प्रसिध्द लेखिका माधवी कुंटे ह्यांच्या ९९ आणि १०० व्या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच मुंबईत खूप थाटात झाले.
१०० वे पुस्तक ही अतिशय दुर्मिळ घटना. पार्ल्याच्या टिळक मंदीरात हा कार्यक्रम झाला. अनेक मान्यवर लेखक, संपादक, प्रकाशक उपस्थित होते.
लेखिका मंगला गोडबोले अध्यक्ष होत्या. कथालेखिका मोनिका गजेंद्रगडकर ह्या प्रमुख पाहुण्या होत्या. निवेदन करण्यासाठी चित्रा वाघ होत्या.
दोन्ही पुस्तकांचे प्रकाशक आणि माननीय आमदार पराग आळवणी हेही व्यासपिठावर होते. सिध्दीविनायक देवळाचे गुरूजी त्यांना आशिर्वाद द्यायला आले होते. सर्वच मान्यवरांची मनोगते छान झाली.
माधवी ताईंच्या १०० पुस्तकांचा आढावा घेणारी ध्वनिफित यावेळी दाखवण्यात आली.
माधवी ताई आणि लेखिका चारूशिला ओक ह्यांनी पार्ल्यात कथाक्लब नावाची एक साहित्यिक चळवळ सुरू केली आहे. त्यांचे मार्गदर्शन दर महिन्याला आम्हाला मिळते. माधवी ताई म्हणतात “या माझ्या मुलीच आहेत.”
माधवी ताई म्हणजे अतिशय हसऱं उत्साही व्यक्तिमत्व, मनमिळावू, हळू शांत संयमी बोलणं आणि प्रेमळ स्वभाव !…सुंदर हस्ताक्षर आणि लेखनातलं सातत्य ! त्यामुळे जनसंपर्कही दांडगा, आणि लेखनाचा आवाकाही मोठा! लेखनाच्या सर्व प्रकारात त्यांनी प्राविण्य मिळवून हा १०० पुस्तकाचा पल्ला गाठला आहे. आम्ही कथाक्लबच्या १५ जणींसाठी आजचा दिवस आनंदोत्सवा सारखाच होता. माधवीताई आमच्या गुरू असून आमच्यावर इतकं प्रेम करतात कि आजचा हा अद्भूत आणि प्रेरणादायी कार्यक्रम पाहून आम्ही सर्व जणी भारावून गेलो. त्यांच्या पुढील सर्व उपक्रमांना असेच यश मिळो ही शुभेच्छा.
— लेखन : चित्रा मेहेंदळे.. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800