“मॉकटेल, थंडाई”
‘लेमन आईस टी’ हे एक मॉकटेल हल्ली खूप लोकांच्या आवडीचे झाले आहे. काही जण कोल्ड कॉफी जशी आवडीने पितात तशाच आवडीने ‘कोल्ड टी’ सुद्धा पितात.
उन्हाळ्यात चहाप्रेमी लोकांची नेहमीच खूप पंचाईत होते. कारण कितीही तल्लफ आली तरी रणरणत्या उन्हात गरम चहा पिणे नकोसे होते. शिवाय शरीरातील तापमान आणखी वाढते. त्यामुळे उष्णतेचे विकार म्हणजे उन्हाळी लागणे, घामोळ्या येणे, ज्वर येणे, पोटात, सर्व शरीरात जळजळ होते, त्वचा, डोळे लाल होणे असे अनेक आजार होतात. म्हणून नाईलाजाने ‘नको तो चहा !’ असे म्हणावे लागते. म्हणूनच आज यावर खास एक मस्त उपाय करू या. चला मग चहा पिऊया तो ही सुरेख तल्लफ भागवणारा आणि कोणत्याही दुष्परिणामाशिवाय !
साहित्य : चहाचे सिरप आधी बनवून ठेवले की मग चहाचे तऱ्हेतऱ्हेचे प्रकार कधीही आणि झटपट बनवता येतात. त्यासाठी आपण आधी सिरप बनवू.

चहाच्या सिरप किंवा स्टॉक साठी साहित्य : एकदम कोवळ्या चहाच्या पानांची पाने पांढरट असतात त्याचा ‘व्हाईट टी’ बनवतात, त्यापेक्षा थोडी मोठी पाने हिऱवट असतात त्या पासून ‘ग्रीन टी’ बनवतात, त्यापेक्षा थोडी जास्त पिकत आलेली लालसर मोठी पाने असतात त्या पासून बनवलेल्या चहाला ‘ओलॉंग टी’ म्हणतात तर रेग्युलर काळ्या चहाच्या पावडर पासून बनवलेल्या चहाला ‘ब्लॅक टी ‘ असे म्हणतात. त्यासाठी….4 चमचे एकदम बारीक केलेली कोणतीही चहाची पावडर..5 मिरे , पाव चमचा बडीशेप,10 चमचे साखर, चिमूटभर मिठ, चिमूटभर दालचिनी पावडर किंवा वेलची पावडर, 5..6 पुदिन्याची पाने, 1 लिटर पाणी.
कृती : व्हाईट टी , ग्रीन टी , ओलॉंग टी, ब्लॅक टी या चार ही चहाचे सिरप बनवण्यासाठी प्रत्येकाचे पाणी टेम्परेचर वेगवेगळे असते.
व्हाईट चहाला सर्वांत कमी गरम म्हणजे 75 ते 80 अंशसे.,
ग्रीन टी साठी 80 ते 85,
ओ लॉंग टी साठी 85 ते 90 आणि
ब्लॅक टी साठी 100 अंशावर उकळावा लागतो.
तरच त्याची टेस्ट परफेक्ट येते.
1 लिटर पाणी उकळायला ठेवून ते गरम झाले की त्यात चहा पावडर घालावी. मग साखर घालून भरपूर उकळावे म्हणजे ती विरघळुन पाक बनला की घट्टपणा आणि चमक दोन्ही मस्त येते. सर्व चहाचा अर्क सुद्धा त्यात उतरतो. मग त्यात बडीशेप, पुदिना, मिरे, वेलची पूड किंवा दालचीनी पूड घालून आवडत असेल तर किन्चित सुंठ पावडर घालून मिठ घालावे व गॅस बंद करावा. थंड झाल्यावर हे एकदम बारीक छिद्राच्या गाळणीतून गाळून ठेवावे. आपल्या आवडीनुसार कोणतेही फ्रुट्स, लिंबू वापरून मस्त थंडगार आईस टी बनवू शकतो. हे सिरप फ्रीझमध्ये भरपूर दिवस राहते. आता हे सिरप वापरून आज आपण लेमन आईस टी बनवू.
लेमन आईस टी साठी लागणारे साहित्य : अर्धा कप सिरप, अर्धे लिंबू, 2 चमचे लिंबाचा रस, अर्धा ते 1 चमचा साखर, 5..6 आईसक्युब्ज.
