Saturday, July 27, 2024
Homeपर्यटनहंपी : वेगळ्या दृष्टी कोनातून

हंपी : वेगळ्या दृष्टी कोनातून

कर्नाटकातील हंपी हे पर्यटन स्थळ म्हणजे भारताचा ऐतिहासिक, सांस्कृतिक समृद्ध, श्रीमंत वारसा आहे. याचा संबंध रामायणातील किष्किंधा प्रकरणाशी तर आहेच. पण अलीकडील विजयनगर साम्राज्य याशी देखील इथल्या वास्तूचे नाते जुळले आहे. ‘ किष्किंधा ‘चा अर्थ वानर भूमी. इथे वाली सुग्रीव यांच्या युध्दा च्या पाऊल खुणा आहेत. विजय नगर साम्राज्यातील शिवाचे विरूपाक्ष मंदिर,हेमकुटा पर्वतावरील गणेश मंदिर,अंजिणाद्री टेकडी वरील हनुमान जन्मस्थान, लोटस महाल, लक्ष्मी नरसिंह मंदिर, त्या काळातील राण्याचे स्नानगृह, हट्टी चा तबेला, पुष्करणी, तीन मित्र उंचीचे बदवी शिवलिंग.. अशी अनेक स्थळे बघताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते.. ती म्हणजे आपल्याकडे प्राचीन काळा पासून वास्तुशिल्प, मूर्ती कला, स्थापत्य शास्त्र, नगर रचना व्यवस्थापन किती तरी प्रगत होते !

या शिल्प मंदिरातील भव्य दिव्य कोरीव काम, त्यातील लय, आकार, सिमित्री, भूमिती, हे अद्भुत, चमत्कारिक असेच आहे. शेकडो, हजारो वर्षापूर्वी निर्मित ही मंदिरे सिव्हिल इंजिनियरिंग, आर्किटेक्चर, मेक्यानिकल, फिजिक्स, धर्म शास्त्र, ज्योतिष शास्त्र अशा सर्व विषयांचा कौशल्याने उपयोग करून निर्माण केल्या गेली आहेत.
जल शुध्दी करण, व्यवस्थापन, संरक्षण, पर्यावरण, नैसर्गिक समतोल, असा सर्वागीण विचार, अभ्यास या निर्मितीत जाणवतो. एवढा प्रगत, समृद्ध, श्रीमंत असा हा आपला देश तेव्हा सुध्धा जगासाठी प्रगतीचा, नैतिक मूल्याचा आदर्श होता असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

पण ही कला, संस्कृती, हे ज्ञान नष्ट करण्यात, या शिल्पमूर्ती कलेचा विध्वंस करण्यात मुस्लिम मोंगल राज्य कर्त्यानी, अरब देशांनी, ब्रिटिश ख्रिश्चन शासन कर्त्यानी जी भूमिका बजावली ती विषण्ण करणारी आहे. आज या भंगलेल्या मूर्ती, तोडफोड झालेली मंदिरे, उद्ध्वस्त झालेला ऐतिहासिक शहराचा परिसर बघताना मन व्यथित होते.

आपण या मागच्या इतिहासाचे अध्ययन केले तर यामागे आपली निष्क्रियता, आपल्यातील जाती भेद, सत्तेच्या लालसेपोटी होणारी आपसातील भांडणे, एकीचा अभाव हेच सगळे कारणीभूत आहे या जाणिवेने अधिक दुःख होते. आपली मंडळी, आपली राज्ये, आपली संस्थाने एकसंघ राहिली असती, एकजुटीने राहिली असती तर कोणीही माईचा लाल आपले वाकडे करण्याची हिम्मत करण्यास धजावला नसता हेही तितकेच खरे.

