Monday, June 16, 2025
HomeUncategorizedआयुर्वेद उवाच : १३

आयुर्वेद उवाच : १३

पाणी
पाणी हे जीवन आहे, हे आपणास माहीतच आहे. म्हणून ते कसेही प्यावे, असे नाही. ज्याप्रमाणे जीवनाला काही नियम आवश्यक आहेत त्याचप्रमाणे पाणी पितानाही काही नियम आवश्यक आहेत. कारण आयुर्वेदात सर्वच गोष्टी नियमाने चालतात. म्हणून आपण पुढील गोष्टींबाबत काळजी घेतली पाहिजे.
* अवेळी पडलेल्या व पहिल्या पावसाचे पाणी कधीही सेवन करू नये.
* वर्षा ऋतु मध्ये नदी, तलाव इत्यादींचे पाणी पिणे व्यर्ज आहे, कारण अनेक दुषित पदार्थ पाण्यात जमिनीवरून मिसळतात.तसेच पाणी गढूळ झालेले असते.
* शरद ऋतूत म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून नदी आदींचे पाणी पिण्यास योग्य असते.
* नदी, विहीर इ. जलस्रोतांमधून पाणी काढताना ते सकाळीच काढावे कारण ते शुद्ध व शीतल असते.

दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी पुढील उपाय करावे.

१ अत्याधिक दूषित पाणी उकळून घ्यावे
२ माध्यम दूषित पाणी – लोखंड/मातीचा गोळा तापवून पाण्यात बुडवणे.
३ अल्प दूषित पाणी – ते उन्हात तापवावे

कुठल्याही परिस्थितीत पाणी हे गरम करणे आवश्यक आहे. तिन्ही प्रकारात फक्त तापमानाचा फरक आहे. सध्याच्या परिस्थितीत पाणी उकळून घेणे श्रेष्ठ.

* पाण्याचा अप्रिय गंध दूर करण्यासाठी त्यात नागकेशर, चाफा, वाळा हि द्रव्ये घालावीत.
* जलशोधक द्रव्य – आयुर्वेदात बरीच द्रव्ये वर्णन केली आहेत, परंतु सध्य स्थितीत तुरटीचा वापर पाणी शुद्ध करण्यास वापरतात.
* पाणी थंड करण्याचा उपाय – ह्यातही अनेक उपाय वर्णन केले आहेत पण त्यातील ओले कापड मातीच्या मडक्यास बांधून त्यात पाणी ठेवणे हा अति उपयुक्त उपाय आहे.

* शीतल पाणी सेवन योग्य व्यक्ती
चक्कर येणे, giddiness, lethargy, पित्तज श्वास, उलटी होणे, रक्ताची उलटी अथवा नाकातून रक्त येणे.
परंतु हे शीतल जल फ्रिज मधील नाही तर स्वभावातच थंड पाणी किव्वा माठातले गार पाणी प्यावे.

* शीतल पाणी पिण्यास अयोग्य व्यक्ती
छातीच्या बाजूस दुखणे, सर्दी, वातरोग, घसा पकडणे अथवा सुजणे, पोटफुगी, पोट जड वाटणे, नवज्वर, अधीक तेलकट तुपकट पदार्थ खाल्यावर. अशा व्यक्तीनी थंड पाणी पिणे अयोग्य आहे.

