Saturday, July 27, 2024
Homeबातम्यासानेगुरुजी राष्ट्रीय शिक्षक होते - देवेंद्र भुजबळ

सानेगुरुजी राष्ट्रीय शिक्षक होते – देवेंद्र भुजबळ

साने गुरुजींमध्ये देशप्रेम ओतप्रोत भरलेले होते. देशभर स्वातंत्र्याचा संग्राम सुरू आहे, आणि आपण काय बघत राहायचे काय ? असे त्यांना वाटत होते. म्हणून १९३० साली ते चांगल्या पगाराची शिक्षकाची नोकरी सोडून स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले आणि पुढे त्यांनी राष्ट्रीय शिक्षकाची भूमिका बजावली असे प्रतिपादन महाराष्ट्राच्या माहिती खात्याचे निवृत्त संचालक तथा न्युज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी केले

कोकण मराठी साहित्य परिषद चेंबूर शाखा आणि लोकमान्य टिळक लायब्ररी चेंबूर यांच्या संयुक्त विदमाने लोकमान्य टिळक लायब्ररी मध्ये आयोजित केलेल्या पूज्य साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती वर्षाचे निमित्ताने मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला “पूज्य साने गुरुजींचे शैक्षणिक योगदान” या विषयावर आयोजित कार्यक्रमात श्री देवेंद्र भुजबळ हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर लोकमान्य टिळक लायब्ररीचे अध्यक्ष श्री रवींद्र विठ्ठल पुरव, कोकण मराठी साहित्य परिषदेचे चेंबूर शाखेचे अध्यक्ष रविकिरण पराडकर उपस्थित होते.

श्री देवेंद्र भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, साने गुरुजींचे बालपण हे सुखवस्तू होते. त्यांचे आजोबा व वडील सुद्धा महसूल कलेक्टर होते. त्या मानाने ते खूप सुस्थितीत होते. पण काही कारणांनी त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली. त्यामुळे त्यांना पालगड हे मूळ सोडून पुणे, औंध संस्थानात शिक्षण घ्यावे लागले. एम ए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते अमळनेर येथील तत्त्वज्ञान केंद्रात दाखल झाले. पुढे अमळनेर येथीलच प्रताप विद्यालयात १९२४ ते १९३० असे सहा वर्षे शिक्षक आणि रेक्टर म्हणून राहिले.

सानेगुरुजी शिक्षक असतानाचे काही प्रसंग सांगताना श्री भुजबळ म्हणाले, वर्गातील एक विद्यार्थी बिडी ओढतो, म्हणून काही विद्यार्थ्यांनी सानेगुरुजींकडे तक्रार केली. दुसऱ्या दिवशी गुरुजी त्या मुलाला शिक्षा करतील, अशी त्यांची अपेक्षा होती. पण माझा एक विद्यार्थी बिडी ओढतो, हे शिक्षक म्हणून मी कमी पडलो, असे म्हणून स्वतःच्याच हातावर त्यांनी छड्या मारून घेतल्या. तर दुसऱ्या एका प्रसंगात काही विद्यार्थी दर शनिवारी शनीच्या मंदिरात तासंतास वेळ घालवतात, हे कळल्यावर त्यांनी त्या विद्यार्थांना तो वेळ अभ्यासात घालवा तर त्याचा फायदा होईल असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या विचाराला व लेखणीला चालना मिळावी म्हणून त्यांनी “विद्यार्थी” नावाचे हस्तलिखित सुरू केले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या लेखणीला चांगली चालना मिळायची, असे म्हणत.

राष्ट्र सेवा दलाची, साधना ट्रस्ट ची स्थापना, ७३ पुस्तकांचे लेखन, अनुवाद अशा साने गुरुजींच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत बालपणापासून ते स्वातंत्र्य संग्रामापर्यंतचा त्यांचा प्रवास रसिक श्रोत्यांपुढे मांडला.

यावेळी आयुष्याच्या जडणघडणीतील गुरूंचे योगदान सांगणाऱ्या “मी आणि माझे गुरु” या सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जेष्ठ कवयित्री जयश्री भिसे, अनघा शिंगरूट, संजीव पुरव, कवयित्री विशाखा कुलकर्णी, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त तथा जेष्ठ कवी रविकिरण पराडकर, खंडू आढांगळे, मंगला उदामले, मंदाकिनी यादव, सौ पौर्णिमा शेंडे आदींनी आपले अनुभव श्रोत्यांपुढे मांडले.

या कार्यक्रमात न्युज स्टोरी टुडे च्या प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांनी त्यांच्या प्रकाशनाची काही पुस्तके वाचनालयास भेट दिली. तर कोमसाप चेंबूर शाखेच्या वतीने ११५ पुस्तके भेट देण्यात आली. ही पुस्तके जमविण्यासाठी श्रीमती विशाखा कुळकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवियत्री विशाखा कुलकर्णी यांनी केले. तर समारोप कवी अनंत धनसरे यांनी केला.

अनंत धनसरे

— लेखन : अनंत धनसरे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments