०१ आॅक्टोबर हा माननीय गजानन दिगंबर माडगुळकर म्हणजेच गदिमा यांचा जन्मदिन.. त्या निमित्ताने मागे वळून पाहताना…
गदिमा हे एक असाधारण व्यक्तीमत्व होते.दिग्गज कवी ,गीतरामायणकार,लेखक ही त्यांची ओळख तर आहेच,पण ते विख्यात पटकथा,संवाद लेखक होते.
घरच्या गरिबीमुळे,केवळ चरितार्थासाठी ते चित्रपट व्यवसायात आले.वास्तविक खूप लिहीण्याची प्रेरणा
त्यांना ,ते वि.स. खांडेकर यांचे लेखनिक असताना
प्राप्त झाली.त्यातूनच एक भक्कम लेखन संस्कार त्यांच्यावर झाला.सहजपणे कविता स्फुरत गेली.
नवयुग चित्रपट संस्थेत,सहाय्यक दिग्दर्शक म्हणून
काम करत असताना,चित्रकथा कशी तयार करायची हे
त्यांनी जाणून घेतले.१९४७ साली त्यांनी राजकमल पिक्चर्सच्या ,लोकशाहीर रामजोशी या चित्रपटाची कथा,
संवाद व गीते त्यांनी लिहीली.त्यात तायांनी एक भूमिका
पण केली.आणि या चित्रपटाला ,प्रचंड लोकप्रियता
मिळाली.आणि त्यानंतर,कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी ,गदिमा हे मराठी चित्रपट सृष्टीचा एक भक्कम आधार बनले,
त्यांनी लिहीलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटात,
पुढचं पाऊल,बाळा जोजो रे,लाखाची गोष्ट,पेडगावचे शहाणे,ऊनपाऊस,मी तुळस तुझ्या अंगणी,जगाच्या पाठीवर संथ वाहते कृष्गामाई या चित्रपटांचा समावेश आहे.शिवाय तुफान और दिया,दो आँखे बारह हाथ,गूँज
ऊठी शहनाई हे त्यांची पटकथा असलेले उल्लेखनीय हिंदी चित्रपटही अतिशय लोकप्रिय झाले..
त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून ,संवाद सोपे आणि
चपखल असत.
योगायोगानेच त्यादिवशी गदिमांची ,कथा,संवाद आणि गीते असलेला लाखाची गोष्ट हा चित्रपट पहायला मिळाला.कृष्गधवल ,काहीशी धूसरच प्रिंट असलेला
चित्रपट पाहतानाही,मन गुंतून गेले.कदाचित ते त्यातल्या प्रभावी कथानका मुळेच असेल.अत्यंत आशयपूर्ण आणि समाजापुढे हसत खेळत,एक चांगला संदेश देणारी गदिमांची कथा ही या चित्रपटाच्या यशाची जमेची बाजू.
लहानपणी,मुंबईच्या सेंट्रल सिनेमागृहात हे पिक्चर पाहिलं होतं…तुफान गर्दी ,हाऊसफुल चित्रपट!
पण तेव्हा जे समजलं नसेल ते आतां जाणवलं.कथा संवाद ,गीते या अनुशंगाने त्यातला दर्जेदारपणा जाणवला.
१९५२ साली हा चित्रपट प्रसारित झाला.आणि प्रचंड गाजला.आजच्या इतकं प्रगत चित्रपट तंत्र नसतानाही
त्यांत मन रमतं,कारण गदिमांची प्रसन्न कथा.कालबाह्य न होणारी कथा.
चित्रा,रेखा,राजा गोसावी आणि राजा परांजपे अशी
उत्तम कास्ट.मालती पांडे आणि आशा भोसले यांनी गायलेली मधुर गाणी. खरोखरच सर्वांगसुंदर चित्रपट.
श्याम आणि रामनाथ हे दोघं कलाकार मित्र.श्याम चित्रकार.रामनाथ कवी.कलाक्षेत्रात अजुन न बहरलेले .
