच्या एका मुलाला त्याचे बाबा खोटं सांगुन माझ्या कडे घेऊन आले. तो रागात बोटाची नखं कुरतडत अत्यंत अस्वस्थपणे वेळ काढत होता. त्या पूर्वी ते गृहस्थ माझ्याकडे मुलांबाबत अनेक तक्रारी नोंदवून गेले होते. खूप उलट उत्तर देतो, खोटं बोलतो, सारखा मित्रा मधेच असतो, अभ्यास करत नाही, मोबाईल अजिबात सोडत नाही, आई बाबांशी फक्त हो किंवा नाही एवढंच बोलतो. अश्या खूप गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. मुलांच्या अश्या वागण्यामुळे तें खूप चिंतीत होते. आपला मुलगा हाताबाहेर गेलाय याचं दुःख त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. मग त्यांनी काय करावं ? तर सतत ओरडणं, टोमणे मारणं, त्याच्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवणं आणि उपदेशाचा ओव्हर डोस देणं. हे सगळं अगदी नियमितपणे सुरू केलं. त्यामुळे मुलावर नकारात्मक परिणाम होत आहेत. हे, जाणवत असतानाही आपला राग शांत करण्यासाठी त्यांनी हे उपाय सुरू ठेवले. परिणामस्वरूप मुलगा त्यांच्या पासून आणखी आणखी लांब होत गेला.

अशी पालक आणि पाल्य नियमीतपणे येतात. असतात. नेमकी कशी, कधी दरी निर्माण झाली माहिती नसतं. पण पालक पाल्य यांच्यातला संवाद हरवत चाललाय एवढं मात्र निश्चित. पाल्यांशी मैत्रीचं नात कसं निर्माण करावं… आणि ते कसं जपावं ? हा आत्मचिंतन आणि अभ्यासाचा विषय आहे, कारण अस प्रत्यक्ष घडणं इतकं सोपं नाहीय. पालकांना एकाएकी हा प्रयोग जमण शक्य होत नाही आणि त्यामुळे मूल आणखी गोंधळतात. त्यांच्या आत असलेली प्रचंड अस्वस्थता प्रत्येक क्षणाला नवीन गोंधळ निर्माण करत असते आणि अश्या अवस्थेत पालक मुलांशी त्यांना हवं तेंव्हा मैत्रीच नातं जोडतात आणि हवं तेंव्हा परत पालक या भूमिकेत शिरतात. असं, जाणवल्यास मुलं आपल्या मनाची दार, आपली गुपितं आणखी घट्ट करत जातात.

आपल्या वागण्यात, बोलण्यात दैनंदिन व्यवहारात कृत्रिमता आणि कोरडेपणा येत जातोय का ? आणि त्याचा परिणाम आपल्या नात्यावर, कुटूंबावर होतोय का ? आपण सगळ्यांनीच हे तपासून बघणं गरजेचं झालं आहे. आपल्या वागण्यातील ही कृत्रिमता आपल्या नात्यांची वीण सैल करत चालली आहे आणि जिव्हाळ्याने कुरवाळून मुलांना आपलंसं करून, त्याच्या कडून अनेक चांगल्या गोष्टी करून घेण्याची पालकांनी जादूची कांडी हरवत जातेय. कदाचित ही जादूची कांडी आपली जादू विसरून कुठल्यातरी कृत्रिम रिमोट च्या अधीन होत चालली आहे.हा अत्यंत गंभीर विषय आहे.

आपल्या पाल्यांना वेळ देऊन.त्यांच्या सोबत राहून कुटुंबातील छोट्या छोट्या कामात मुलांना सहभागी करून घेत त्या सहवासातून मुलांना त्यांच्या मनात साठलेल्या अनेक गोष्टी बोलण्याची संधी द्यावी. पालकांनी मुलांशी बोलताना कायम केवळ कुठल्यातरी आदर्श गोष्टीचा मारा करत राहणं आवश्यक नसतं. तर, मुलांना जास्तीत जास्त व्यक्त होण्याची संधी देणं आणि त्यांचा मनात असलेला गोंधळ आणि द्विधा मनस्थिती या विषयी चर्चा करणं. आवश्यक आहे.

बाल्याअवस्थेतून कौमार्य अवस्थेत प्रवेश करताना मुलांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आणि आता तर मुलांना इंटरनेट वापरायला देणं याशिवाय आपल्या कडे पर्याय नाहीय. तरी मुलांच्या नकळत ते इंटरनेटच्या माध्यमातून कुठल्या विश्वात वावरत आहेत याचा अंदाज घेत राहणं आवश्यक आहे. त्यांचा स्क्रीन टाईम कमी करण्याचा प्रयत्न करून त्यांच्याशी अगदी सामान्य तसेच जे विषय आपण त्यांच्याशी बोलणं टाळतो ते विषय काढून त्यावर मुलांचे काय विचार आहेत हे जाणून घेऊन त्यावर पुढे चर्चा करत जाणं हे व्हायलाच हवं आणि जे आपल्याला त्यांना सांगायचं आहे ते गोष्टीच्या माध्यमातून आणि आपल्या स्वतच्या लहान लहान अनुभवातून सांगू शकतो.

