आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ वर्तमानपत्र सुरु करुन मराठी वृत्तपत्रसृष्टीची मूर्तमेढ रोवली, त्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जन्मगावी त्यांचे तर हिंदी वृत्तपत्र सृष्टीची मूर्तमेढ रोवणाऱ्या बाबूराव पराडकर यांच्या कोकणात असलेल्या पराड या गावी पराडकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे या मागणीचा ज्येष्ठ पत्रकार श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी पुनरुच्चार केला. पत्रकार उत्कर्ष समिती, मुंबई तर्फे ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री विजय वैद्य, योगेश वसंत त्रिवेदी, प्रसाद मोकाशी, हिंदुस्थान या उर्दू दैनिकाचे संपादक सरफराज आरझू दूरदर्शन निवेदिका सौ. शिबानी जोशी, यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी केलेल्या भाषणात श्री. योगेश त्रिवेदी यांनी सांगितले की, इच्छा शक्ती असली की काम कसे पूर्ण होते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या स्मारकाची उभारणी करुन दाखवून दिले. गुजरात मधील डभोई जवळचे केवडिया हे गांव २०१४ पर्यंत कुणालाही माहित नव्हते. पण २०१८ मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी तिथे उभारण्यात आले आणि आज हेच केवडिया जागतिक नकाशावर आले आहे. लाखो पर्यटक येतात आणि कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. जर केवडिया आंतरराष्ट्रीय पातळीवर सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक होऊ शकते तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ला येथे राष्ट्रीय स्मारक कां होऊ शकत नाही ? असा प्रश्न त्यांनी केला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि बाबूराव पराडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी राज्यकर्त्यांनी आवर्जून लक्ष द्यावे, ही मागणी योगेश त्रिवेदी यांनी केली.
पत्रकार उत्कर्ष समितीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार देऊन आम्हाला आणखी ऊर्जा प्राप्त करून दिली असून कामाठीपुरा सारख्या समाजातील उपेक्षित परिसरात राजेंद्र लकेश्री सारखा हिरा गेल्या पस्तीस वर्षांपासून सामाजिक कार्य करीत आहे, बॅरिस्टर रामराव आदिक यांच्या कडे बत्तीस वर्षे सेवा करुनही काहीही पदरात पाडून न घेता समाजाला सतत देत राहण्याची त्यांची भूमिका आदर्श आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास’ हे सूत्र अंगिकारुन समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन राजेंद्र लकेश्री हे कार्य करीत आहेत, अशा शब्दांत सर्वच पत्रकारांनी त्यांचा गौरव केला.
विजय वैद्य, प्रसाद मोकाशी, शिबानी जोशी, सरफराज आरझू यांनी पत्रकार उत्कर्ष समिती च्या कार्याची प्रशंसा केली.
पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अशोकराव म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पत्रकारांना अपघात विमा देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीच्या २०२३ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
समारंभाच्या प्रारंभी थोर संसदपटू, पत्रकार भाई डॉ. केशवराव धोंडगे आणि ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईचे अध्यक्ष राजेंद्र लकेश्री, सरचिटणीस आनंद मुसळे, सुनील कोलगे, पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई च्या महिला अध्यक्षा डॉ. संपदा कारेकर, माजी नगरसेवक जावेद जुनेजा, राजेंद्र नरवणकर, बबन गवस, शाकिर अन्सारी, सुरेश काळे, शिवसेनेचे उपविभागप्रमुख सुनील कदम, शाखाप्रमुख सुरेश शेट्टी, सुरेंद्र तेलंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800