Tuesday, June 17, 2025
Homeसाहित्यआठवणीतील संजय देवतळे

आठवणीतील संजय देवतळे

महाराष्ट्राचे माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांच्याविषयीच्या हृद आठवणी सांगतायत त्यांच्या प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम केलेल्या अर्चना शंभरकर ….

महाराष्ट्र राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य, पर्यावरणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, वरोरा-भद्रावती विधानसभेचे सलग २० वर्षे नेतृत्व करणारे नेते संजय देवतळे यांचे वयाच्या ५८ व्या नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले ही बातमी कळाली आणि धक्काच बसला.

संजय देवतळे सर यांनी पर्यावरण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांच्यासाठी विभागीय संपर्क अधिकारी म्हणून मी काम पाहिले होते.
पर्यावरण आणि सांस्कृतिक कार्य हे दोन्ही माझ्या आवडीचे विषय, शिवाय मंत्री महोदय माझ्याच जिल्ह्यातले, त्यामुळे मला आनंदच झाला होता. मी उत्साहाने त्यांना भेटायला गेले होते. माझी तसेच माझ्या विभागाची ओळख करुन त्यांना करुन दिली.

मंत्री म्हणून त्यांना पहिल्यांदाच संधी मिळाली होती. शपथ विधी झाल्यानंतर मंत्रीमंडळ परिचयासाठी राज्याच्या कोणत्याच यंत्रणेकडे त्यांचे अधिकृत छायाचित्र नव्हते. आमची प्राथमिक ओळख झाल्यानंतर मी त्यांना विनंती केली. “सर आपण तुमचे विशेष फोटो काढुन घेऊ.” कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशीची वेळ दिली.

आमच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या छायाचित्रकारासह त्यांच्या निवासस्थानी गेलो. देवतळे सर नेहमी प्रमाणे पांढरा शर्ट घालून छायाचित्र काढायला तयार होते. छायाचित्र पांढऱ्या रंगाच्या शर्टऐवजी डार्क रंगाच्या कपड्यांमध्ये चांगले येईल असं आमच्या छायाचित्रकाराचं मत पडलं. आम्ही तशी विनंती त्यांना केली. बाहेर भेटायला येणारे लोक थांबलेले असतांनाही ते आमच्या सांगण्यावरुन परत आत जाऊन डार्क रंगाची सफारी घालून आले. नंतर आम्ही आठवण म्हणून त्यांना ते मंत्री पदाची शपथ घेत असतानाचे मोठे छायाचित्र भेट दिले.

सर्वोत्तम कामगिरी
सांस्कृतिक खात्याचे मंत्री म्हणुन त्यांना खुप चांगले काम करता आले. त्यांच्या कारकिर्दीतच राज्याचे सूवर्ण महोत्सवी वर्ष होते. या कालावधीत वर्षभर कार्यक्रम राबविता आले. सांगता समारोह गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आला होता.

संजय देवतळे सरांनी सुरु केलेला एक महत्वाचा पुरस्कार म्हणजे भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार. शास्त्रीय गायन व वादन क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंताला सन २०१२-१३ पासून भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. किशोरी आमोणकर, पं. जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं. राम नारायण, परविन सुलताना, माणिक भिडे, पं केशव गिंडे, पं. अरविंद परिख, डॉ. एन. राजम यांसारख्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

नटवर्य प्रभाकर पणशिकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार देखील त्यांच्याच काळात सुरु करण्यात आला. सांस्कृतिक खात्यातर्फे देण्यात येणारे अनेक वर्षांचे प्रलंबित पुरस्कार त्यांच्या काळात नियमित प्रदान करण्यात आले. या शिवाय या पुरस्कारांच्या रकमेतही त्यांनी वाढ केली.

लोककलावंत असु देत नाही तर प्रसिद्ध चित्रपट अभिनेते, त्यांच्या लेखी सर्व समान होते. त्यांच्या दालनात नेहमीच एखादा लोक कलावंत भेटीला आलेला दिसायचा. देवतळे सरांसोबत मला फिल्मसिटी बघण्याची संधी मिळाली. फिल्मसिटी येथे सामान्यांसाठी पर्यटन खुले करण्यातही त्यांची दूरदृष्टी होती. फिल्म सिटी येथे अनेक नवीन गोष्टी त्यांना सुरु करावयाच्या होत्या. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

देवतळे सरांच्या काळातच अनेक नव्या पुरस्कारांची सुरुवात झाली. वृद्ध कलावंतांचे अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न त्यांनी सोडविले. लोक कलावंत कै. विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराची रक्कम त्यांच्या काळात एक लाखावरून तब्बल पाच लाखावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. वयोवृद्ध कलावंताच्या मानधनात त्यांनी भरघोस वाढ केली होती.

