Sunday, June 29, 2025
Homeलेखआयुष्यातले सांगाती

आयुष्यातले सांगाती

“श्रीपाद सहस्रभोजने”

नागपूर येथील जेष्ठ माध्यमकर्मी श्री अविनाश पाठक हे त्यांना भेटलेल्या विविध व्यक्तींवर लिहित आहेत. आतापर्यंत त्यांनी पी.व्ही.नरसिंहराव, विद्याधर गोखले, डॉ. विश्वास मेहंदळे, सुधीर गाडगीळ, नीला उपाध्ये, मनोहर जोशी, नानासाहेब मिराशी, डॉ. उदय निरगुडकर, डॉ. मोहन भागवत यांच्यावर लिहिले आहे.
आजचा दहावा लेख त्यांनी कै.श्री श्रीपाद सहस्रभोजने यांच्यावर लिहिला आहे. अतिशय हृद्य असलेल्या या लेखात नोकरीत असताना आणि नोकरीतून निवृत्त झाल्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी कसे वागले पाहिजे, याचा आदर्श वस्तुपाठ आपल्याला पहायला मिळतो.
सहस्रभोजने साहेबांना विनम्र अभिवादन.
— संपादक

महाराष्ट्राच्या राजकीय जगतात, प्रशासनात आणि माध्यम जगतात गेल्या पिढीतल्या मंडळींना श्रीपाद सहस्रभोजने हे नाव चांगलेच परिचित असेल. तसेच संघ परिवारात देखील हे नाव तितकेच परिचित आहे.

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे अतिरिक्त मुख्य संचालक म्हणून निवृत्त झालेले सहस्रभोजने काका आपल्या शासकीय सेवेच्या काळात एक, दोन नाही तर चार मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. उच्च पदावरून निवृत्त झाल्यावर अगदी साधेपणाने आयुष्य जगणारे हे व्यक्तिमत्व अखेरच्या श्वासापर्यंत सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत राहिले. त्यामुळेच आज त्यांना जाऊन दोन वर्षाहून अधिक काळ लोटला तरी त्यांची आठवण करणारे माझ्यासारखे अनेक लोक आहेत.

अशा या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा आणि माझा थोडा थोडा नाही तर तब्बल ४६ वर्षांचा स्नेहबंध होता. हा मी माझ्या आयुष्यातला एक भाग्ययोगच समजतो. आजही सर्वसाधारणपणे सरकारी नोकरीत उच्च पदावर पोहोचलेल्या व्यक्तीचे मित्र कमी आणि शत्रूच जास्त झालेले दिसतात. मात्र श्रीपाद सहस्रभोजनेंनी सर्व मित्रच जोडले होते आणि शेवटपर्यंत त्यांनी ते मैत्र जपले देखील.

माझा आणि श्रीपाद सहस्रभोजने यांचा संबंध आला तो १९७७ मध्ये. त्यावेळी मी जेमतेल २२ वर्षाचा होतो. त्यावेळी सहस्रभोजने माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयात उपसंचालक पदावर कार्यरत होते. तेव्हा ते वांद्रा रेक्लमेशनला राहायला आले होते. त्यावेळी मी नुकताच मुंबई दूरदर्शन ला नागपुरचा वृत्त छायाचित्रकार म्हणून कंत्राटी पद्धतीवर रुजू झालो होतो. दूरदर्शन मध्ये त्यावेळी निर्माता या पदावर कार्यरत असलेले मनोहर पिंगळे हे आधी नागपुरात कॉलेजमध्ये माझे प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांचा माझा चांगला परिचय होता. पिंगळे सर काही कौटुंबिक अडचणीमुळे आपल्या मुलीसह आपले नातलग असलेल्या सहस्त्रभोजने यांच्यासमवेत राहत होते. एकदा मुंबईत गेलो असताना एका रविवारी पिंगळे सरांना भेटायला वांद्र्याच्या घरी गेलो. तिथेच माझी सहस्रभोजने यांची पहिली भेट झाली. त्यावेळी पिंगळे सरांची मुलगी मोना ही सहस्रभोजनेंना काका आणि सौ. वसुधा सहस्रभोजनेंना बेबीआत्या म्हणायची. म्हणून मी देखील त्यांना काका आणि आत्या म्हणू लागलो.