त्या काळी आपल्यात नैतिक, धार्मिक, वैज्ञानिक अशा सर्व प्रकारचे सामर्थ्य असूनही, आपसातील मतभेद, राज्य सत्तेची लालसा, अंतर्गत दुहीचे राजकारण याचा फायदा बाहेरून आलेल्या मुस्लिम, अरब,पोर्तुगीज, ख्रिश्चन मंडळींनी घेतला. आपली लूट केली. आपले नैसर्गिक धन लुटले. आपले वैज्ञानिक, गणिती शोध चोरून नेले. त्यात फेरफार करून ते स्वतःचे म्हणून खपवले. आपण मूग गिळून बघत बसलो. त्याची फळं आजही आपण भोगतो आहोत.

आपण कधीही देश म्हणून एकत्र नव्हतो. आजही एकच देशातील दहा राज्याची तोंडे दहा दिशेला आहेत. देशाची एक भाषा आपल्याला मान्य नाही. एक शैक्षणिक धोरण मान्य नाही. एक समान कायदा मान्य नाही. खरे तर शेतकरी म्हणून सर्व शेतकऱ्याच्या समस्या सारख्या असायला हव्यात. पण एकाच राज्यात शेतकरी आंदोलन होते. एकच भागात आरक्षण विषयक मागणीचा जोर दिसतो. खरे पाहिले तर या अशा समस्या साऱ्या देशाच्या समस्या ठरल्या तर निर्णय सोपा ठरेल. पण असे घडण्यासाठी आवश्यक असलेला एकोपा आपल्यात नाही. आधीही नव्हता. आताही नाही. यामुळे आपले किती प्रचंड नुकसान झाले हे हम्पीचे भग्न अवशेष बघताना जाणवते. एकीकडे या शिल्प कलेचे, मूर्ती कलेचे, स्थापत्य विज्ञानाचे कौतुक करायचे अन् दुसरीकडे ती लुटालूट, ती तोडफोड पाहून विषण्ण व्हायचे असा ऊन पावसाचा श्रावण बघायला, अनुभवायला मिळतो हंपी ला भेट दिल्यावर !

आता तरी आपण आपल्या सनातन हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगायला शिकले पाहिजे. त्या दृष्टीने ३७० कलम, समान नागरी कायदा, राम मंदिर निर्माण, काशी मथुरा वृंदावन येथील मंदिराचे पुनर्वसन, शहराची मुस्लिम नावे बदलण्याचे निर्णय याकडे सर्वांनीच सकारात्मक दृष्टीने बघण्याची गरज आहे. केवळ व्होट बँक डोळ्यापुढे ठेवून चांगल्या निर्णयांना विरोध करणे थांबले पाहिजे. आपल्या कडे सर्वच धर्मांचा आदर केला जातो. पण त्यासाठी आपली संस्कृती, आपली नैतिकता, आपली धर्म निष्ठा गुंडाळून ठेवण्याची, उगाच कुणाचे लाड करण्याची मुळीच गरज नाही. कारण त्याचे विपरीत परिणाम आपण भोगले आहेत. आपल्या आया बहिणीवर अत्त्याचार झालेले, आपले ज्ञान, आपले खजिने लुटले गेलेले आपण अनुभवले आहे. त्याची पुनरावृत्ती व्हायला नको.आपणच आपल्या राष्ट्राचे, धर्माचे सत्व जपले पाहिजे. एरवी पुन्हा इतिहासाची पूनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुका जवळ आल्या आहेत. सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयाला काही जण विरोधासाठी विरोध करतील. अर्थाचा अनर्थ करून लोकांची दिशाभूल करतील तेव्हा सुजाण नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.

हंपी ला भेट दिल्यावर नेहमी सारखा प्रवास वर्णनाचा लेख लिहिण्या ऐवजी या वेगळ्या मुद्द्याला स्पर्श करणे मला गरजेचे वाटले. जागा तीच असते. दृष्टी तीच असते. फरक असतो दृष्टिकोनात !

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे.
माजी कुलगुरू, हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. हंपी हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे.त्याचे वर्णन अप्रतिम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments