भगवान श्रीराम हे हिंदू धर्मातील एक दैवत व भगवान नारायण यांचे सातवे अवतार आहेत. वाल्मिकींनी रचलेल्या रामायण या महाकाव्याचे ते नायक आहेत. अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौशल्या यांचे ते पुत्र होत. त्यांचा जन्म चैत्रशुद्ध नवमी या तिथीला झाला.
भगवान रामचंद्रांना पुरुषोत्तम म्हटले जाते. ते सत्यवचनी, एकपत्नीव्रतस्त व परम दयाळू होते. राजा दशरथ यांनी पुत्रेष्टी यज्ञ केला ज्यामुळे त्यांना पुत्रांचा जन्म झाला. अयोध्येत सूर्यप्रकाशामुळे त्यांचा जन्म कौशल्या देवीच्या पोटी झाला. वायूच्या आशीर्वादाने भरताचा जन्म झाला. यमराजापासून लक्ष्मणाचा जन्म झाला. इंद्राच्या आशीर्वादाने शत्रूघ्नचा जन्म झाला .भगवान श्रीराम हे ज्येष्ठ भगिनी शांता यांच्यानंतर जन्मले. रामाच्या पत्नीचे नाव सीता होते. हनुमान हा रामाचा सर्वात मोठा भक्त मानला जातो. रामाने लंकेचा राजा रावणाचा वध केला.
श्रीरामांची मर्यादा पुरुषोत्तम अशी ख्याती आहे. त्यांनी राज्य, मित्र, आई-वडील अगदी पत्नीला ही सन्मानाचे पालन करण्यासाठी सोडले. रघुकुलमध्ये जन्म झालेले श्रीराम सावत्र आईच्या हट्टामुळे चौदा वर्षे वनवासाला गेले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि भाऊ लक्ष्मण यांनी सुद्धा १४ वर्षे वनवासात घालवली. भरताने न्यायासाठी मातेचा आदेश धुडकावून लावला आणि मोठा भाऊ राम यांच्याकडे जंगलात गेला. त्यांची पादुका आणली आणि गादीवर ठेवून राज्य चालवले.
राम जेव्हा वनवासी होते तेव्हा त्यांची पत्नी सीताईला रावणाने पळून नेले होते. जंगलात रामाला हनुमानासारखा मित्र आणि भक्त सापडला ज्याने रामाची सर्व कामे पूर्ण केली. हनुमान, सुग्रीव इत्यादी वानर जातीतील महापुरुषांच्या मदतीने रामाने सीता शोधली. मदतीने समुद्रावर पुल बांधून लंकेत पोहोचले आणि रावणाशी म्हणजेच असत्याशी युद्ध केले. त्याचा वध करून त्यांनी सीतेला परत आणले. राम अयोध्येला परत आल्यावर भरताने राज्य त्यांच्या हाती दिले. श्रीरामांनी अनेक वर्षे अयोध्येवर चांगले राज्य केले. त्यामुळे आजही सुशासनाची उपमा रामराज्य म्हणून देतात.
श्रीरामानंतर लव आणि कुश या त्यांच्या राजपुत्रांनी राज्य चालवले. श्रीराम आदर्श पुत्र होता . त्यांनी आई-वडिलांच्या आज्ञेचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम लक्ष्मणाची उपमा देतात.
एका परिटाने सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर त्यांनी आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता राजधर्म म्हणून धर्मपत्नीचा त्याग केला.
श्रीराम हे आदर्श शत्रूसुद्धा होते. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो तेव्हा राम त्याला सांगतात, “मरणाबरोबर वैर संपते, तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे”. श्रीरामांनी धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या म्हणून त्यांना ‘मर्यादा पुरुषोत्तम’ असे म्हटले जाते.
भरताचा जन्म अयोध्येत राजा दशरथाचा दुसरा मुलगा आणि तिसरी पत्नी कैकेयी हिचा एकुलता एक मुलगा म्हणून झाला. त्याने आपले बालपण त्याचा मोठा सावत्र भाऊ आणि कोसल राजाचा वारस असलेल्या राम आणि त्याचे धाकटे भाऊ लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्यासोबत घालवले.