सजावटी साठी लिंबाची पातळ गोल चकती, पुदिन्याची 2..3 पाने, आवडत असल्यास 1 चमचा भिजवलेले सब्जा बी.
कृती : प्रथम लिंबाची एक पातळ चकती काढून बाकीच्या लिंबाचे बारीक तुकडे करून ते काचेच्या ग्लासमध्ये घालाव्यात. मग त्यात पुदिन्याची पाने घालून साखर घालावी. आता एका लाकडी दांड्याने ते हलकेच क्रश करावेत म्हणजे पुदिना आणि सालीसहित लिंबाचा सुरेख स्वाद उतरतो. आता त्यात लिंबाचा रस, भिजवलेले सब्जाचे बी घालुन नंतर त्यात ग्लास भरेपर्यंत आईसक्युब्ज घालावेत व त्यावरून ब्लॅक टी सिरप घालावे म्हणजे फ्रेश चहाचा सुगंध येईल. स्टिकने थोडेसे हलवून ग्लासवर सजावटीसाठी पुदिन्याचे पान आणि ग्लासच्या काठावर लिंबाची चकती लावावी आणि हा थंडगार लेमन आईस टी सर्व्ह करावा.
वैशिष्टय : हा थंडगार आईस टी तब्येतीसाठी खूपच उपयुक्त आहे. या धावपळीच्या जीवनात आता प्रत्येकानेच आपल्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच आता बरेच लोक जागरूक झाले आहेत त्यामुळे आता ग्रीन टी, आईस्ड टी, लेमन टी, जिंजर टी, हनी टी, तसेंच वेगवेगळी आवडती फळे वापरून सुद्धा कोल्ड टी बनवला जातो. वजन, बीपी, शुगर कंट्रोल मध्ये ठेवून त्वचा, केस, डोळे, हृदय, पोटाचे आजार या सर्वांवर हे एखाद्या रामबाण औषधासारखे काम करते. स्मरण शक्ती वाढते, आपले मानसिक आरोग्य उत्तम राहते. म्हणुनच याला एनर्जी ड्रिंक असेही म्हटले जाते. शरीरातून नको असलेले घटक, टॉक्झिन्स बाहेर टाकून व्हिटॅमिन्स, शरीराला पुरवणे, कॅलरीज बर्न करून चरबी, वजन कमी करणे, शरीरात थंडावा वाढवणे … असे असंख्य फायदे असून मुख्य म्हणजे चहाची तल्लफ भागवून टेस्टी शितपेय पिण्याचे खुपच समाधान मिळते. करून पाहाच मग आता.
थंडाई :
आपल्या संस्कृतीत प्रत्येक सण, उत्सव भरपूर आहेत आणि त्या साजरे करण्याच्याही खास पद्धती आहेत. आपले पूर्वज खरोखर खूप हुशार होते. त्यांनी प्रत्येक ऋतुतील सणांसाठी अभ्यासपूर्वक जे आरोग्यासाठी उत्तम असतील असे खाद्यपदार्थ करण्याची प्रथा सुरु केली. जसे संक्रांतीला थंडी सुरु असते, तेंव्हा तीळ स्निग्धता देतात तर गुळामुळे उष्णता निर्माण होते. हिवाळ्यात तेलकट, तुपाचे, मसालेदार पदार्थ खावेत, तर पावसाळ्यात पोटाला पचायला हलके असे गरम पदार्थ खावेत, तसेंच उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहावे म्हणून शितपये, रसदार फळे, थंडावा देणारे पदार्थ खाणे उत्तम असते. म्हणूनच उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच धुळवडीला, रंग पंचमीला तर ही थंडाई बनवली जातेच, पण उन्हाळ्यात सतत ही बनवून सेवन केली जाते कारण ती आरोग्य उत्तम राखण्यासाठी खुप मोलाची असते त्यामुळे ती बनवण्याची तयारी करू.

साहित्य : 1 चमचा खसखस, 1 चमचा देशी गुलाबाच्या वाळवलेल्या पाकळ्या, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा मगज बी, 1 कप साखर, 8..10 वेलदोडे, प्रत्येकी 5..6 काजू, बदाम, पिस्ते, मनुका, मिरे, केशर , चिमूटभर सुंठ पावडर, किंचित स्वादासाठी असेल तर पानात घालतो ते मेंथोल, 1 लिटर थंड दूध, अर्धा ग्लास पाणी.
कृती : प्रथम खसखस, मगज बी, ड्रायफ्रुट्स, वेलदोडे, गुलाबाच्या पाकळ्या, मिरे, बडीशेप अर्धा ते 1 तास भिजत ठेवावेत. मिक्सरच्या भांड्यात सर्व भिजवलेले साहित्य घालून मेन्थोल, सुन्ठ घालावी व त्यात सर्व व्यवस्थित फिरण्यासाठी पाणी घालून एकदम बारीक पेस्ट होईल असे वाटून घ्यावे. लगेच करून प्यायची असेल तर हे वाटतानाच साखरही घालावी म्हणजे सर्व लगेच बारीक होते आणि साखरही लगेच विरघळते. मग हे बारीक गाळणीतून किंवा पातळ कापडातुन व्यवस्थित गाळून घ्यावे. जास्त चोथा राहिला असेल तर पुन्हा एकदा थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून फिरवून गाळून घ्यावे. नंतर घट्ट झाकणाच्या बाटलीमध्ये भरून ठेवावे. हे फ्रीजमध्ये 2 ..4 दिवस चांगले राहते. मग जेंव्हा करायची असेल तेंव्हा एका ग्लासासाठी दीड ते 2 चमचे प्रिमिक्स घालावे व त्यात थंडगार दूध व केशर काड्या घालून दुसऱ्या भांड्यात घालत फेस येईपर्यंत उंचावरून वर.. खाली करावे. भरपूर फेस आला की मग ते ग्लासमध्ये घालून त्यावर सजावटीसाठी ड्रायफ्रुटसचे पातळ काप व केशर काडी, एखादी गुलाबाची पाकळी घालून थंडगार सर्व्ह करावी.
जास्त दिवसांसाठी प्रिमिक्स बनवायचे असेल तर साखरेत बुडेपर्यंत पाणी घालून उकळण्यास ठेवावे. सर्व साखर विरघळली की त्यात मिक्सर मधून फिरवलेले गाळुन ठेवलेले पण साखर न घालता वाटलेले वाटण घालावे व केशराच्या काड्या घालाव्यात. त्यातील बुडबुडे संपले की 2 मिनिटे ठेवून खाली काढून थंड झाले की घट्ट झाकणाच्या बाटलीमध्ये भरून ठेवावे. 1 ग्लास बनवण्यासाठी 1 चमचा घालून आधीच्या थंडाई बनवन्याच्या सांगितलेल्या पद्धतीनेच बनवावी. म्हणजे कधीही झटपट बनवता येते. ही 3.. 4 महिने सुद्धा छान टिकते. आहे कि नाही बनवायला सोपी ? पण या थंडाईचे गुण अगणित आहेत बर का ! पाहायचे आहेत ?
वैशिष्टय : थंडाई म्हणजे उन्हाळ्यासाठी तर एक जादूची कांडीच आहे. ती प्यायल्यामुळे अद्भुत आणि असंख्य फायदे मिळतात. बदामामुळे स्मरणशक्ती वाढते, काजू, पिस्ते, दूध स्निग्धता देतात म्हणून त्वचा, केस यांना फायदा होतो तर बडीशेपे मधल्या अँटी इन्फ्लीमेन्ट्रि गुणधर्मामुळे बद्धकोष्ठता, पोटाचे विकार, गॅसेसची समस्या, अपचनाची समस्या दूर होऊन पचन शक्ती वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मिरे, वेलदोडे, सुंठ यासारख्या मसाल्याच्या पदार्थामुळे ऊर्जा मिळते, मिऱ्यांमध्ये सुज उतरण्याचा खास गुणधर्म असतो. वजन नियंत्रण होते. खसखशीमुळे शान्त .. झोप लागते त्यामुळे मन शान्त राहते. स्मरणशक्ती वाढते. मगज बी, मेन्थोल, गुलाब, सब्जाचे बी.. घातल्यास, शरीरातील उष्णता कमी करून थंडावा निर्माण करतात. त्यामुळे उष्माघात, पित्त, जळजळ, डीहायड्रेशन होत नाही. याशिवाय सुद्धा थंडाई मधून अनेक जीवनसत्वे, प्राथीने, खनिजे मिळतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तितकीच टेस्टी सुद्धा असते. म्हणूनच थंडाईचे सेवन करणे आबालवृद्धांसाठी हितकारकच आहे.
— लेखन : सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800