काका त्यावेळी महत्त्वाच्या पदावर कार्यरत असल्यामुळे सतत व्यस्त असायचे. त्यामुळे गेल्यावर ते समोर असले तरी “काय अविनाश कसा आहेस ?” इतकी जुजबी चौकशी करायचे आणि आपल्या कामात व्यस्त असायचे. फारसे कधी बोलणे व्हायचे नाही. मात्र एकदा १९७८ मध्ये रविवारच्या दुपारी त्यांच्या घरी गेलो, तेव्हा पिंगळे सर घरी नव्हते, आणि योगायोगाने काका मोकळे होते. नुकतेच ते तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांच्या भेटीनिमित्ताने नागपुरात येऊन गेले होते. त्या दिवशी फावल्या वेळात आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. मग एरवी कडक शिस्तीचा वाटणारा हा अधिकारी चांगलाच मोकळा आहे हे त्या दिवशी लक्षात आले.

नंतर कालांतराने हळूहळू भेटी वाढत गेल्या. १९८० च्या डिसेंबर महिन्यात काका तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांचे जनसंपर्क अधिकारी झाले. मग त्यांचा आणि माझा नियमित संपर्क येऊ लागला. मला आठवते एकदा अंतुलेंची यवतमाळ जिल्ह्यात भेट होती. त्याचे चित्रीकरण करण्यासाठी मी दिवसभर दौऱ्यात होतो. काका देखील सोबत होते एक उच्चपदस्थ अधिकारी असून देखील माझ्यासारख्या नवख्या छायाचित्रकाराला त्यांनी आपले पद प्रतिष्ठा विसरून केलेली मदत मला आजही लक्षात आहे.

अशाप्रकारे योग्य ती मदत करून आपल्या लहानात लहान सहका-याकडून काम यशस्वीरित्या करून घ्यायचे ही काकांची हातोटी होती. १९८१ च्या ऑक्टोबर महिन्यात अंतुलेंची चंद्रपूरात भेट होती. त्या भेटीचे चित्रीकरण करण्यासाठी मी चंद्रपूरला गेलो होतो. काका देखील सोबत होते. विमानतळापासून तर सभास्थानापर्यंत उघड्या जीपवरून भव्य मिरवणूक निघाली. त्यांच्याच पुढे एका उघड्या जीपवर छायाचित्रकारांना उभे राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र त्या जीपच्या मागच्या बाजूला आधारासाठी कठडे नव्हते. त्यामुळे जीप चालू लागली की चित्रीकरण करणाऱ्या छायाचित्रकाराचा तोल जायचा आणि कॅमेरा सकट खाली पडण्याची भीती असायची. तिथे काका माझ्या सोबतीला आले आणि त्यांनी सांगितले की तू काळजी करू नकोस मी तुला पकडून बसतो. मग जीपच्या मागच्या बाजूच्या कठड्यावर बसून पूर्ण वेळ काका माझ्या कंबरेला पकडून बसले होते. त्यामुळे त्या दिवशीचे चित्रीकरण मला नेटके करता आले.

सहस्रभोजने काका बालवयापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. संघाची शिस्त आणि तत्व त्यांच्या अगदी रक्तात भिनले होते. त्यामुळे सरकारी नोकरीत उच्च पदावर असले तरी खाजगी कामासाठी सरकारी सोयी सवलती वापरायच्या नाहीत हे त्यांचे तत्व होते. अंतुलेंचा कार्यकाळ संपल्यावर काका काही का काळ बाबासाहेब भोसले यांचे जनसंपर्क अधिकारी होते. त्याच काळात अतिरिक्त मुख्य संचालक, माहिती व जनसंपर्क म्हणून ते पदोन्नत झाले. त्याच काळात एकदा ते रजेवर नागपुरात आले होते. एक दिवस दुपारी मी स्कूटरने कुठेतरी जात असताना काका सायकलने जाताना दिसले. ते बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी त्यांच्याजवळ जात स्कूटर स्लो केली आणि विचारले, “काका तुम्ही आज सायकलने कसे काय ?” तर काका उत्तरले, “अरे मी रजेवर आलो आहे, मग सरकारी गाडी कशाला वापरायची, म्हणून मी भाड्याची सायकल घेऊन फिरतो आहे.” मी त्यांना म्हटले “काका मला फोन करायचा, मी स्कूटर घेऊन आलो असतो.” तर काका लगेच उत्तर देते झाले, “तुझ्या मागे तुझी कामं असतात, तुला कशाला माझ्यामागे फिरवायचे, मला सायकलच आवडते,” त्यांच्या या उत्तरावर मला काहीच बोलणे सुचले नाही.

