प्रत्येकाच्या आयुष्यात एक गाव असते आपल्या बालपणीच्या आठवणीच, शाळेतल्या रमनीय दिवसांच आणि केलेल्या कष्टाचं !!
तेच गाव मग कायमची आठवण म्हणून साक्षीला पाठीमागे आयुष्यभर उभे राहते. कित्येक अनुभव याच गावातून जमा झालेले असतात. हेच गाव खरं शिक्षक असत आपल्या जीवनाचं !!
प्रत्येकाच्या आठवणी कोणत्या ना कोणत्या गावाशी जोडल्या गेलेल्या असतात. बालपण असो, उपजीविकेचे साधन असो किंवा अचानक ओढवलेल्या संकटामुळे असो कोणी मामाकडे तर कोणी आजोळी एखाद्या गावाशी जुळवून घेतो.
हरिगांव…..
मी हरिगावकर झालो ते खरं हरिगांव मुळेच. अहमदनगर जिल्हातील श्रीरामपूर तालुक्यातल हे छोटेसे गाव हरिगांव !!! या गावाचा इतिहास मात्र खूप रंजक आणि अभिमानास्पद आहे.
हरिगांव मुळात गाव नव्हतंच ती एक स्वप्न नगरी होती, वसवलेली नगरी होती. जर चंदीगड हे भारतातील सर्वात सुंदर वसवलेलं शहर असेल तर 1935 साली हरिगांव हे ब्रिटिश्यांनी वसवलेले भारतातील पहिलं गाव असायला हवं !!
ज्या वेळी अहमदनगर जिल्हा हा अनेक छोटया तालुक्यांनी आणि गावांनी बनला होता त्याच वेळी एक गाव मात्र सोन्याचा चमचा घेऊन या तालुक्यात जन्माला आलं आणि त्याच नाव होत हरिगांव !!!
सन 1919 चा तो काळ होता, सर्वत्र इंग्रज सरकारचे राज्य होते याच काळात त्यांनी वेगवेगळे उद्योग धंदे भारतभर सुरु केले होते. अहमदनगर आणि परिसरातील कित्येक गावे यांची सुपीक जमीन बघून इंग्रजांनी या भागात साखर कारखाना उभारण्याची कल्पना मांडली.
कारखान्यासाठी लागणारी जागा आणि कच्चा माल उपलब्ध होता आणि त्याच वेळी प्रवरा नदीवर भंडारदरा धरणातील पाणी सरळ कॅनल मार्गे कारखान्यात आणून पाण्याचा प्रश्नही त्यांनी सोडविला. कारखान्याच्या उभारणीबरोबरच हरेगावही बाळसं धरू लागल होत. संपूर्ण गर्द झाडी असलेलं हे गाव वसण्याचं काम सुरु झाल आणि संपूर्ण आराखडाही तयार झाला.
या सर्व कामाची जबाबदारी इंग्रज अधिकारी सर हॅरिसन यांच्याकडे होती. पुढे यांच्याच नावाचा अपभ्रंश होऊन हरेगाव हे नाव पडले. मोठं मोठी अति भव्य बंगले, सुंदर ट्वीन बंगलो आणि स्टाफ कॉलोनी, कामगार कॉलोनी यांचे बांधकाम सुरु झाले आणि काही वर्षात सुंदर असे गाव वसवले गेले.
मोठं मोठे बाहेरील रस्ते, डांबरीकरण केलेले आतील रस्ते, मोठमोठी दुकाने, सुलभ प्रसाधन गृहे आणि पथदिवे सगळं काही मनमोहक आकर्षक आणि लक्षवेधी होत. इंग्रजांनी त्या वेळी सर्व बंगले, कारखाना आणि घरे यांचा आराखडा, बांधकामासाठी लागणारा कच्चा माल थेट परदेशातून भारतात आणला होता.
सर्व खेळाच्या साहित्याने सुसज्ज असा जिमखाना ज्या मध्ये लॉन टेनिस, टेबलं टेनिस इनडोअर गेम या सर्वाचे प्रयोजन आत केलेलं असायच अशी ही जिमखान्याची खूप मोठी वास्तू गावाच्या मध्यभागी उभारली गेली. गाव सर्व बाजूनी भिंती आणि कंपाउंड टाकून भक्कम तटबंदी केलेली होती. सर्व बाजूनी चोवीस तास पहारेकरी सतत पहारा देत असत. आत लागणाऱ्या गरजेच्या सर्व वस्तू उपलब्ध असायच्या.
शाळा, पाणी, खेळाचे मैदान, दुकाने सर्व काही अगदी नियोजनबद्ध पद्धतीने उभारले होते. गावात बाहेरून कोणीही परका माणूस आत प्रवेश करू शकत नसे इतकी सुरक्षा भक्कम होती. हया गावातील कारखाना आणि सर्व गाव हे एका बलाढ्य नगरा सारखं होत. ब्रँडी अँड ब्रँडी कंपनीचे मोठे अधिकारी सर जोसेफ के यांच्या कारकिर्दीत हे गाव वसवले गेले तेव्हा या गावाला के नगर असेही म्हणत.
