Tuesday, June 17, 2025
Homeसाहित्यअण्णाभाऊ साठे : राष्ट्रीय साहित्यिक

अण्णाभाऊ साठे : राष्ट्रीय साहित्यिक

थोर राष्ट्रीय साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचा एक ऑगस्ट हा जयंती दिवस आहे. त्यानिमित्ताने या थोर चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीला आदरयुक्त श्रद्धांजली…

— संपादक

“माझा माझ्या देशावर, जनतेवर नि त्याच्या संघर्षावर अटळ विश्वास आहे.”
“हा देश सुखी आणि समृद्ध व्हावा, इथे समानता नांदावी, या महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे, अशी मला रोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पहात मी लिहीत असतो.”
“आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे, आम्हाला मांगल्य हवे आहे.”
” साहित्य हा जगाचा तिसरा डोळा आहे.”
हे मुखोद्गार आहेत थोर लेखक अण्णाभाऊ साठे (तुकाराम भाऊराव साठे) यांचे.

अण्णाभाऊ साठे म्हणजे महाराष्ट्राच्या पावन भूमीतील व मराठी साहित्य जगतातील जागतिक कीर्तीचा तेजस्वी ध्रुवतारा ! भारतीय समाजाचा त्यांनी वैश्विक स्वरूपाने विचार केला आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उमटले. त्यांनी त्यांच्या साहित्यात तीन महत्त्वाची साहित्यिक मूल्ये जपण्याचा प्रयत्न केला. देशाचे स्वातंत्र्य, महिलांची प्रतिष्ठा व शील आणि माणसाचा स्वाभिमान या तीन मूल्यांची त्यांनी जीवापाड जपणूक केली. त्यांच्या साहित्यिक योगदानामुळेच ते प्रकाशाचा दीपस्तंभ ठरले.

अण्णाभाऊ साठे यांचे नाव घेताच पहिली मनात येते ती त्यांची सर्वोत्कृष्ट मास्टरपीस कादंबरी “फकिरा” आणि “माझी मैना” ही छक्कड. ६०/६५ वर्षांपूर्वीच्या या साहित्यकृती आजही तितक्याच ताज्या आणि रसरशीत आहेत. त्या वाचताना मन अक्षरश: झपाटून जाते.

फकिरा कादंबरीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी सामाजिक एकीकरण, संस्कार, राष्ट्रधर्म, राष्ट्र, राजकीय व्यवस्था, प्रेम अशा उच्च विचारांची बीजे पेरली. दीन—दलितांचे हीन जीवन, सहिष्णुता, लढवय्येपणा याचेही दर्शन “फकिरा” या कादंबरीत होते. कादंबरीतला “फकिरा” हा नायक म्हणजे सामाजिक आणि राष्ट्रीय उदात्त, उन्नत भावनांचा वस्तू पाठच म्हणावा लागेल. कादंबरी वाचून अनेक वर्ष उलटली असतील पण फकिरा नावाची व्यक्ती मन:पटलावरून पुसली जाऊच शकत नाही. माणुसकीची चाड असणारा, स्वाभिमानी, बेडर, निर्भय, निर्मळ मनाचा, अन्यायाविरुद्ध बंड करण्याची धमक असणारा, सर्वमान्य नायक फकिरा. श्रद्धा व भक्ती भाव यांचा समतोल यात साधलेला आहे. या कादंबरीत जोगिणींचा खेळ आहे पण तो अंधश्रद्धेवर तोललेला नसून लोकसंस्कृतीशी जोडणारा आहे. गावासाठी आत्मसमर्पण करणारा व हसत फासावर जाणारा हा उमदा, दिलदार, लढवय्या फकीरा मनावर ठसून राहतो. फकिरा या कादंबरीला १९६१ साली उत्कृष्ट कादंबरीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

अण्णाभाऊंच्या कृतिशील लेखनाचे मूळ त्यांच्या जन्मात आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी त्यांचा जन्म एक ऑगस्ट १९२० रोजी झाला. गरीब आणि उपेक्षित समाजात जगत असताना त्यांनी जे सोसलं, अनुभवलं, त्या फटकाऱ्यातून ही साहित्य निर्मिती झाली म्हणून ती कृतिशील! परिवर्तनीय आणि संवेदना जागवणारी आहे.

वास्तविक अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळेत गेलेले होते. त्याला कारण म्हणजे सवर्ण जातीच्या लोकांचा भेदभाव. पण जाणतेपणी त्यांच्यावर कार्ल मार्क्स, श्रीपाद डांगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा जबरदस्त प्रभाव पडला. दलित समाजातील लोकांच्या, कामगार जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी, त्यांचे जीवन, त्यांच्या व्यथा, समस्या यांना समाजापुढे मांडण्यासाठी त्यांनी त्यांच्या कथांचे माध्यम वापरले. ‘कृष्णाकाठच्या कथा’ हे एक असंच त्यांचं गाजलेलं पुस्तक.

दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर (१९५८) भाषणात ते म्हणाले होते, “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित आणि कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे.” त्यांचे पहिले नमन हे परंपरेप्रमाणे गणरायाला नसून कामगारांना, राष्ट्रीय पुरुषांना, हुतात्म्यांना असे.

असा हा जबरदस्त धडाडीचा, तळमळीचा समाज सुधारक, लेखक. वास्तविक साहित्य विचाराचे मापदंड काळाबरोबर सतत बदलत असले तरीही गेली आठ दशके अण्णाभाऊंच्या अभिजात साहित्याची उपयोगिता आणि समर्पकता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांनी लिहिलेले अनेक पोवाडे, लावण्या, छक्कड या इतक्या अस्सल आहेत, इतक्या भिडणाऱ्या आहेत आणि प्रत्येक वेळी नव्याने अर्थ घेऊन येणाऱ्या आहेत की वाचक, श्रोता या साहित्य समृद्धीने अक्षरशः भारावून जातो, चकित होतो. लोक साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी लोकसंस्कृतीला, लोकनाट्याला एक व्यावसायिक सांस्कृतिक, प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचे साहित्य म्हणजे भारताच्या वैभवशाली परंपरेचा चिरंतन वाहणारा झरा च आहे !

“माझी मैना गावावर राहिली..” हा मला तर त्यांच्या पूर्ण साहित्याचा परमोच्च बिंदु वाटतो.

माझी मैना गावाकडे राहिली। माझ्या जीवाची होती या काहीली।
ओटीव बांधा। रंग गव्हाळ। कोर चंद्राची।
उदात्त गुणांची। मोठ्या मनाची।
सीता ती माझी रामाची।
हसून बोलायची।
मंद चालायची।
सुगंध केतकी।
सतेज कांती ।
घडीव पुतळी सोन्याची।
नव्या नवतीची।
काडी दवण्याची।
रेखीव भुवया।
कमान जणू इंद्रधनुची।
हिरकणी हिऱ्याची। काठी आंधळ्याची।
तशी ती माझी गरीबाची मैना ।
रत्नाची खाण ।माझा जीव की प्राण ।
नसे सुखाला वाण।
तिच्या गुणांची छक्कड मी गायली।
माझ्या जीवाची होती या काहिली…।।

ही रचना वाचल्यानंतर सर्वप्रथम मनात येते ती दोन जीवांची झालेली ताटातूट. गरिबीमुळे झालेली असावी. राघू—मैनेची जोडी वेगळी होत आहे आणि त्या विरही भावनेत प्रेमातिरेकाने मैनेच्या मनाचं, देहाचं, तिचं त्याच्या जीवनात असल्याचं नितांत सुंदर आणि ठसकेबाज वर्णन या रचनेत केलेलं आहे. थोडक्यात हे एक सुंदर प्रेमगीत आहे असंच जाणवतं, पण ही मैना अधिक व्यापक स्वरूपात समजून घेण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा मला त्या रचने मागचे वेगळे संदर्भ लक्षात आले.

माझी मैना ही एक छक्कड आहे. छक्कड हा लावणीचा एक प्रकार आहे. माझी मैना ही एक राजकीय छक्कड आहे. आणि त्या पाठीमागे अण्णा भाऊंच्या जीवनाची पार्श्वभूमी आहे.
अण्णाभाऊंना गरिबीमुळे त्यांचे मूळ गाव वाटेगाव हे सोडावं लागलं. कामधंद्यासाठी त्यांना मुंबई नगरीत यावं लागलं. तिथे त्यांनी मिळेल ते काम केलं. हेल्पर, बूट पॉलिश वाला, सिनेमागृहात द्वारपाल अशी विविध कामे करता करता कोईनुर मिलमध्ये ते कामगार म्हणून स्थित झाले. या ठिकाणी त्यांचा संबंध कामगार चळवळीशी आला आणि त्याच वातावरणात त्यांची लेखन कला बहरली. ते लेखक, शाहीर बनले.
त्यानंतर याच माध्यमातून त्यांचा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी संबंध आला. या चळवळीत कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर म्हणून ते काम करायचे पण ते खरे कलाकार होते. नाटक, वग, पोवाडे आणि लावण्या लिहून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची मशाल पेटती ठेवली. याचवेळी “माझी मैना गावावर राहिली”… ही छक्कड अतिशय गाजली ती एक रूपकात्मक रचना म्हणूनच. ही मैना कोण ? याचे उत्तर या चळवळीत सापडलं.
संयुक्त महाराष्ट्राची एक मे १९६० रोजी स्थापना झाली. पण बेळगाव आणि कारवार हा भाग महाराष्ट्राच्या सीमेत आला नाही याचं दुःख झालं. हा सल टोचला आणि त्यातूनच “माझी मैना” या छक्कडचा जन्म झाला. माझी मैना गावावर राहिली हे बेळगाव आणि कारवार या भागासाठी रूपक आहे आणि ही नितांत ‘सुंदर मैना’ म्हणजेच निसर्ग रम्य बेळगाव आणि कारवार !

आजही ही मैना प्रासंगिक आहे. तितकीच ताजीतवानी आहे कारण अजूनही सीमावाद सुटलेला नाही. म्हणून “माझी मैना गावावर राहिली” हा सल उरलेला आहेच.

अण्णाभाऊ साठेंनी विपुल लिखाण केलं. कथा, कविता गीतं, लावण्या, कादंबऱ्या, वगनाट्य, वृत्तांकन, प्रवास वर्णन असे सर्व साहित्य प्रकार हाताळले. त्यांच्या साहित्यात अविट गोडी आहे. त्यांच्या या अविटपणाच्या रहस्या बद्दल सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी फकिरासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हटले आहे,
“समाजाच्या तळाच्या थरातील माणसं, घटना आणि जीवन हे सारं अण्णाभाऊंनी अनुभवलेलं आहे, पचवलेलं आहे. माझ्यासारखे पांढरपेशी लेखक घराच्या खिडकीतून किंवा गच्चीत टाकलेल्या आराम खुर्चीतून बाहेरचे जीवन अनुभवतात. तसं अण्णाभाऊंचं नाही. या थरातच त्यांचा जन्म झाला. टिपकागद जसा झटकन ओली अक्षर टिपतो त्याप्रमाणे त्यांनी दलितांच्या आयुष्यातली आसवं टिपली.”

अण्णाभाऊ साठे यांनी विविध कलाप्रकार आणि साहित्यप्रकार तर हाताळलेच पण त्यातील आणखी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे त्यांनी लिहिलेलं “माझा रशियाचा प्रवास” हे प्रवास वर्णन.

अण्णाभाऊ साठे हे विचारांनी साम्यवादी होते. त्यांना कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंजल्स ! लेनिन यांच्या विचारांचे आकर्षण होते. त्यांनी रशियन क्रांतीवरील निरनिराळी पुस्तके वाचली. स्टालीनग्राडच्या लढाईवर त्यांनी “स्टालीनग्राडचा पोवाडा” लिहीला होता.
“दलितांचा आशा किरण रशियाचा प्राण” असे या लढाईचे वर्णन त्यांनी केले. या पोवाड्याचा रशियन भाषेत अनुवाद झाला आणि तो रशियन लोकांना प्रचंड आवडला.

रशियात ते गेले असताना त्यांना विचारलं होतं, “तुम्हाला इथे काय पाहायचं आहे ?” तेव्हा ते म्हणाले,”मला फक्त इथल्या फुटपाथ वर भटकायचं आहे.”
रशियाची राजधानी मॉस्को येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. आपल्या राज्यातील एक समाजसेवक आणि साहित्यिकाचा अशा प्रकारे गौरव होणं ही सर्वांसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.
१९ जुलै १९६९ साली त्यांचे दुःखद निधन झाले. पण कलाकार अमर असतो. तो त्यांच्या कलेच्या माध्यमातून जनमनात त्यांचं अस्तित्व ठेवून जातो.
तर असा हा लोकशाहीर. लोककवी. समाज सुधारक. राष्ट्रीय साहित्यिक. दलदलीतलं एक सुरेख कमळ.

अशा या अलौकिक शाहीर, लोकशाहिरास विनम्र अभिवादन.

राधिका भांडारकर
  • — लेखन : राधिका भांडारकर. पुणे.
    — संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सामाजिक भान असलेला,तळागाळातील लोकांच्या जीवनाला शब्दबद्ध करणारे महान साहित्यिक लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक कार्याचा उचित आढावा घेणारा लेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?