भाग – 8 : सायबर गुन्हे आणि बालकं
आज इंटरनेट आणि सोशल मीडियाने आपल्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. इंटरनेटच्या सकारात्मक वापराबरोबरच दुष्प्रवृत्तींद्वारे केला जाणारा दुरुपयोग किशोर वयातली बालक, बालिकांना अत्यंत वेगळ्या अवास्तव विश्वात भरकटवतोय. आणि ही अतिशय गंभीर बाब आहे. तेव्हा, अशा ऑनलाईन गुन्हेगारीपासून आपण सावध असायला हवं. त्यासाठी नेमके बालकांच्या संदर्भात ‘सायबर क्राईम’चे स्वरुप समजून त्यानुसार उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
बाल कल्याण समितीत कार्य करताना, सायबर गुन्ह्यात किशोर वयातील बालिका अजाणतेपणी गुरफटल्या जात आहेत.आणि त्याची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या बाबत दररोज अनेक धक्कादायक अनुभव येत आहेत. किशोर वयातील बालिका Instagram वर कोणीतरी अनोळखी तरुणाशी बोलतात, तो तरुण त्या बालिकेस काहीतरी खोटे आमिष दाखवतो आणि खोट्या प्रेमाचे दाखले देतो. त्या बालिकेस सुरुवातीला त्या सगळ्या गोष्टींची भुरळ पडते आणि नंतर ती तिच्या नकळत त्यात गुंतत जाते. बऱ्याचदा समोरचा मुलगा देखील किशोर वयातील असतो. जसा जसा त्यांच्यात संवाद वाढत जातो बालिकेच्या मनातील गोंधळ पण वाढत जातो.तिच्या वया नुसार तिच्या शरीरात आणि मानसीक अवस्थेत होणारे बदल तिला तीच्या भावनिक गरजांच्या आहारी जाण्यास भाग पाडतात.बालिका अगदी थोड्या काळातच पूर्णपणे त्या अनोळखी तरुणावर, मुलावर विश्वास ठेऊ लागते आणि लिखित संदेश,फोटो, व्हिडिओ कॉल हे सगळं त्यांच्यात सामान्य होऊन जातं.पण तो तरुण याचा गैरफायदा घेण्यास सुरुवात करतो.या सगळ्या गोष्टींचा वापर करून तो बालीकेला त्याच्या इच्छे प्रमाणे वागण्यास भाग पाडतो.अश्या अनेक बालिका बाल कल्याण समिती पुढे येतात.
लहान मुलां विषयीच्या गुन्ह्याबाबत एक धक्कादायक आणि अत्यंत गंभीर अहवाल समोर आलेला आहे. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये मुलांशी निगडीत सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Crimes Against Children) 400 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
किशोर वयातील बालक बालिका अजाणतेपणी अनेक प्रकारच्या आकर्षणाला बळी पडतात.कोविड काळात नाईलाजास्तव बालकांच्या शिक्षणाच्या हेतूने मोबाईल देणं भाग पडलं आणि हळूहळू बालकं त्याच्या आहारी गेली.मोबाईल मुळे कोणत्याही साईट् उघडून बघणं त्यांना सोपं झालं आणि सुरूवातीला उत्सुकता म्हणून बालकं त्यांच्या साठी नसणाऱ्या गोष्टी बघू लागतात पण नंतर ते त्याच्या आहारी जातात.