विविध परिस्थितीत बालकांकडून घडू शकणाऱ्या वर्तनाची तत्वे आणि त्यांवर आधारित पूर्वकथन.हा बाल मानसशास्त्राचा महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये बालकांकडून कोणत्या परिस्थितीत काय घडू शकते याचा पूर्व अनुमान अभ्यासाच्या आधारावर लावला जातो.
अश्या प्रकारे बालकांच्या व्यक्तिमत्वाला सामाजिक जाणीव ही एक महत्त्वाची किनार आपण लावू शकतो.आपल्या सूचना किंव्हा केवळ आदर्श गोष्टीचा मारा यातून मुलं शिकत नाही ते आपल्या वर्तणुकीचे अनुकरण करतात आणि त्याची बैठक घट्ट झाली की ते चांगल्या सवयी आणि तत्व आत्मसात करतात. आपल्या सकारात्मक वर्तनाचा परिमाण मुलावर होत असतो. आपण केवळ गरजूंची मदत करायला हवी असं मुलांना सांगत जाणं यापेक्षा त्यांना सोबत घेऊन तशी कृती केल्यास ती गोष्ट त्यांच्यात रुजत जाते.मग शाब्दिक सूचना करण्याची गरज उरत नाही.

परवा एका आईचा फोन आला त्यांचा बारा वर्षाचा मुलगा हल्ली खूप उलट बोलू लागला आहे असं त्या म्हणाल्या. कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरतो. महागडी खेळणी, गेम्स खरेदी करण्यासाठी मागे लागतो. त्यांना आपल्या मुलाची काळजी वाटणं साहजिक होतं. बाल्या अवस्थेतून कौमार्य अवस्थेत पदार्पण करताना ही लक्षणं अगदी सामान्य आहे. मुलांना पालकांनी आपल्या कृतीतून शिकवण्याचा प्रयत्न करावा.
अगदी थोड्या प्रमाणात त्याच्या पिगीबँक मधून एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदत करण्यास प्रवृत्त करा.आणि यात त्याचाच सहभाग घ्यावा. आधी त्या आईला हे सगळं कठीण वाटलं पण, तिने सुरुवात केली.नंतर तिचा उगाच हट्ट करणारा, त्रागा करणारा मुलगा यात स्वतःच इतका गुंतू लागला की, आपल्या शाळेतील गरजू विद्यार्थी शोधणे आणि त्यांची थोडी का होईना मदत करणे याची त्याला सवय लागली. अश्या प्रकारे मुलांना त्यांच्या पिगीबँक मधून थोडे पैसे काढून त्यातून थोडी मदत करणं शिकवायला हवं. त्यामुळे त्यांच्या वर्तूणुकीच्या समस्या आटोक्यात येऊन त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण होईल.

आपल्या मुलांसोबत घरी मनसोक्त खेळा, छान गाणी लावून मुला सोबत नाचा. उत्तम संगीत हे मानसिक आरोग्यासाठी मोठं वरदान आहे. खूप सारे ओले रंग घेऊन चित्र काढा, कलर थेरपी मानसिक आरोग्य छान ठेवण्यास खूप प्रभावी आहे. तसेच कपाल भारती, प्राणायाम हे मुलांना आपल्या समोर बसवून जरूर करावं. त्यामुळे मुलांना तुमचा सहवास मिळतो. तुमच्या डोळ्यातील भाव वाचण्याची आणि तुम्हाला त्यांच्या body language चा मर्म समजून घेण्याची संधी मिळते. याची सवय मुलांना जरूर लावावी. खोट्या आभासि जगापेक्षा तुमच्या कुशीत मुलांना जास्त आनंद मिळू शकतो आणि त्या सुरक्षेच्या भावनेतून मुलं समाधानी होतं.

मुलांच्या भावनिक, मानसिक गरजा आणि त्याच सकारात्मक नियोजन यावर त्याच व्यक्तिमत्त्व फुलत जातं. पाल्य तर अजाण आहेत. त्यांच्या गाठी अनुभव नाहीय. सगळं जग त्यांना नवीन आहे. पालकांनी आपलं सक्षम बोटं त्यांच्या हाती ठेवण्याची कला अवगत करणं काळाची गरज आहे.
क्रमशः

डॉ राणी खेडीकर

— लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर.
अध्यक्ष, बाल कल्याण समिती. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८