* उष्ण पाणी पिण्याचे महत्त्व
भूक वाढवणारे, पाचन करणारे, हलके आहे. मूत्रशोधक, कंठरोग, उचकी, पोटफुगी, वात, कफ, नवज्वर, खोकला, दमा, जुनाट सर्दी, अपचन, छातीच्या फासळ्या दुखणे, ह्यांमध्ये श्रेष्ठ आहे.
* ज्यांनी मल बद्धतेची ( कॉन्स्टिपेशन) साठी औषध घेतली आहे त्यांनी गरम पाणी प्यावे.
* उष्ण पाणी हे सदैव पथ्यकर आहे ( आजारानुसार बदलावे)
* पाणी उष्ण करण्याची पद्धत
पाणी उकळून त्याचा १/४ भाग शिल्लक ठेवावा. ह्याला उष्णोदक म्हटले जाते. काही वेळा १/२ भाग ठेवला तरी चालतो. ( पाणी कमी अशुद्ध असल्यास) हे पाणी स्थूलता कमी करते.
* तापवून गार केलेले पाणी – (फ्रिज मधील नाही)
मद्यपानाने उत्पन्न रोगात, पित्तजन्य रोग, दाह, अतिसार, नाकातून, मल -मूत्रातुन, मुखातून रक्त येणे, मूर्च्छा, सतत तहान लागणे, उलट्या होणे, giddiness, इ. व्याधींमध्ये ह्याचा उपयोग होतो.
* आदल्या दिवशी उकळलेले पाणी दुसऱ्या दिवशी वापरू नये, त्यामुळे शरीरात आम्लता वाढते व कफ वाढतो.
* वाग्भट आचार्य मते जेवणाच्या आधी पाणी प्यायल्यास मनुष्य कृश होतो, मध्ये पाणी प्यायला तर सडपातळ होतो आणि शेवटी पाणी प्यायला तर स्थूल होतो.

* अजिर्णे भेषजं वारी जिर्णे वारी बल प्रदम।
भोजनेच अमृतं वारी भोजनांते विष प्रदम।।

अजीर्ण म्हणजे अन्न नीट पचले नसेल तर(गरम) पाणी हे औषधा प्रमाणे काम करते. म्हणजे अन्न सेवन त्यावेळी न करता तहान लागली की अल्प प्रमाणात गरम पाणी प्यावे.

अन्न पचले असताना पाणी प्याले की ते तृप्ती व बल प्रदान करते.
भोजन समयी आपण अल्प प्रमाणात पाणी घेतले तर ते अमृताप्रमाणे कार्य करते. जेवताना कोमट पाण्याचा घोट जिभेवरील जुनी चव काढतो व जिभेस नवीन रस ज्ञानासाठी तयार करतो. त्यामुळे घास नवीन असल्याचा आभास होतो व पाचनाही सुलभ होते.

भोजनाच्या अंती एकदम पाणी प्यायल्याने ते नीट पचत नाही. परिणामी आम तयार होतो व तो विषप्रदच असतो.
तसेच थंड, गरम असे तापमान भेद असलेले पाणी एकत्र करून पिणे देखिल आयुर्वेदाला मान्य नाही.

* कोणत्या रोगांत जल अगदी कमी प्यावे –

भूक व चव नसणे, सतत सर्दी असणे, अधिक प्रमाणात लाळ गळणे, सूज, कृषता, दौर्बल्य, अपचन, उदररोग, कुष्ठ, ताप, डोळ्यांचे विकार, जखम झाली असल्यास, मधुमेह (डायबीटीस नाही) .

* वाग्भटांनी निरोगी माणसानेही ग्रीष्म व शरद ऋतु सोडून अधिक प्रमाणात पाणी पिऊ नये असे सांगितले आहे. नाहीतर वरील रोग उद्भवू शकतात.

* ह्यामुळेच सकाळी उठुन उपाशी पोटी भरपूर पाणी पिणे व त्याच्यात हि मध आणि लिंबू पिळून पिणे हे आयुर्वेदाला मुळीच मान्य नाही.

* तसेच बाहेरून आल्यावर हृदय गती स्थिर होई पर्यंत व शरीराचे तापमान सामान्य होई पर्यंत पाणी पिऊ नये.
* पाणी एकदम पिऊ नये. शांतपणे एक एक घोट प्यावे.

* अत्यम्बुपानात न विपच्यते अन्न निराम्बुपानाच्च स एव दोष:।
तस्मात नरो बहनीविवर्धनाय मुहूर्मुर्वारी पिबेदभुरि।।

अतिशय पाणी पिण्याने अन्नाचे पचन नीट होत नाही, पाणी मुळीच न पिण्याने दोष निर्माण होतो. म्हणून थोडे थोडे पाणी वारंवार प्यावे (तहान लागली तरच) .

पाण्याला तसेच जीवनालाही नियम लावणारा असा हा आयुर्वेद आहे.
भेटु पुढील लेखात तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे।।

डॉ शार्दुल चव्हाण

– लेखन : प्रा वैद्य शार्दुल चव्हाण. एम. डी. आयुर्वेद
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments