भारतात ऋषी-मुनींनी विकसित केलेले आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र आहे. आयुर्वेदाने विश्वाला विज्ञानाधिष्ठित जीवनशैली दिली. त्यामुळेच विश्वातील अनेक देशांनी आयुर्वेदाचा स्विकार केला, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी सांगितले.
आयुर्वेद व्यासपीठ या सार्वजनिक विश्वस्त न्यासाच्या कार्यकर्त्यांच्या देणगीमधून नाशिकमधील व्दारकापूरममध्ये उभारण्यात आलेल्या चरक सदन या वास्तुच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर आयुर्वेद व्यासपीठचे संस्थापक वैद्य विनय वेलणकर, अखिल भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष डाॅ.जयंत देवपुजारी, वैद्य संतोष नेवपूरकर, वैद्य विलास जाधव, वैद्य रजनी गोखले आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.भागवत पुढे म्हणाले, कोरोनानंतर अनेक बाबींचा फेरविचार करावा लागत आहे. वैद्यकीय क्षेत्रही याला अपवाद नाही. सध्या काही काल्पनिक आजार निर्माण करून औषधांची विक्री सुरू आहे. त्यातून काही कंपन्या बक्कळ नफा कमावत आहेत. सध्या वैद्यकीय उपचारातील पॅथींमध्ये भेदभाव सुरू आहे. तो न ठेवता रूग्ण केंद्रबिंदू मानून डाॅक्टरांनी उपचार करावेत.
कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराविरोधात लढा देण्यासाठी सर्व पॅथींनी एकत्र येण्याची गरज आहे. देशात स्वस्तात आरोग्यसेवा पोहोचवायची असेल तर आयुर्वेदाशिवाय चांगला पर्याय नाही. भारतात आयुर्वेदिक चिकित्सा पध्दतीचा पर्यायी उपयोग व्हायचा आता लोक ही पॅथी स्विकारत आहेत. इतर पॅथी इलनेसवर काम करतात. आयुर्वेद वेलनेसवर काम करते. अॅलोपॅथी शरीरशास्त्राचा विचार करते तर आयुर्वेद मन, शरीर, बुध्दी व आत्म्याचा विचार करते. आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र असून आजच्या युगात सर्वांनी मिळून आयुर्वेदाचा अभ्यास केला पाहिजे.
आयुष मंत्रालयाच्या चतुःसुत्री कार्यक्रमांतर्गत आयुर्वेद जगात पोहोचविला जात आहे. सेवा, संशोधन, प्रचार आणि शिक्षण या चतुःसूत्रीच्या माध्यमामधून आयुर्वेद माहिती केंद्रे विविध देशात काम करू लागली आहेत. आयुर्वेद हे सर्वसुलभ आणि निसर्गास अनुकूल औषधीशास्त्र आहे. आयुर्वेदाचा मान, प्रतिष्ठा वाढवणारी ताकद निर्माण झाली तर आयुर्वेदाला गतवैभव प्राप्त होईल.
देशभरात स्वस्तात आरोग्यसेवा पोहोचवायची असेल तर आयुर्वेदाशिवाय दुसरा पर्याय नाही. सर्व पॅथींनी एकत्र येऊन आजच्या काळात काम करावे. मात्र सर्वांचे नेतृत्व आयुर्वेदानेच करावे. कारण सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये दर्जेदार सेवा देण्याची क्षमता फक्त आयुर्वेदामध्येच आहे, असे श्री.भागवत यांनी ठणकावून सांगितले.
ते पुढे म्हणाले, आजारपणाच्या पलिकडे जाऊन माणसाचे आयुष्य निरामय करण्याचा उत्तुंग दृष्टीकोन जगाच्या पाठीवर केवळ आयुर्वेदच मांडू शकला. आयुर्वेदाने व्याधी बरी होण्यास वेळ लागतो हा गैरसमज आहे. औषधांच्या मात्रांवर उपचार अवलंबून असतो. सरकारी रूग्णालयांमध्ये चांगले उपचार केले जातात तरीही लोकांचा सरकारी रूग्णालयांवर विश्वास नाही. काहींना या रूग्णालयांचा अनुभव आहे तर काही चर्चांमुळे सरकारी रूग्णालयांमध्ये जात नाहीत.
कोरोनाकाळात आयुर्वेद काढ्यांचा प्रभावी अनुभव घराघरांत घेतला गेला. जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यासाठी आयुर्वेदाने पुढाकार घ्यावा, असे मत श्री.भागवत यांनी मांडले.
अखिल भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्रीय आयोगाचे प्रथम अध्यक्ष डाॅ.जयंत देवपुजारी यांचा आयुर्वेद व्यासपीठातर्फे श्री.मोहनराव भागवत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना जयंत देवपुजारी म्हणाले, आयुर्वेदाला इ.स.पूर्व दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. मुळातच आयुर्वेद श्रेष्ठ आहे. या प्राचीन व विज्ञानाधिष्ठित उपकारक विद्येचे आपण प्रसारक आहोत, या भावनेने आयुर्वेद व्यासपीठ ही संघटना काम करीत आहे. कोणतेही शासन परिस्थिती बदलू शकत नाही. मात्र परिस्थितीत बदल करण्यासाठी आणि परिवर्तन घडविण्यासाठी संघटना महत्वाची ठरते. आयुर्वेदात खूप काही आहे हे आयुर्वेदासोबत चालल्यास ध्यानी येते.
आयुर्वेद व्यासपीठच्या केंद्रीय अध्यक्षा वैद्या रजनी गोखले यांनीही मनोगत व्यक्त केले. कोरोनाकाळात आरोग्यसेवा दिलेल्या विविध जिल्ह्यातील वैद्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
वेगवेगळ्या पॅथींनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीच्या सद् भावनेने स्वस्तात आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असा महत्वपूर्ण संदेश या सोहळ्याने वैद्यकीय क्षेत्रास दिला.
आयुर्वेद व्यासपीठाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, देशातील विविध प्रांताचे समन्वयक आणि विभाग व शाखांचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

– लेखन : मिलिंद चवंडके
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800