१९८४ मध्ये काका सरकारी नोकरीतून निवृत्त झाले. त्यावेळी मग विदर्भातील एक दोन इंग्रजी वृत्तपत्रांना त्यांनी मुंबईहून बातम्या द्यायला सुरुवात केली. त्याच काळात अमरावतीच्या दाजीसाहेब पटवर्धन यांच्या तपोवन चळवळीचे ते मानससेवी जनसंपर्क अधिकारी म्हणून मुंबईत कार्यरत झाले. त्याच काळात त्यांनी मुंबईतल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करायला सुरुवात केली. अर्थात ही सेवा ते विनामूल्य देत होते. त्यासाठी वांद्र्याहून मंत्रालयात जाण्यासाठी बस किंवा रेल्वे तिकिटाचा खर्चही ते स्वतःच्या खिशातूनच करायचे. हे काम त्यांनी बरीच वर्षे केले.

याच काळात पिंगळे सरांनी सहस्त्रभोजनेंच्या बाजूला त्याच इमारतीत दुसरा एक फ्लॅट घेतला होता. मग मुंबईला कामाने गेलो की ते त्या फ्लॅटवरच उतरायचा आग्रह करायचे. कधी कधी मी तिथे थांबायचो देखील. त्या फ्लॅटवर थांबलो तरी सकाळच्या चहाला आणि जेवणाला तिकडे आमच्याकडे ये असा काकांचा आग्रह असायचा. मग जेवताना गप्पा व्हायच्या. बरेच जुने किस्से ते सांगायचे.

मी त्यांच्याकडे कधी मधेच उतरायचो. मात्र त्यांनी अनेकांना मुंबईत आल्यावर त्यांच्या घरी आधार दिला होता. त्यामुळे असे अनेक स्नेही जोडून त्यांचे कुटुंब चांगलेच विस्तारलेले होते. आधी सांगितल्याप्रमाणे पिंगळे सर बरीच वर्षे मुंबईत यांच्यासोबतच राहत होते. सरांची मुलगी मोना हिला आपल्या मुलीप्रमाणेच वाढवून तिच्या लग्नात तर काका आणि आत्यांनी पुढाकार घेतला होताच, पण नंतर अखेरपर्यंत मोनाचे माहेरपण देखील या पती-पत्नींनी तेवढ्याच प्रेमाने केले.

सतत विनोद करून वातावरण हस्ते खेळते कसे ठेवायचे याचे शास्त्र काकांना चांगलेच अवगत होते. १९९० मध्ये माझे लग्न झाले. नंतर १९९१ च्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात मी पत्नी अनुरूपासह मुंबईला गेलो होतो. एक दिवस सकाळी सहस्रभोजनेंकडे येतो आहे असे मी फोन करून कळवले. त्या दिवशी ठरल्या वेळेवर आम्ही उभयता त्यांच्या घरी पोहोचलो. थोड्याच वेळात डायनिंग टेबलवर पाने मांडली आणि आम्ही सर्वच जेवायला बसलो. जेवता जेवता काका सांगायला लागले “अविनाश आज सकाळी वसुधाचा (बेबीआत्या) स्वयंपाकात विशेष बेत दिसला म्हणून मी विचारले, तर ती म्हणाली की आज अविनाश जेवायला येतो आहे. मग मी म्हटले की अविनाश तर नेहमीचच आहे, त्याच्यासाठी विशेष बेत कशाला ? तेव्हा मला उत्तर मिळाले, अहो आज अविनाश एकटा नाही तर बायकोला सोबत घेऊन येतो आहे, ती आपल्याकडे पहिल्यांदाच येते आहे, मग वेगळा बेत नको का करायला ? असे सांगत काका मला म्हणाले, बघ लग्न झालं की सर्व असं विशेष लक्ष द्यायला लागतात” त्यावर सर्वांनाच हसू आवरले नाही. यावेळी गप्पांच्या दरम्यान अनुरूपाला काकांनी विचारले, “तुझे नागपुरात शिक्षण कुठे झाले, आणि तुझे गाव मोहपा, तर तू कुठे राहून शिकलीस?” त्यावर तिने सांगितले की मी एल.एडी कॉलेजच्या होस्टेलवर राहुन एल.एडी कॉलेजमध्येच शिकली. तर लगेचच काका म्हणाले “तरीच त्या काळात अविनाश सारखा एल.एडी कॉलेज कडे चकरा मारताना दिसायचा. आम्हाला आम्हाला मात्र उगाचच वाटत राहिलं की याने आई-बाबांनी पाहून गेलेल्या मुलीशीच लग्न केलं आहे.” त्यावरही तिथे एकच हशा पिकला होता.

१९९२-९३ च्या दरम्यान काकांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि नागपुरातच असलेल्या त्यांच्या एका प्लॉटवर घर बांधून तिथे राहायला आले. मग त्यांच्याकडे माझे नियमित जाणे येणे सुरू झाले. नागपूरला आल्यावर काकांचे पुन्हा सायकलने फिरणे सुरू झाले. अनेकदा कुठेतरी सायकलने जाताना काका दिसायचे. सगळीकडे ते सायकलनेच फिरायचे. या काळात त्यांनी संन्यस्त वृत्तीने राहायला सुरुवात केली. फुल पॅन्ट शर्ट सोडून धोतराची एक लुंगी आणि अंगात एक साधी बंडी अशा पेहरावात ते राहू लागले. त्यांनी दाढी आणि केसही वाढवून घेतले होते. त्यामुळे ते एक संन्यासीच वाटायचे.

या काळात मी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असे. काकांना कधीही बोलावले तर त्या कार्यक्रमाला ते उभयता उपस्थित राहायचे. कार्यक्रम संपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी काकांचा फोन ठरलेला असायचा. कार्यक्रमाचे छान आयोजन केल्याबद्दल आवर्जून कौतुक करायला काका कधीही चुकायचे नाहीत. माझ्या मुलीच्या बारशाला, नव्या घराच्या वास्तूला देखील ते आवर्जून आले होते. या काळात दरवर्षी एक दिवाळी अंक प्रकाशित करत असे. काकांच्या सरकारी नोकरीतल्या विविध अनुभवावर मी त्यांना दरवर्षी एक लेख मागत असे. काका देखील आवडीने मला लेख द्यायचे. त्यानंतर दिवाळी अंक मिळाला की त्यांचा कौतुकाचा फोन येत असे. माझ्या घरी हिंदुस्तान समाचार वृत्तसंस्थेचे कार्यालय सुरू झाले. त्याच्या उद्घाटनाला देखील काकांनाच बोलावले होते. त्यांच्या हस्तेच उद्घाटन केले. माझ्या घरी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात देवीला महालक्ष्मीला श्री सूक्ताची १६ आवर्तने करून अभिषेक केला जातो. एका वर्षी काकांना सहपरिवार मेहुण म्हणून बोलावले होते. त्या दिवशी काका आधीच श्री सूक्ताची आवर्तने ऐकायलाच येऊन थांबले होते.

नागपूरच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पूर्वी गांधी जयंतीला काही मान्यवर ज्येष्ठांचा सत्कार करण्याची पद्धत होती एका वर्षी काकांचाही सत्कार होणार होता. त्यासाठी एक स्मरणिकाही तयार होणार होती. त्या स्मरणिकेची मुलाखत घेण्यासाठी एक तरुण पत्रकार मला सोबत घेऊन काकांकडे गेला. त्यावेळी आपण जिथे जिथे नोकरी केली तिथे कोणताही अर्ज न करता आपल्याला नोकरीवर घेतले होते अशी माहिती काकांनी सांगितली होती. आपल्या भिडस्त स्वभावानुसार काका हा सत्कार स्वीकारायला तयार नव्हते. शेवटी मीच खूप आग्रह केला तेव्हा ते तयार झाले. माझ्या गाभाऱ्यातला कवडसा या पुस्तकात काकांचे एक कनिष्ठ सहकारी शरद चौधरी यांनी अडचणीच्या काळात सहस्रभोजने साहेब कशी मदत करायचे त्याची एक सांगितलेली आठवण मी लिहिली होती. ते पुस्तक मी काकांना नेऊन दिले तेव्हा “तू नको त्या गोष्टी कशाला जाहीर करतोस” म्हणून मला रागवले देखील होते.