लक्ष्मण रामाचा निष्ठावान होता तर त्याचा जुळा भाऊ शत्रुघ्न हा भरताचा एकनिष्ठ होता. राजा कुशलध्वज यांनी दशरथाच्या इष्वाकू आणि निम्मी यांच्या राजघराण्यातील एकतेची विनंती मान्य केली म्हणून भरताचा विवाह कुशल ध्वजाची कन्या मांडवीशी झाला.
श्रीराम १४ वर्षे वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून न्यायाने राज्य चालवले आणि बंधू परत आल्यानंतर त्यांच्या हाती ते राज्य सोपवले.
वाल्मीकी रामायणानुसार रावण पुलत्स्य मुनींचे पुत्र महर्षी विश्रवा आणि राक्षसी कैकशीचा मुलगा होता. वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडातील वर्णनानुसार पौराणिक काळात माली, सुमाली आणि मलेवण नावाची अत्यंत क्रुर राक्षस भावंड होती. या तिन्ही भावांनी ब्रह्माची कठोर तपस्या केली आणि ब्रह्मदेवाने त्यांना प्रसन्न होऊन बलशाली होण्याचे वरदान दिले. ब्रह्माजी कडून वरदान मिळाल्यानंतर तिन्ही भावांनी स्वर्गलोक, पृथ्वी लोक आणि पातळलोक येथील देवतांचे ऋषीमुनी आणि मानवावर अत्याचार करण्यास सुरुवात केली पण जेव्हा अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढला तेव्हा ऋषीमुनीं देवता भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांच्याकडे या तिन्ही भावांच्या अत्याचाराचे वर्णन केले. भगवान विष्णू नी त्यांना सांगितले तुम्ही तुमच्या लोकात जावा आणि निर्भयपणे रहा. मी या दुष्ट राक्षसांचा नक्कीच विनाश करीन. इकडे या तिन्ही राक्षसांनी सैन्यासह इंद्रलोकावर हल्ला केला. त्यानंतर भगवान विष्णू इंद्रलोकात आले आणि त्यांनी राक्षसांचा संहार करण्यास सुरुवात केली. या संहारात सेनापती माली यांच्यासह अनेक भुते मारली गेली आणि बाकीची लंकेकडे पळून गेली.
एके दिवशी सुमाली पृथ्वी लोकात फिरायला आला आणि त्याने कुबेराला पाहिलं पण देवांच्या भीतीमुळे तो परत पातळ लोकांकडे परत गेला आणि विचार केला की देवांच्या भीतीमुळे आपल्याला किती काळ इथे राहावे लागेल? काही क्षणानंतर त्यांना कुबेर लक्षात आले आणि त्यांच्या मनात विचार आला की आपल्या मुलीचे लग्न ऋषी विश्रवाशी केले तर त्याला कुबेरासारखा तेजस्वी मुलगा सहज होईल. राक्षसी असूनही कैकसी एक धार्मिक स्त्री होती म्हणून तिने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करणे आपला धर्म मानले आणि लग्नासाठी संमती दिली. तिने वडिलांना नमन केल्याने त्यांच्या आज्ञेनुसार महर्षी विश्रवांना भेटायला पृथ्वीवर गेली. अशा प्रकारे परमपराक्रमी महर्षी विश्रवाकडे जाऊन त्यांच्याशी विवाह करावा आणि पुत्र प्राप्त करावा तोच पुत्र देवतांपासून अक्षर संरक्षण करू शकतो असे सांगून कैकशीचा विवाह त्यांच्याशी केला गेला.
त्या दोघांना दशानन (रावण), कुंभकर्ण, शुर्पणखा आणि बिभीषण अशी चार मुले झाली. श्रीराम आणि सीतामाई वनवासासाठी फिरत असताना रावणाकडून सीतामाईंचे अपहरण झाले आणि पुढे वानरांच्या मदतीने श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि सीतामाईंना सुखरूप परत आणले. वनवास संपून अयोध्येला गेल्यानंतरही श्रीरामांना सीतामाईंचा त्याग करावा लागला.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240418-WA00002-150x150.jpg)
— लेखन : सौ. भारती सावंत. खारघर, नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800