संजय देवतळे सरांच्या कालावधित सांस्कृतिक कार्य विभागात सर्वात उत्तम काम झाले आहे. मंत्री म्हणून समोर आलेल्या विषयाला त्यांनी पुर्णपणे न्याय दिला. शांतपणे विषय समजुन घेऊन त्यावर त्यांनी काम केले. ते केवळ मंत्री म्हणूनच नव्हे तर व्यक्ती म्हणूनही उत्तम होते.

मंत्री महोदयांना एखाद्या कार्यक्रमासाठी भाषण तयार करून देतांना विभागीय संपर्क अधिकारी म्हणून मुद्दे देण्याची जबाबदारी माझी होती. संजय देवतळे सरांना भाषणासाठी मुद्दे देतांना ते पुर्ण वाक्यात आणि मोठ्या अक्षरात टाईप करुन द्यावे लागत. विदर्भातील छोट्या भागातून ते आले होते. राज्यस्तरावरून भाषण करतांना प्रमाण भाषेचा वापर व्हावा असे त्यांना वाटत असे. संपुर्ण भाषण वाचून झाल्यानंतर ते वेळेवर समयसुचकता दाखवुन काही मुद्दे मांडत असत.

पर्यावरण या खात्यात देखिल त्यांनी बरेच बदल केले. अनेक वर्ष न होणाऱ्या पर्यावरण समितीच्या त्यांनी बैठका घेतल्या. राज्यात उद्योगांमधून होणारे प्रदुषण कमी व्हावे यासाठी त्यांनी प्रसंगी कठोर आदेश निर्गमित केले होते.

देवतळे सरांबरोबर काम करत असतांना मनावर कोणतेही दडपण येत नसे. ते अत्यंत सुस्वभावी होते. २० वर्ष लोकप्रतिनिधी असलेले, सातत्याने चार निवडणूक जिंकलेले ते लोकनेता होते. आपले काम शांतपणे पुर्णत्वास नेण्याकडे त्यांचा कल होता. साधेपणा हा त्यांचा स्वभाव होता. मंत्री असतांनाही त्यांनी कशाचाच बडेजाव मिरवला नाही.

चंद्रपूर जिल्ह्याची हानी
संजय देवतळे हे चंद्रपूर जिल्ह्याचे खऱ्या अर्थाने ‘पालक’ मंत्री होते. त्यांच्याच कालावधीत चंद्रपूरला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला. पुरातत्व खात्याचे मंत्री म्हणुन त्यांनी भटाळा येथे शिवलिंग मंदीराला पुरातत्व विभागाकडून निधी मिळवून दिला.

देवतळे सरांना कोरोना झाला होता. त्यावर त्यांनी आधी वरोरा येथेच उपचार सुरु केले. एक माजी मंत्री म्हणुन, किंवा एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांना कोणत्याही मोठ्या रुग्णालयात उपचार घेणे शक्य होते. मात्र त्यांनी शेवटपर्यंत आपला साधेपणा सोडला नाही. आणि कोणत्याही मोठ्या रुग्णालयात जाण्याऐवजी ते त्यांच्या नागपुरातील एका मित्राच्या खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. प्रकृतीत सुधारणा होत असतानाच शनिवारी दि.२४ एप्रिल रोजी सायंकाळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. प्राणवायुचे प्रमाण कमी झाले आणि रविवारी दि. २५ एप्रिल रोजी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

विदर्भातील सामाजिक आणि राजकिय क्षेत्रातील संजय देवतळे सरांच्या योगदानाची निश्चितच दखल घेतली गेली आहे, तथापि चंद्रपूरच्या या नेत्याची राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील कारकिर्दही अविस्मरणीय ठरली आहे. एवढं मात्र निश्चित.

स्वर्गिय संजय देवतळे सरांना भावपुर्ण श्रद्धांजली.

लेखिका अर्चना शंभरकर.

– लेखन : अर्चना शंभरकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments