आपले काम नेहमी पूर्ण 100% देत करा आणि आनंदाने जगा, आनंदाने जगू द्या असा सर्वांना प्रेरणादायी संदेश देणारी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे निवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ यांची प्रेरणादायी मुलाखत नुकतीच रेडिओ विश्वास वरून प्रसारीत झाली.
ही मुलाखत प्रसिद्ध मुलाखतकार मेघना साने यांनी घेतली
या मुलाखतीला रसिक श्रोत्यांचा भरपुर प्रतिसाद मिळाला. अनेक श्रोत्यांनी ती दोन वेळा ऐकली.
काही काळ पत्रकार, दूरदर्शन साठी निर्माते आणि माहिती जनसंपर्क खात्यात संचालक पदावर काम केलेले कर्तबगार अधिकारी म्हणजे माननीय श्री देवेंद्र भुजबळ.
स्वकर्तृत्वाने माणूस सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करू शकतो आणि आपले कष्ट माणसाला पुढे नेऊ शकतात हे विचार भुजबळ सरांनी मांडले.
महाराष्ट्रातील अकोला येथे त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पण वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. परंतु ते डगमगले नाहीत .आपले शिक्षण त्यांनी कष्ट आणि मेहनत करत पूर्ण केले.
दहावीच्या परीक्षेत प्रथम ते अनुत्तीर्ण झाले परंतु पुढे नेटाने त्यांनी प्रयत्न केले आणि दाखवून दिले की कितीही प्रतिकूल परिस्थितीत पण आपले कष्ट आपणास यशाचा मार्ग नक्कीच दाखवतात. पुढे पुणे येथे विविध कामे करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. आधी भारती विद्यापीठ नंतर हडपसर कॉलेज, अहमदनगर येथील महाविद्यालयात त्यांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण केली.
त्यावेळी त्यांनी एका आईस्क्रीम पार्लर मालका कडे पी ए म्हणुन ही काम केले आणि दैनिक समाचार या वर्तमान पत्रात उपसंपादक कम वार्ताहर म्हणुन कामालाही सुरवात केली. पदवीनंतर पुणे विद्यापीठात पत्रकारिता शिक्षण घेऊन त्यांनी सुरवात केली आणि आपली नवीन पाऊलवाट तयार केली.
अशक्य असे काही नसते असे भुजबळ सर यांच्या बोलण्यातून जाणवते. जिद्दीने आणि चिकाटीने त्यांनी हार ना मानता काम केले आणि ते पुढे आले.
परिस्थितीला दोष न देता हे मार्ग शोधणे नेहमी आपल्या हातात असते असे भुजबळ सर विश्वासाने म्हणतात.
आणि रात्र कितीही मोठी असली पहाट होतेच. त्याप्रमाणे अनेक सरकारी परीक्षा पास होवून सर माहिती जनसंपर्क विभागात वर्ग एक पदावर रुजू झाले त्यावेळी एकाच वेळी सहा ठिकाणी ते परीक्षा उत्तीर्ण झाले होते.
सह्याद्री वाहिनीच्या महाचर्चा या कार्यक्रमासाठी ते संशोधक- समन्वयक म्हणुन काम करत होते.
माय मराठी आणि शिवशाही आपल्या दरी या महाराष्ट्र शासनाच्या दूरदर्शन कार्यक्रम निर्मिती समन्वय कार्य भुजबळ सर यानीच केले. तसेच दिलखुलास या कार्यक्रमाच्या प्रथम 500 भागांचे आव्हानात्मक टीम लिडरचे काम भुजबळ सर यानी केले.
पुरुष आणि स्त्रियांच्या यशो कथांचे गगन भरारी, प्रेरणेचे प्रवासी ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
असा हा प्रेरणादायी प्रवास पूर्ण करत भुजबळ सर आज, ‘न्यूज स्टोरी टुडे’ या लोकप्रिय वेब पोर्टलचे संपादन करत आहेत ज्याला जगभरातील अनेक वाचक लाभले आहेत आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे.
आपले जीवन आनंदाने जगले पाहिजे हा मंत्र ते सर्वांना सांगत आहेत, आणि एक स्फूर्तिदायक व्यक्ती म्हणुन त्याची राज्यभर नाही तर जगभरातील माणसात ओळख आहे.

– कमल अशोक. नवी दिल्ली