त्यामुळे गरीबच.खोलीचं भाडंही भरण्यापुरते पैसे नाहीत.
रामनाथची प्रेयसी रेखा. ती गायिका.रेडिओ प्रसिद्धीमुळे ,
थोडंफार कमावणारी. तिची मैत्रीण सरोज,ही एका श्रीमंत बापाची मुलगी.आणि पोर्ट्रेट करण्याच्या निमित्ताने ,एकमेकांच्या प्रेमात पडलेले ती आणि रामनाथ.
अशी ही कलाप्रेमी मित्रांची एकमेकांत गुंतलेली प्रेम कहाणी.कथेचा विस्तार होत असताना ,अनेक विनोदी घटना प्रेक्षकांना खळखळून हसवतात. सरोजच्या वडीलांचं
अवास्तव श्वानप्रेम,रेखाच्या वडीलांचची फाटक्या संसारातही, नाट्यवेड टिकवून ठेवण्याची अतोनात धडपड…शेवटी काय पैसा महत्वाचा..
त्याचवेळी सरोजचे वडील रामनाथला एक लाख रुपये देतात.व एक विचीत्रअट घालतात.हे एक लाख रुपये एक महिन्यात संपवून दाखवलेस तरच माझी मुलगी तुझ्याशी लग्न करेल.वरवर सोपी वाटणारी ही अट अमलात आणत असताना अनंत अडचणी येतात.पैसे कमी होण्याऐवजी अचानक वाढतच जातात.म्हणजे न धावण्यार्या घोड्यावर पैसे लावूनही जॅकपाॅट लागतो.
आणि अशा बर्याच घटना..ज्या पाहतांना खूप मनोरंजन होते.ते २५/३० दिवस रामनाथ आणि श्यामचे प्रचंड तणावात जातात.आणि श्यामला जाणवायला लागते की या पैशापायी आपण
कलेपासून दूर जात आहोत.रंग ,कॅन्व्हासची आपली दुनिया दुरावत आहे.कला हाच आपल्या जीवनाचा आत्मा आहे.शेवटी तो पैसा,प्रीतीचा त्याग करतो.आणि पुन्हा कलेकडे वळतो.श्रीमंत बापाचं घर सोडून श्यामची प्रेयसी सरोज त्याच्याचकडे येउन तिचं त्याच्यावरचं,आणि त्याच्या कलेवरचं प्रेम सिद्ध करते.
या सर्व प्रेम संघर्षाच्या प्रवासात,रामनाथ आणि रेखाही असतातच.शेवट अर्थातच गोड होतो.अखेर सरोजचे वडील लग्नास परवानगी देतात.कलेवरचं प्रेम हीच लाखाची गोष्ट ,याची जाणीव त्यांना होते…कथा आणि चित्रपट एक चांगला संदेश देऊन सुखांतात संपतो.
चित्रपट कुठेही रेंगाळत नाही.कंटाळवाणा आजही वाटत नाही.तो हसवत राहतो.उत्सुकता वाढवतो,आणि चुटपुटही लावतो.यात गदिमांच्या अत्यंत सजीव ,चैतन्यमयी लेखनाचाच वाटा आहे.
शिवास “माझा होशील ना..”
“त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे….”
“डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे…
ही अवीट गोडीची गदिमांची तरल गीते….
आजकालचे चित्रपट तंत्रज्ञानामुळे गाजतात. कथानक
दुय्यमच ठरते.शिवाय पिसाट गाणी. शब्दांतल्या माधुर्याचा
अभावच..पण जुनं ते सोनं..गदिमांची पटकथा असलेले चित्रपट गाजले ,ते त्यांच्या विचार देणार्या ,प्रभावी ,संवादात्मक कथानकामुळे….
अशा या महाराष्ट्राच्या वाल्मिकीला ,महान मराठी सारस्वताला माझा आदरपूर्वक प्रणाम…!!!
– लेखन : सौ राधिका भांडारकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
गदिमांच्या लेखनावरचे सौ.राधिका भांडारकर यांचे अत्यंत प्रभावी भाष्य.