लेखक, कवी तथा आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वर सातत्याने योगदान देत आलेले श्री राजाराम जाधव यांची चाळीसगाव येथे येत्या २७ एप्रिल रोजी होणाऱ्या बंजारा समाज साहित्य व संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
अल्प परिचय
मूळ यवतमाळ जिल्ह्यातील लाख खिंड येथील असलेल्या श्री राजाराम जाधव यांनी विविध कामे करीत एम ए, बी एड पर्यंत शिक्षण घेतले.
पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे त्यांची महाराष्ट्र शासनाच्या सेवेसाठी निवड होऊन विविध पदे भूषवून ते पु सह सचिव म्हणून ३१ ऑगस्ट २०१६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते नवी मुंबईत स्थायिक झाले.

श्री राजाराम जाधव यांची “वादळ वारा” (कवितासंग्रह) “वाळवंटातील संधिप्रकाश” (सामाजिक विषयावरील ग्रामीण लघुकथा संग्रह) “अंधार यात्रीचे स्वप्न” (वडिलांचे चरित्र) “अजिंक्यवीर” (शासकीय सेवेचा लेखाजोखा) “चंद्रकला” (कादंबरी) “हुंदके सामाजिक वेदनेचे” (वैचारिक लेख संग्रह), आई – याडी “झामाई” (काव्य संग्रह), “वंचितांचे विश्व” (वैचारिक लेख संग्रह) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
यापैकी “अंधार यात्रीचे स्वप्न” “अजिंक्यवीर”, “चंद्रकला”, “हुंदके सामाजिक वेदनेचे”, ही पुस्तके आपल्या न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स तर्फे प्रकाशित करण्यात आली आहेत.
श्री जाधव यांची सानुंजली (काव्यसंग्रह), “आपुलकीचा झरा” (मुलांशी त्यांच्या शैक्षणिक आणि महाविद्यालयीन उच्च शिक्षण कालावधीत पत्राद्वारे साधलेला संवाद) “कृतार्थ यात्री” (संपादित वैचारिक लेख संग्रह) प्रेरणादायी सप्तर्षी ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
श्री राजाराम जाधव यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
श्री राजाराम जाधव यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800