हा आशिया खंडातील पहिला साखर कारखाना होता, त्यामुळे साहजिकच या वास्तूकडे सर्वजण एका आश्चर्यच्या नजरेतूनही बघत व जो येथे नोकरीला लागे त्याने नशीब अजमावल असं समीकरण होत, आमचे आजोबा त्या वेळी चांगल्या हुद्यावर होते त्यामुळे आजोबांनी कित्येक जणांना तेथे नोकरीला लावले होते.
कारखान्यातील साखर मुंबईहुन थेट परदेशात जहाजाने पाठवली जाई त्यासाठी इंग्रजांनी श्रीरामपूरहुन रेल्वे लाईन सरळ कारखान्याच्या आत आणली होती. श्रीरामपूर जवळील बेलापूर हे गाव फक्त त्या वेळी होते. त्या गावाच्या नावावरून बेलापूर रेल्वे स्टेशन हे नाव पाडले जे आजचे श्रीरामपूर रेल्वे स्टेशन आहे.
आणि त्यावरूनच कारखान्याचे नाव पडले बेलापूर शुगर साखर कारखाना !!!!.
कारखाना इतका मोठा आणि भव्य होता की संपूर्ण मालवाहू रेल्वे डब्यासह आत जाऊन साखरेचे पोते भरून बाहेर निघत असत.
श्रीरामपूरहुन हरेगावला येणारी वाट म्हणजे दोन्ही बाजूनी हातात हात धरून उभी असलेली झाडी आणि हिरव्यागार रानात माना हलवणारी सुंदर पीक बघून मन प्रसन्न होई. गावाकडे जातांना त्या छोट्याश्या मंदिरावरचा दूरवरून फडफडणारा तो “भगवा झेंडा” नेहमी नजरेत पडे आणि आपोआप श्रद्धेने नमन केले जात असे.
रस्त्याच्या समांतर असलेली रेल्वेच्या रुळाची पटरी इतिहास जमा झालेल्या रेल्वेचा पुरावा हातात घेऊन अजूनही शेवटचा श्वास मोजत होती. याच वास्तूंनी हरेगावचं अस्तित्व टिकवण्याचं खूप प्रयत्न केले पण
“घर फिरले की घराचे वासेही फिरतात” या उक्ती प्रमाणे हरेगावचे काळानुसार होत्याचे नव्हते झाले.
श्रीरामपूरहुन आलेला हा रस्ता सरळ कॉलोनीत येत होता, कॉलोनी म्हणण्यापेक्षा सुंदर “भव्य नगरी” हाच शब्द योग्य ठरतो. चित्रपटातील एखाद्या देखाव्यासाठी तयार केलेल्या शहरासारखी दिसणारी ही “नगरी “खरोखरच अगदी तशीच होती.
याच गावात आम्ही खूप काही शिकलो. खेळ, संस्कार, शिक्षण, मैत्री यांचा याच जागेवर जणू आत्मसाक्षातकार झाला.
हरेगावातील प्रत्येक वाटेवर आमचा पावलांचा ठसा उमटलेला होता.
याच वाटावर आम्ही कित्येक खेळ खेळलो. याच मातीत कुस्ती खेळून माती अंगावर घेतली.
आमच्या गावात सर्व धर्मांची लोक, अगदी गुण्या गोविंदाने राहत होते पण धर्माच्या नावाखाली कधी कोणात वाद झाले असे कधीच दिसले नाही. आम्ही सर्व जणू एका कुटुंबासारखे राहायचो. त्यावेळी कोणालाही कोणत्याही घरात प्रवेश अगदी मोफत असायचा. सुख दुःखात सगळेजण आपला धर्म जातीरीवाज सोडून मदतीला येत. माणुसकीचा झरा प्रत्येक घरातून अगदी शुद्ध मनाने वाहत होता. लहान मोठा, उच्च नीच, तुझं माझं हा प्रकार आम्हाला कधी गावात दिसला नाही. सर्व सण, उत्सव गावात सारख्या भाव आणि भक्तीने साजरे व्हायचे.
गावात ऐकून चार प्रकारची बंगले आणि कॉलोनी होती A, B, C आणि D टाईप.
A टाईप मध्ये मोठी राजवाड्या सारखी बंगले होती. सुंदर बगीच्यांनी आणि दाट वेलींनी नटलेली आणि हिरव्यागार वनराईत ही बंगले म्हणजे जणू हरेगावचा मुकुटमणी !!
B आणि C मधील बंगल्यातील वाटा म्हणजे जणू गर्द हिरव्या झाडीतून गेलेल्या सर्प खुणाचं.!!
दोन्ही बाजूंनी असलेली टुमदार बंगले आणि दाट झाडी यातून ही बंगले हळूच आपल्याला डोकावून पाहत आहे असे वाटायचं. आपण जणू इंग्लंड किंवा जर्मनीच्या एखाद्या गावात आहोत असे क्षणभर वाटायचे इतके सुंदर बंगले आणि वाटा आज खंडर बनलेत हे पाहून वाईट वाटते.
याच गावात कित्येक जण चालायला शिकले तर कोणी आपले पाऊल मजबूत केले, काहींना याच गावात आत्मविश्वास आला आणि पंखाना बळ आले.
याच गावात आम्ही चालता बोलता लहानचे मोठे झालो. सायकलचे जुने दोन टायर एकमेकांत घालून आम्ही याच गावातून आम्ही पळवले. आज मजबूत चार चाकी जरी आली असली तरी खरी मजा आम्हाला त्याच टायरच्या गाडीत होती कारण त्यावेळी अहंकार” अंगी तयार झाला नव्हता.
D टाईप म्हणजे जणू बुद्धिबळ च्या खेळातील घरासारखी वसलेली कॉलोनी. एका सरळ रेषेत काढलेला तो चौकोन कोठूनही बघितला तरी समारंतरच दिसायचा.
D टाईप चे सुंदर रस्ते सकाळी सकाळी झाडून साफ केले जात. आणि हे काम अगदी नियमित होत असे. सर्व रस्त्यांची निगा अगदी काळजीने राखली जाई..
रस्त्यांच्या कडेला असलेल्या अंधुक दिव्या खाली केलेला अभ्यास आजही आठवतो रात्री बारदान टाकून त्या “बत्ती” खाली केलेला अभ्यासची प्रेरणा थोराकडून मिळायची. एक वाक्य आजही मी स्मरणात ठेवलंय,
“कठोर परिश्रमा शिवाय या जगात कोणतीच गोष्ट साध्य होत नाही.”
D टाईप मधले सगळे रस्ते आणि घरे हे एक सारखे होते अगदी जुळ्या भावा सारखे. नवीन आलेला पाहुणा हमखास चुकलाच म्हणून समजायच किंवा “कावरा बावरा” तरी व्हायचा.
मग आम्हीच उपकार केल्या सारखे त्यांना जे घर पाहिजे ते दाखवून यायचो.
कारखान्याच्या गटेवरून निघालेली वाट ही खऱ्या अर्थाने हरेगावचा “राजपथ “होती. त्या वाटेमध्ये रुबाबता होती, सौंदर्य होत आणि दबदबा पण. कारखान्याच्या उच्च अधिकाऱ्यांचे बंगले आणि निवासस्थाने याच वाटेवर.आपण परदेशातील भूमीवर उभे आहोत की काय अशी कल्पना काही क्षण मनात निर्माण व्हायची ती येथेच.
पंच तारांकित रिसॉर्ट सारखी दिसणारी सुंदरशी बंगले आणि झाडीतून शाळेकडे गेलेली ती सरळ वाट ही आमची खरी “विद्येची रेषा” ठरली.
हरीगाव म्हणजे आठवण
हरीगाव म्हणजे उनाडपण
हरीगाव म्हणजे पाया
हरीगाव म्हणजे जणू मोह माया
हरीगाव म्हणजे आपुलकी
हरीगाव म्हणजे बांधिलकी
हरीगाव म्हणजे मस्ती
हरीगाव म्हणजे दोस्ती
हरीगाव म्हणजे समर्पण
हरीगाव म्हणजे आपलेपण.
हरीगाव म्हणजे मतीतार्थ
हरीगाव म्हणजे निःस्वार्थ.

– लेखक : प्रकाश फासाटे. अल जदीदा.
मोरोक्को (नॉर्थ आफ्रिका)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. +91 9869484800
आम्ही सुद्धा अनुभवलेले असून, लेखात दर्शविलेल्या हरीगाव च्या भव्यतेबाबद विस्मरणात चाललेल्या हरीगाव ला उजाळा मिळाला आहे,.
कुणालाही हेवा वाटेल असे हे गाव आज अखेरच्या घटका मोजत आहे।
It’s really awesome. You took me to my grandpa’s memories. My grandfather Mr. Madhavrao Jadhav used to tell these views and sweet experiences in Harigaon that you ve mentioned. My dad and aunt always speak about it a lot. I stayed in cities only but when they used to speak about Harigaon it was like a fairytales for me. I wish I could experience the same happy days there.
Really nice …………haregone var kya bolave te divas kadhich vapas yenar nahi evdhich khanta..
अतिशय उत्कृष्ट शब्दांकन करून हरिगावचे हुबेहुब वर्णन समोर उभे करून पुन्हा त्या आठवणींना प्रकाशसरांनी उजाळा दिला
तो बालपणीचा काळ सुखाचा ,अन् समृद्धीचा
वारसा आम्हा हरिगावकर आजी -आजोबांचा वरिष्ठांचा
अभिमान आम्हा आमुच्या त्या हरिगावचा
याच भूमीत पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा
वाटे मनी या स्वप्ननगरीचा उद्धार व्हावा .
या पोर्टलचे निर्माणकर्ता आणि संपादक यांचा प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक प्रवास वाचला.नवनिर्माण करण्याच्या देवेंद्र सरांच्या ध्यासाचे विशेष कौतुक,
आपणास सुख,शांती आणि दीर्घायुष्य लाभो,ही ईश्वरचरणी प्रार्थना,