कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नाही, शासनाकडून पुरेशी लसच मिळाली नाही म्हणून केंद्र बंद आहे, सर्व्हर स्लो झाल्याने लसीकरणाला वेळ लागत आहे, रांगेत तासंतास थांबून लसीविना परत फिरावे लागत आहे, अशा एक ना अऩेक कारणांनी पुणेकर नागरिक त्रस्त झाले आहेत . पुणे शहरातील एका केंद्रावर मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळते. तेथे जाणाऱ्या नागरिकांसाठी हा सुखद अनुभव असून राज्यातील इतर केंद्रांनी असा आदर्श का घेऊ नये? असे मनोमन वाटते.
पर्वती परिसरातील स्व. राजीव गांधी ई लर्निंग स्कूल हे ते आगळे वेगळे केंद्र. लसीसाठी येथेही नागरिकांच्या भल्यामोठ्या रांगा लागतात. लसीकरणाला येथेही वेळ लागतो, पण दोन- तीन तास थांबून लस टोचून परतणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव नसतात, उलट असते समाधान आणि कृतज्ञतेचे भाव.
पर्वती- सहकारनगर परिसरातील नगरसेवक आबा बागूल, त्यांचे चिरंजीव अमित व हेमंत आणि त्यांच्या मित्र परिवाराने घेतलेल्या परिश्रमाचे हे फळ आहे. लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकाला येथे प्रथम एक टोकन दिले जाते. त्यानंतर सोशल डिस्टसिंगचे पालन करीत त्यांना एका भल्या मोठ्या प्रतिक्षालयात नेऊन बसविण्यात येते. वेळ चांगल्या पद्धतीने व्यतीत करता यावा, यासाठी येथे टी व्ही, वर्तमान पत्रे, पुस्तकांचीही सोय बागूल यांनी केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, रक्तदाबाची औषधे वेळेवर घ्यावी लागतात. ती घेण्यापूर्वी काही तरी खाणे गरजेचे असते, याचे भान ठेऊन रांगेत थांबणाऱ्या सर्वांच्याच चहापानाची आणि अल्पोपहाराची व्यवस्थाही त्यांनी चोख ठेवली आहे. बातम्या पहात व शिरा- पोहे आणि चहा, कॉफीचा आस्वाद घेत दोन- अडीच तास कसे जातात हे कोणाच्या लक्षातही येत नाही. “आम्हाला लस घेण्यासाठी दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागली. पण येथील सुखद वातावरणामुळे आणि सुविधांमुळे आमचा वेळ खूप छान गेला”, अशा ज्येष्ठांच्या उस्फूर्त प्रतिक्रिया या उपक्रमाचे मनापासून स्वागत करणाऱ्या म्हणाव्या लागतील.
संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आलेल्या नागरिकांसाठी घरपोच डबे पोहोचविण्याचा एक स्तुत्य उपक्रम बागुल यांनी सुरु केला आहे. गेल्या आठ दिवसांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असून दररोज सुमारे दोन हजार डबे विविध भागात पोहोचविले जात आहेत. चार पुऱ्या, पातळ भाजी, वरण भात आणि एखादा गोड पदार्थ असे या डब्यांचे स्वरुप असते. कार्यकर्ते विविध भागात जाऊन ही सेवा निरलस, नि:स्वार्थ भावनेने करीत असतात. कोरोनाच्या कठीण काळात अनेक नेते घरात बसून असताना बागूल कुटुंब मात्र आपल्या जिवाची पर्वा न करता या केंद्राच्या माध्यमातून जे काम अहर्निश करीत आहेत, त्याबद्दल त्यांना अनेक ज्येष्ठांचे भरभरून आशीर्वाद मिळत असतील, याविषयी माझ्या मनात शंका नाही.
आबा हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. लोकांसाठी मनापासून ते किती झटत असतात, हे त्यांच्या मित्रपरिवाराने पाहिले आहे .’वन पर्सन कॅन मेक अ डिफरन्स, अँड एव्हरीवन शुड ट्राय’, असे जॉन केनेडी म्हणाले होते. आबा बागुल यांच्या या कार्याकडे पाहिल्यावर या उक्तीची आठवण झाल्यावाचून राहत नाही. इतरांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य त्यांच्या या समाजाभिमुख कार्य शैलीत आहे, एवढे मात्र निश्चित.
– लेखन: सुनील कडूसकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ.9869484800.