काकांचा मुलगा हर्षद मुंबईत असतो. तर मुलगी सौदी अरेबियात. त्यावेळी हे दोघेही इथे त्यांच्या रवींद्र नगरच्या घरी एकटेच राहायचे. अधून मधून मी चक्कर मारत असे. २०२० मध्ये कोरोना काळात लॉक डाऊन सुरू झाले. जवळजवळ सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. कुणाला कामाशिवाय बाहेर फिरायलाही बंदी होती. सुदैवाने पत्रकार म्हणून माझ्याकडे राज्य शासनाचे अधिस्वीकृती पत्र होते. त्यामुळे मीम कुठेही मोकळेपणे फिरू शकत होतो. दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी मी सहस्त्रभोजनेंकडे गेलो आणि काही अडचण असली तर मला कळवा म्हणून सांगितले. त्यावेळी काकांनी तक्रार केली की सध्या वृत्तपत्र मिळणे बंद झाले आहे. त्यावर काही उपाय करू शकत असल्यास सांग. मी त्यांना सोशल मीडियावर सर्व वृत्तपत्रांच्या लिंक्स येतात असे सांगितले. त्यावेळी माझ्याकडे तर काही येत नाही आणि आल्या तरी त्या उघडायच्या कशा आणि वाचायचे कसे हे मला माहीत नाही, असे त्यांनी उत्तर दिले. मग मी माझ्याकडे येणाऱ्या एक दोन लिंक्स त्यांच्याकडे पाठवल्या आणि त्यांच्याच मोबाईलवर त्यांना त्या उघडून दाखवल्या. त्यांना त्या वाचणे देखील जमले. मग दुसऱ्या दिवशीपासून माझ्या व्हाट्सअप वर येणाऱ्या सर्व वृत्तपत्रांच्या लिंक्स मी त्यांना पाठवायला सुरुवात केली. त्यामुळे सर्वच वृत्तपत्रे त्यांना घरबसल्या वाचायला मिळू लागली. सुमारे दहा-बारा दिवसांनी पुन्हा वृत्तपत्रे घरी यायला सुरुवात झाल्यावर एक दिवस काकांचा फोन आला. “अविनाश रोज सकाळी नियमाने सर्व देशातली वृत्तपत्रे घरपोच देणारा इतका चांगला पेपर वाला मी आजवर बघितला नाही. आता या पेपरचे बिल न्यायला तू कधी येतो, आणि किती झालं तेही सांग.” असं त्यांनी म्हणताच मी फक्त तुमच्या घरचा बेबीआत्यांच्या हातचा एक कप चहा असे सांगताच ते खळाळून हसले होते.

कोरोना पिरियड संपला आणि नेमकी त्याच दरम्यान काकांची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. त्यांनी नव्वदी कधीच पार केली होती. त्यामुळे वयानुसार येणाऱ्या व्याधी त्यांच्या मागे लागल्या होत्या. तरीही त्या काळात नियमित वर्तमानपत्र वाचन आणि फोनचा संपर्क सुरूच होता. एप्रिल २०२२ मध्ये अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांताचा कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड झाल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले. ते वाचून काकांचा मला आवर्जून फोन आला होता आणि मी त्यांना भेटायला देखील गेलो होतो. नंतरही अधून मधून माझी चक्कर व्हायची.

माझ्या आठवणीनुसार मी त्यांना शेवटचा २०२२ च्या दिवाळीनंतर भेटलो होतो. नंतर कामाच्या व्यस्ततेत काकांकडे जायला वेळ झाला नाही, आणि अचानक २०२३ फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एका संध्याकाळी काका गेल्याचीच बातमी कळली. ९४ वर्षाचे यशस्वी आयुष्यमान पूर्ण करून त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली होती.

प्रशासनातील सर्वोच्च पदावर राहून तसेच चार दिग्गज मुख्यमंत्र्यांसोबत जवळून काम करण्याची संधी मिळून सुद्धा हा माणूस शेवटपर्यंत साधाच होता. अत्यंत साधेपणाने आयुष्य जगत त्याने फक्त माणसं जोडली. त्या जोडलेल्या असंख्य माणसांपैकी मी देखील एक होतो, याचा आनंद मला आयुष्यभर पुरणार आहे.

अविनाश पाठक

— लेखन : अविनाश पाठक. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील
अविनाश ब.हळबे. on अष्टपैलू सुचिता पाटील