या विषया संदर्भात माझ्या मैत्रीण डॉ जयश्री नांगरे या सायबर सोल्युशन लॉ च्या कार्याध्यक्ष आणि संस्थापक असून त्यांना महाराष्ट्र विभागामध्ये विशेष सायबर कायदेशीर सल्लागार तसेच भारतातील सर्व मोठे सायबर गुन्हे हाताळले आहेत यांच्याशी चर्चा केल्यास त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
सायबर गुन्हे पोर्नोग्राफी म्हणजे कुठल्याही लहान मुलांची अश्लील किंवा आक्षेपार्ह अशी चित्रे किंवा चलतचित्रे इंटरनेट किंवा इतर कुठल्याही प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्ध करणे. ऑबसेनीटी हा प्रकार IPC आणि इन्फॉर्मेशन अँड टेक्नलॉजी २००७ ह्या कायद्यांमध्ये ऑबसेनीटीची व्याख्या दिली नाही, परंतु विश्लेषण केले आहे.लहान मुलांची अश्लील किंवा असभ्य किंवा लैंगिकता उघडकीस आणण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिजिटल चित्रे,जाहिराती, टेक्स्ट, मनोरंजनासाठी डाउनलोड केले, वाटप केले, गोळा केले, दाद मिळवण्यासाठी प्रसिद्ध केल्यास; त्यास इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी कायदा २००८ प्रमाणे कलम ६७(ब) अनुसार चिल्ड्रन्स पोर्नोग्राफ्य गुन्हा असे म्हणतात.
इन्फॉर्मेशन अँड टेक्नलॉजी कायद्याखाली कलम ६७(ब) अनुसार फौजदारी तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात दाखल करता येते. गुन्हा दाखल झाल्यास तो गुन्हा पहिल्यांदा केल्यास त्या व्यक्तीला ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १० लाखांपर्यंत दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते आणि तोच गुन्हा दुसऱ्यांदा केल्यास ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १० लाखांपर्यंत दंड किंवा दोन्ही अशा शिक्षा होऊ शकतात.
IPC १८६०, अनुभाग २९३ नाबालिकांना अश्लील सामग्री विकणे इत्यादी विरुद्ध स्पष्ट स्वरूपाने कायदा निर्दिष्ट करीत आहे. IPC १८६०, अनुभाग २९२ मध्ये उल्लेखित आहे की, जी व्यक्ती, वीस वर्षांहून कमी वय असलेल्या एखाद्या व्यक्तीला अशी काही अश्लील वस्तू विकतो, भाड्याने देतो, वितरण करतो, प्रसारित करतो किव्वा तसे करण्याचा प्रयत्न करतो तर त्यास दंड केला जाईल.
ही उपुयुक्त आणि कायदेशीर माहिती बाल कल्याण समिती ने त्यांच्या समोर येणाऱ्या पालकांना मुलांना दिली तर त्याचा फायदा त्यांना या धोक्यापासून वाचवण्यासाठी निश्चितच याचा उपयोग होऊ शकेल. बालका कडून काही चूक झाल्यास त्यांच्या मनात जी भीती निर्माण होते आणि त्यामुळे ते पुढे आणखी चुका करत जातात आणि त्याच चक्रात भरकटतात आणि एखाद्या गंभीर गोष्टीत नकळत अडकून पडतात.ज्याचा अतिशय नकारात्मक परिणाम त्यांच्या भविष्यावर होतो.
याचा विचार करता किशोर वयीन बालकांना या पासून परावृत्त करून त्यांच्या साठी योग्य तो पर्याय सुचवणं हे खूप मोठे आव्हाहन आज पालक आणि शाळे पुढे आहे.मुलांना मैदानी खेळात रुची निर्माण व्हावी यासाठी प्रोत्साहन देणं आवश्यक आहे तसेच कौशल्यपूर्ण गोष्टी शिकण्याची संधी उपलब्ध करून द्यायला हवी.
सगळ्यात महत्त्वाचं किशोर वयीन बालकांचे नियमित स्वरूपात समुपदेशन व्हायला हवं.त्यांना अतिशय आदर्श गोष्टी न सांगता वास्तिवक्तेशी निगडित असणारे तथ्य सांगून त्यावर चर्चा करणं खूप गरजेचे आहे.तसेच बालकांना चर्चेत सहभागी करून त्यांना जास्तीत जास्त व्यक्त होण्याची संधी देणं महत्त्वाचं आहे.बालक जेव्हां व्यक्त होतील तेंव्हा त्यांच्या विचारांची बैठक कशी तयार होतेय हे समजून घेण्याची संधी उपलब्ध होते.आणि त्यातून आपण त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू शकतो.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/07/IMG-20210731-WA0006-150x150.jpg)
— लेखन : डॉ राणी खेडीकर
अध्यक्ष, बाल कल्याण समिती. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800